बाळासाहेबांच्या एका चिठ्ठीवर सलमान खान शिरीष कणेकर यांच्या प्रयोगाला हजर झाला होता

ज्येष्ठ लेखक, पत्रकार आणि कथाकथनकार शिरीष कणेकर यांचं निधन झालं आहे. वयाच्या ८० व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. मुंबईतल्या हिंदुजा रुग्णालयात हृदय विकाराचा झटका आल्याने त्यांचं निधन झालं. सिनेमा, क्रिकेट आणि राजकारण या विषयांवर त्यांचं लेखन प्रसिद्ध होतं.त्याचबरोबर इंडियन एक्प्रेस, डेली, फ्री प्रेस जर्नल, सिंडिकेटेड प्रेस न्यूज एजन्सी यासाठी शिरीष कणेकरांनी काम केलं. लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स, लोकमत, सामना, पुढारी, साप्ताहिक मनोहर, साप्ताहिक लोकप्रभा, साप्ताहिक प्रभंजन, पाक्षिक प्रभंजन, पाक्षिक चंदेरी, साप्ताहिक चित्रानंद, सिंडिकेटेड कॉलम, द डेली या सर्व ठिकाणी देखील शिरीष कणेकरांचं लेखन छापून आलं होतं.

महत्वाचं म्हणजे शिरीष कणेकर यांचा शब्द राजकीय आणि साहित्यिक क्षेत्रात देखील तितक्याच ताकदीने स्वीकारला गेला होता. त्याचाच हा किस्सा.

मराठी सिनेमाच्या प्रमोशनसाठी सलमान खान आलेला पाहून अनेकांच्या भुवया उचांवल्या काही जण तर म्हणू लागले की सलमान पहिल्यांदा एखाद्या मराठीच्या कार्यक्रमाला आला. पण तस नाही. यापूर्वी सलमान खान एका मराठी एकांकिकेच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेला. ते देखील बाळासाहेबांच्या एका छोट्याशा चिठ्ठीमुळे..

हा किस्सा जेष्ठ लेखक पत्रकार शिरीष कणेकर यांनी एके ठिकाणी लिहून ठेवला आहे.

शिरिष कणेकर यांचा माझी फिल्लमबाजी नावाचा एकपात्री प्रयोग त्या काळात खूप प्रसिद्ध होता. तर झालं असं की या नाटकाचा एक महोत्सवी प्रयोग होता. महोत्सवी प्रयोग म्हटल्यावर त्याला तसाच मोठा सेलीब्रेटी प्रमुख पाहुणा म्हणून लागणार होता. शिरीष कणेकर यांनी खूप जणांना संपर्क करुन पाहिलं पण काही ना काही कारणास्तव कोणताच सेलिब्रिटी तयार होत नव्हत.

जशी जशी तारीख जवळ येत होती तस कणेकरांच टेन्शन वाढू लागलं होतं. शेवटचा पर्याय म्हणून ते बाळासाहेबांकडे गेले. बाळासाहेब कणेकरांच्या नर्मविनोदी शैलीच्या लिखाणाचे चाहते होतेच, शिवाय “माझी फिल्लमबाजी” त्यांना खूप आवडल होतं.

कणेकरांना पाहताच बाळासाहेबांनी विचारलं,

“काय काम काढल?

कणेकर म्हणाले “माझी फिल्लमबाजी” च्या महोत्सवी प्रयोगासाठी फिल्मस्टार सेलिब्रिटी प्रमुख पाहुणा म्हणून हवा आहे. पण कोणी तयार होत नाही.

त्यांनी बाळासाहेबांना विनंती केली की सलमान खान मिळवून द्या.

आता मराठी एकपात्री प्रयोगाच्या कार्यक्रमाला डायरेक्ट सलमान खान ?

बाळासाहेब काही बोलले नाहीत. त्यांनी तिथल्या तिथे पत्र लिहायला घेतलं. शिवसेनेच्या लेटरहेडवर लिहिलेल्या पत्रात सुवाच्च अक्षरात मराठीत लिहिलं होत.

“प्रिय सलमान खान यांस…”

हे पत्र घेऊन कणेकरांचा मित्र सलमानच्या पर्सनल सेक्रेटरीला भेटला. ती चिट्ठी बघून तो उडालाच !

त्यान दबून विचारलं “बालासाब खुद आनेवाले है क्या?”

कणेकरांनी बाळासाहेबांना काही बोलावलं नव्हतं तरी त्यांच्या मित्राने थाप ठोकली

“अर्थातच ते येणार”.

कणेकराना मात्र विश्वास नव्हता की सलमान खान येईल, कारण निमंत्रण असंच अनौपचारिकरीत्या दिल होतं. सलमान खान सारखा सुपरस्टार एवढ्या छोट्या कार्यक्रमाला कशाला येईल म्हणून त्यांनी शेवटच्या क्षणी आपला मित्र राजेश खन्नाला तयार केलं.

कार्यक्रमाच्या दिवशी राजेश खन्ना वेळेत आला.

सलमान येणार नाही गृहीत धरून कार्यक्रम सुरु झाला. राजेश खन्ना आणि शिरीष कणेकर यांची स्टेजवर जुगलबंदी सुरु होती. आणि अचानक स्टेजमागे विंगेत गलबला सुरु झाला,

“सलमान आला. सलमान आला”.

कणेकर म्हणतात,

“सलमान जत्रेत हरवलेल्या मुलासारखा भांबावलेला दिसत होता. त्याला कळतच नव्हते की आपण कुठे आलोय, नेमका कसला कार्यक्रम चाललाय.”

तेवढ्यात स्टेजवर राजेश खन्नाला बघून त्याच्या जीवात जीव आला. मग मात्र त्याने प्रेक्षकांच्या टाळ्यांच्या कडकडाटातलं अभिवादन स्वीकारत मंचावर एन्ट्री केली. आल्या आल्या फिल्मी स्टाईलमध्ये आपल्या सिनियर असलेल्या राजेश खन्नांचे पाय धरले. उगीचच जुनी ओळख असल्यासारखं स्माईल देत कणेकरांना शेक हॅण्ड केलं.

त्यानंतर तो थेट माईक कडे गेला. प्रेक्षकांच्या आग्रहाखातर त्याने मैने प्यार किया मधला गाजलेला डॉयलॉग म्हणून दाखवला. आणि तसाच टाळ्यांच्या गजरात तो निघूनही गेला.

शिरीष कणेकरांच्या मते आजही सलमानला विचारलं, तरी त्याला सांगता येणार नाही की तो त्या दिवशी तो कोणत्या कार्यक्रमाला गेला होता. तो आला ही फक्त बाळासाहेबांच्या चिठ्ठीची करामत.

हे ही वाचा –

Leave A Reply

Your email address will not be published.