महाराष्ट्रातल्या शिक्षण तज्ञामुळे संपूर्ण देशात १०+२+३ चा पॅटर्न राबवण्यात आला..
काल दहावीचा निकाल लागला आणि सगळीकडे प्रत्येकाच्या व्हाट्सअप स्टेटसला आपल्या नातेवाईकांच्या पोराटोरांची मार्कशीट झळकू लागली. काँग्रॅज्युलेशनची देवाणघेवाण झाली पण खरं सांगतो ९० टक्केच्या वर मार्क बघून आपल्या तर लई वाईट वाटलं. आपल्या दहावीच्या आठवणी जाग्या झाल्या.
आमच्या वेळी मेरिट लिस्ट नावाचा खुंखार प्रकार होता. स्कॉलर पोरं बोर्डात यायच्या धडपडीत रगडले जायची.
तेव्हा स्टेटस ठेवलं जात नसे. नातेवाईक थेट फोन करून मार्क विचारत आणि जखमेवर मीठ चोळत. आम्ही मात्र कसबस सगळ्या विषयात पास होऊन ६५ % मार्क पडले तर सगळ्या गल्लीला पेढे वाटले होते. दहावी सुरु होण्याच्या आधीपासून ते संपे पर्यंत एकच वाक्य सगळ्यांकडून ऐकावं लागलं होतं.
दहावीच वर्ष म्हणजे महत्वाचं वर्ष. त्या निकालानंतर आयुष्य बदललं जाणार आहे अशीच समजूत करून दिली गेली होती. दहावीचे मार्क सायन्स कॉमर्स कि आर्टस् ला जायचं हे ठरवायचे. हे बरोबर चूक हि गोष्ट आज कळते पण तेव्हा तरी हेच डोक्यात बसलं होतं. आजही आयुष्याचा महत्वाचे टप्पे म्हणून दहावी आणि बारावी कडे पाहिलं जातं.
पण हे दहावीच्या वर्षाला महत्व आलं तरी कधी ?
तुम्ही तुमच्या आजी आजोबांना विचाराल तर पूर्वीच्या काळी दहावीला विशेष महत्व नव्हतं. तेव्हाचा पॅटर्न ११+४ असा होता. तेव्हाची सर्वात महत्वाची परीक्षा ११ वीला असायची. त्याला मॅट्रिक म्हणायचे. इंग्रजांनी लागू केलेला हा पॅटर्न स्वातंत्र्यानंतरही जवळपास वीस वर्षे चालला.
अखेर पंतप्रधान इंदिरा गांधींच्या काळात हा पॅटर्न बदलण्यात आला. यात सिंहाचा वाटा होता महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ जे.पी.नाईक यांचा.
जे.पी.नाईक उर्फ जयंत पांडुरंग नाईक. मूळचे कोल्हापूर जिल्ह्यातल्या आजरा तालुक्यातले. जे.पी.नाईक हे त्यांचं खरं नाव नव्हतं. त्यांचं मूळ नाव विठ्ठल हरिभाऊ घोटगे. शिकायची लहानपणापासूनची आवड होती. कर्नाटकात आपल्या चुलत्यांच्या पेढीवर काम करून त्यांनी प्राथमिक शिक्षण घेतलं.
कोल्हापुरात छत्रपती शाहू महाराजांनी सुरु केलेल्या बोर्डिंगमध्ये राहून त्यांनी आपलं उच्च शिक्षण पूर्ण केलं. या काळात आपल्या अचाट बुद्धिमत्तेने तिथे प्रचंड यश मिळवलं.
हा काळ स्वातंत्र्यलढ्याचा होता. विठ्ठल घोटगे हे देखील या मातुभूमीची सुटका करण्याच्या क्रांतीकार्यात उतरले. त्यांना शोधण्यासाठी ब्रिटिश पोलीस हात धुवून मागे लागले होते. तेव्हा भूमिगत असताना विठ्ठल घोटगे यांनी घरच्यांना आपल्या मुले त्रास होऊ नये म्हणून जयंत पांडुरंग नाईक हे नाव धारण केलं. पुढे अधिकृत रित्या हेच नाव कायम झालं.
