गुजरातमध्ये देखील भूमिका बदलणारे ‘राज ठाकरे’ आहेत….त्यांचं नाव हार्दिक पटेल

राज ठाकरे कायमच आपल्या भूमिका बदलत असतात असा आरोप त्यांच्यावर होत असतो.

२०१४ च्या वेळेस त्यांनी भाजपला सॉफ्ट कॉर्नर दिला, मोदींचं उघड उघड कौतुक केलं अन २०१९ मध्ये त्यांनी भाजपला कडवा विरोध केला. मध्येच असं मध्येच तसं काही कळायलाच मार्ग नाही. थोडक्यात मनसेचं इंजिन कधी कोणता ट्रॅक पकडेल काही सांगता येत नाही. सद्या हे इंजिन कोणत्या ट्रॅकवर आहे हे संपूर्ण महाराष्ट्र जाणून आहे.

राजकारण म्हणलं की, भूमिका बदलणारे नेते आलेच. पण हे सांगण्याचं निमित्त म्हणजेच अलीकडे  अशी चर्चाय की, गुजरातमध्ये देखील अशीच भूमिका बदलणारे ‘राज ठाकरे’ आहेत. 

अहो…आम्ही काँग्रेसचे तरुण तडफदार नेते हार्दिक पटेल यांच्याबाबतीत बोलतोय.. आणि हो आम्ही काय या दोन नेत्यांची तुलना करत नाहीये तर त्यांच्या ‘बदलणाऱ्या’ भूमिकेची तुलना करतोय. 

गुजरातच्या राजकारणात असं म्हणलं जातंय कि, हार्दिक पटेल आता काँग्रेसला सोडचिट्ठी देत भाजपचा हात पकडणार. मग गुजरातच्या आगामी विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर हार्दिक पटेलांची बदलती भूमिका का चर्चेत आहे?

त्याचं उत्तर म्हणजे त्यांनी बदललेली भूमिका स्पष्ट होते ते पुढील मुद्य्यांच्या आधारे….

१. त्यांचा व्हाट्स ॲपचा डीपी…ज्यामध्ये हार्दिकने भगवी शाल घेतलीये.

तुम्ही म्हणाल व्हाट्स ॲपचे डीपी पाहून जर का लोकांच्या भूमिका कळल्या असत्या तर सगळी राजकीय ‘सूत्रं’ व्हाट्स ॲपवरूनच हलली असती. पण काही सूक्ष्म गोष्टी देखील मोठ्या बदलांचे कारण ठरतात.

व्हॉट्सॲपच्या नवीन डिपीमध्ये हार्दिक पटेलचा भगवा ‘भगवा’ अवतार दिसत आहे. हार्दिक पटेलने व्हॉट्सॲपसह टेलिग्रामचाही प्रोफाइल फोटो बदलला आहे. इतकंच नाही तर त्याच्या WhatsApp Bio मधून काँग्रेसचा इंट्रोच गायब झाला आहे. त्यामुळे राजकीय चर्चांना जोर आलाय कि हार्दिक पटेल भगवा अवतार घेऊन भाजपमध्ये जाणार.

२. दुसरं म्हणजे हिंदुत्वाचा पुरस्कार

अलीकडच्या काळात हार्दिक पटेलने स्वतःला हिंदुत्वाशी जोडले आहे. एका भाषणात तर त्यांनी जाहीर केलं की, मला हिंदू असल्याचा अभिमान आहे. स्वतःला राम भक्त म्हणवून घेत आपली प्रतिमा देखील बनवण्याचा हार्दिकचा प्रयत्न चाललाय. यावरून ते विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे म्हणले जातेय.

३. वडिलांच्या श्राद्धाला ४ हजार भगवत गीता वाटल्यात.

स्वतःला रामभक्त म्हणवून घेत हार्दिक पटेल यांनी आपल्या वडिलांच्या निधनाच्या पश्चात विधीमध्ये स्थानिक जनतेला, आणि आप्तस्वकीयांना ४,००० भगवत गीता वाटल्याचे त्यांनी स्वतः सांगितलं होतं.

 त्यावर त्यांची प्रतिक्रिया अशी होती की, आम्ही हिंदू आहोत आणि आम्हाला हिंदू असल्याचा अभिमान असल्याचं देखील स्पष्ट केलेलं.

