देशात कोण गिणत नव्हतं, आज भारतानं ॲथलेटिक्समध्ये ८ पदकं जिंकलीत…
याच वर्षीची मे महिन्यातली बातमी, दिल्लीच्या त्यागराज स्टेडियममध्ये आयएएस दाम्पत्याला कुत्र्याला फिरवत यावं म्हणून ॲथलिट्सची प्रॅक्टिस थांबवून स्टेडियम ७ वाजताच मोकळं केलं जायचं. ही बातमी चांगलीच गाजली आणि त्या आयएएस दाम्पत्यावर कारवाईही झाली. बघता बघता लोकं हा विषय विसरुन गेले, फक्त स्टेडियमची वेळ वाढवून रात्री १० पर्यंत करण्यात आली हाच काय तो फायदा त्यागराज स्टेडियमवर सराव करणाऱ्या खेळाडूंना झाला.
हे त्यागराज स्टेडियम बांधण्यात आलं होतं २०१० मध्ये भारतात झालेल्या कॉमनवेल्थ गेम्ससाठी. मात्र फक्त १२ वर्षात तिथं खेळाडूंनाच सराव करण्यापासून रोखलं जाऊ लागलं.
आणखीन एक किस्सा, त्यागराज स्टेडियमपासून थोड्याच अंतरावर असलेल्या जवाहरलाल नेहरू स्टेडियमचा. २०१० मध्ये जगभरातून कॉमनवेल्थ गेम्ससाठी खेळाडू भारतात आले होते. तेव्हा या स्टेडीयमवर ३० पेक्षा जास्त भटकी कुत्री होती. ज्यांच्यामुळं अनेक खेळाडूंना त्रास झाला आणि पार आंतरराष्ट्रीय मीडियामध्ये भारताचं नाक कापलं गेलं.
१२ वर्षानंतर २०२२ मध्ये, भारताचा हायजम्प ऍथलेट तेजस्विन शंकरनं सोशल मीडियावर एक स्टोरी टाकली, ज्यात तो याच जवाहरलाल नेहरु स्टेडियमवर प्रॅक्टिस करत होता आणि त्याच्या अगदी समोर असलेल्या भटक्या कुत्र्यांना हटवण्याचे प्रयत्न सुरू होते.
त्या प्रॅक्टिसनंतर तीन दिवसांनी तेजस्विन कॉमनवेल्थ गेम्ससाठी इंग्लंडला गेला आणि भारताला ब्रॉंझ मेडल जिंकून दिलं.
त्याचा स्ट्रगल फक्त कुत्र्यांना हाकलण्याचाच नव्हता, तर कॉमनवेल्थ गेम्समध्ये खेळायला मिळावं यासाठी त्याला आपल्याच देशाच्या फेडरेशनशी न्यायालयीन लढाई लढावी लागली होती.
इंटरस्टेट चॅम्पियनशिपमध्ये भाग घेतला नाही म्हणून तेजस्विनला कॉमनवेल्थ गेम्समध्ये स्थान नाकारण्यात आलं होतं, मात्र त्यानं थेट कोर्टात दाद मागितली. कोर्टाकडून दोन सुनावणींनंतर होकार आला, पण तोवर संघनिवड झालेली, राखीव खेळाडू म्हणून चान्स मिळायची शक्यता होती, पण दोन खेळाडूंना डोपिंग टेस्ट पार करता आली नाही आणि तेजस्विन इंग्लंडला गेला.
त्याच्या ब्रॉंझ मेडलनं त्याच्या कष्टाचं आणि लढाईचं चीज केलं.
अशीच काहीशी गोष्ट अविनाश साबळेची…
महाराष्ट्रातल्या बीडचा सुपुत्र असणाऱ्या अविनाशकडं कायम भारताचं ॲथलेटिक्समधलं भविष्य म्हणून पाहिलं जातं. २०१८ च्या एशियन गेम्समध्ये भाग घेण्यासाठी संधी दुखापतीमुळं हुकल्यावर त्यानं खचून न जाता नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये गोल्ड जिंकलं. आपलाच नॅशनल रेकॉर्ड ९ वेळा मोडायची कामगिरी त्यानं केली, अगदी २०२२ च्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये सिल्व्हर मेडल जिंकतानाही त्यानं नवं नॅशनल रेकॉर्ड प्रस्थापित केलं.
अविनाशनं मेडल जिंकल्यावरही त्याची फारशी चर्चा झाली नाही, किंवा त्याच्यावर बक्षिसांचा वर्षाव झाला नाही. आता हेच यश भारतानं कुठल्या सांघिक खेळात मिळवलं असतं, तर परिस्थिती साहजिकच वेगळी असती.
