महाराष्ट्रातल्या या गावात १५ वर्षांपासून एकाही गुन्ह्याची नोंद झालेली नाही.
महाराष्ट्रात एक गाव आहे जिथे पंधरा वर्षांपासून एकही पोलीस फिरकला नाही. कारण काय तर या गावात गेल्या पंधरा वर्षांपासून गुन्हाच घडलेला नाही. अस कस ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमध्ये तरी भांडण होत असतील की, तर इथे गावाच्या मंदीरात सर्व गावगोळा होतं आणि बिनविरोध ग्रामपंचायतीचे सदस्य निवडले जातात. बरं इतकच नाही तर अवयवदान करण्याचा आदर्श देखील या गावाने जपला आहे. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या गावातली घरे महिलांच्या नावावर आहेत.
घरांची मालकी तर महिलांकडे आहेच पण प्रत्येक घराच्या दारावर कुटूंबप्रमुख म्हणून घरातील महिलांच नाव देण्यात आलं आहे.
महाराष्ट्रातल्या अशा लय भारी गावाच नाव देखील तितकच लय भारी आहे,
या गावाच नाव आनंदवाडी. तालुका निलंगा जिल्हा. लातूर.
मांजरा नदीच्या काठी वसलेले एकशेबारा घरांच हे छोटसं गाव. गावची लोकसंख्या एक हजार पस्तीस. नदीजवळ असल्याने बोअरवेलला बारामाही पाणी असते. गावात घेण्यात येणारं पिक म्हणजे ऊस, सोयाबीन, हरभर, मूग, ज्वारी ही पिके. पण ही पिके कशी घेतली जातात तर ठिंबक सिंचनाद्वारे ती देखील सामूहिक शेतीमधून. गावातले लोक शेतीसाठी काही सामग्री खरेदी करायची असल्याचं ती गटाद्वारे एकत्रित करतात.
एकदम वस्तू खऱेदी केल्यामुळे कंपन्या देखील आनंदाने ग्रामस्थांना डिस्कॉऊंट देतात.
आनंदवाडी गावाचा राज्यात उल्लेख केला तो गावातील घरांची मालकी महिलांच्या नावे केल्यामुळे. घरातील पुरूष भांडण झाल्यानंतर घरातून बाहेर काढेल. संसार करत असताना महिलांच्या मनात ही भिती कायमची असते. त्यावर तोडगा काढताना ग्रामसभेत महिलांच्या नावे घरे करण्याचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. त्याचबरोबरीने महिलांच्या नावे सातबारा व ८/अ या कागदपत्रावर लावून निम्मी शेती निम्मे घर महिलांच्या नावे करण्यात आले. असे प्रयोग फक्त कागदपत्री न राहता तो घराच्या दरवाज्यांवर कुटूंबप्रमुख म्हणून नाव लिहून अंमलात आणण्यात आला.
इतकच काय तर गावात कोणताही कार्यक्रम असेल तर पंगतीत पहिला महिलांना बसण्याचा मान इथे दिला जातो.
याच गावाचा उल्लेख भारतातील पहिले अवयवदान करणारे गाव म्हणून देखील केला जातो.
१४ ऑगस्ट २०१६ रोजी ग्रामस्थ श्रमदानासाठी गावच्या स्मशानभूमीत एकत्र आले होते. तेव्हा ग्रामपंचायत सदस्य असणाऱ्या दत्ता पुरी यांनी अवयवदानाचा संकल्प गावकऱ्यांच्या समोर मांडला होता. ३० ऑगस्ट ते ६ सप्टेंबर दरम्यान गावात अवयवदान जागृती घेवून ग्रामस्थांनी मिळून अवयव दान केले, २०१७ च्या माहितीनुसार गावात ४०७ जणांनी अवयवदान तर तीन जणांनी देहदान करण्याचा निर्णय घेतल्याचं सांगण्यात येत.
बाकी एकत्र येवून निर्मल ग्राम, तंटामुक्त गाव, जलसंधारणाची कामे या गावाने केलीच आहेत. तंटामुक्त अभियान, निर्मल ग्राम स्पर्धा आणि सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा अशा सर्व स्पर्धांमध्ये या गावाने उल्लेखनीय कामगिरी करत पुरस्कार मिळवले आहेत.
जाता जाता सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे या गावात मुलांच्या सोबतच मुलींच्या शिक्षणाकडे विशेष लक्ष दिले जाते. बहुतांश मुली या उच्चशिक्षित असून मेडिकल, इंजिनिरिंग अशा क्षेत्रात त्या उल्लेखनिय कामगिरी बजावत आहेत.
जमलच कधी तर आनंदी असणाऱ्या आनंदवाडीला नक्कीच भेट द्या..!!!
हे ही वाच भिडू.
- गुटखा सोडला आणि वाचलेल्या पैशातून १ हजार झाडांच जंगल उभा केलं..
- नागपूरच्या या माणसाने आत्तापर्यन्त आत्महत्या करणाऱ्या १,००० माणसांचा जीव वाचवलाय.
- ७०० कोटींच्या चेकमधले नको असलेले ६३० कोटी परत करणारे शिवशंकरभाऊ.