अन् राजकारणात सहाव्यांदा पलटी मारत नितीशकुमार पुन्हा एकदा ‘पलटूराम’ ठरलेत !
आज देशाच्या राजकारणात दोन मोठ्या घडामोडी घडल्या. एकीकडे महाराष्ट्रात मंत्रिमंडळाचा विस्तार होत शिंदे – फडणवीस सरकारने संसार मांडला तर दुसरीकडे बिहारमध्ये भाजप आणि नितीश कुमारांचा संसार मोडला. भाजप-जेडीयू युती सरकार कोसळलं…
नितीश यांनी २०१७ मध्ये आरजेडीसोबत युती तोडत एनडीएमध्ये परत येण्याचा निर्णय घेतला होता. २०१९ मध्ये मोदी-नितीश यांनी एकमेकांची मुक्तकंठाने स्तुती करत लोकसभा निवडणुका एकत्रित लढविल्या. मात्र, आता पुन्हा एकदा नितीशकुमार भाजपपासून वेगळे झाले आहेत. वेगळे होत त्यांनी नवीन सरकार स्थापन करण्यासाठी परत आरजेडीला निवडल्याचं बोललं जातंय.
मात्र या निर्णयाने कुणाला धक्का बसलेला नाहीये. कारण नितीश कुमार यांची ही जुनी सवय आहे, असं बोललं जातं. आजवर नितीश कुमारांनी अनेक पक्ष, राजकीय नेत्यांची वेळ साधत साथ सोडलीये.
तेव्हा कसा आहे नितीश कुमार यांचा ‘पलटूराम’ होण्याचा इतिहास, बघूया…
पहिली पलटी लालूंपासून दूर होत घेतली….
१९७४ दरम्यान देशातील अनेक पक्ष आणि नेते इंदिरा गांधींच्या विरोधात एकत्र येत होते. त्यावेळी नितीशकुमार जयप्रकाश नारायण यांच्या प्रेरणेतून जेपी आंदोलनाशी जोडले गेले आणि इथेच ज्येष्ठ समाजवादी नेते जॉर्ज फर्नांडिस आणि नितीश यांची जोडी जमली.
जॉर्ज राष्ट्रीय राजकारणात होते. तर नितीश यांना राज्याच्या राजकारणात लालू प्रसाद यादव यांच्यासोबत होते. नितीश लालूंना आपला ‘बडे भाई’ म्हणायचे. १९९० मध्ये नितीश यांनी लालूंना मुख्यमंत्री होण्यासाठी मोलाची मदत केली होती.
मात्र, १९९४ साली त्यांनी लालू यांच्या जनता दलावरील नियंत्रणाविरोधात बंड पुकारलं आणि जॉर्ज फर्नांडिस यांच्याशी युती करून ‘समता पक्षाची’ स्थापना केली.
दुसरी पलटी भाजपसोबत युती तोडत मारली…
समता पक्षाची स्थापना झाल्यानंतर १९९५ मध्ये नितीश यांनी लालूं विरोधात बिहार विधानसभा निवडणूक लढवली होती, पण त्यांचा पराभव झाला. तेव्हा त्यांनी आधार शोधायला सुरुवात केली आणि या शोधादरम्यान त्यांनी बिहारमध्ये कमकुवत समजल्या जाणाऱ्या भाजपशी १९९६ साली हातमिळवणी केली.
अटलबिहारी वायपेयी सरकारमध्ये त्यांना मंत्रीपद देखील देण्यात आलं. २००३ मध्ये शरद यादव यांच्या नेतृत्वातील जनता दल आणि नितीशकुमार यांच्या नेतृत्वातील समता पक्ष यांनी एकत्रित येत जेडीयूची स्थापना केली. भाजप आणि समता पक्षाची ही युती पुढील १७ वर्षे टिकली.
मात्र २०१४ च्या पूर्वी मोदी यांनी पंतप्रधानपदाचा उमेदवार बनण्याची तयारी सुरू केल्यावर देशातील अनेक मुख्यमंत्र्यांना पंतप्रधानपदाची स्वप्नं पडू लागली. नितीशकुमारही त्याला अपवाद नव्हते. नितीश कुमारांनी प्रत्यक्षपणे काही बोलून दाखवलं नव्हतं पण त्यांनी नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदाचा उमेदवार बनण्यास कडाडून विरोध होता, असं निरीक्षक सांगतात.
मोदींची प्रतिमा आणि पार्श्वभूमी याविषयी आक्षेप घेऊन नितीशकुमारांनी २०१३ मध्ये भाजपशी युती तोडली.
