नुसता पेन बदलल्याने सुभाष चंद्रांनी राज्यसभा गाठली होती

राज्यसभा निवडणुकीची तयारी जोरात चालू आहे. आपल्या कोट्यापेक्षा जास्तीचा उमदेवार उभा केल्याने सर्वच राज्यात निवडणुकीची रंगात वाढली आहे. इंग्लंडच्या हाऊस ऑफ लॉर्ड सारखंच असणाऱ्या राज्यसभेचा वरिष्ठ सभागृह, विचारवंताचे सभागृह अशी वाहवा करण्यात असली तरी घोडेबाजार, करोडो रुपयांची उधळपट्टी राज्यसभेच्या निवडणुकीत देखील होते. विशेषतः एकाद्या बिझनेसमॅनला उमेदवारी दिल्यानंतर घोडेबाजार होणारच असं मानूनच चालायचं.

महाराष्ट्रातही ६ वा अतिरिक्त उमदेवार दिल्याने घोडेबाजार होईल या चर्चांना ऊत आला आहे.

देशभरातही ज्या उमेदवाऱ्या जाहीर झाल्यात त्यामध्ये एक इंटरेस्टिंग नाव आलाय ते म्हणजे झी मीडियाचे संस्थपाक सुभाषचंद्रा यांचं. २०१६ मध्ये सुभाषचंद्रा अपक्ष म्हणून हरियाणातून अपक्ष म्हणून ते राज्यसभेत गेले होते. यावेळी मात्र त्यांना राजस्थानमधून भाजपाची उमेदवारी मिळाली आहे.

राजस्थानमध्ये भाजपच्या दुसऱ्या उमेदवाराला निवडून येण्यासाठी ११ मतं कमी आहेत.अशावेळीच उद्योगपती सुभाष चंद्रा यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

यामागील कारण आहे त्यांचा इतिहास. जास्त जुना नाही पण २०१६च्या निवडणुकीचा. २०१६ च्या राज्यसभेच्या निवडणुकीत अशी काय गडबड  झाली होती की ती राज्यसभा निवडणुकीच्या इतिहासातील एक वादग्रस्त निवडणूक ठरली होती.

तर बघूया सुभाष चंद्रा हे राज्यसभेत निवडून गेले होते त्यामध्ये कोणता गेम झाला होता ?

त्याआधी राज्यसभा निवडणुकीचे काही नियम लक्षात घ्या. राज्यसभेच्या निवडणुकीत होणाऱ्या क्रॉस-व्होटिंगला आळा घालण्यासाठी प्रत्येक पक्षाच्या आमदाराने मतपत्रिका बॅलेटबॉक्समध्ये टाकण्यापूर्वी  पक्षाच्या अधिकृत एजंटला त्याची मतपत्रिका दाखवावी असा नियम आहे.

स्वत:च्या पक्षाच्या अधिकृत एजंटशिवाय इतर कोणालाही चिन्हांकित मतपत्रिका दाखविल्यास ते मत अवैध मानलं जातं. तसेच अधिकृत एजंटला मतपत्रिका न दाखवल्यास ते मत मोजले जात नाही.  त्याचबरोबर अपक्ष उमेदवारांना त्यांच्या मतपत्रिका कोणालाही दाखविण्यास मज्जाव करण्यात आला आहे.

यातून दोन उपाय उरतात एक तर अपक्ष उमेदवार आपल्या बाजूला ओढा आणि दुसरा म्हणजे आहे त्या नियमांमधून पळवाट काढा.

२०१६ मध्ये सुभाष चंद्रा यांना अशीच एक पळवाट कामी आली होती.

हरियाणा विधससभेचं संख्याबळ होतं ९० आणि राज्यातून राज्यसभेच्या रिकाम्या जागा होत्या दोन. या दोन जागांमध्ये भाजपाची एक आणि काँग्रेस- इंडियन नॅशनल लोकदल यांची मिळून एक अशा दोन जागा आरामात जाणार होत्या. त्यानुसार भाजपाने चौधरी बिरेंद्र सिंग यांना तर काँग्रेस-आयएनएलडीने अपक्ष उमेदवार आर के आनंद यांना पाठिंबा दिला होता. 

मात्र निवडणुकीत रंगत आली सुभाष चंद्रा यांच्या अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल करण्याने. 

