ग्यानी झैलसिंग यांचा मृत्यू अपघातात झाला कि घातपातामध्ये ?
दिवंगत राष्ट्रपती ग्यानी झैलसिंग यांचे नातू इंदरजीतसिंग यांनी नुकताच भाजप पक्षात प्रवेश केला.
इंदरजीतसिंग हे रामगढिया शीख समाजाचे आहेत या जातीचा इतर मागासवर्गीयांमध्ये म्हणजेच ओबीसीमध्ये समावेश आहे. पंजाब राज्याच्या दोआबा आणि माझा या पट्ट्यात या जातीची लोकसंख्या असल्याचे म्हणले जाते. त्यामुळे अवघ्या काहीच महिन्यांवर येऊन ठेपलेल्या पंजाब विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने इंदरजीतसिंग यांचा हा भाजप पक्ष प्रवेश फार महत्त्वाचा मानला जातोय.
पण… त्यांचा हा भाजप प्रवेश गाजला तो एका खळबळजनक वक्तव्यामुळे…
आपल्या आजोबांचा अपघात होता कि घडवून आणलेला घातपात होता याबद्दल सांगू शकत नाही. असं बोलून त्यांनी राजकीय वर्तुळात चालणाऱ्या उलट सुलट चर्चांना आणि होऊ पाहणाऱ्या आरोपांना खतपाणी घातलं आहे.
इंदरजीतसिंग यांनी भाजपमधील प्रवेशानंतर प्रसार माध्यमांसोबत संवाद साधतांना, असं म्हणलं आहे कि, आज माझ्या आजोबांची इच्छा पूर्ण झाली आहे. त्यांची इच्छा होती कि, मी भाजपमध्ये जावे असे त्यांना वाटत होते. त्यांनी स्वतःच्या पक्षाच्या बाबतीत निष्ठा दाखवूनही त्यांच्याबाबत काँग्रेसने काय केले सर्वांनाच ठाऊक असं म्हणत त्यांनी अपघाताबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण केलंय.
त्याकाळी माझ्या आजोबांनी माझी अटल बिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी यांच्याशी ओळख करून दिली होती. तसच मदनलाल खुराणा यांच्या काळात मी भाजपचा प्रचार केला होता. माझ्या भाजप प्रवेशाने माझ्या आजोबांचं म्हणजेच ग्यानी झैलसिंग याचं स्वप्न साकार झालं आहे.
पण त्यांनी केलेल्या घातपाताच्या संशयात किती तथ्य आहे ?
झैलसिंग १९८२ ते १९७७ दरम्यान राष्ट्रपती होते. त्यांच्या कारकिर्दीत अनेक मोठ्या वादग्रस्त घटना घडल्या होत्या. स्वर्ण मंदिरातली लष्करी कारवाई असेल वा तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांची हत्या आणि त्यानंतर दिल्लीत शिखांविरुद्ध उसळलेली दंगल अशा वादग्रस्त घटनांची साखळी घडली होती.
आणि त्याच नंतर १९९४ च्या २९ नोव्हेंबर रोजी झैलसिंग यांचे अपघाती निधन झाले.
झैलसिंग यांचे वय तेंव्हा ७८ होते. रोपर जवळील किरतपुर साहिबजवळ चुकीच्या दिशेने येणाऱ्या मालवाहणाऱ्या ट्रकने झैलसिंग हे प्रवास करत असलेल्या मोटारीला धडक दिली. या जबरदस्त अपघात मध्ये झैलसिंग यांना गंभीर दुखापत झाली. चंदीगड मधील रुग्णालयात दाखल करण्यात आले पण ते वाचवू शकले नव्हते.
ते तब्बल २५ दिवस त्यांच्यावर उपचार चालू होते. शेवटी २५ डिसेंबर रोजी ख्रिसमसच्या दिवशी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. भारत सरकारने त्यांच्या मृत्यूनंतर सात दिवसांचा अधिकृत शोक जाहीर केला होता. त्यांच्यावर दिल्लीतील राज घाट स्मारकात अंत्यसंस्कार करण्यात आले होते.
उत्तरेकडील पंजाब राज्यातील अधिकाऱ्यांनी या अपघाताचा तपास केला होता मात्र त्यांच्या तपासात काही निष्पन्न झालं नाही.
स्वातंत्र्यानंतर देशाच्या अनेक मोठ्या उलथापालथींचे झैलसिंग हे साक्षीदार राहिले आहेत. सिंग यांची राष्ट्रपती पदासाठीची निवड तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी केली होती.
त्याच दरम्यान इंदिरा गांधी यांच्या आदेशावरून सुवर्ण मंदिरात सैन्य घुसवून ऑपरेशन ब्ल्यू स्टार अंतर्गत जनरैल सिंग भिंदरणवाले हा अतिरेकी मारला गेला. आणि याच मुद्द्यावरून ग्यानी झैलसिंग व इंदिरा गांधींच्या दरम्यान वादाची ठिणगी पडली, झैलसिंग यांच्यावर राजीनामा देण्याचा दबाव आणला गेला. पण त्या दबावाला झैलसिंग बळी पडले नव्हते.
परंतु सैन्याने मंदिरावर हल्ला केला तेव्हा झैलसिंग यांच्या अधिकृत भूमिकेमुळे त्यांच्यावर अनेकांनी टीका केली होती. बऱ्याच शिखांना वाटत होते कि, की झैलसिंग यांनी राजीनामा दिला पाहिजे.
त्यात भर म्हणजे त्यांनी अशा तणावग्रस्त परिस्थितीमध्ये सुवर्ण मंदिरात भेट दिली. सुरक्षा यंत्रणेचे म्हणणे होते की अशा परिस्थितीत त्यांनी सुवर्णमंदिरात भेट देणं सुरक्षित ठरणार नाही मात्र शीख समुदायावर विश्वास दाखवण्यासाठी त्यांनी हे पाऊल उचललं. मात्र त्यांच्या या भेटीदरम्यान त्यांच्यावर गोळी झाडली पण त्यातून ती सहीसलामत वाचले पण ती गोळी त्याच्या सुरक्षारक्षकांना लागली. आणि त्यांना माघारी परतावे लागले.
त्याच्या चार महिन्यांनंतर श्रीमती गांधींना दोन शीख अंगरक्षकांनी गोळ्या घालून हत्या केली होती. त्यानंतर नव्याने पंतप्रधान झालेले राजीव गांधी आणि राष्ट्रपती झैलसिंग यांच्यात बरेच वाद होते.
राजीव गांधी यांना संशय होता कि, झैलसिंग हे खलिस्तानी नेत्यांच्या संपर्कात आहेत.
माजी पंतप्रधान राजीव गांधी आणि भारताचे राष्ट्रपती झैलसिंग यांनी कधीही एकमेकांवर विश्वास दाखवला नाही.
पण दरम्यान झालेल्या शीख दंगलींच्या काळातच त्यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न झालेला त्यावरून काही तर्क वितर्क असेही लावले जातात कि, त्या कालावधीत घडलेल्या घटना आणि झैलसिंग यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे त्यांचा जीव गेला असावा.
हे हि वाच भिडू :
- राजीव गांधींवर गोळीबार सुरु झाला. पंतप्रधानांसोबत राष्ट्रपतींचेही प्राण पणाला लागले होते..
- बोफोर्सच्या आधी या घोटाळ्यामुळे बच्चनने राजीव गांधींना अडचणीत आणलं होतं..
- राजीव गांधींवर थेट राष्ट्रपतींचा फोन टॅपिंग केल्याचे आरोप झाले होते .