हसन मुश्रीफांच्या पालकमंत्री पदामागचं शुक्लकाष्ठ काय संपत नाही.
राष्ट्रवादीचे नेते, अहमदनगरचे पालकमंत्री आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ पालकमंत्री पद सोडणार असल्याची चर्चा सध्या सुरु आहे. मुश्रीफ केवळ दोन वर्षांसाठीच पालकमंत्री पद घेणार असल्याचं त्यांनी पक्षाला सांगितलं होतं. त्यामुळे पालकमंत्री पद सोडणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आलय.
मात्र हसन मुश्रीफ यांच्या कुटुंबाने १२७ कोटींचा घोटाळा केला असून, त्याबाबत २७०० पानांचा पुरावा इन्कम टॅक्सला दिल्याचा दावा किरीट सोमय्या यांनी केलेल्या पार्श्वभूमीवर मुश्रीफ पालकमंत्री पद सोडत असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे.
यावर मुश्रीफ म्हणतात,
राज्यातील विविध निवडणुकांचा व्याप पाहता प्रत्येक मंत्र्याकडे एकाच जिल्ह्याचे पालकमंत्रीपद असावे अशी चर्चा सुरू होती. त्यावेळी मी माझी बाजू मांडली. कोल्हापूर व अहमदनगर अशा दोन्ही जिल्ह्यातील विधान परिषद, जिल्हा परिषद, बाजार समित्या, पंचायत समित्यांची निवडणूक आहे. शिवाय कोल्हापूर जिल्ह्यातील ९ नगरपालिकांचीही निवडणूक जवळ आली आहे. त्यामुळे दोन्ही जिल्ह्यांकडे लक्ष देणे कठीण होईल.
आता पालकमंत्री पद जाईल न जाईल पण मुश्रीफांच्या पालकमंत्रीपदामागचं शुक्लकाष्ठ काय संपत नाही.
आजवर कोल्हापूरच्या पालकमंत्रिपदावर काँग्रेस आणि राष्ट्रवादीची नेहमीच रस्सीखेच राहिली आहे. ज्यात काँग्रेसने नेहमीच बाजी मारली. आघाडी सरकारच्या काळात पतंगराव कदम आणि त्यांच्यानंतर हर्षवर्धन पाटील हे कोल्हापूरचे पालकमंत्री राहिले आहेत.
२०१९ च्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर जेव्हा, महविकास आघाडी सत्तेत आली तेव्हा कोल्हापूर जिल्ह्याचं पालकमंत्री पद मुश्रिफांनाच मिळणार असं वाटत होत. आणि तशी स्वतः मुश्रिफांची सुद्धा इच्छा होती. जेव्हा महाविकास आघाडीच्या पालकमंत्र्यांची यादी जाहीर झाली तेव्हा कोल्हापूरच्या पालकमंत्रीपदाची उत्सुकता कायम होती.
कारण कोल्हापूरच पालकमंत्रिपद महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना दिलं गेलं. मात्र थोरात यांनी कोल्हापूरचे पालकमंत्रिपद नाकारलं आहे. त्यामुळे पालकमंत्र्यांची नव्याने चर्चा सुरु झाली. यात काँग्रेसचे गृहराज्यमंत्री सतेज पाटील आणि राष्ट्रवादीचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यात कोल्हापूरच्या पालकमंत्रिपदाबाबत रस्सीखेच सुरु झाल्याचं चित्र निर्माण झालं.
त्यावेळी एका पत्रकार परिषदेत मुश्रिफांना पालकमंत्री कोण होतील असं विचारलं असता ते म्हंटले होते,
मोठ्या मनानं सतेज पाटील सांगत असतील तर मी कोल्हापूरचं पालकमंत्रिपद स्वीकारायला तयार आहे. माझे मोठे भाऊच पालकमंत्री होतील असे सतेज पाटील म्हणतील.
यावरून कोल्हापूरच्या पालकमंत्री पदावर आपला दावा त्यांनी अप्रत्यक्षपणे केला होता. यावर सतेज पाटलांनी मात्र भारी गेम केला, ते म्हंटले,
वरिष्ठ घेतील तो निर्णय मला मान्य असेल.
हसन मुश्रीफ आणि सतेज पाटील यांच्यातील अंतर्गत कुरघोड्या टाळण्यासाठी आता काँग्रेसकडून विश्वजीत कदम यांचे नाव पुढ केलं जातं होत. त्यात आणि पालकमंत्रिपदाच महत्त्व दोन्ही पक्षांना चांगलंच माहीत होत. त्यामुळे सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ यांनीही आपले प्रयत्न शेवटपर्यंत सुरु ठेवले. तर दुसर्या बाजूला शिवसेनेन देखील हे पालकमंत्रीपद काँग्रेसला देण्याचे संकेत देत राष्ट्रवादीला शह देण्याचा प्रयत्न केला. आणि झालं हि तसंच. पालकमंत्री पदाची माळ सतेज पाटलांच्या गळ्यात पडली.
आणि मुश्रिफांचं कोल्हापूरचं पालकमंत्री होण्याचं स्वप्न भंगल. आणि आता परत अहमदनगरच पालकमंत्रीपद जातंय. त्यामुळे मुश्रीफांच्या पालकमंत्रीपदामागचं शुक्लकाष्ठ काय संपत नाही असंच म्हणावं लागेल.
हे ही वाच भिडु
- पोलिसांनी कराडात अडवलं पण सोमय्या शांत बसले नाहीत, मुश्रीफांचा दुसरा घोटाळा उघड केलाय.
- UPA काळात सोमय्यांनी देशातील १६ राज्यांमध्ये फिरून घोटाळ्यांचे आरोप केले होते
- कागलात धुण्याचा दगड सुद्धा कोणत्या गटाचा हे आधीच ठरलेलं असतं..