कोंबडी हा पक्षी खाता येवू शकतो, हे जगाला भारतानं पहिल्यांदा सांगितलं…!!!
इंग्लंडच्या संसदेत एकदा डिबेट चालू होती कशाची तर चिकन टिक्काचं देशानं पेटंट घ्यावी याची. १५० वर्षे भारतातल्या वस्तू चोरून ब्रिटिश म्युझियम भरणाऱ्या ब्रिटिशांनी आपला ‘लूट’ हा शब्द सुद्धा चोरून इंग्लिश भाषेत नेलाय. आता चिकन टिक्का असू दे की चिकन करी या इंग्लंडमधल्या सगळ्यात फेमस डिश भारताच्या आहेत हे त्यांनापण माहित आहे तरी इंग्रजांनी हा चोरटेपणा केला होता. याच्या पुढं जाऊन चिकन टिक्का मसाल्याला त्यांनी आपली नॅशनल डिश सुद्धा केल्याचं सांगण्यात येतं.
पण या इंग्रजांना कोण सांगणार की फक्त चिकन टिक्काच नाही तर चिकन सुद्धा त्यांना भारतानं दिलंय.
बरं हे आपण म्हणत असं नाहीये. उत्क्रांतीचा सिद्धांत मांडणाऱ्या इंग्रज शास्त्रज्ञाचंच हे म्हणणं होतं.
चार्ल्स डार्विनने असा युक्तिवाद केला होता की कोंबडी लाल जंगलातील पक्षापासून पासून इव्हॉल्व्ह झालेय.
आणि हे लाल पक्षी सुरवातीला दक्षिण आणि दक्षिणपूर्व आशियामध्ये सापडत होते.
म्हणजे पक्षांचं ओरिजिन तर आपल्या भागातलं होतं एवढं कन्फर्म झालं. आता कोंबड्याना जास्त उडता येत नव्हतं त्यामुळं लवकरंच माणसांनी त्यांना पकडून पाळायला सुरवात केली. जवळपास ४००० वर्षांपूर्वी भारतात चिकन पाळीव झाल्याचे पुरावे भेटतात. याचकाळात चीनमध्येही कोंबड्या पाळल्या जात होत्या.
मग आता ह्या कोंबड्या भारताबाहेर कश्या गेल्या?
यात याचं उत्तर आहे हडप्पा संस्कृतीमध्ये. आता आपली हि हडप्पा संस्कृती होतीच एवढी ऍडव्हान्स की त्यामुळं काही जणांना हे विशेषही वाटणार नाही. इंडस व्हॅली सिवेलायझेशन जीला आपण हडप्पा आणि मोहिंजदरोची संस्कृती म्ह्णून देखील ओळखतो तिथं कोंबड्या पाळल्याचे अनेक पुरावे सापडतात.
जसं की हे कोंबडीचं शिल्प. आणि याच संस्कृतीचा भाग असणाऱ्या लोथल बंदरातून कोंबड्या एक्स्पोर्ट करण्यात येत असल्याचे पुरावे सापडतात. पुरातत्वशास्त्रज्ञांना लोथलला कोंबडीची हाडं मोठ्या प्रमाणात इथून सुरवातीला पश्चिम आशियामध्ये कोंबड्या निर्यात केल्या गेल्या. पश्चिम आशियात सुरवातीला कोंबड्यांचा वापर खाण्यासाठी नं होता झुंजी लावण्यासाठी होत होता.
पश्चिन आशियातल्या मेसोपोटेमियात कोंबडीला ‘मेलूहा पक्षी’ या नावाने ओळखलं जात होतं.
तिथून मग रोमन साम्राज्य आणि मेडीटेरिनियन समुद्रमार्गे आपल्या कोंबड्या युरोपात पोहचल्या. आणि तिथून पुढं मग जगभर त्यांचा प्रसार झाला.
आता आपल्या भारतात पुन्हा येऊ.
जरी आपल्या भारतात कोंबड्यांचा ओरिजिन असलं तरी भारतात तेवढ्या प्रमाणात त्यांचा खाण्यासाठी वापर होत असल्याचे पुरावे सापडत नाहीत.
त्यानंतर मग १६ व्या शतकात लिहल्या गेलेल्या निमातनामासारख्या इस्लामिक लेखनात चिकन आणि अंड्यांचा अन्न म्हणून वापर केल्याचे पुरावे सापडतात. मुघलांच्या रसोईमध्ये तर चिकन डिश म्हणून एका वेगळ्या लेव्हलला जाऊन पोहचली.