पुढे सविनय कायदेभंगाच्या आंदोलनात त्यांना अटक झाली. जे.पी. नाईकांनी इतरांनी नाकारलेले रूग्ण सेवेचे काम तुरुंगात मागून घेतले. त्यांचं हे काम बघून ब्रिटिश डॉक्टरने शिक्षेतील सूट देऊ केली पण जे.पी.नाईकांनी त्याऐवजी वैद्यक शास्त्राची पुस्तके त्यांनी मागून घेतली.
राजबंदी म्हणून नाईक तुरुंगात गेले; पण डॉक्टर बनून ते बेल्लारीच्या तुरुंगातून बाहेर आले. सुटकेनंतर उप्पीनबेटी या छोट्याशा खेडेगावात त्यांनी रुग्णसेवा सुरु केली. फक्त इतकंच नाही तर तिथे साक्षरता, पाणीपुरवठा, साफसफाई अशी कामे केली.
याच गावात त्यांनी धारवाड शिक्षण मंडळ सुरु केलं.
या काळात नाईकांनी शिक्षणविषयक बरेच लिखाणही केले. १९३७ साली मुंबई प्रांतात काँग्रेसचे सरकार स्थापन झाले व शैक्षणिक विकासासाठी प्रांतिक प्राथमिक व प्रौढ शिक्षण मंडळे स्थापन झाली. या दोन्हीमध्ये सदस्य होण्याचे निमंत्रण नाईकांना मिळाले. त्यांनी ‘मास एज्युकेशन’ हे पुस्तक लिहिले. शैक्षणिक इतिहासावर ५ व्याख्याने दिली आणि ‘ब्रिटिश इंडियातील शिक्षणाचा इतिहास’ हा अत्यंत गाजलेला ग्रंथ तयार केला.
पुढे त्यांना करवीर संस्थानात शिक्षणसचिवपदी बोलवण्यात आलं. तिथे त्यांनी शिक्षणविषयक अनेक प्रयोग केले, संशोधन केलं. आपल्या अनेक कल्पना लोकसहभागातून राबवल्या. अनेक पुस्तके लिहिली.
देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर संस्थाने खालसा झाली. जे.पी.नाईकांनी देखील मुंबईत इंडियन इस्न्टिट्यूट ऑफ एज्युकेशन नावाची शिक्षण संस्था सुरु केली.
१९४९ मध्ये ‘राधाकृष्णन आयोगा’चा ग्रामीण विद्यापीठांविषयी अहवाल प्रसिद्ध झाल्यानंतर संस्थेच्या संशोधन कार्यक्रमात तो प्रयोग समाविष्ट करण्याचे त्यांनी ठरविले आणि त्यासाठी कोल्हापूरच्यागारगोटी येथे मौनी विद्यापीठाची स्थापना केली.
इथे मौनी विद्यापीठामध्ये ग्रामीण भागाच्या पूर्व प्राथमिकपासून उच्च शिक्षणापर्यंतच्या विविध शैक्षणिक गरजा पूर्ण करणे,औद्योगिक व शेतीला उपयुक्त असे शिक्षण देणे आणि अभियांत्रिकी, सहकार, समाजसेवा, कृषिशास्त्र अशा विषयांचा अभ्यासक्रमात समावेश करून शैक्षणिक विकासाची आदर्श योजना करणे असे नाईक यांचे संकल्प होते.
जे.पी. नाईक यांच शैक्षणिक कार्य पाहून युनेस्कोने आशिया खंडातील प्राथमिक शिक्षणाची योजना तयार करण्यासाठी निमंत्रित केले होते.
