काँग्रेस नेता हाताशी धरून अखिलेश यादव युपीमध्ये जाट-मुस्लिम कॉम्बिनेशन बनवू पाहत आहेत

आगामी काळात उत्तर प्रदेशात निवडणुका येऊ घातल्या आहेत. या पार्श्वभूमीवर तेथील हालचालींना वेग आलेला आहे. उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टी आणि भाजपा यांच्यात खरी लढत बघायला मिळणार आहे. या लढतीमध्ये रंगत आणली आहे ती म्हणजे एका नेत्याच्या पक्षप्रवेशाने… ते म्हणजे सध्याचे काँग्रेसचे उत्तर प्रदेशातील राष्ट्रीय सचिव इम्रान मसूद हे काँग्रेसला मोठा झटका देण्याच्या तयारीत आहेत. समाजवादी पार्टीत होणारा त्यांचा प्रवेश जवळजवळ निश्चित सांगितला जातोय.

इमरान मसूद हे प्रियंका गांधींचे निकटवर्तीय मानले जातात. सद्या ते समाजवादी पार्टीत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत… फक्त चर्चाचं नाही त्याचा पुरावा म्हणजे अलीकडेच त्यांनी स्वतः “आपण लवकरच समाजवादी पार्टीत प्रवेश करत असल्याचे स्पष्ट केले होते”. यासंदर्भात 10 जानेवारीला इम्रान मसूद यांनी प्रसार माध्यमांना माहिती दिली की- “मी आज माझ्या कार्यकर्त्यांची बैठक बोलावली होती, मी माझ्या कार्यकर्त्यांशी आणि सहकार्‍यांशी या विषयावर (सपा मधे प्रवेश करण्यासाठी) सल्लामसलत केली आहे, त्यांनी मला जाऊन अखिलेश यादव यांना भेटण्याची आणि समाजवादी पार्टी शी जोडण्याची परवानगी दिली आहे.”

येत्या विधानसभा निवडणुकांमध्ये युपी मधील निवडणुकात थेट लढत ही बीजेपी व समाजवादी पार्टी या दरम्यान असणार आहे. म्हणूनच आपण सपा मध्ये प्रवेश करणार आहोत असे त्यांनी म्हटले.

प्रियांका गांधींचे निकटवर्तीय मानले जाणारे हे इमरान मसूद कोण आहेत?

2007 मध्ये, इम्रान मसूद यांनी सहारनपूरच्या मुझफ्फराबाद म्हणजेच सद्याचे बेहट विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून पहिल्यांदा निवडणूक जिंकली. त्यानंतर त्यांना कधीही विधानसभा निवडणूक जिंकता आली नाही. इम्रान यांनी 2012 आणि नंतर 2017 च्या विधानसभा निवडणुका सहारनपूरच्या नकुड विधानसभा मतदारसंघातून लढवल्या होत्या, त्यातही त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता.

विधानसभा निवडणुकीव्यतिरिक्त इम्रान यांनी लोकसभा निवडणुकीतही नशीब आजमावले होते. 2014 आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीत ते काँग्रेसच्या तिकिटावर रिंगणात होते, पण त्यांना विजय मिळवता आला नाही. 2014 मध्ये भाजपचे राघव लखनपाल सहारनपूर लोकसभा मतदारसंघातून विजयी झाले, तर 2019 मध्ये बहुजन समाज पार्टी (BSP) च्या हाजी फजलुर रहमान यांनी इम्रान मसूद यांचा पराभव केला.

बरं राजकीय कारकिर्दीत एवढे सलग राजकीय पराभव होऊनही पश्चिम उत्तर प्रदेशातील मुस्लिम मतदारांमध्ये इम्रान मसूद यांचा चांगला प्रभाव असल्याचे मानले जाते. यामुळेच यूपी निवडणुकीपूर्वी सपामध्ये जाण्यामुळे पश्चिम यूपीमध्ये काँग्रेसला नुकसान होऊ शकते हे मात्र नक्की.

