भारताच्या अंतिम टोकावर संरक्षण मंत्र्यांचं स्वागत हर हर महादेवच्या घोषणेनं झालं..
बंगालच्या उपसागरात असणारी अंदमान निकोबार बेटे. भारताच्या गळ्यात गुंफलेला पाचूचा नेकलेस. नजरेत न मावणारे विस्तीर्ण समुद्र किनारे, पांढरीशुभ्र वाळू, आपल्याशी हितगुज करणाऱ्या अगणित लाटा आणि हिरवीगार सदाहरित जंगले हे तेथील आकर्षण.
या बेटांना स्वातंत्र्यलढ्याचा जाज्वल्य इतिहास आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर व असंख्य क्रांतीकारकांना काळ्या पाण्याची शिक्षा भोगायला लावणारं सेल्युलर जेलदेखील इथेच आहे. दुसऱ्या महायुद्धात भारताला स्वतंत्र करण्यासाठी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या नेतृत्वाखाली आझाद हिंद सेना या बेटांवर येऊन थडकली होती. कित्येकांनी आपले रक्त सांडले, शौर्याच्या अमर गाथा लिहिल्या.
आज भारताचा अभिमान म्हणून अंदमान निकोबार बेटांना ओळखलं जातं. अशा या ऐतिहासिक बेटांना मराठा इतिहासाचा देखील स्पर्श झालाय.
एकेकाळी हि बेटे अत्यंत निर्जन होती. तुरळक ठिकाणी काही आदिवासी जमाती वास्तव्य करायच्या मात्र त्यांचा आधुनिक जगाशी काहीही संबंध आलेला नव्हता. अजूनही त्यातील सेन्टेनली सारखी जमात त्याच जगात जगत असते. या बेटांना भारताशी जोडलं मराठी आरमाराने.
सोळाव्या शतकात छत्रपती शिवाजी महाराजांनी टोपीकर इंग्रज आणि पोर्तुगीज यांच्यावर वचक बसवण्यासाठी मराठा आरमाराची स्थापना केली. या आरमाराला वाढवण्याचं काम कान्होजी आंग्रे यांनी केलं. मुंबई ते वेंगुर्ला या किनारपट्टीवर त्यांचे वर्चस्व होते. अरबी समुद्रातच नाही तर हिंदी महासागर आणि बंगालचा उपसागर या भागातही मराठ्यांच्या लढाऊ नौका फिरत होत्या. दर्यासारंग कान्होजी आंग्रेंची दहशत लंडनपर्यंत पोहचली होती. त्यांचा बंदोबस्त कसा करावा हा प्रश्न इंग्रज सत्तेला पडला होता.
बंगालच्या उपसागरावर नियंत्रण मिळवण्यासाठी तिथल्या इंग्रज डच आणि पोर्तुगीज जहाजांशी लढा देण्यासाठी कान्होजी आन्ग्रेनी थेट अंदमान बेटावर आपला नाविक तळ उभा केला.
अंदमान बेटावरचा हा पहिला नाविक तळ होता.
कान्होजी आंग्रे यांचा हा व्युव्हात्मक निर्णय होता. कलकत्ता, मद्रास, पोंडेचरी येथून जाणारी इंग्लिश, डच जहाजे मराठ्यांच्या टप्प्यामध्ये आली. जंग जंग पछाडूनही इंग्रजांना सरखेल कान्होजी आंग्रेंचा पराभव करणे शक्य होत नव्हते. दुर्गम अशा अंदमान निकोबार बेटांमध्ये वेगाने जाऊन लपणार्या मराठी जहाजांचा पाठलाग करण्यासाठी गेलेल्या इंग्लिश नौका तिथेच जलसमाधी घेत होत्या.
खरं तर हा भाग भारतापेक्षा आग्नेय आशियाई देशांना अंतराच्या बाबतीत जास्त जवळ आहे. पण कान्होजी आंग्रे आणि मराठा आरमाराने तेव्हा नाविक तळ उभारला म्हणून अंदमान निकोबारवर कायमसाठी भारताचा अधिकार दृढ झाला.
मधल्या काळात अनेक घटना घडल्या. इंग्रजांनी हि सामरिक दृष्ट्या महत्वाची बेटे जिंकून घेतली. चीनपासून ते इंडोनेशियापर्यंतच्या व्यापारावर त्यामुळे वचक ठेवता येणार होती.
३० डिसेंबर १९४३ रोजी आझाद हिंद सेनेने अंदमान निकोबार बेटे जिंकून घेतली. सुभाषचन्द्र बोस यांनी त्यांची नावे अनुक्रमे शहिद द्वीप आणि स्वराज द्वीप अशी बदलली. मात्र जवळपास २ वर्षे हि बेटे आझाद हिंद सेनेकडे होती. मात्र पुढे जपानचा दुसऱ्या महायुद्धात पराभव झाला, नेताजींचा देखील विमान अपघातात मृत्यू झाला. त्यामुळे अंदमान निकोबार बेटे पुन्हा इंग्रजांच्या ताब्यात गेली.
भारताचा दुसऱ्या महायुद्धाशी तसा अर्थ अर्थी संबंध नव्हता तरी युरोप आणि आफ्रिकेत जर्मनी इटली इथे झालेल्या लढायांमध्ये लढली. हिटलर मुसोलिनी सारख्या हुकूमशाही सत्तांना हरवण्यात त्यांचाही हातभार लागला होता. विशेषतः मराठा रेजिमेंट आणि महार रेजिमेंट यांनी या भागात मोठा पराक्रम गाजवला.
