मोदीजी खोटं बोलले ; म. गांधी तर पिक्चर येण्यापूर्वी जगप्रसिद्ध होते | हे आहेत ७ पुरावे..
सध्या सगळ्यात जास्त चर्चा कोणत्या विषयाची चालू असेल तर ती काश्मीर फाईल्स या पिक्चरची. साक्षात पंतप्रधानांनी या तारीफ केल्यानंतर काश्मीर फाइल्स अजूनच चर्चेत आला. मोदींनी पिक्चरचं तोंड भरून कौतुक केलं.
कश्मिरी पंडितांच्या अत्याचाराचं सत्य इतक्या दिवस दाबून ठेवण्यात आलं होतं ते काश्मीर फाईल्सच्या माध्यमातून बाहेर आलं असं मोदी म्हणाले.
मात्र बोलता बोलता त्यांनी रेफेरंस दिला १९८२ च्या रिचर्ड अटेनबरो यांच्या ‘गांधी’ या पिक्चरचा.
जग क्वचितच गांधींचा उल्लेख करायचं. जर तेव्हा कोणी गांधींचे जीवन (चित्रपटात) चित्रित केले असते तर कदाचित आपण त्यांचा संदेश पोहोचवू शकलो असतो…….
शेवटी देशा बाहेरच्या एका इंग्रजी चित्रपट निर्मात्याने गांधींवर चित्रपट बनवला आणि चित्रपटाने अनेक पुरस्कार जिंकले तेव्हाच जगाला गांधी नावाच्या व्यक्तीची ओळख झाली
असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
पण पंतप्रधानच्या या दाव्यात थोडा घोळ आहे. पंतप्रधान म्हणतायेत तसं गांधींवरचा पिक्चर एका बाहेरच्या माणसाने बनवला आणि त्याला पुरस्कार मिळाला का?
तर हो…..
दिवंगत इंग्लिश चित्रपट निर्माते रिचर्ड अॅटनबरो यांनी १९८२ मध्ये ‘गांधी’ हा महात्मा गांधींचा बायोग्राफिकल चित्रपट बनवला.
‘गांधी’ या चित्रपटाने आठ ऑस्कर जिंकले आणि ११ नामांकनं मिळवली होती
या चित्रपटात महात्मा गांधीची भूमिका करणाऱ्या बेन किन्सले यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. याशिवाय, सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट अभिनेता, सर्वोत्कृष्ट पटकथा, सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी असे पुरस्कारही या चित्रपटाला मिळाले होते.
चित्रपटाला केवळ राष्ट्रीयच नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही सकारात्मक प्रतिसाद मिळाला. न्यूजवीक, द वॉशिंग्टन पोस्ट, द पब्लिक हिस्टोरिअन, क्रॉस करंट्स, द जर्नल ऑफ एशियन स्टडीज, फिल्म क्वार्टरली, इत्यादी पेपरमध्ये गांधी पिक्चरचे रिव्हिव्ह छापून आले होते.
पण हे झालं अर्धसत्य ..
रिचर्ड अॅटनबरो यांनी १९८२ ‘गांधी’ बनवायच्या आधी १९५२ मध्येच नेहरू गांधींवरील चित्रपटासाठी प्रयत्नशील होते.
हंगेरियन चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक गॅब्रिएल पास्कल यांनी महात्मा गांधींच्या जीवनावरील चित्रपटाची निर्मिती करण्यासाठी तत्कालीन भारताचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याशी करार केला होता. मात्र १९५४ मध्ये पास्कलचे निधन झाले आणि चित्रपट बनू शकला नाही.
गांधी हा चित्रपट बनवायला रिचर्ड अॅटनबरो यांना अठरा वर्ष लागली होती. टाइम्स ऑफ इंडियाच्या माहिती नुसार पिक्चर बनवण्याच्या सुरवातीच्या काळात रिचर्ड अॅटनबरो यांनी भारताचे तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि त्यांची कन्या इंदिरा गांधी यांची भेट घेतली.
नेहरूंनी स्पष्टपणे या चित्रपटाला आपला होकार कळवला होता आणि पिक्चरच्या निर्मितीसाठी मदत करण्याचे आश्वासन दिले होते.
याचबरोबर पंतप्रधान यांनी गांधींचं पात्र कसं दाखवण्यात यावं यावर काही सूचनाही केल्या होत्या आणि त्या सूचना अॅटनबरो यांनी चित्रपटात पण उतरवल्या होत्या असं त्यांनीच मान्य केलं आहे. परंतु १९६४ मध्येच नेहरू यांचा मृत्यू झाला.
शेवटी जेव्हा हा चित्रपट तयार झाला तेव्हा अॅटनबरो यांनी तो माउंटबॅटन आणि नेहरूंच्या स्मृतीला समर्पित केला होता
इंदिरा गांधींनी लावलेल्या इमर्जंसीमुळे पुढे ढकलावा लागल्यानंतर १९८० मध्ये चित्रपटाच्या शूटिंगला सुरवात झाली.
तेव्हा चित्रपटाच्या सह-निर्मात्या राणी दुबे यांनी इंदिरा गांधीं यांना राजी करून नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या भारत सरकारच्या संस्थेकडून १० दशलक्ष डॉलरची मदत मिळवली होती.