सुभाषचंद्रांना त्यानंतर भाजपने पाठिंबा दिला. त्यामुळं भाजपाची अतिरिक्त मतं त्यांना मिळणार होती मात्र तरीही राज्यसभा जिंकून त्यांना जवळपास अशक्यच होतं.

मात्र खरा खेळ झाला निवडणुकीच्या दिवशी. आधीच सांगितल्याप्रमाणे हरियाणा विधानसभेत ९० सदस्य होते. ९० मतांपैकी भाजपच्या बिरेंदर सिंग यांना ४०, काँग्रेस -आयएनएलडी पुरस्कृत आनंद यांना २१ आणि चंद्रा यांना १५ मते मिळाली तर १४ मते रद्द ठरवण्यात आली.

तब्बल १४ मतं रद्द झाल्यानंतर गणित बदललं होतं. 

बिरेंदर सिंग यांना विजयासाठी केवळ २६ मतांची गरज होती. त्यांना ४० मते मिळाल्याने,उर्वरित १४ मते चंद्रा यांच्याकडे हस्तांतरित करण्यात आली कारण भाजप आमदारांनी त्यांच्या दुसऱ्या पसंतीची मतं चंद्रा यांना दिली होती. त्यामुळे चंद्रा यांना अखेर २९ मतं मिळाली. तिसरे उमेदवार आरके आनंद २१ मतांवरच राहिले. 

अगदी सोप्पा विजय असताना देखील आरके आनंद यांचा पराभव झाला.

चंद्रानी अशक्य असलॆला विजय खेचून आणला होता.आणि हे सगळं झालं होतं काँगेसच्या तब्बल १४ मतं रद्द ठरवल्याने.

काँग्रेसची जी १४ मतं रद्द झाली होती ती रद्द होण्यामागचं कारण होतं ते म्हणजे काँग्रेसच्या आमदारांनी मत देण्यासाठी चुकीचा पेन वापरला होता. 

भाजप आणि आयएनएलडी आमदारांचे मतदान सॅम्पल आणि काँग्रेसच्या आमदारांनी मतदान सुरू केले त्याचवेळी  कोणीतरी इलेक्शन कमिशनने दिलेला  पेन बदलून साधं पेन मतदान कक्षात ठेवलं होतं आणि ज्या काँग्रेसच्या आमदारांनी त्या पेनाने मतदान केलं त्यांची सगळी मतं बाद करण्यात आली.  त्यांनी इलेक्शन कमिशनने दोऱ्याला बांधून ठेवलेल्या जांभळ्या स्केचपेनने मतपत्रिकेवर आपलं मत नं  नोंदवता दुसऱ्या पेनाने आपलं मत नोंदवलं होतं असं इलेक्शन अधिकाऱ्यांनी म्हटलं होतं.अशाप्रकारे काँग्रेसची १२ मतं बाद झाली. 

तर रणजीत सुरजेवाला यांचं मत त्यांनी दुसऱ्या एका आमदाराला दाखवल्याने बाद झालं.

तर एका आमदाराने मतपत्रिकेत काही मार्किंगच केली नव्हती त्यामुळे ते मोजलं गेलं नाही. म्हणजे टोटल १४ मतं बाद.

त्यामुळं पेन बदलायच्या एका चालीने सुभाष चंद्रा २०१६ ला राज्यसभेत पोहचले. 

भाजपच्या आमदाराने पेन बदलला ते काँग्रेसच्या भूपेंदर हुड्डा यांच्या नेतृत्वाखालील नाराज आमदारांनी मुद्दाम हा कार्यक्रम केला असे अनेक आरोप त्यानंतर झाले पण त्याचा सुभाषचंद्रांच्या खासदारकीवर कोणताच परिणाम झाला नाही.

इलेक्शन कमिशमनने या त्रुटीची दखल घेत त्यानंतर झालेल्या राष्ट्रपती निवडणुकीत मतदारांना मतदानकक्षात पेन घेऊन जाण्यास मज्जाव केला होता आणि त्यांना इलेक्शन कमिशनने डिझाइन केलेल्या खास मार्करनेच मतदान करण्यास सांगितलं होतं.

आता यावेळीदेखील विरोधीपक्षातील नाराज आमदारांना आपल्याकडे ओढण्यासाठी सुभाष चंद्रा आणि  महाराष्ट्रासह इतर राज्यांत उभे राहिलेले अधिकचे उमेदवार कोणती नवीन पळवाटा शोधतात का हे पाहणं महत्वाचं असणार आहे. 

हे ही वाच भिडू :

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.