या पावसाळ्यात सोलो ट्रीपचा विचार करत असाल तर ही 10 ठिकाणं तुमच्यासाठीच आहेत..
अंगाची लाही लाही करणारा कडक उन्हाळा संपून दणक्यात मान्सूनची एंट्री झालीये, मागच्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस कोसळतोय, त्यामुळे सगळीकडे हिरवळ दिसू लागलीये. मातीचा सुगंध आणि रिमझिम बरसणाऱ्या सरीमुळे वातावरणात गारवा निर्माण झालाय, त्यामुळे आपल्यापैकी बर्याच जणांना बाहेर पावसात मस्त फिरण्याची इच्छा निर्माण होत असेलच.
निसर्ग विहार करायला तसं तर सगळ्यांनाच आवडतं पण प्रत्येकाची फिरण्याची एक पद्धत असते, जसं की काहींना आपल्या फॅमिली आणि मित्र मैत्रिणींसोबत फिरायला आवडतं तर काहींना एकटं फिरायला आवडतं. अशा
एकटं फिरण्याच्या कृतीलाच ‘सोलो ट्रॅव्हलींग’ म्हणतात. आजकाल हा ट्रेंड तरुणाई मध्ये लोकप्रिय होत असलेला दिसतोय.
सोलो ट्रॅव्हलींग मुळे वेगवेगळ्या ठिकाणच्या संस्कृती, खानपान, तिथली माणसं ह्या गोष्टी जवळून पाहता आणि अनुभवता येतात. त्यामुळेच आज आपण भारतातल्या अशा १० ठिकाणांबद्दल जाणून घेणार आहोत जिथे तुम्ही तुमच्या सोलो ट्रॅव्हलींगचा प्लॅन करू शकता.
१ हंपी, कर्नाटक
हंपी हे कर्नाटक मध्ये असणारं युनेस्कोचा जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळालेलं भारतातलं सुंदर ठिकाण आहे. तुम्ही जर इतिहास, कला, उत्तम स्थापत्य शैली यांचे चाहते असाल तर हे ठिकाण तुमच्यासाठी बेस्ट आहे.
५०० हून अधिक स्मारके, भरपूर टेकड्या,ऐतिहासिक मंदिरं तुम्हाला हंपीमध्ये पाहायला मिळतील, त्यामुळे जातानाच भरपूर वेळ काढून जा.
विजयनगर साम्राज्याचे राजकीय, राजेशाही केंद्र, मंदिरे आणि अगदी शाही सैन्यातील अधिकार्यांचे क्वार्टर हे सर्व येथे काही मैलांवर आहेत. इथं वाहणारी तुंगभद्रा नदी कोरॅकल बोटी आणि दगडी टेकड्या हंपीच्या सौंदर्यात भर घालतात. त्यामुळं तुम्ही जर सोलो ट्रिपचा प्लॅन करत असाल तर हंपीचा विचार नक्की करा.
कसे जाल?
सुरूवातीला तुम्हाला होसपेट या हंपी पासून जवळ असणार्या शहरात जावं लागेल. इथे तुम्ही ट्रेनने जाऊ शकता आणि त्यानंतर तिथून बस ने हंपीला पोहचू शकता. जर तुम्हाला विमानाने जायचं असेल तर तुम्ही हुबळी पर्यन्त विमानाने जाऊ शकता तिथून १६० किमी वर हंपी आहे आणि त्यानंतर बसने जाऊ शकता.
२ दूधसागर धबधबा, गोवा
कर्नाटक-गोव्याच्या सीमेवर घनदाट जंगलात असलेला प्रसिद्ध दूधसागर धबधबा दरवर्षी पावसाळा सुरवात होताच देशविदेशातील पर्यटकांना खुणावत असतो. दरवर्षी हा धबधबा जुलैनंतरच पूर्ण क्षमतेने प्रवाहीत होतो. उंच शिखरावरुन कोसळणार्या या धबधब्याचे मनोहारी रुप पाहण्यासारखे असते.
धबधब्याचे फेसाळणारे शुभ्र पाणी पर्यटकांना साद घालत असते आणि हेच शुभ्र पाणी दुधासारखे दिसत असल्याने त्याला ‘दूधसागर’ असं नाव देण्यात आलं आहे.
