वडिलांसाठी क्रिकेट सोडून इंजिनिअरींग केलं, परत येऊन जागतिक क्रिकेटला फिरकीच्या तालावर नाचवलं !

भारतीय बाप. संशोधनाचा विषय.

बाप लोकांना आपल्या पोरांनी इंजिनियरिंग करावं असं का वाटतं हा तर त्याहूनही खोल विषय. आता बाप लोकांच चुकतंय असं आम्ही म्हणत नाही, पण पोरांचं काय? आता अशी ढीग भर पोरं सापडतील की जी बळजबरीनं इंजिनियरिंग  करतायत किंवा इंजिनियरिंग पूर्ण केलेत ते फक्त घरच्यांच्या इच्छे खातर.

भारतातलं खूप सारं टॅलेंट इंजिनियरिंग कॉलेजमध्ये ग्राफिक्स सोडवण्यात व्यस्त आहे. एकापेक्षा एक जबरी कलाकार माणसं सॉफ्टवेअर आणि तत्सम कंपन्यामध्ये आठवड्यातले ५ दिवस  कम्प्युटरमध्ये मान घालून प्रोग्राम लिहिण्यात वाया जात आहेत.

आजही चान्स मिळाला तर त्यांना ते जग सोडून पळायचं असतं, पण पाच-सहा  आकडी आकडी पगाराने त्यांच्या पायात बेड्या बांधलेल्या असतात. घरासाठी काढलेल्या कर्जाच्या ईएमआयचे हप्ते फेडण्यात त्यांची सगळी स्वप्न, सगळं टॅलेंट संपून गेलेलं असतं.

आज अशाच एका  इंजिनियरची गोष्ट, ज्याने ५० वर्षापूर्वी घरच्यांच्या इच्छेखातर इंजिनिअरिंग तर पूर्ण केलंच पण आपल्या जिद्दीने आपलं स्वप्न सुद्धा साकार केलं. इरापल्ली प्रसन्ना असं त्याचं नाव.

erapalli prasanna
भारतीय क्रिकेटमधील जगविख्यात चौकडी डावीकडून वेंकटराघवन, बेदी, प्रसन्ना आणि चंद्रशेखर

भारतीय क्रिकेटच्या सुप्रसिद्ध अशा स्पिनर चौकडीपैकी एक. तुम्हाला माहित नसेल की ज्याच्या बॉलिंगचा टेरर इयान चॅपलपासून गॅरी सोबर्ससारख्या दिग्गज बॅट्समनमध्ये होता, तो प्रसन्ना आपल्या वडिलांच्या टेररखाली असयाचा. कोण नसतं म्हणा?

इरापल्ली प्रसन्नाचा जन्म तत्कालीन म्हैसूरमधील एका कर्मठ कुटुंबात झाला होता. शिक्षणाची त्यांच्या घरात मोठीच  परंपरा होती. त्याचे आजोबा इरापल्ली रामा राव हे पहिल्या पिढीचे पदवीधर. प्रसन्नाचे बाबा ब्रिटीशांच्या काळापासून सरकारी नोकरीत होते. त्याचे बाकीचे दोन्ही काका सुद्धा डबल पदवीधारक आणि सरकारी नोकरीत.

नाही म्हणायला त्याचा धाकटा काका “कृष्णास्वामी” हा म्हैसूर संघाकडून चांगला क्रिकेट खेळायचा पण क्रिकेट हा खेळ प्रोफेशन म्हणून स्वीकारणे हे त्या काळात तरी इरापल्ली कुटुंबाच्या स्वप्नात देखील नव्हते.

प्रसन्नाने क्रिकेट खेळायला सुरु केलं तेव्हा सुरुवातीला तर त्याच्या वडिलांनी म्हणजेच इरापल्ली अनंतराव यांनी विरोध केला नाही. प्रसन्ना म्हैसूरमध्ये क्रिकेट खेळू लागला. त्याचं फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये नांव होऊ लागलं होतं. त्याच्या याच कामगिरीच्या आधारावर १९६१ साली इंग्लडची टीम जेव्हा भारताच्या दौऱ्यावर आली तेव्हा या दौऱ्यासाठीच्या भारतीय संघात प्रसन्नाची निवड झाली.

