बाळासाहेबांनी मुंडेंना टिळा लावला आणि बजावलं, ‘भगवा आयुष्यभर सोडू नको’

बाळासाहेबांच्या व्यक्तिमत्वाचे संबंध महाराष्ट्रावर असणारे गारुड, त्यांच्यावर असलेली शिवसैनिकांची भक्ती, त्यांची अखंड टिकलेली लोकप्रियता हा कोणत्याही विश्लेषणापलीकडचा विषय आहे. राजकारणाच्या रणधुमाळीत राहूनही ते अजातशत्रू राहिले. विरोधकांवर देखील त्यांनी प्रेमच केलं.
आणि जे मित्र होते त्यांच्यासाठी तर बाळासाहेब आदी कोणत्याही टोकाला जाण्यासाठी तयार असायचे. त्यात राजकारणाचे कोणते हिशोब नसायचे. निष्पक्षपाती पणा कसा असावा, हे त्यांच्याकडून शिकावे !
असाच बाळासाहेबांच्या मनाच्या उमदेपणाचा किस्सा गोपीनाथ मुंडे यांनी सांगितला आहे.
१९८३-८४ ची गोष्ट असेल. गोपीनाथ मुंडे त्यावेळी राजकारणात नवीन होते. शिवसेना आणि मुंबईबद्दल त्यांच्या मनात एक वेगळे आकर्षण होते. त्यावेळी अजून शिवसेना आणि भाजपची युती व्हायची होती. प्रमोद महाजन हे गोपीनाथरावांचे मित्र राष्ट्रीय राजकारणात चमकू लागले होते.
महाजनांनीच शिवसेनेबरोबर भाजपची युती साकार करण्यास मोलाची भूमिका बजावली होती. बाळासाहेबांनी देखील अटल बिहारी वाजपेयी यांचे नेतृत्व मला आवडते असे सांगत या युतीला होकारभरला होता. विशेष म्हणजे मनोहर जोशी, सुधीर जोशी या आपल्या नेत्यांना त्यांनी कमळ चिन्हावर निवडणुकीसाठी उभे करण्याचा निर्णय घेतला.
स्वतःचा पक्ष असतानाही त्यांना एखादी गोष्ट भावली की त्यासाठी काहीही करायची त्यांची तयारी असायची. ……. अशावेळी पक्षबिक्ष ते बाजूला ठेवायचे !
१९९० सालच्या विधानसभा निवडणुकांवेळी त्यांनी महाराष्ट्राचा दौरा करताना तब्बल शंभर सभा घेतल्या. गोपीनाथ मुंडेंची इच्छा होती की बाळासाहेबांनी परळी येथे सभा घ्यावी. बाळासाहेब अहमदपूरला सभा घेण्यासाठी आले होते.
थोड्याशा अस्वस्थ झालेल्या गोपीनाथरावांनी थेट अहमदपूर गाठून त्यांना माझ्या मतदारसंघात सभा घ्या अशी विनंती केली.
खरे तर गंगाखेड कंधार येथे शिवसेनेच्या उमेदवारांच्या प्रचारसभा होत्या. बाळासाहेबांना तिकडे जायचे होते. तरी ते मुंडेंना म्हणाले,
संध्याकाळी ५ वाजता सभा लाव, मी येतो.
बाळासाहेबांनी होकार देताच मुंडे थोडे गांगरून गेले. त्यांना अपेक्षाच नव्हती की बाळासाहेब होकार देतील. शिवाय एवढ्या कमी वेळात माणसे येतील का ? अशी भीती मनात होती. पण तब्बल ३० हजार लोक एवढ्या कमी वेळेत तेथे आले.
५ वाजताची वेळ उलटून गेली. सात वाजले. अजून शिवसेनाप्रमुख पोहचले नव्हते. गोपीनाथरावांना देखील पुढच्या प्रचारासाठी जायचं होतं. बाळासाहेबांची सभा होईल की नाही याची खात्री कोणाला नव्हती. तेवढ्यात त्यांचा मुंडेंना निरोप आला.