समोरच असलेला रेल्वेपूल त्यावरून धावत जाणारी रेल्वे, डोंगरकड्यावरून कोसळणारं पाणी, हा नजारा आत्तापर्यंत कित्येक सिनेमांमधुन आपण बघितला असेल. या पावसाळ्यात निसर्गाचा हा चमत्कार बघायला नक्की जाऊन या..
कसे जाल ?
दूधसागर धबधब्याला जाण्यासाठी तुम्ही रेल्वेनेही जाऊ शकता. कोल्लेम या जवळच्या रेल्वे स्टेशन वर उतरून जाता येतं. बाय रोड जाणार असाल तर नॅशनल हायवे ४ए ने जाऊ शकता.
३ वर्कला बीच, केरळ
वर्कला बीच केरळच्या तिरुवनंतपुरम जिल्ह्याच्या सीमेवर वसलेली एक शांत वस्ती आहे. पोन्नुमथुरुथु बेट, पापस्नानम बीच, कपिल तलाव, जनार्दन स्वामी मंदिर ही येथे पाहण्यासारखी काही ठिकाणे आहेत. इथे तुम्ही समुद्रकिनार्यावर निवांत झोपाळा लाऊन झोपू शकता आणि मस्त दिवसभर किनारा बघत आराम करू शकता.
अनेक आयुर्वेदिक मसाज आणि थेरपी केंद्रांमुळे वर्कला हे झपाट्याने लोकप्रिय आरोग्य केंद्र बनत आहे.
आपण आपला अनेक दिवसांचा थकवा देखील येथे दूर करू शकता. वर्कला हे ध्यान आणि कला आणि सर्जनशील कार्यशाळांसाठी देखील प्रसिद्ध आहे. इथले हाताने बनवलेले दागिने देखील तुम्हालानकीच आवडतील.
नयनरम्य समुद्रकिनाऱ्यांप्रमाणेच, २००० वर्षे जुने विष्णूचे प्राचीन मंदिर आणि समुद्रकिनाऱ्यापासून हाकेच्या अंतरावर असलेला आश्रम – शिवगिरी मठ इथं तुम्हाला नारळाची झाडे, समुद्रकिनाऱ्याच्या आसपास झोपड्याही आढळतात.
कसे जाल?
वर्कला शहर आणि रेल्वे स्टेशनपासून ते फक्त १० मिनिटांच्या अंतरावर आहे. वर्कला रेल्वे स्थानकावर २० भारतीय रेल्वे गाड्या थांबतात. बीच वर जाण्यासाठी ५० रुपये भरून तुम्ही येथून ऑटो रिक्षा करून जाऊ शकता. कोची आणि तिरुवनंतपुरम विमानतळावरून तुम्ही इथे सहज पोहोचू शकता. येथे तुम्हाला हॉटेल्सपासून गेस्ट हाऊसपर्यंत वाजवी दरात राहण्याची सोय मिळेल.
४ ऋषिकेश, उत्तराखंड
ऋषिकेश भारताच्या उत्तराखंड राज्यातील एक तीर्थक्षेत्र आहे. ऋषिकेश हरिद्वाराच्या उत्तरेस ४५ कि.मी. अंतरावर गंगा आणि चंद्रभागा नद्यांच्या संगमावर आणि हिमालयाच्या पायथ्याशी वसलेलं शहर आहे. साहसी रायडिंग, प्राचीन मंदिरे, लोकप्रिय कॅफे आणि
“जगातील योग राजधानी” म्हणून ऋषिकेश ला ओळखलं जातं.
व्हाईटवॉटर राफ्टिंग हा व्यवसाय वाढल्याने आणि विविध प्रकारचे कॅम्पिंग आणि कॅफे स्पॉट्स उदयाला आल्याने, ऋषिकेशची लोकप्रियता वाढतच चालली आहे.
कसे जाल?
ऋषिकेशला रेल्वे आणि रस्त्याची चांगली कनेक्टीव्हिटी आहे. दिल्ली, डेहराडून आणि उत्तराखंडमधील इतर शहरांमधून ऋषिकेश साठी बसेस उपलब्ध आहेत.
५ शिमला-मनाली, हिमाचल प्रदेश
हिमाचल प्रदेशातील प्रसिद्ध पर्यटनस्थळांमध्ये मनालीचा पहिला नंबर लागतो. कारण मनालीतील निसर्ग सौंदर्य, बाजारपेठ, तिथलं वातावरण आणि इतर अनेक गोष्टी प्रसिद्ध आहेत.
