चहावर भारताचं मन जिंकणारे पहिले लोक इराणी होते, त्यानंतर…
कित्येक शतकानुशतके जीभेवर रेंगाळणाऱ्या चहाची चव सातासमुद्रापलीकडे इराणमधून भारतात आणणारे इराणी लोक आणि त्यांच्या या भन्नाट चहाची कथा जाणून घ्यावी अशीच आहे. या भारदस्त गोड परंपरेला आता मात्र बर्याच मोठ्या प्रमाणात कायमची घरघर लागली आहे.
कित्येक शहरांमध्ये तुम्ही इराणी हॉटेल पाहिली असतील किंवा कदाचित सत्तर आणि ऐंशीच्या दशकामध्ये केलेल्या कादंबऱ्यांमध्ये याची वर्णने वाचली असतील. इराणी हॉटेलांची स्वतःची एक वेगळी खासियत होती बेरोजगार लोकांना बसण्याचा हक्काचा अड्डा म्हणजे ही इराणी हॉटेल.
अरुण कोलटकरांनी आपल्या कवितेद्वारे ह्या इराणी हॉटेलमध्ये घडणाऱ्या कित्येक प्रसंगांना हुबेहूब वठवलं होतं.
पुणे मुंबई हैदराबाद अशा कित्येक शहरांमध्ये अजूनही काही प्रमाणामध्ये की इराणी हॉटेल आणि त्यातील प्रसिद्ध इराणी चहा अजूनही चाखायला मिळतो.
इराणी चहाची स्वतःची अशी एक वेगळी खासियत असते. उस्मानिया बिस्किटांबरोबर दिला जाणारा हा चहा व त्याचं दूध कित्येक तास आधनावर तसंच तापत ठेवलेलं असतं. त्यानंतर त्याच्यात कडकपणा आल्यावर मावा किंवा मलई सोबत हा चहा बनवला जातो.
1800 च्या काळात जेव्हा इराणी लोक आपला देश सोडून भारतात आले तेव्हा त्यांनी भारतातील संस्कृती व हिरान वरून आणलेली आपली संस्कृती यांच्या संगमातून ज्या काही गोष्टी इथल्या संस्कृतीला देऊ केल्या,
त्यापैकी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा इराणी चहा होय.
आजही केवळ 15 रुपयांच्या आत मिळणारा हा चहा कित्येक ठिकाणी कॅफेमध्ये याच्या पेक्षा कितीतरी पटीने महाग आहे, मात्र याची चव कोणत्याही दुसऱ्या चहाला कधीच येत नाही.
आज हळूहळू या इराणी दुकानांची संख्या कमी होत असताना एक काळ असा होता की जेव्हा मुंबईच्या रस्त्यांवर कित्येक इराणी दुकाने ओळीने उभी असत.
या चहा पिण्याच्या सवयींमध्ये आज कितीतरी पटीने बदल झालेले असताना भारताची चहाची तलफ अजूनही कायम आहे.
इंग्रज येण्याच्या कित्येक शतके आधी पासूनच भारतामध्ये चहाची परंपरा होती, मात्र याचा प्रसार केवळ गर्भश्रीमंत व मोठमोठे राजे लोक यांच्यापुरताच मर्यादित होता. इंग्रजांनी इथे आल्यानंतर जेव्हा प्रचंड मोठ्या प्रमाणात चहाची लागवड सुरू केली तेव्हा या पेयाचा फैलाव जवळपास सर्व भारतामध्ये झाला.
याजद नावाच्या इराणमधल्या एका प्रांतामध्ये जेव्हा दुष्काळाने मोठे थैमान घातले त्या वेळी तेथील कित्येक लोकांनी पोट भरण्यासाठी व रोजगारासाठी भारताच्या दिशेने स्थलांतर सुरू केले. त्यांनीच येथे इराणी चहाची एक वेगळी लज्जतदार चव भारतीयांसाठी बनवली. सुरुवातीला इराणी चहा मध्ये दुधाचा समावेश केला जात नसे मात्र स्थानिक भारतीयांच्या आवडीनुसार त्यात दुधाचा वापर सुरू झाला.