दुसऱ्या महायुद्धाने पोळलेल्या इंग्लंडला भारतावर फार काळ राज्य करणे शक्य नव्हते. १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य देण्यात आलं.
शून्या पासून नवीन देश उभारण्याच्या दृष्टीने भारताचे राज्यकर्ते कामाला लागले होते. इंग्रजांनी अंदमान मध्ये सुरु केलेलं काळ्या पाण्याचं कारागृह कधीच बंद करण्यात आलं होतं. अंदमान निकोबार मध्ये मनुष्य वस्ती वसवण्यासाठी प्रयत्न सुरु झाले. याला कारण एक गंमतीशीर घटना ठरली.
झालं असं कि स्वातंत्र्यानंतर एकदा निकोबार बेटाचे कमिशनर ए. के. घोष दक्षिण निकोबार मधील कोंडूल , छोटे निकोबार बेटाला भेट द्यायला गेल्यावर तेथील खेड्याचा सरपंच ब्रिटिश युनियन जँक झेंडा घेऊन भेटायला आला. त्याला ब्रिटिश सरकारची निकोबार वरील सत्ता संपुष्टात आल्याचे माहिती नव्हते. नंतर त्याला युनियन जँक काढून भारताचा झेंडा देण्यात आला.
भारत सरकारने निकोबार बेटावर मनुष्य वस्ती वाढवण्यासाठी दुसऱ्या महायुद्धात पराक्रम केलेल्या शूरवीर जवानांना तिथल्या बेटांवर जागा बक्षीस दिली. निकोबारमधल्या गावांमध्ये निवृत्त सैनिकांच्या वसाहती स्थापन केल्या. दुसऱ्या महायुद्धात पराक्रम केलेले मराठा वमहार रेजिमेंटचे अनेक सैनिक निकोबार बेटावर वसले.
निकोबार बेट हा भारताचा दक्षिणेतला शेवटचा पॉईंट समजला जातो. आजही तिथे गेल्यास रात्रीच्या वेळी बँकॉकचे दिवे दिसतात. बेटावरील दळणवळणाचे जाळे अत्यंत कमी आहे. कॅंपबेल बे हे बेटावरील सर्वात मोठे गाव असून साधारणपणे ५००० इतकी लोकसंख्या आहे. कॅंपबेल बे व परीसरात लष्कराने मोठी ठाणी स्थापली आहेत. नौदलाचा तळ व हवाईपट्टी देखील कॅंपबेल बे येथेच् आहे.
३० एप्रिल १९७२ रोजी निकोबार बेटाचे सर्वात शेवटचे टोक असलेल्या पिग्मेलियन पॉइंट येथे समुद्रातील नौकांना दिशादर्शक म्हणून एक दीपस्तंभ उभारण्यात आला. भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधींनी या जागेला भेट दिली होती. पुढे त्यांचा मृत्यू झाल्यावर निकोबार बेटावरच्या खासदारांनी मागणी केली आणि पंतप्रधान राजीव गांधींनी त्या पॉईंटचे नाव इंदिरा पॉईंट असे केले.
पुढे एकदा भारताचे संरक्षणमंत्री शरद पवार हेलिकॉप्टरमधून निकोबार बेटाच्या पाहणीसाठी गेले. त्यावेळी इंदिरा पॉईंटवरील हेलिपॅडवर जेव्हा त्यांचं हेलिकॉप्टर उतरलं तेव्हा अचानक तिथे जमलेल्या लोकांकडून हर हर महादेव, छत्रपती शिवाजी महाराज कि जय च्या घोषणा झाल्या.
पवारांना आश्चर्याचा धक्का बसला. त्यांनी चौकशी केल्यावर कळालं की दुसऱ्या महायुद्धात पराक्रम गाजवलेल्या मराठा व महार रेजिमेंटचे हे माजी सैनिक आहेत. शरद पवार आपल्या आत्मचरित्रात सांगतात,
“देशाच्या पायथ्याशी या घोषणा ऐकताना विलक्षण रोमांच उभं राहिलं. एरव्ही ज्या भागात आपल्या आयुष्यात कधी जाण्याची संधी नाही तिथं मला संरक्षण मंत्रीपदाच्या निमित्तानं जाता आलं हे भाग्यचं म्हटलं पाहिजे.”
२००४ सालच्या त्सुनामीने मात्र भागाचा संपूर्ण विध्वंस करून टाकला. अनेक घरे वाहून गेली. प्रत्यक्षदर्शीं कडून तसेच येथे भेट देणाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार सुनामीची लाट ही येथे ३५ फुटांपेक्षाही अधिक होती. मानवी तसेच जंगलांची मोठ्या प्रमाणावर जिवितहानी झाली. आज इंदिरा पॉईंट येथे फक्त चारच घरे उरली आहेत.
देशाच्या शेवटच्या टोकाला असणारी ही मराठी कुटुंबे आजही तिथे आहेत का याची निश्चित माहिती उत्तर मिळत नाही.
हे ही वाच भिडू
- गेली दोनशे वर्ष केरळ मधल्या या कुटुंबांनी मराठी बाणा अभिमानाने जपलाय
- कराचीमध्ये शाळेला मराठी माणसाचे नाव आहे पण पाकिस्तानने ते बदलले नाही
- गेली शंभर वर्ष ही संस्था मद्रासमध्ये मराठी मुलांच्या शिक्षणासाठी कार्य करत आहे..