इथं बर्याचदा असे पर्यटक येतात ज्यांना शहरातील गर्दीपासून काही दूर ठिकाणी फिरायला आवडतं.
म्हणून तुम्ही जर सोलो ट्रीप मारणार असाल तर मनाली तुमच्यासाठी चांगला ऑप्शन आहे. सोलान व्हॅली, रोहतांग पास, बियास कुंड, वशिष्ठ मंदिर,हिडिंबा मंदिर ही मनालीची पाहण्यासारखी ठिकाणं आहेत.
कसे जाल?
शिमला- मनालीला जाण्यासाठी तुम्ही फ्लाईटने जाण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला दिल्ली किंवा चंदीगढपर्यंत जाता येईल. पुढे तुम्हाला कार किंवा या ठिकाणी जाणाऱ्या बसदेखील मिळतिल.
६ लोणावळा
लोणावळा हे महाराष्ट्रातील प्रमुख पर्यटन स्थळ आहे. मुंबई पुण्याबरोबरच देशातून मोठ्या संख्येने सुट्टीचा आनंद घेण्यासाठी पर्यटक येत असतात. याची समुद्रसपाटीपासून उंची ६२० मिटर असून सह्याद्री पर्वत रांगेमध्ये वसलेले आहे.
लोणावळा हे महाराष्ट्रातील प्रमुख थंड हवेच्या ठिकाणांपैकी आहे.
या ठिकाणी उंच डोंगर रांगा दऱ्या धबधबे विपुल वनसंपदा किल्ले, लेणी, थंड हवा यासारख्या नैसर्गिक साधन संपत्ती बरोबरच मनोरंजन पार्क, थीम पार्क, कॅम्पिंग, पॅराग्लायडिंग, बंजी जंपिंग यासारख्या ऍक्टिव्हिटी मुळे पर्यटकांमध्ये प्रमुख आकर्षणाचे केंद्रबिंदू झाले आहे. इथला भुशी डॅम, कार्ला लेणी, राजमाची, लायन्स पॉइंट, टायगर पॉईंट्स इत्यादि परिसर पाहण्यासारखे आहेत.
कसे जाल?
लोणावळा हे पुणे आणि मुंबई या दोन्ही ठिकाणांपासून जवळ असलेलं ठिकाण आहे. इथे येण्यासाठी रस्ता आणि रेल्वे या दोन्ही मार्गांनी तुम्ही येऊ शकता.
७ नाशिक
नाशिक हे उत्तर महाराष्ट्रातील एक सुंदर शहर आहे. हे शहर महाराष्ट्रातील निसर्गरम्य पर्यटन स्थळांपैकी एक आहे. नाशिकची द्राक्षं भरपूर प्रसिद्ध आहेत, त्यामुळेच आंतरराष्ट्रीय स्तरावर नाशिक शहर उत्तम दर्जाची दाक्षं आणि वाईनसाठी ओळखलं जातं. हे शहर गोदावरीच्या कुशीत वसलेलं एक तिर्थस्थळ देखील आहे. महाराष्ट्रातील अनेक प्रसिद्ध मंदिरे नाशिकमध्ये आहेत.
बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असणारं ‘त्र्यंबकेश्वर’ हे मंदिर नाशिक मध्येच आहे.
इथे तुम्ही नाशिक लेणी, मुक्तीधाम मंदिर,गंगापूर धरण, काळाराम मंदिर, सुला वाईन्स, सीता गुफा, सप्तश्रृंगी देवी इत्यादि ठिकाणांना भेटू देऊ शकता.
कसे जाल?
नाशिकला जाण्यासाठी रेल्वे, बस अशा भरपूर सुविधा उपलब्ध आहेत. एसटी महामंडळच्या बसने सुद्धा तुम्ही आरामात जाऊ शकता.
८ दार्जिलिंग
पश्चिम बंगालमधील दार्जिंलिंग हे ठिकाण फिरण्यासाठी खूपच प्रसिद्ध आहे. बर्फाच्छादित शिखरांनी वेढलेल्या, हिरव्यागार दर्यांनी सुशोभित झालेल्या दार्जिलिंगला पश्चिम बंगालचं स्वित्झर्लंड असंही म्हणतात. भारतात ब्रिटीशांचे राज्य असताना उन्हाळ्यात फिरण्यासाठी ब्रिटीश या ठिकाणी थंडावा मिळवण्यासाठी जात असतं. दार्जिलिंगमध्ये माथेरानप्रमाणे मिनी ट्रेन आहे. इथे तुम्हाला मोठ मोठे चहाचे मळे पाहायला मिळतील.