उशीर होईल पण मी येतोय. तू प्रास्ताविक कर आणि पुढे प्रचारासाठी निघून जा.
आणि खरंच दिलेल्या शब्दाला जागत बाळासाहेब आले. त्यांची वाट बघत बसलेली जनता जागची हलली नव्हती. मुंडे साहेब सांगतात,
“ते साडेआठ वाजता सभेला आले आणि त्यांनी मैदान मारून माझ्या विजयाचा मार्ग मोकळा केला. दुसऱ्या पक्षाच्या कार्यकर्त्यासाठी झटणारा असा दुसरा नेता माझ्या तरी पाहण्यात नाही !”
पुढे १९९५ मध्ये जेव्हा युतीची सत्ता आली तेव्हा मुख्यमंत्रीपद शिवसेनेकडे आणि उपमुख्यमंत्रीपद भाजपकडे अशी वाटणी करण्यात आली होती.
मनोहर जोशी मुख्यमंत्री तर मुंडे उपमुख्यमंत्री झाले. गोपीनाथरावांना त्यासोबत महसूलमंत्रीपद हवे होते. युतीतील जागा वाटपानुसार महसूल भाजपकडे जाणार होते.
पण बाळासाहेबांनी जागावाटपात चक्क बदल केला. त्यांनी आपल्या वाट्याला आलेले गृहमंत्रीपद गोपीनाथ मुंडेंना दिले आणि सेनेच्या सुधीर जोशी यांच्यावर महसूलमंत्रीपदाची जबाबदारी सोपवली. तेव्हा त्यांनी गोपीनाथ मुंडेंना बजावून सांगतलं,
“गृहमंत्रीपदावर तुझ्यासारखा आक्रमक व कणखर माणूस हवा. मुंबईतील गुन्हेगारीशी मुकाबला करायचा असेल तर तूच त्या जागी पाहिजे.”
बाळासाहेब दिलेल्या शब्दाला जागणारे होते. आपल्या पक्षाच्या फायद्या तोट्याची गणिते न करता त्यांनी मराठी माणसाचा फायदा कशात आहे याचाच विचार केला.
गोपीनाथ मुंडे सांगतात की एकदा भाजपमध्ये त्यांचा वैयक्तिक संघर्ष सुरु होता. त्यांची मनःस्थिती ढासळली होती. काय करावे हे सुचत नव्हते ! अखेर ते मातोश्रीवर गेले. बाळासाहेब आणि उद्धव ठाकरे यांची भेट झाली. तेव्हा बाळासाहेब त्यांना त्यांच्या वैयक्तिक रूममध्ये घेऊन गेले. सर्वप्रथम त्यांनी तिथल्या गणपतीला नमस्कार करायला लावला आणि तिथला भगवा टिळा त्यांच्या डोक्यावर लावला.
शिवसेनाप्रमुख मुंडेंना म्हणाले,
“भगवा आयष्यभर सोडू नकोस. माझा गणपती आणि माझे आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी राहतील. “
गोपीनाथ मुंडे सांगतात की त्यांच्या या बोलण्याने माझे सैरभैर झालेले मन पूर्णपणे शांत झाले. समोरच्याची मनःस्थिती जाणून घेऊन त्यामधून त्याचा मार्ग काढण्याची त्यांना मिळलेली हि एक प्रकारची दैवी शक्ती होती, मी स्वतः घेतलेला हा अनुभव असल्यामुळे मी हे कधीच विसरू शकत नाही. दिलेला शब्द पाळणारे आणि उमद्या मनाचे असे व्यक्तिमत्व पुन्हा होणे नाही.
हे ही वाच भिडू.
- दस का दम : बाळासाहेबांचे असेही दहा किस्से !
- बाळासाहेब म्हणाले, नितीन जातीपातीचा फालतूपणा आम्हाला शिकवू नकोस.
- या व्यक्तीने सर्वात पहिल्यांदा पवारांची ओळख बाळासाहेब ठाकरें सोबत करुन दिली होती
- भंगारात निघणाऱ्या युद्धनौकेचं बाळासाहेबांमुळे युद्ध स्मारकात रुपांतर होवू शकलं..