प्रसन्ना तेव्हा म्हैसूर येथील ‘नॅशनल कॉलेज ऑफ इंजिनियरिंग’मध्ये पहिल्या वर्षात शिकत होता. पोराच्या अभ्यास सोडून क्रिकेट खेळण्यामुळे अनंतराव नाराज होते पण तेव्हा ते काही बोलले नाहीत. इंग्लंडविरुद्धच्या दौऱ्यात प्रसन्नाचे पदार्पण झाले. तोपर्यंत देखील काही प्रश्न नव्हता, पण खरा प्रश्न उभा राहिला तो त्यानंतरच्या वेस्ट इंडीज विरुद्धच्या दौऱ्याच्या वेळी.

अडचण अशी होती की आता भारत वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर जाणार होता. त्याकाळातले  ओव्हरसीज दौरे दीर्घकाळ चालायचे. हा दौरा देखील साधारणतः २ महिने चालणार होता. त्यामुळे पोराला वेस्ट इंडीजला जाण्यासाठी प्रसन्नाच्या बाबांनी स्पष्ट शब्दात नकार दिला. वेस्ट इंडीज दौरा म्हणजे एका अर्थी प्रसन्नाने’ इंजिनियरिंग की क्रिकेट’ या दोहोंपैकी एकाची निवड करायची होती.

टिपिकल भारतीय परंपरेप्रमाणे प्रसन्नासाठी ही निवड त्याच्या बाबांनी केली होती आणि ती निवड इंजिनियरिंगची होती. प्रसन्नासाठी तर ही तर गुगलीच होती. कारण अशी संधी फारच कमी लोकांना मिळते. प्रसन्नाला ती मिळाली होती, पण आता वडील आडकाठी करत होते. पण प्रसन्ना काही वडिलांच्या शब्दाबाहेर नव्हता.

भारतीय टीमला मात्र प्रसन्नाची आवश्यकता होती, त्यामुळे बीसीसीआयचे तत्कालीन सचिव एम.चिन्नास्वामी प्रसन्नाच्या घरी गेले. त्यांनी अनंतरावांना समजावून सांगायचा प्रयत्न केला. मात्र अनंतराव काही आपल्या निश्चयापासून ढळायला तयार नव्हते.

त्याकाळात क्रिकेटची एक मॅच खेळल्यास ५ रुपये मिळायचे. इतक्या तुटपुंज्या पैशावर हा बेभरवश्याचा प्रोफेशन निवडणे म्हणजे आपल्या पोराच्या भविष्याचा जुगार खेळण्यासारखं आहे, असं इरापल्ली अनंतराव यांच मत होतं.

अशा संकटसमयी चिन्नास्वामी यांनी आपलं अखेरचं अस्त्र बाहेर काढलं. देशभक्ती.

चिन्नास्वामी यांच्या ‘देशाला प्रसन्नाची गरज असताना, तुम्ही माघार घेणं बरं नाही’ या अर्ग्युमेंटसमोर अनंतरावांचं काहीच चालेना. शेवटी या परिस्थितीतून एक मधला मार्ग काढण्यात आला.

अनंतरावांनी प्रसन्नाला वेस्ट इंडीज दौऱ्यावर जाण्याची परवानगी तर दिली, पण ती एका अटीवर. अट अशी होती की, प्रसन्नाने त्या दौऱ्यानंतर क्रिकेट बंद करून इंजिनियरिंगचं शिक्षण पूर्ण करायचं. प्रसन्ना त्यात सुद्धा खुश होता. पुढचं पुढे बघता येईल. दौऱ्यावरून आल्यावर वडीलांची समजूत काढता येईल असा विचार त्याने केला आणि तो  वेस्ट इंडीजला गेला.