ते सपा मध्ये जातायेत याचा अर्थ ते आगामी निवडणुकीत नशीब आजामावण्यासाठी वेगळा पक्ष देखील आजमावत आहेत…

बऱ्याच दिवसांपासून काँग्रेसचे नेते इम्रान मसूद यांना निवडणुकीत विशेष काही दाखवता आले नाही, त्यामुळे ते सपामध्ये जात आहेत. सपाकडे काँग्रेसपेक्षा जास्त मतदार आहेत, त्यामुळे आगामी निवडणुकीत त्यांना यश मिळू शकेल, असे त्यांना वाटते.

मसूद यांनाच सपा ची गरज नसून तर सपालाही त्यांची गरज आहे! कशी काय???

मोठं आणि स्पष्ट कारण म्हणजे, सपाकडे पश्चिम यूपीमध्ये मोठा मुस्लिम चेहरा नाही. पक्षाचे दिग्गज नेते आझम खानही तुरुंगात आहेत. अशा स्थितीत सपाही एका मोठ्या मुस्लिम नेत्याच्या शोधात आहे. इम्रान मसूद यांची उंची आझम खान यांच्याइतकी मोठी नसली तरी पश्चिम उत्तर प्रदेशातील अनेक जागांवर इम्रान मसूद यांची चांगली पकड आहे. सपा नेत्यांचा असा विश्वास आहे की जर मसूद काँग्रेस सोडून सपामध्ये सामील झाले तर पश्चिम उत्तर प्रदेशातील ते मुस्लिमही पक्षात सामील होतील, ज्यांनी मसूद यांच्याकडे बघून काँग्रेसला मत दिले होते.

आणखी एक मुद्दा म्हणजे, अखिलेश यादव पश्चिम युपीमध्ये जाट-मुस्लिम कॉम्बिनेशन बनवू पाहतायेत…

पश्चिम यूपीमध्ये, 26 जिल्ह्यांमध्ये 136 विधानसभेच्या जागा आहेत, ज्यामध्ये मेरठ, सहारनपूर, मुरादाबाद, बरेली, आग्रा यासह अनेक जिल्ह्यांचा समावेश आहे. या प्रदेशात सुमारे 20 टक्के जाट आणि 30 ते 40 टक्के मुस्लिम लोकसंख्या आहे. म्हणजेच जाट-मुस्लिम कॉम्बिनेशन जवळपास कोणत्याही पक्षाचा विजय ठरवत असतेय.  2017 बद्दल बोलायचे झाले तर, पश्चिम उत्तर प्रदेशात भाजपने 136 पैकी 109 जागा जिंकल्या होत्या. तर सपाच्या वाट्याला केवळ 20 जागा आल्या.

आता 2022 च्या विधानसभा निवडणुकीत मात्र सपा कसल्याही प्रकारची रिस्क घेणार नाही, सपा ला 2017 च्या निवडणुकीच्या निकालांची पुनरावृत्ती करायची मुळीच इच्छा नाही आणि म्हणूनच त्यांनी प्रथम अजित सिंग आणि जयंत चौधरी यांचा पक्ष आरएलडीशी युती केली आणि आता इम्रान मसूदला आपल्या पक्षात आणत आहेत….इलेक्शन हैं भाई… कोई रिस्क नहीं मांगता…

बरं आधी काँग्रेस मध्ये असणारे अन आता सपा मध्ये जाणारे हे इम्रान मसूद एकदा त्यांच्या वक्तव्यामुळे चर्चेत आलेले, वक्तव्य नाहीच खरं तर धमकीमुळेच म्हणावं लागेल… आणि म्हणूनच त्यांना अटक देखील झाली होती. 

इम्रान मसूद यांनी 2014 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल ‘बोटी-बोटी’ वक्तव्य केले होते, त्यानंतर ते चर्चेत आले होते. 2014 मध्ये इमरान मसूदने भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्यावर एका मेळाव्यात आरोप केला होता. ते म्हणाले होते की, गुजरातमध्ये चार टक्के मुस्लिम आहेत, इथे 40 टक्के आहेत. नरेंद्र मोदी इथे आले तर त्यांची बोटी बोटी करू. या वक्तव्याबाबत सहारनपूरच्या देवबंद कोतवालीमध्ये मसूदविरोधात एफआयआर दाखल करण्यात आले होते, त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली होती.

हे हि वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.