यानंतर त्यांनी तिसरी पलटी मारली महागठबंधन तोडून…
२०१४ च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी भाजपशी फारकत घेतल्यानंतर त्यांनी लालूप्रसाद यांच्या आरजेडी, काँग्रेस आणि इतर काही छोट्या पक्षांशी हातमिळवणी करत ‘महाआघाडी’ची स्थापना केली. २०१५ च्या राज्य विधानसभेच्या निवडणुकीत या महाआघाडीला १७८ जागा मिळवल्या आणि नितीश कुमार मुख्यमंत्री झाले आणि लालूंचा मुलगा तेजस्वी यादव उपमुख्यमंत्री झाले.
२० महिने हे सरकार चांगलं चाललं मात्र नंतर त्यांच्यात खटके उडायला सुरुवात झाली. यात भर पडली मनी लाँड्रिंग प्रकरणाची.
२०१७ मध्ये सीबीआयने लालूंच्या घरावर रेड मारली तेव्हा मनी लाँड्रिंग प्रकरणात उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांचं नाव समोर आलं. नितीशकुमार यांची प्रतिमा आतापर्यंत कायदा सुव्यवस्था, सांप्रदायिकता आणि भ्रष्टाचारावर कोणतीही तडजोड न करणारी राहिली आहे. म्हणून तेजस्वी यादव यांचं नाव घोटाळ्यात आल्याने नितीश कुमारांना हा पक्षाचा अपमान वाटला आणि मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देत ते महागठबंधन तोडत बाहेर निघाले.
चौथी पलटी आताची… भाजप सोबत युती तोडल्याची.
२०१७ ला आरजेडीपासून युती तोडत ते परत भाजपकडे गेले. भाजपच्या पाठिंब्याने २४ तासांपेक्षा कमी वेळात नितीश पुन्हा मुख्यमंत्रीपदी परतले. एनडीएच्या गोटात परतल्यानंतर सर्व काही आलबेल असल्याचं दिसून आलं. २०२० ची विधानसभा निवडणूक भाजप आणि जेडीयू यांनी एकत्रित लढली. मात्र या निवडणुकीच्या वेळी नितीश यांना मुख्यमंत्री पद देताना आणि सामान मंत्रिपदाच्या वाटपाबाबतीत भाजपच्या नेत्यांमध्ये नाराजी दिसली.
त्यानंतर पुढे त्यांचे सारखे खटके उडताना दिसले. दोन्ही पक्षाचे नेते एकमेकांचा अपमान करण्याची कोणतीही संधी सोडत नसल्याचं दिसून आलं. लोकसंख्या नियंत्रणाचा प्रस्ताव, जातनिहाय जनगणना, बिहारला विशेष प्रवर्गाचा दर्जा देण्याची मागणी आणि पटना विद्यापीठाला केंद्रीय विद्यापीठाचा दर्जा नाकारणं यासह अनेक मुद्द्यांवर भाजप आणि जेडीयूची वेगवेगळी मतं राहिली.
त्यात भाजप जेडीयुला कमजोर करत असल्याचा आरोपही होत होता आणि त्यामुळेच नितीश यांनी आपल्या कारकिर्दीतला सहावी पलटी मारली असल्याचं दिसतंय. भाजपची साथ सोडत नितीश कुमार यांनी एनडीए देखील सोडली आहे.
आज सकाळी भाजपशी युती तोडल्याचं त्यांनी जाहीर केलं आणि दुपारी त्यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देखील दिला. आता ते पुन्हा लालू प्रसाद यादव यांच्या आरजेडीबरोबर जाऊन सत्ता स्थापन करतील, अशी दाट शक्यता वर्तवली जातेय. कारण काही महिन्यांपासून हे लालूंच्या जवळ जात असल्याचे प्रसंग समोर येतायेत.
काही महिन्यांपूर्वी तेजस्वी यादव यांच्या घरी आयोजित इफ्तार पार्टीत नितीश कुमार पोहोचले होते तेव्हा या चर्चांना तोंड फुटलं होतं आणि नंतर यात भरच पडत गेली.
यासर्व घटनाक्रमामुळे बिहारच्या जनतेत `पल्टी बाबा’ म्हणून ओळखले जाणारे नितीश कुमार यांनी त्यांचा किताब साबूत ठेवल्याचं बोललं जातंय. अशीही प्रसिद्धी असू शकते असं नितीश कुमारांनी दाखवून दिलंय.
हे ही वाच भिडू :
- १८ व्या शतकात ब्रिटिशांनी घेतलेल्या त्या दोन निर्णयांमुळं बिहार आजपर्यंत गरीब राहिलाय…
- लालूंनी चक्क साध्या धोबिणीला विधान परिषदेवर पाठवलंय
- जाती आधारित जनगणना झाली तर नितीश कुमार यांना हे ५ फायदे होणार आहेत…