इकबाल बानो यांनी ‘हम देखेंगे’ गात पाकिस्तानी लष्करशहाच्या आदेशांना पायाखाली तुडवलं होतं…
विद्रोही गाणी म्हटलं तर भारतात दोन गाणे आपोआप बॅकग्राइउंडला ऐकू यायला लागतात. एक म्हणजे ‘आजादी’ आणि दुसरं ‘हम देखेंगे’. या गाण्यांची सध्याच्या तरुण पिढीला जास्त प्रकर्षाने ओळख झाली ती जेएनयु, जामिया मिलिया विद्यापीठाच्या प्रकरणांपासून… विदयार्थी आंदोलनात जेव्हा हे गीत गायले गेले तेव्हा खूप मोठा कल्ला झाला होता. त्यांना देशद्रोही म्हणायला सुरुवात झाली होती… असो तो विषय वेगळा.
साध्याचं सांगायचं तर यातील ‘हम देखेंगे’ हे गीत मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर आणि सहज लोकांच्या तोंडी ऐकू येतंय. याचं कारण म्हणजे ‘द काश्मीर फाईल्स’. देशभरात राडा करत असलेल्या या चित्रपटात हे गाणं घेण्यात आलंय. म्हणून परत त्याचा ट्रेंड आलाय. तेव्हा या घटनेवरून आम्हाला ‘हम देखेंगे’ गीताशी संबंधित तो किस्सा आठवला जेव्हा इकबाल बानोने खुलेआम ‘हम देखेंगे’ गाऊन पाकिस्तान सरकारच्या आदेशाची पायमल्ली केली होती.
त्यातच आज जागतिक कविता दिवस. तेव्हा जनमाणसात स्फूर्तीची लाट आणणाऱ्या या कवितेबद्दल हा किस्सा सांगण्याचा यापेक्षा सटीक मुहूर्त कायच असू शकतो!
प्रसिद्ध पाकिस्तानी कवी ‘फैज़ अहमद फैज़’ यांनी १९७९ मध्ये लिहिलेली ही तेवढीच प्रसिद्ध कविता. मुळतः उर्दू भाषेत लिहिलेली मात्र आज सगळ्याच भाषांमध्ये ती आपल्याला सहज मिळते. या कवितेमुळे भावना दुखावल्या जाण्याची नेहमीच भीती असते, असं बोललं जातं. तेव्हाही अशीच काहीशी भीती वाटत होती मात्र भारताच्या सीमेपलीकडे…
भीती निर्माण करण्यामागील व्यक्ती – ‘इकबाल बानो’
१९३५ मध्ये भारतातील सर्वात जुन्या घराण्यांपैकी एक असलेल्या ‘दिल्ली घराण्यात’ जन्मलेली ही गायिका. साहजिकच गायनाची आवड तर असणारच. मात्र जोडीला होतं ते त्यांचं आंतरिक कौशल्य. तेच ओळखून घरच्यांनी दिल्ली घराण्याचे सूत्रधार चांद खान यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांना तयार करण्यास ठेवलं. उस्तादांनी इकबाल बानोंच्या कौशल्याला अगदी न्याय दिला. त्यांना दादरा आणि ठुमरीचं जबरदस्त प्रशिक्षण देण्यात आलं.
खुप कमी कालावधीत इकबाल बानो अशा तयार झाल्या की १९५० मध्ये जेव्हा दिल्लीतील ऑल इंडिया रेडिओसाठी काही नवीन गायकांचं ऑडिशन घेतलं गेलं तेव्हा ऑडिशन संपण्यापूर्वी बानो यांना गाण्याचा कॉन्ट्रॅक्ट मिळाला होता. तिथूनच त्यांच्या प्रसिद्धीच्या प्रवासाला सुरुवात झाली होती…
पुढच्या फक्त पाच वर्षांत म्हणजे १९५५ येता येता इकबाल बानो प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचल्या होत्या. अनेक उर्दू चित्रपटांमधील त्यांची गाणी खूप गाजत होती. त्यांची गझल गाण्याची शैली, शेर वाचण्याची, त्यातील वेगवेगळे शब्द म्हणण्याची आणि शब्दांच्या उच्चारांकडे विशेष लक्ष देण्याची शैली श्रोत्यांना विशेष आवडायची.
१९७० नंतर इकबाल बानो लाहोरला गेल्या. या काळात त्यांनी फैज़ अहमद फैज़, नासिर काज़मी यांसारख्या कवींच्या रचना गायल्या, ज्यांनाही खूप पसंती मिळत होती.
अशातच आलं १९८५ साल.