मुघल राजवाड्यातील कोंबड्यांना त्यांच्या मांसाची चव सुधारण्यासाठी केशर आणि गुलाबजलाच्या गोळ्या खायला दिल्या जात होत्या आणि कस्तुरीच्या तेलाने आणि चंदनाने दररोज त्यांचा मसाज केला जात होता.
मधल्या काळात चिकन स्वादिष्ट एक पदार्थ म्ह्णून जरी फेमस झाला असला तरी कोंबड्यांचं कुक्टपालन करण्यात येत नव्हतं. भारतात कुक्कुटपालन हा ब्रिटिशांचा वारसा आहे. भारतावर राज्य करायला सुरवात केल्यानंतर त्यांचा मांसाहाराचा आग्रह शहरी भागाबाहेर भागवणं सोपं नव्हतं. त्यावेळी मग कोंबडीचा कळप हा तेथे मांस पुरविण्याचा एक सोपा मार्ग असायचा.
तरीही भारतात किंवा उर्वरित जगात कोंबडी आजच्यासारखी सामान्य नव्हती. चिकन हे विशेष काहीतरी असल्याचं मानलं जायचं. त्यांचा वापर प्रामुख्याने अंडी मिळवण्यासाठी व्हायचा आणि जेव्हा त्या अंडी घालणं बंद व्हायच्या तेव्हा त्यांचा कार्यक्रम केला जायचा.
पण चिकन क्षेत्रात क्रांती झाली ती ब्रॉयलरच्या येण्यानं. ब्रॉयलरच्या येण्यानं चिकन ही फक्त चैनेचं खाणं नं राहता बाजारात अगदी स्वस्तात मिळू लागलं.
ब्रॉयलर कोंबड्या बनवण्याचं आणि त्यांचा कुक्कुटपालन चालू करण्याचं श्रेय मात्र अमेरिकेला जातं. १९२३ मध्ये, डेलावेअरच्या विल्मर स्टीलने फक्त मांस मिळवण्याच्या उद्देशाने पक्ष्यांची ५०० पिल्ले वाढवली. तिच्या एंटरप्राइझने इतके चांगले काम केले की १९२६ पर्यंत तिने १०००० पक्ष्यांची क्षमता असलेले ब्रॉयलर हाउस विकत घेतले. ती व्यावसायिक ब्रॉयलर उद्योगाची अग्रणी मानली जाते.
आणि मग यातूनच फक्त मांसासाठी कोंबड्या तयार करण्यात येऊ लागल्या. तयार याच्यासाठी की वेगवेगळी अँटीबायोटीक, जिनेटिक एडिटिंग पक्षांची साइझ वाढवण्यात आली. तसेच विविध लसींचा, औषधांचा उपयोग करून कोंबड्यांचा मृत्यूदर देखील कमी करण्यात यश आली. आणि यातूनच कुक्कुटपालनाची इंडस्ट्रीच उभी राहिली.
भारतात १९८० मध्ये ब्रॉयलरच्या कोंबड्यांची आयात करण्यात आली आणि भारतात देखील त्यांचं लोण पसरलं. म्हणजे भारतातून गेलेली कोंबडी पुन्हा भारतातच आली.
आता जाता जाता एक इंटरेस्टिंग फॅक्ट जगात माणसं जास्त असतील का कोंबड्या? तर उत्तर सरळ आहे कोंबड्या आणि प्रत्येक माणसानं कोंड्या खायचं ठरवलं तर ३ कोंबड्या प्रत्येकाचा वाट्याला येतील.
अजून एक म्हणजे मागच्या ५० वर्षात कोंबड्यांचं वजन ५००% टक्यांहून अधिक वाढवण्यात आलं आहे.
आपली गावठी कोंबडी आणि ब्रॉयलर यांच्या साइझ मधला फरक तुम्हाला दिसतंच असंल.तर हा होता कोंबड्यांचा इतिहास. बाकी तुम्हाला पण काय नवीन माहित असेल तर आम्हाला खाली कमेंट करून जरूर सांगा.
हे ही वाच भिडू :
- मटण-चिकन खायचं असेल तर पुण्यातली ही ’10’ हॉटेल्स बेस्ट पर्याय आहेत..
- मुंबईला बटर चिकनची ओळख करुन देणारा माणूस शिवसेनेमुळं मुंबईचा शेरीफ बनला
- विरारच्या मिल कामगाराने बनवलेलं पोहा चिकन भुजिंग 5 स्टार शेफनां सुद्धा भुरळ घालतंय