हाच व्यवसाय हळूहळू मोठा होत इराणी हॉटेल आणि इराणी चहाची मोठी दुकाने इथपर्यंत पसरत गेला.
मुंबई शहरात या हॉटेलांनी आणि चहाने एक वेगळ्या संस्कृतीला जन्म दिला व महानगराच्या धावपळीच्या जगात सर्वसामान्य लोकांना दोन घटका थांबण्याची व पुन्हा आपल्या कामावर निघण्यासाठी रिचार्ज होण्याची सोय जागोजागी करून दिली.
कित्येक इराणी लोकांनी हळूहळू मुंबईमधून पुणे आणि पुण्यानंतर हैदराबाद येथे स्थलांतर केले व आपल्या सोबत ही सर्व संस्कृती ते घेऊनच आले.
हैदराबाद लवकरच भारतातील इराणी संस्कृतीचा केंद्रबिंदू बनले.
सर्व जाती धर्माचे वर्गाचे लोक या ठिकाणी एकत्र येऊन गप्पागोष्टी करत व सामाजिक चर्चांमध्ये सहभाग घेत. पुण्यामध्ये तर अजूनही इराणी वस्ती मोठ्या प्रमाणात आढळते व तेथे राहणारी जनता आपली संस्कृती अजून जोपासत आहे. ही चालवली जाणारी दुकाने आणि कॅफे बहुतांशी एखाद्या कुटुंबाचा व्यवसाय असत व कुटुंबानं तर पुढच्या पिढीतील लोकांच्या या व्यवसायाचा ताबा घेत अशा प्रकारे ही हॉटेल वर्षानुवर्षे चालू राहत.
मात्र आता इराणी लोकांची तरुण पिढी हा परंपरागत व्यवसाय सोडून हळूहळू इतर व्यवसायाकडे वळत असताना या संस्कृतीला घरघर लागली आहे.
पुण्यातील जंगली महाराज रोडवरील एक इराणी हॉटेल नुकतेच आता चायनीज पुरवणाऱ्या हॉटेलमध्ये रूपांतरीत झाले आहे.
भारतीयांच्याकडून चहाची तलफ कमी तर नक्कीच होणार नाही मात्र ते तेथून चहा पितात ठिकाणीही हळूहळू बदलत जातील अशी शक्यता सध्याच्या घडीला दिसते आहे. औंध मधील नागरस रोडवर सुरू झालेले चहाचे दुकान इराणी पद्धतीने नव्या थाटामाटाच्या रूपात जेव्हा ग्राहकांच्या भेटीस आले होते तेव्हा त्याला सर्व पुण्यामधून चहा प्रेमींनी चांगला प्रतिसाद दिला होता.
सध्या हे दुकान बंद झाले असले तरी अशा प्रकारच्या दुकानांना येत्या काळात मोठी मागणी येणार आहे.
जगभरातील चहाच्या मोठमोठ्या कंपन्या हळूहळू भारतामध्ये येऊन आपला विस्तार करत असताना काही ठिकाणी उरलेला इराणी चहा मात्र हळूहळू नव्या रूपांमध्ये आपली ओळख बनवत आहे. इराणी चहा च्या झोक्या मध्ये घडलेली भारताची इतर आशियातल्या देशांशी असणारी घट्ट संस्कृती ही अजून खूप काळापर्यंत अशीच अबाधित राहील व आपल्याला चहाचा आनंद देत राहील अशी अपेक्षा करूयात.
हे ही वाच भिडू.
- भारतीय क्रांतिकारकांने बनवलेली डिश गेली नव्वद वर्षे जपान मध्ये धुमाकूळ घालत आहे.
- “वाघ-बकरी” हे चहाला नाव ठेवण्यामागे जातीवाद संपवण्याचा उद्देश होता…
- ‘चौधरी चहावाले’ ज्यांची नरेंद्र मोदींनी गेल्या महिनाभरात दोन वेळा आठवण काढलीये !
- पराठ्याचा शोध मुघलांच्या शाही रसोईमध्ये नाही तर दुष्काळात गरिबाच्या घरी लागलाय