४. भाजपचं कौतुक  

हार्दिक पटेल सध्या गुजरात काँग्रेसचे कार्याध्यक्ष आहेत. काँग्रेसचे सदस्य असून कट्टर विरोधी पक्ष असलेल्या भाजपचं कौतुक करण्याचा चान्स ते सोडत नाहीत. काँग्रेसवरील नाराजीनंतर हार्दिकने अनेकवेळा भाजपचे कौतुक केले आहे. भाजप चांगला भक्कम पाया असलेला पक्ष आहे, 

नुकतेच त्यांनी जाहीरपणे असं विधान केलं की, ‘भाजपच्या अलीकडच्या राजकीय निर्णयावरून हे मान्य करावे लागेल की भाजपमध्ये चांगले राजकीय निर्णय घेण्याची क्षमता आहे..तेच काँग्रेसला बळकट व्हायचे असेल तर पक्षाला आपली निर्णय क्षमता सुधारावी लागेल”. 

गुजरात मध्ये हार्दिक पटेलांची भूमिका महत्वाची राहिलीये…

त्यांचा राजकारणातली एंट्री तशी मोदींच्या विरोधात मोर्चे, आंदोलनं करून झाली.  २०१४-१५ वर्षाच्या कॉलेजमधल्या निवडणूकीत बिनविरोध महासचिव होत हार्दिक यांनी पहिल्यांदा शहरी राजकारणाला सुरुवात केली. 

मग त्यांच्या करिअरचा टर्निंग पॉईंट ठरला तो म्हणजे, पाटीदार समाजाचे आंदोलन. 

आपल्या समाजातील केवळ गरीबच नाही तर श्रीमंत असलेल्या मुलांना देखील सरकारी नोकरी मिळत नाही, आणि या गोष्टीला केवळ आरक्षण जबाबदार आहे. हेच लक्षात घेऊन त्यांनी पाटीदारांच्या जमिनींच पण मोठ्या प्रमाणावर अधिग्रहण झाले होते पण त्यांना नोकऱ्या दिल्या नव्हत्या हा मुद्दा पुढे आणला.

हार्दिक यांनी ‘पाटीदार अनामत आंदोलन समितीची’ स्थापना केली आणि २२ व्या वर्षी आरक्षणाची मागणी घेऊन राज्यसरकारच्या विरोधात आंदोलनाला सुरुवात केली.  गुजरातच्या राजकारणात मोठा बदल घडवणारं ठरलं.

याचदरम्यान त्यांना अटकही झाली अन पटेल यांना अवघ्या महिन्याभरात राष्ट्रीय पातळीवर ओळख मिळाली होती.  २२ व्या वर्षी मुख्यमंत्री आणि देशाच्या पंतप्रधांना थेट भिडणारा नेता म्हणून ओळख जाऊ लागलं होतं. 

आणि अशाप्रकारे ९ सप्टेंबर २०१५ ला लाखो लोकांच्या उपस्थितीमध्ये ‘पटेल नवनिर्माण सेनेची’ स्थापना केली होती.

आणि पुढे वयाची २५ वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्यांनी राहुल गांधींच्या उपस्थितीमध्ये काँग्रेस पक्षात प्रवेश केला, त्यानंतर अवघ्या १९ महिन्यात त्यांना गुजरात काँग्रेसचं कार्यकारी अध्यक्ष बनवलं गेलं होतं. आज मात्र हार्दिक पटेल ज्याप्रकारे काँग्रेस पक्षावर नाराज आहेत त्यावरून अशीच चर्चा चालू आहे कि ते काँग्रेस सोडून भाजपमध्ये जाणार. 

थोडक्यात आता हे तर स्पष्ट झालंच असणारे की, कधीकाळी भाजपचा आणि मोदींना टोकाचा विरोध करणारे हार्दिक पटेल आज ‘भगवी शाल’ पांघरूण स्वतःला हिंदुत्ववादी म्हणून समोर आणू पाहत आहेत. तसेच भाजपचं कौतुक करतायेत.. त्यांच्या भूमिकेमध्ये  आणि इकडे महाराष्ट्रात राज ठाकरेंची बदललेली भूमिकेमध्ये यांत काहीशा प्रमाणात का होईना साम्य दिसतंय हे तर स्पष्ट आहे.

हे हि वाच भिडू :

 

 

 

 

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.