युनेस्कोच्या परिषदेसाठी नाईक कराची येथे गेले होते. तेथे संपूर्ण आशिया खंडामध्ये प्राथमिक शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणाची योजना त्यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झाली, ती पुढे ‘कराची प्लॅन’ म्हणून विख्यात झाली. त्यानंतर नाईक यांनी ‘एशियन इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशनल प्लॅनिंग अँड अॅडमिनिस्ट्रेशन’ ही संस्था स्थापन करून एक नवा अभ्यासक्रम तयार केला. शिक्षण मंत्रालयातले विविध कक्ष एकत्र करून नॅशनल कौन्सिल फॉर एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग (एन.सी.इ.आर.टी.) ही संस्था स्थापन करण्यात पुढाकार घेतला.
जे.पी.नाईक हे देशाच्या शिक्षण क्षेत्रात चार दशकांपेक्षा अधिक काळ कार्यरत होते व १९६० पासून पुढे २० वर्षे ते त्या क्षेत्राचे केंद्रस्थान बनून गेले होते.
त्या काळातील भारतीय शैक्षणिक संशोधन, शिक्षण क्षेत्रातील नवनवे उपक्रम आणि सुधारणा यांना मिळालेले संस्थात्मक स्वरूप, शैक्षणिक नियोजन आणि धोरण या सर्वांचा आरंभ व प्रगती यांवर त्यांचा संपूर्ण प्रभाव पडला होता. १९६४ मध्ये स्थापन झालेल्या या कोठारी आयोगाचे सचिव नाईकच होते. आयोगाचा अहवाल ७०० पानांचा असून त्या कार्याकडे नाईकांनी एक जागतिक स्तरावरचा महत्त्वाचा संशोधन प्रकल्प म्हणून पाहिले.
या कोठारी आयोगातच जे.पी.नाईक यांनी १०+२+३ या आकृतिबंधाची शिफारस केली.
याआधी बहुतेक राज्यांमध्ये ११+४ तसेच ११+१+३ असे पॅटर्न प्रचलित होते. जे.पी.नाईक यांच मत होत कि या नव्या पॅटर्न मुळे माध्यमिक शिक्षण व्यवस्थेत लवचिकता येणार होती. विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थी विद्यार्थिनींना पदवी प्राप्त करण्यापेक्षा व्यवसाय शिक्षण घेण्यासाठी या पॅटर्नचा फायदा होणार होता.
जे.पी.नाईक यांच्या प्रयत्नातून १०+२+३चा आकृतिबंध साकार झाला. फक्त महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण भारतात लागू झाला.
पुढे १९९३-९४ मध्ये युनेस्कोने ‘थिंकर्स ऑन एज्युकेशन’ या शीर्षकाखाली सुमारे ४०० पृष्ठांचे ४ खंड प्रकाशित केले. त्यामध्ये गेल्या अडीच हजार वर्षांतील संपूर्ण विश्वातील प्रतिभावंत शिक्षणतज्ज्ञांची चरित्रे समाविष्ट आहेत. त्यामध्ये ग्रीक तत्त्ववेत्ता अॅरिस्टॉटलपासून अलिकडच्या काळातील पाउलो, फे्रेईरे, ईव्हान, इलीच आदींचा समावेश आहे. या संकलनात भारतामधील तीन विचारवंतांचा अंतर्भाव झाला आहे. ते म्हणजे महात्मा गांधी, रवींद्रनाथ टागोर आणि जे. पी. नाईक.
जे. पी. नाईक यांना १९६६ साली कर्नाटक विद्यापीठाने सन्माननीय डॉक्टरेट प्रदान केली होती. तर निधनोत्तर त्यांना भारत सरकारने पद्मभूषण उपाधी दिली.
हे ही वाच भिडू.
- भारतीयांची विचार करण्याची क्षमता कमी आहे म्हणणाऱ्या आईन्स्टाईनने पुढे टागोरांना गुरु मानले.
- या मराठी नेत्याच्या सुटकेसाठी आईनस्टाईनने आपला शब्द टाकला होता
- आईनस्टाईन यांच्या स्टडीरूमच्या भिंतीवर एका भारतीयाचा फोटो होता.