अविनाशचं यश किती महत्त्वाचं आहे, हे सोप्या शब्दात सांगायचं झालं तर…
अविनाश ३००० मीटर स्टीपलचेस या प्रकारात खेळतो, यात धावणं आणि अडथळ्यांची शर्यत पार करणं हे आव्हान असतं. या खेळावर केनियाचं एकहाती वर्चस्व आहे. १९९८ पासून सलग ६ कॉमनवेल्थ गेम्समध्ये या इव्हेंटमधली तिन्ही पदकं केनियन खेळाडूंनीच जिंकली होती. २०२२ मध्ये गोल्ड आणि ब्रॉन्झ केनियाच्या नावावर असलं, तरी सिल्व्हर जिंकत भारतानं त्यांच्या वर्चस्वाला धक्का द्यायचा प्रयत्न केलाय, हे ही तितकंच खरं.
त्यागराज स्टेडियम आणि जवाहरलाल नेहरु स्टेडियमची अवस्था भारतात ॲथलेटिक्सला किती महत्त्व दिलं जातं हे सांगायला पुरेशी होती.
इतकंच नाही, तर ऑलिंपिक्सबद्दल बोलायचं झालं तर १९०० साली नॉर्मन प्रिटचार्डनं २०० मीटर रेस आणि २०० मित्र हर्डल्समध्ये मेडल जिंकल्यानंतर ॲथलेटिक्समध्ये ऑलिम्पिक मेडल जिंकायला भारताला २०२१ मध्ये नीरज चोप्रानं केलेल्या पराक्रमापर्यंत वाट पाहावी लागली.
मिल्खा सिंग, पीटी उषा, अंजु बॉबी जॉर्ज यांनी पराक्रमाची शर्थ करुनही त्यांना मेडल जिंकण्यात मात्र यश आलं नाही.
कॉमनवेल्थ गेम्सबद्दल बोलायचं झालं तर,
२०१४ आणि २०१८ च्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारताला प्रत्येकी ३-३ मेडल्स मिळाली होती. त्यानंतर यंदाच्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारतानं खतरनाक यश मिळवलं. विशेष म्हणजे ज्यांच्याकडून हमखास मेडलची अपेक्षा केली जात होती, त्यातल्या नीरज चोप्रानं दुखापतीमुळं माघार घेतली, तर हिमा दासला मेडल जिंकण्यात अपयश आलं तरीही भारतानं फक्त ॲथलेटिक्समध्ये ८ मेडल्स कमावली आहेत.
त्यात ट्रिपल जम्पमध्ये गोल्ड आणि सिल्व्हर अशी दोन्ही पदकं भारताच्या एल्डोस पॉल आणि अब्दुल्ला अबुबाकेर यांनी जिंकली, तर चौथ्या क्रमांकावरही भारताचा प्रवीण चिथ्रावेल राहिला. १० हजार मीटर रेसवॉकमध्ये महिला आणि पुरुष गटात भारताला पदक मिळालं, भालाफेक, स्टीपलचेस, लॉन्ग जम्प, हाय जम्प अशा वेगवेगळ्या खेळात भारतानं मेडल्स जिंकली आहेत
अर्थात ही व्हरायटी खूप बोलकी आहेत, अनेक खेळाडूंनी पहिल्यांदाच इतक्या मोठ्या पातळीवर यश मिळवलं आहे. त्यामुळं हा मोठी स्पर्धा खेळण्याचा अनुभव, स्पर्धेतली लक्षवेधी कामगिरी आगामी ऑलिंपिक्समध्ये भारताच्या ॲथलेटिक्समधल्या पदकांची संख्या तर वाढवू शकेलच.
पण या ८ पदकांमुळं, कुत्र्याला फिरवण्यासाठी ॲथलेटिक्सची प्रॅक्टिस ७.३० वाजता थांबवण्याची हिंमत कोणी करणार नाही, हेही तितकंच खरं.
हे ही वाच भिडू:
- यापेक्षा भारी टेस्ट मॅच क्रिकेटच्या इतिहासात झाली नाही…
- अंपायर्सच्या चुकीमुळे भारत हरल्यावरही सविता भक्कम राहिली, कारण तिच्या कष्टाची गोष्ट भारी आहे
- या तीन क्रिकेटर्समुळं भारताला लॉन बॉल्समध्ये मेडल जिंकणं शक्य झालंय…