एवढच नाही तर कुमार शहानी, मुझफ्फर अली, बासू चटर्जी, एमएस सथ्यू, गिरीश कर्नाड आणि सईद मिर्झा यांच्यासह २० हून अधिक प्रसिद्ध भारतीय चित्रपट निर्मात्यांनी गांधी चित्रपटाला वित्तपुरवठा करण्याच्या सरकारी निर्णयावर टीका करणारे पत्र तत्कालीन I&B मंत्री यांना लिहिले होते.
म्हणजे तत्कालीन भारत सरकारनं तसं गांधींवरील चित्रपट बनवण्यसाठी प्रयत्नशील होतं आणि जेव्हा तो बनला त्यात पैसा पण लावला होता.
आता आपला मेन मुद्दा या पिक्चरच्या आधी गांधी जगातल्या लोकांना माहित नव्हते का?
तर इतिहासात जे पुरावे भेटता त्यानुसार पिक्चर येण्याच्या कित्येक वर्षे आधीच गांधी जगभरात फेमस होते. अनेक मोठ्या लोकांनी गांधींचा उल्लेख केला होता. त्याचे पुरावे आपण एक एक करून पाहू.
१
१९३० मध्ये गांधींनी काढलेल्या दांडी मार्चने आणि त्यांनतर केलेल्या मिठाच्या सत्याग्रहाने इंग्रज सरकारचे धाबे दणाणले होते त्याची नोंद जगभरतल्या वृत्तपत्रांनी घेतली होती.
गांधींनी कायदा धुडकावत लावत मीठ बनवलं अशी हेडलाइन्स न्यूयॉर्क टाइम्सनं हेडलाईन छापली होती. त्याचबरोबर अमेरिकेतल्या लोकांनी भारताच्या स्वातंत्र्य लढ्याला पाठिंबा यासाठी महात्मांनी केलेल्या अपीलला पण न्यूयॉर्क टाइम्सनं छापून आणलं होतं.
२
१९३१ ला तर गांधी टाइम्स या वर्ल्ड फेमस मॅगझिनच्या कव्हर पेज वॉर झळकले होते. त्याचबरोबर त्यांची टाइम्सच्या त्या वर्षीच्या पर्सन ऑफ दि इयर म्हणूनही निवड झाली होती.
३
गांधींच्या कार्याचा जगभर आदर केला जात होता. अनेक बडे असामी गांधींबद्दल गौरवउद्गार काढत असत. त्यापैकी एक होते जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ अल्बर्ट आईन्स्टाईन.
गांधींसारख्या माणूस या कधीकाळी पृथ्वीतलावर होता याचा पुढच्या पिढीला विश्वास बसणार नाही असं आईन्स्टाईन म्हणाले होते. प्रिन्स्टनमध्ये असताना त्यांनी आपल्या भिंतीवर गांधीजींचे चित्र लावले होते.
४
मोदींनी ज्यांच्या उल्लेख आपल्या भाषणात उल्लेख केला ते अमेरिकेचे कृष्णवर्णीयांचे नेते मार्टिन ल्युथर किंग यांनीही अनेकदा जाहीररीत्या गांधींचा उल्लेख केला होता. मार्टिन ल्यूथर किंग ज्युनियर यांनी गांधींना आपला गाइडिंग लाइट म्हटलं होतं.
५
एवढंच नाही तर जेव्हा गांधींची हत्या झाली तेव्हा जगभरतल्या अनेक वृत्तपत्रांची हेडलाइन गांधी हत्या हीच होती.
६
गांधींच्या हत्येनंतर अनेक सरकारांनी गांधींच्या स्मृती जपण्यासाठी वेगवेगळे उपक्रम घेतले होते. गांधींच्या स्मृतीप्रित्यर्थ अमेरिकेने १९६१ मध्येच चॅम्पियन ऑफ लिबर्टी या सिरीजच्या अंतर्गत गांधींचे स्टॅम्प्स काढले होते.
अगदी दूर आफ्रिकेतल्या देशांनी पण गांधी विचाराच्या स्मृती जपण्यासाठी स्टॅम्प छापले होते. कॉंगो देशाने १९६९ मधेच गांधींचे स्टॅम्प आणले होते.
७
लंडनमधील टॅविस्टॉक स्क्वेअरच्या मध्यभागी असलेल्या आज जो गांधींचा पुतळा आहे त्याचे अनावरण १९६८ मध्येच करण्यात आले होते. आज तो पुतळा इंग्लंडच्या राष्ट्रीय वारसा यादीत समाविष्ट आहे.
आता एवढे सगळे पुरावे बघितल्यवर आपल्याला सहज कळून येतंय की महात्मा गांधी १९८२ चा त्यांच्यावरील पिक्चर येयच्या आधीच जगभर फेमस होते. त्यामुळे आपण जास्तीत जास्त एवढं म्हणू शकतो ‘गांधी ‘ पिक्चरनं पुन्हा एकदा लोकांच्या गांधीनाबद्दलच्या आठवणी जागा केल्या.
बाकी आता एवढं सगळं सांगूनही तुमचं काय वेगळं मत असेल तर आम्हला ते खाली कमेंट करून जरूर सांगा.
हे ही वाच भिडू
- सुरवात गांधींपासून करणारा आप सत्तेसाठी आंबेडकर आणि भगत सिंग यांच्याकडे वळला का?
- महात्मा गांधीजींचे ते तीन मारेकरी : सत्तर वर्षे झाली आज ही मोकाट आहेत.
- महात्मा गांधींच्या उपचारासाठी डॉ. बिधानचंद्र रॉय कोलकात्यावरून थेट पुण्यात आले होते