हैद्राबादच्या निझामाचे बुट बाजारात लिलावात काढून पं.मदनमोहम मालवीय यांनी निझामाची मस्ती जिरवली.

पंडित मदन मोहन मालवीय यांच्या दृढनिश्चयी स्वभावाचे अनेक किस्से सांगितले जातात. प्रत्येक गोष्टी ते सर्वस्व अर्पण करुन पुर्ण करत. पं. मदन मोहन मालवीय यांचा जन्म अलाहाबादचा. त्यांच्या पिढ्या माळव्यातून अलाहाबादला स्थलांतरीत झाल्यामुळे त्यांना मालवीय नाव पडलं व पुढे हेच त्यांच आडनाव झालं.
पं. मालवीय हे १८८४ साली बी.ए. झाले होते. कलकत्ता विद्यापीठातून त्यांनी आपलं शिक्षण पुर्ण केलं होतं. ते चार वेळा कॉंग्रेसचे अध्यक्ष राहिले होते व भारताच्या स्वातंत्र्याबद्दल म्हणायचे गेले पन्नास वर्ष मी कॉंग्रेसच्या व्यासपीठावरून लढा देत आहे. नक्कीच आपणाला स्वातंत्र मिळेल आपण न थकता प्रयत्न करायला हवेत.
याच निश्चयी स्वभावातून त्यांनी बनारस विद्यापीठ पुर्ण करण्याचा संकल्प केला. कोणत्याही परिस्थितीत विद्यापीठ पुर्ण करण्याचा त्यांचा निश्चय होता. त्यासाठी संपुर्ण भारतात फिरून त्यांनी देणगी गोळा करण्यास सुरवात केली.
बनारस हिंदू विद्यापीठाच्या उभारणीसाठी मदत म्हणून ते हैद्राबादच्या निझामाच्या दरबारात पोहचले. निझामाला त्यांनी आपण करत असलेलं काम सांगितल आणि अशा कामासाठी आपण मदत करावी अशी विनंती देखील केली.
पण हैद्राबादचा निझाम आपल्या कंजूषपणाबद्दल प्रसिद्ध होता. त्यात तो मग्रुर देखील होता. त्याने आपल्या पायातील बुट काढले आणि पंडित मदनमोहन मालवीय यांना म्हणाला,
हे बुट घेवून जा आणि बांधा तुमचं विद्यापीठ.
पंडित मदन मोहन मालवीय यांना निझामाच्या या वृत्तीचा संताप आला. त्यांनी ते जोड उचलले आणि निझामाच्या दरबारातून बाहेर पडले. निझामाच्या दरबारातून बाहेर पडतं त्यांनी थेट बाजार गाठलां. तिथे निझामाजे बूट म्हणून थेट बुटांचा लिलाव मांडला. लोक गोळा होवू लागले, चौकशी करु लागले तेव्हा ते निझामाच्या बूटांचा लिलाव करायचा आहे म्हणून सांगू लागले.
हि बातमी निझामाच्या दरबारात पोहचली. निझाम खजील झाला. आपल्या बुटांचा लिलाव आपल्याच राज्यात होतोय यासारखा निझामाचा दूसरा अपमान नव्हता. पंडित मदनमोहन यांना सन्मानाने बोलवण्यासाठी निझामाने आपल्या सेवकांना पाठवलं. पंडित मदन मोहन मालवीय पुन्हा निझामाच्या दरबारात आले. तिथे त्यांना सन्मानपुर्वक देणगी देण्यात आली.
पंडित मदनमोहन मालवीय यांनी त्या काळात विद्यापीठासाठी १ कोटी ६४ लाख रुपयांचा निधी गोळा केला होता. त्यातूनच बनारस हिंदू विद्यापीठाची स्थापना करण्यात आली.
हे ही वाचा.
- स्वत:च्या चप्पला घालता आल्या नाहीत म्हणून अवधचा नवाब इंग्रजांना सापडला..!
- जाके बोल तेरे निझामको, वऱ्हाड के लोगोंके घरसे कस्तुरी का सुगंध आता है.
- आणि ‘हैद्राबाद संस्थान’ बिनशर्तपणे भारतीय सैन्याला शरण आले !