सतत कटिंग करून निगा राखलेले चहाचे मळे दार्जिलिंगच्या सौंदर्यात भर टाकतात. या चहाच्या मळ्यांमुळे दार्जिलिंगच्या डोंगर उतारावर जणू हिरवे गालिचेच पसरलेत असं दिसतं.
सर्व प्रकारच्या हिरव्या रंगांच्या शेड असणार्या वनस्पतींनी नटलेल्या टेकड्या तिथं आहेत. त्यामुळं दार्जिलिंगचं स्वत:चं असं एक सौंदर्य आहे आणि वेगळपणही आहे. सक्या मठ, मागडोग मठ, जपानी मठ, रॉक गार्डन, रॉक गार्डन अशी बरीच ठिकाणं इथे तुम्हाला पाहता येतील.
कसे जाल?
बागडोगरा विमानतळ दार्जिलिंगपासून २ तासांच्या अंतरावर आहे. या शिवाय या ठिकाणांहून कोलकाता सुद्धा जवळ आहे. तुम्ही कोलकाता- दार्जिलिंग असा प्रवाससुद्धा करता येतो.
९ मुन्नार, केरळ
केरळला देवभूमी का म्हणतात हे तिथे गेल्याशिवाय कळत नाही. विस्तीर्ण पसरलेले चहाचे मळे, सुंदर समुद्रकिनारे, जुनी मंदिरं इत्यादि गोष्टी तुम्ही तिथे पाहू शकता.
केरळमधील ‘मुन्नार’ हे थंड हवेचं ठिकाण जणू स्वर्गासारखं आहे.
हे तीन पर्वतांच्या श्रेण्या मुथिरपुझा, नल्लथन्नी आणि कुंडलच्या संमेलनाचे ठिकाण आहे. इथे तुम्हाला चहाचे मळे, मसाल्याच्या पदार्थांची झाडं, सुंदर बीचेस अशा बर्याच गोष्टी बघता येतील.
कसे जाल?
विमानाने जाणार असाल तर तुम्हाला सगळ्यात जवळचे विमानतळ कोची हे आहे. तेथून बायरोड तुम्ही ३ तासात मुन्नारला पोहोचाल. तुम्ही ट्रेनने जाणार असाल तर तुम्हाला कोची किंवा एर्नाकुलम स्टेशनवरुन प्रायव्हेट गाडी किंवा टॅक्सी करुन जाता येईल.
१० महाबळेश्वर
महाबळेश्वर हे समुद्रसपाटीपासून १३७२ मीटर उंचीवर वसलेले थंड हवेचे ठिकाण व महाराष्ट्रातलं पर्यटनाचं महत्वाचं ठिकाण आहे. कृष्णा, वेण्णा, कोयना, सावित्री व गायत्री या पाच नद्या येथून उगम पावतात. या पंचगंगेचे येथे देऊळ आहे. वेण्णा तलावात नौकाविहाराची सोय आहे.
विल्सन पॉईंट व माखरिया, केल्स, एको, आर्थर सीट, विडो, कसल रॉक व सावित्री पॉईंट, मार्जोरी ट, एल्फिन्स्टन , कॅनॉट पीक हंटर, नॉर्थकोर्ट, लॉडविक, बॉम्बे , हत्तीचा माथा, चायनामन धबधबा, फाकलेड पॉईंट असे भरपूर पॉईंट्स इथे तुम्हाला बघयला मिळतील.
कसे जाल?
महाबळेश्वरसाठी तुम्हाला बस, ट्रेन असा प्रवास करता येईल.
हेही वाच भिडू
- महाबळेश्वर हे पर्यटनस्थळ म्हणून उदयास आले ते या छत्रपतींमुळे
- राजकारणाचा लईच कंटाळा आला असला, तर हे ४ पर्याय ट्राय मारुन बघा…
- सह्याद्रीच्या जंगलात हरवलात, चुकलात तर काय करायचं अन् काय नाही हे समजून घ्या..