पाकिस्तानचे लष्करशहा ज़िया-उल-हक़ यांनी देशात काही निर्बंध लादले होते. ज्यामध्ये स्त्रियांवर विशेष बंधनं घालण्यात आले होते. महिलांनी साडी नेसणं आणि कवी फैज़ अहमद फैज़ यांच्या कविता म्हणणं यावर बंदी आणली गेली होती. यावरून तुम्हाला सध्या अफगाणिस्तानात तालिबान जशी स्त्रियांवर बंधनं लावतायेत त्याची आठवण झाली असेल, तर अगदी परफेक्ट ओळखलंत तुम्ही. अगदी असंच तिळमात्र लॉजिक नव्हतं लष्करशहाने लावलेल्या दोन्ही निर्बंधांमागे.
म्हणूनच इकबाल बानो यांनी या निर्णयांना विरोध करण्याचं ठरवलं आणि तशी घोषणा केली. त्यासाठी लाहोर स्टेडियमची त्यांनी निवड केली.
ठरलेल्या दिवशी जेव्हा त्यांनी लाहोर स्टेडियमची वाट धरली तेव्हा स्टेडियममध्ये विशेष व्यवस्था करण्यात आली होती. त्यांना रोखण्यासाठी, विरोध करण्यासाठी अनेक राजकारणी (शासनकर्ते) लोक तर होतेच मात्र त्यांना अटक करण्यासाठी पोलीस देखील उपस्थित होते. तर या विरुद्ध त्यांच्या विद्रोहाचं साक्षीदार होण्यासाठी आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी जवळपास ५० हजार लोकांचा घोळका तिथे जमला होता.
अशा वातावरणात इकबाल बानोंची एंट्री जेव्हा स्टेजवर झाली तेव्हा एकंच शांतात पसरली… कारण सगळ्यांची नजर त्यांच्यावर खिळून राहिली होती. निषेधाचं प्रतीक असलेला रंग अंगाभोवती नेसून बानो स्टेजवर आल्या होत्या. काळ्या साडीत त्या अतिशय सुंदर दिसत होत्या.
या शांततेला तडा गेला जेव्हा माईक हातात घेत दणदणीत आवाजात त्या म्हणाला, ‘आदाब!’. एकाच कल्ल्याने स्टेडियम दुमदुमून गेला. त्यात काही सेकंदात त्यांचा परत आवाज आला. त्या म्हणत होत्या…
“बघा, आम्ही तर फैज़ यांची कविता गाणार. आणि जर आम्हाला अटक झाली तर तुरुंगातही तिचं गायन सुरु ठेवणार, जेणेकरून राज्यकर्त्यांना ते ऐकू जाईल!”
हे ऐकून स्टेडियममध्ये एकच शांतता पसरली. तबल्याच्या आणि शेहनाईच्या आवाजाने आता स्टेडियमवर कब्जा घेतला होता आणि इकबाल बनोंनी गायला सुरुवात केली…
“‘हम देखेंगे, लाजिम है कि हम भी देखेंगे…’
प्रत्येक जण त्यांच्याकडेच बघत होता. कविता तर भन्नाट होती मात्र त्याला जेव्हा इकबाल बानोंच्या आवाजाची साथ लाभली तेव्हा तर आविष्कारच झाला. कवितेच्या एका एका ओळीतून लष्करशहाच्या आदेशांची पायमल्ली होत होती. अशात जेव्हा ‘सब ताज उछाले जाएंगे, सब तख़्त गिराए जाएंगे’ ही ओळ आली तेव्हा तर भला मोठा गोंगाट झाला होता.
उपस्थित सगळ्या लोकांनी हात वर करत, आवाज उठवत बानोंना समर्थन दर्शवलं होतं.
जवळपास १० मिनिट टाळ्यांचा कडकडाट ऐकू येत होता. वातावरण इतकं तापलं होतं की, विरोध करायला आलेल्यांपैकी एकाची हिम्मत झाली नाही बानोंना थांबवायची. शिवाय पोलिसांची देखील हिम्मत झाली नाही बानोंना अटक करण्याची.
इकबाल बानो यांनी त्या दिवशी ‘हम देखेंगे’ कविता गात लष्करशहाच्या आदेशांना पायाखाली तुडवलं होतं. त्यांच्या निर्बंधांना झटक्यात तोडलं होतं. काय ती बेफिकीरी आणि धाडस!
हे ही वाच भिडू :
- नूरजहाँ यांचं गायनाच्या क्षेत्रातलं श्रेष्ठत्व दस्तूरखुद्द लता दीदींनीही मानलं होतं
- राजा हिंदुस्थानीच्या गाण्यावर बँजो वाजवून जगभर फेमस झालेले उस्ताद नुर बक्ष बलोची…..
- जेएनयुच्या ५ वर्षानंतर कन्हैया कुमार काँग्रेसमध्ये आहे, पण उमर खालिद कुठे गायब झालाय?