इंडोनेशियातलं शंकराच मंदिर हिंदू धर्माच भारताबाहेरचं सर्वात मोठं प्रतिक मानलं जात
भारतीय संस्कृती जगातील सर्वात प्राचीन संस्कृती म्हणून ओळखली जाते. जिचा शोध जवळपास ४५०० वर्षापूर्वी लागल्याचं म्हंटल जात. ही भारतीय संस्कृती जगाच्या कानाकोपऱ्यात पसरलीये. ज्याचे पुरावे आजही अनेक देशांत आहेत. असचं एक प्राचीन शिव मंदिर इंडोनेशियाच्या जावा इथं आहे. तिथल्या हिंदू मंदिरांच सर्वात मोठ स्थान मानलं जाणार हे मंदिर प्रम्बानन मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे.
९ व्या शतकात या प्रम्बानन मंदिराची स्थापना करण्यात आली, जे ब्रम्हा, विष्णू आणि शंकराला समर्पित आहे. इथल्या परिसरात अजूनही २४० पेक्षा जास्त मंदिरांचे अवशेष आहे. प्रम्बाननला तिथल्या स्थानिक जावासीन भाषेत लारा जोग्गरंग म्हंटल जात.
इतिहासकारांच्या म्हणण्यानुसार, मेदांग साम्राज्याच्या संजय राजवंशाचे राजा रकाई पिकातन यांनी या प्रम्बाननच्या मंदिराचा पाया घातला. ज्या साम्राज्याला माताराम साम्राज्य सुद्धा म्हंटल जात.
खर तर, व्यापारी, नाविक, विद्वानांच्या माध्यमातून हिंदू धर्म इसवी सणाच्या पहिल्या शतकात इंडोनेशियात पोहोचला. ज्यामूळ जावा संस्कृती आणि हिंदू विचारांचं फ्युजन झालं आणि इथं इंडोनेशिया मध्ये हिंदू धर्म रुजला.
इथले स्थानिक लोकं या प्रम्बानन मंदिराच्या स्थापने मागचं श्रेय जावाची राजकुमारी लारा जोग्गरंगला देतात. तिथल्या राजा बकाची ती मुलगी. बांडुंग बंदवासा नावाच्या राजकुमाराने राजासमोर लाराशी लग्न करण्याचा प्रस्ताव ठेवला होता.
तेव्हा राजान त्याला म्हंटल कि, युद्धात मला हरवलं तर तो आपली मुलगी त्याला देईल. बांडुंगने युद्धात राजाचा पराभव केला. या युद्धात बांडुंगच्या हातून राजा मारला गेला. त्यामुळे ठरल्याप्रमाणे राजकुमारीला त्याच्याशी लग्न करण भाग होत. पण राजकुमारीला आपल्या बापाच्या मारेकऱ्याशी लग्न करायचं नव्हत. पण बांडुंगला थेट नकार देण्याची हिम्मत राजकुमारीत नव्हती.
त्यामुळ राजकुमारीने अट ठेवली कि, जेव्हा तो एका रात्रीत १ हजार मंदिर बांधेल, तेव्हाच ती त्याच्याशी लग्न करेल.
बांडुंगनं ती अट मान्य करून आपल्या वडिलांच्या मदतीन मंदिर बांधण्यासाठी आत्म्यांची फौज बोलवली. यावर राजकुमारीच्या दासीन आणखी एक शक्कल लढवली आणि राजकुमारीला धान्य कुटायला सांगितल. त्या धान्य कुटण्याच्या आवजानं कोंबड्या बांग द्यायला लागल्या. आत्म्यांना वाटलं कि, सकाळ झालीये त्यामुळे ती तिथनं निघून गेले आणि मंदिराच काम अर्धवट राहीलं.
पण , बांडुंगला जेव्हा राजकुमारीची ही चाल समजली. तेव्हा त्यानं तिला दगड बनण्याचा श्राप दिला. पण भगवान शंकराच्या कृपेनं राजकुमारीचं दुर्गा मूर्तीत रुपांतर झालं.
प्रम्बानन मंदिरात प्रवेश करताच तीन भली मोठी मिनारे आहेत. त्या तिन्हीतलं मधलं मंदिर १५० फुट उंच आहे, ते शंकराच मंदिर आहे. तर बाकी दोन मंदिर ब्रम्हा आणि विष्णूची. शंकराच्या मंदिराच्या चारही बाजूंनी परिक्रमा पथ आहे. परिक्रमा करताना आपल्याला बाहेरच्या भिंतींवर रामायणाची कथा दगडात कोरलेली दिसते. तर विष्णू मंदिराच्या भिंतीवर भगवान पुराणातलं कृष्ण जीवन रेखाटल आहे.
या तिन मंदिराच्या पुढे देवांच्या वाहनांची देखील मंदिर आहेत. जसं शंकराच्या मंदिरापुढ नंदी, ब्रम्हा मंदिराच्या पुढ हंसाचे तर विष्णू मंदिराच्या पुढ गरुडाच मंदिर आहे. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे गरुड इंडोनेशियाच राष्ट्रीय चिन्ह आहे.
सध्या तिथली फक्त ८ चं मंदिर चांगल्या अवस्थेत आहेत. बाकी मंदिर ढासळलेल्या अवस्थेत आहेत. लोककथेनुसार इथ जवळपास एक हजार मंदिर होती. पण पुरातत्व विभागाला इथ २४० मंदिराचा पाया मिळाला आहे.
१० शतकाच्या मध्यात संजय राजवंश नंतर इसयाना राजवंश आले. ज्याचे शासक मपू सिंडोक यांनी मध्य जावाच्या ऐवजी पूर्व जावाला आपली राजधानी बनवली. त्यामुळ मंदिर परिसर ओसाड व्हायला सुरुवात झाली. त्यात १५८४ मध्ये जावात भीषण भूकंप आला, ज्यात मंदिराचा परिसर नष्ट झाला. नॅदरलँडच्या लोकांनी आपल्या बागा सजवायला इथल्या मुर्त्या पळवल्या. तर गावातल्या लोकांनी तिथल्या दगडांचा उपयोग घर बांधायला केला.
१९ व्या शतकात प्रम्बाननवर परत एकदा नजर गेली. त्यानंतर तिथं केलेल्या खोदकामात दगडाचा एक डब्बा मिळाला. ज्यात दगड, कोळसा, माती, नाणी, दागिने, सोन्या – चांदीच्या पानांचे तुकडे, शिंपले, १२ सोन्याची पान मिळाली.
त्यानंतर १९९१ मध्ये सेवू, बूबराह, आणि लूमबुंगच्या बौद्ध मंदिर परिसरासोबत प्रम्बाननला युनेस्को वर्ल्ड हेरीटेज साईट घोषित करण्यात आलं. आज त्या ठिकाणी लाखो लोकं येतात, ज्याला भारताबाहेरच हिंदू धर्माच प्रतिक मानलं जात. २०१९ मध्ये या मंदिराचा अभिषेक करण्यात आला होता.
हे ही वाच भिडू :
- दुष्काळामुळे महाराष्ट्रातील लोकांनी इंडोनेशियाला स्थलांतर केलं होतं
- लिंगेश्वरी मातेचं मंदिर, जिथे स्त्री रुपात केली जाते भगवान शंकराची पूजा !
- नेहरूंच्या सांगण्यावरुन वैमानिक बिजू पटनायक इंडोनेशियात घुसले..