नियतीच्या मनात मात्र काहीतरी वेगळंच होतं. वडिलांची अट मान्य करून वेस्ट इंडिजला गेलेला प्रसन्ना ज्यावेळी दौऱ्यावरून परतला त्यावेळी मात्र त्याला एक अतिशय वाईट बातमी समजली. त्याच्या वडीलांचं निधन झालं होतं. प्रसन्ना आतून हादरूनच गेला. त्याचे वडील त्याच्यासाठी सगळं काही होते. त्यामुळे त्यांची शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट सोडून दिलं आणि आपलं पूर्ण लक्ष देऊन इंजिनियरिंगच्या अभ्यासावर केंद्रित केलं.

पुढची पाच वर्षे प्रसन्ना क्रिकेटपासून दूर राहिला आणि क्रिकेटमध्ये परतला तो इंजिनिअरींगची पदवी पूर्ण करूनच. ५ वर्षांचा काळ क्रिकेटच्या दृष्टीकोनातून खूप मोठा असतो. एवढ्या काळात अनेक जणांचं क्रिकेटिंग करीअर सुरु होऊन संपून देखील जातं. कधीकाळी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेल्या जिद्दी प्रसन्नाने परत डोमेस्टिक क्रिकेट पासून सुरवात केली. एक नवी सुरुवात.

प्रसन्ना स्पिनर म्हणून घातक होताच पण तो जेव्हा परत भारतीय संघात निवडला गेला त्यावेळी तो अजून धारदार बनला होता. पुनरागमनाच्या आपल्या पहिल्याच मॅचच्या पहिल्याच दिवशी त्याने ८ विकेट्स काढल्या. त्याच्या जास्त न वळणाऱ्या स्लो बॉलिंगची जादूच अशी काही होती की ज्या वेस्ट इंडीज, न्युजीलंड, ऑस्ट्रेलियामध्ये आपण उभे पण राहू शकत नव्हतो त्या देशात आपण जिंकायला लागलो.

प्रसन्नानेच भारताला परदेशी भूमीवरचा आपला पहिला टेस्ट सिरीज विजय न्यूझीलंडमध्ये मिळवून दिला. त्या सिरीजमध्ये त्याने एकूण २४ विकेटस  काढल्या होत्या. कारकिर्दीतल्या १०० विकेट्सचा टप्पा गाठायला त्याला अवघ्या २५ मॅच लागल्या. तो देखील एक विश्वविक्रम ठरला होता, जो पुढे त्याचाच वारसदार समजल्या जाणाऱ्या आर. अश्विनने पन्नास वर्षांनी मोडला.

प्रसन्नाच्या क्रिकेटिंग करिअरने अशी काही गती मिळवली की अल्पावधीतच सत्तरच्या दशकातला सर्वात बेस्ट बॉलर म्हणून प्रसन्ना उदयास आला. जगभारातले दादा बॅटसमन त्यावेळी भारताच्या बेदी-चंद्रशेखर-प्रसन्ना आणि वेंकटराघवन या चौकडीच्या तालावर नाचायचे.

प्रसन्नाच्या बाबतीत असं सांगतात की तो मैदानात क्रिकेट न खेळता बुद्धिबळ खेळायचा. त्याने आखलेल्या व्युहात बॅट्समन हमखास अडकायचाच अडकायचा. गंमत अशी की खुद्द प्रसन्नानेच आपल्या या खुबीचं क्रेडीट आपल्या इंजिनियरिंगच्या शिक्षणाला दिलंय.

प्रसन्नाच्या मते, इंजिनिअरींगच्याच शिक्षणाने त्याला खेळामागचं  सायन्स, बायोमेकॅनिक्स,एरोडायनामिक्स समजून घ्यायला मदत झाली.अॅनॅलीटीकल विचार बॅटसमनला आपल्या जाळ्यात ओढण्याचा हा जो वारसा प्रसन्नाने भारतीय क्रिकेटला दिला, तोच वारसा इंजिनियर क्रिकेटर असलेल्या कुंबळे, श्रीनाथ आणि आर. अश्विन यांनी अगदी व्यवस्थित सांभाळला.

हे ही वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.