गोध्रा दंगलीतल्या त्याला उशीरा कळालं…पोटापाण्याचा प्रश्न हिंदू-मुस्लीम पेक्षा खूप मोठ्ठाय…
“मजहब नहीं सिखाता आपस में बैर करना”
कवी इक्बाल…
इथं दोन ओळी लिहणाऱ्या कवीचं नाव वेगळं असतं तर, तर या ओळी पटाव्या की न पटाव्या यावर विचार नक्कीच झाला असता. असो तर मुद्दाय आजच्या बिघडलेल्या वातावरणाचा. बर वातावरण बिघडलं आहे की नाही यावर पण बरीच मतमतांतरे असणार.
कारण सरकार कोणाचं आहे यावरून आपल्याकडे प्रत्येकाची मतं ठरत असतात. असो आपण तो विषय देखील घ्यायला नकोय..
पण चर्चेत तर हिंदू मुस्लीम आणि अशांतता हाच विषय चर्चेत आहे. मध्यंतरीच्या काळात TRP मोजला जात नव्हता, त्यामुळे माध्यमांमधून म्हणावी तितकी स्पर्धा दिसून येत नव्हती. पण बऱ्याच काळाने रेटिंग आल्याने कोणता चॅनेल कुठे हे समजू लागलं आणि TRP ची स्पर्धा पून्हा वाढली. साहजिक बातम्यांनी वेग पकडला आणि अशांततेच्या बातम्या दिसू लागल्या, नाहीतर तस सगळं शांतच असतं…
मुळ विषय आहे तो अशा अशांततेतून काय पेटतं आणि पुलाखालून पाणी गेल्यानंतर काय होतं हे सांगणारा..
तर ही गोष्ट सुरू झाली ती २००२ साली. म्हणजेच सुमारे वीस वर्षांपूर्वी…
२००२ च्या गुजरातच्या गोध्रा दंगलीतली ही नाव. एकाच नाव अशोक मोची आणि दूसऱ्याचं नाव कुतूबुद्दीन अंन्सारी. या दोघांची नाव गुगलवर सर्च करण्याची पण गरज रहात नाही. तुम्ही नुसत गुजरात दंगल म्हणून सर्च केलं तरी या दोघांचे फोटो गुगलवर येतात.
पहिला दिसतो तो अशोक मोची यांचा फोटो.
हातात तलवार, पाठीमागे जाळपोळ आणि खूनशी प्रवृत्तीने पाहणारी नजर. दंगलीतलं अशोक मोचींचं हे चित्र तेव्हा माध्यमांमध्ये झळकलं होतं. गुजरातच्या कुठल्यातरी भागात दंगल पेटल्यानंतर हा फोटो काढण्यात आला होता.
तर दूसरा फोटो दिसतो तो कुतूबुद्दीन अंन्सारी यांचा..
हतबल झालेला रडावलेला चेहरा. डोळ्यात काठोकाठ पाणी. जीवाची भिक मागत कुतूबुद्दीन उभा होता तेव्हा त्याचा हा फोटो काढण्यात आलेला होता. हा फोटो देखील तेव्हा वर्तमानपत्रांमध्ये छापून आला होता. या फोटोवरून देखील बऱ्याच चर्चा झाल्या होत्या.
गुजरातच्या दंगलीचं प्रातिनिधिक चित्र म्हणून हे दोन्ही फोटो वापरण्यात आले. आजही गुजरातच्या दंगलीचा विषय निघाला की हेच फोटो वापरण्यात येतात.
त्यानंतर कट टू २०१७-१८ चा काळ..
वेळ गेला, टाईम गेला.. गुजरातच्या एका शहरात एका गल्लीत एक दुकान सुरू करण्यात आलं. दुकान होतं चप्पलीचं. या चप्पलांच्या दुकानाचं नाव ठेवण्यात आलं होतं “एकता चप्पल”. या चप्पलच्या दुकानाच्या मालकाचं नाव होतं अशोक मोची. आणि त्याच्या चप्पलच्या दुकानाच्या उद्घाटनाला आलेला व्यक्ती होता कुतूबुद्दीन अन्सारी..
त्या दिवशी या दोघांनी एकत्र येवून फोटो काढले.. ते फोटो देखील माध्यमांमधून व्हायरल झाले. पण या दरम्यानच्या काळात दोघांनी काय केलं आणि दोघं कुठे होते ते पण समजून घ्यायला हवं.
यातल्या अशोक मोचीचा फोटो व्हायरल झाल्यानंतर त्याला पोलीसांनी अटक केली होती. तेव्हा त्याने पोलीसांना जबाब दिला होता की त्याच्या हातात कोणीतरी रॉड दिला. त्यावेळीच्या गोष्टींबद्दल त्याने पश्चाताप देखील केला होता. त्याने कोणाला मारलं नाही अस त्याने सांगितलं होतं. कारवाई झाली आणि त्याला सोडून देण्यात आलं.
त्यानंतर मात्र तो पोटापाण्याचा विचार करु लागला. काहीतरी करायला हवं म्हणून चप्पल विकू लागला. चप्पल विकता विकता सेट झाला. पुढे कुतूबुद्दीन त्याला भेटला दोघांनी सगळं विसरून एकत्र फोटो काढला. हा फोटो हिंदू मुस्लीमांची विस्कटलेली मनं जुळवणारा फोटो म्हणून चांगलाच व्हायरल देखील झाला. पुढे त्याने चप्पलच दुकान काढलं आणि स्वत:चा सेटअप उभारला.
दूसरीकडे कुतूबुद्दीनं पश्चिम बंगालला गेला. तिथे तो कपडे शिवण्याचा व विकण्याचा व्यवसाय करू लागला. हळुहळु का होईना त्याची गाडी पण रुटिंगला लागली. तो पण सेट झाला.
पण गोष्ट इथेच संपत नाही..
अशोक मोचीने २०१७ मध्ये दलित आझादी कुच नावाची पार्टी जॉईन केली. दलितांच्या एकतेसाठी आत्ता लढण्याचा संकल्प त्याने केला. लोकसभेच्या २०१९ च्या निवडणूकीवेळी त्यांनी कम्युनिस्ट पार्टीच्या केपी जयराजन यांचा प्रचार केला. त्यांनी म्हणजे अशोक मोची आणि कुतुबुद्दीन या दोघांनी देखील. माध्यमांमधून अस सांगितलं जातं की, अशोक मोची याला दुकान सुरू करण्यासाठी देखील कम्युनिस्ट पार्टीने मदत केली.
आत्ता दोघेही पोटापाण्याला लागलेत आणि काम करतायत ही काय ती चांगली गोष्ट..
हे ही वाच भिडू
- गोध्रा कांडाची चौकशी करणारे राकेश अस्थाना आता दिल्ली पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती झालेत
- असं पहिल्यांदाच घडलंय कोर्टाने ३८ जणांना एकत्र फाशीची शिक्षा सुनावलीये
- गुजरात दंगली प्रकरणी नरेंद्र मोदींना क्लीन चिट देणाऱ्या अहवालात सुप्रीम कोर्ट घालणार लक्ष