काश्मीरमध्ये तिरंगा फडकवण्याची ललकारी देणाऱ्या साध्वी कांचन गिरी मुंबईत का आल्या आहेत ?
हिंदुराष्ट्राच्या स्थापनेचं अभियान हाती घेतलेल्या गुरु माँ साध्वी कांचन गिरी या देशभर दौरा करत आहेत. महाकाल मानव सेवा समितीच्या बॅनरखाली त्यांनी हे अभियान सुरू केलंय. या अभियानांतर्गतचं त्यांनी देशातील अनेक भागात बॅनर्स आणि पोस्टर्स लावले आहेत. एवढंच नाही तर हिंदुराष्ट्राच्या संकल्पनेसाठी त्यांनी महाराष्ट्र, मध्यप्रदेशासह विविध राज्यातील नेत्यांच्या भेटीगाठी सुरू केल्या आहेत.
याच साखळीत गुरु माँ साध्वी कांचन गिरी या मुंबईत आल्या आहेत. यावेळी त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. कृष्णकुंजवर त्यांनी तब्बल तासभर राज ठाकरेंशी चर्चा केली. सोबतच हिंदुराष्ट्र उभारणीच्या अभियानात सहभागी होण्याचं आवाहन करत त्यांनी राज ठाकरे यांना अयोध्येला येण्याचं निमंत्रणही दिलं.
भारतातील इतर राज्यांप्रमाणे जम्मू-काश्मीरमध्ये आपण जाणार आहोत आणि काश्मीरच्या लाल चौकात तिरंगा फडकवणार आहोत असही साध्वी कांचनगिरी यांनी जाहीर केलं. या दौऱ्यात त्या संत समाजाशीही चर्चा करणार असल्याचं समजत.
खरं तर, साध्वी कांचन गिरी त्यांची आजची ही भेट अत्यंत महत्वाची मानली जाते. कारण कालच कांचनगिरी यांनी उत्तर भारतीयांच्या मुद्द्यांवरून राज ठाकरेंवर टीका केली होती. राज ठाकरे यांनी ती भूमिका अज्ञानातून घेतल्याचं त्यांनी म्हटलं होतं.
राज ठाकरेंच्या भेटीनंतर साध्वी कांचनगिरी यांनी माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. कांचन गिरी म्हणाल्या,
‘उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांचं नाव बुडवलं आहे. बाळासाहेब जे बोलायचे, ते करायचे. ते प्रखर हिंदुत्ववादी होते. हिंदूंसाठी ते वाघासारखी डरकाळी फोडायचे. पण उद्धव ठाकरे यांच्यावर आम्ही नाराज आहोत. ते मुस्लिमधार्जिण्यांसोबत गेले आहेत.
यावर मुंबईच्या शिवसेनेच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी साध्वी कांचनगिरी याना चोख प्रतिऊत्तर दिल,
‘धार्मिक क्षेत्रातील लोकांनी राजकारणात पडू नये, तुम्ही गुरू माँ असा किंवा गुरू पिता, त्याच्याशी आम्हाला घेणंदेणं नाही. पण थेट राजकीय वक्तव्य करू नका. बाळासाहेबांचा मुलगा काय करू शकतो आणि काय नाही ही सर्टिफिकेट तुम्ही देण्याची गरज नाही. ‘
दरम्यान, गुरु माँ कांचन गिरी या महिला संत म्हणून प्रसिद्ध आहेत. ज्या जुन्या आखाड्याशी संबंधित आहेत. १९९१ पासून त्यांनी युरोपीय देशात भारतीय सनातन हिंदू धर्माचा प्रचार सुरु केला आहे. त्या गेल्या २० वर्षांपासून त्या इंग्लंड आणि अमेरिकेसारख्या देशातही हिंदू धर्माचा प्रचार करत आहेत.
महिलांच्या प्रश्नांवरही त्या नेहमी काम करताना दिसतात. महत्वाचं म्हणजे फक्त महिलाच नाही तर महिलांच्या चुकीच्या साक्षीमुळे जे पुरुष फसवले गेले आहेत. त्या पुरुषांना न्याय देण्याचं कामही साध्वी कांचनगिरी करतात. मानसिकतेशी झगडणाऱ्या आणि आत्महत्या करण्याच्या मार्गावर असणाऱ्या व्यक्तींची समजूत काढून त्यांना योग्य मार्गावर आणण्याचं काम त्या करतात.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वीही साध्वी कांचनगिरी चर्चेत आल्या होत्या. गुरु माँ कांचन गिरी यांना फोनवरून धमक्या येत होत्या. ‘तू माझ्याशी मैत्री कर, नाहीतर मारून टाकेल’ अशी धमकी त्यांना दिली जात होती. संबंधित व्यक्ती कित्येक दिवस त्यांच्याशी फोनवरून अश्लील भाषेत बोलत असायचा. तसेच त्यांच्यावर अॅसिड हल्ला करण्यासोबतचं जीवे मारण्याची धमकीही येत होती.
साध्वीना फेक आयडीवरून फेसबुवर सुद्धा मॅसेज केले जायचे.आरोपीला कंटाळलेल्या कांचनगिरी यांनी पोलिसांत तक्रार करण्याची धमकी दिली. पण संबंधित व्यक्ती तरीही शांत राहिला नाही. ‘कर पोलिसांना तक्रार, बघून घेईल’, असही आरोपी साध्वी कांचनगिरी यांना म्हणायचा.
आपली प्रतिमा खराब करण्यासाठी हे करत असल्याचा आरोप त्यांनी त्यावेळी लावला होता. याप्रकरणी साध्वी कांचनगिरी यांनी गाझियाबादच्या इंदिरापूरम पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला होता.
या सोबतच मधल्या काळात साध्वी कांचनगिरी यांनी ‘देश बचाओ आंदोलन’ सुरू केलं होतं. सोबतच येत्या काही दिवसांत आपण धर्म ध्वज यात्रा सुद्धा सुरू करणार असल्याचं त्यांनी यावरी सांगितलं.
हे ही वाच भिडू :
- अमर्त्य सेनच नाही तर केंद्राच्या कोरोना विषयक धोरणावर या दिग्गज विचारवंतांनी टीका केली आहे
- पोलीसांचा स्वत:च्या राजकारणासाठी वापर करुन घेण्यात सर्वच पक्ष एक आहेत
- शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर नारायण राणे आणि राज ठाकरे एकत्र पक्ष स्थापन करणार होते..