जिथं पराभव स्वीकारावा लागला, त्याच शिर्डीसाठी आठवले कसे आग्रही आहेत
मागच्या काही दिवसात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) अध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचे अहमदनगर जिल्ह्यात दौरे वाढले आहेत. त्यातही विशेष म्हणजे शिर्डी भागात ते जात आहेत. याचं महत्वाचं कारण म्हणजे २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुका. २००९ साली रामदास आठवले यांच शिर्डी मतदार संघातून पराभव झाला होता.
रामदास आठवले यांनी नुकतेच शिर्डी मतदार संघातील एका कार्यक्रमा हजेरी लावली. त्यावेळी त्यांनी शिर्डी लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवण्याची इच्छा बोलून दाखवली. यांनतर रामदास आठवले यांचा २००९ मध्ये शिर्डीत झालेल्या पराभव बद्दल बोलण्यात येत आहे.
शिर्डी मतदार संघातून रामदास आठवले निवडणूक लढवणार याची चर्चा कधी सुरु झाली
रामदास आठवले हे शिर्डी लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवणार याची चर्चा सुरु झाली ती २०१९ पासून. हा मतदार संघ शिवसेनेच्या वाट्याला येत असल्याने २०१४ आणि २०१९ या दोन्ही निवडणुका शिवसेनेच्या उमेदवारांनी लढल्या आणि जिंकले.
तर दुसरीकडे २०१९ मध्ये शिवसेनेने भाजपची साथ सोडून महाविकास आघाडी स्थापन केली. त्यामुळे शिर्डीची जागा परत भाजपाच्या वाट्याला येऊ शकते अशी शकत्या वर्तविण्यात येत होती. त्यामुळे रामदास आठवले यांनी शिर्डी मतदार संघातून लढण्याची इच्छा २०१९ मध्ये बोलून दाखवली होती. त्यानंतर त्यांनी २०२० मध्ये अनेक कार्यक्रमांध्ये निवडणूक लढवण्याची इच्छा बोलून दाखवली.
मागच्या सहा महिन्यात रामदास आठवले हे ३ वेळा शिर्डी लोकसभा मतदार संघात गेले आहे. त्यामुळे शिर्डी मतदार संघासाठी आठवले किती आग्रही आहेत हे समजून येते.
मात्र आता प्रश्न पडतो की, १९९० पासून कधी आमदार, खासदार, मंत्री राहिलेल्या आठवले यांचा २००९ साली शिर्डी लोकसभा निवडणुकीत पराभव कसा झाला.
२००९ शिर्डी लोकसभा मतदार संघातून रामदास आठवले यांचा पराभव कसा झाला
१९९९ आणि २००४ च्या लोकसभा निवडणुकीत रामदास आठवले राष्ट्रवादीच्या कोट्यातून पंढरपूर (राखीव) मतदार संघातून निवडून आले होते. मात्र २००९ मध्ये लोकसभा मतदारसंघ पुर्नरचना झाल्या. यात पंढरपूर मतदार संघ गेला आणि त्याऐवजी माढा मतदार संघाची निर्माती झाली.
माढा मतदारसंघातुन शरद पवार हे लढणार असल्याने रामदास आठवले यांना दुसरा मतदार संघ शोधावा लागणार होता. शिर्डी मतदार संघ राखीव ठेवण्यात आला होता. यामुळे काँग्रेसच्या कोट्यातील मतदारसंघ रामदास आठवले यांना देण्यात आला.
काँग्रेस, राष्ट्रवादीचे उमेदवार म्हणून रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले यांना शिर्डी लोकसभा मतदारसंघातुन तिकीट देण्यात आले होते. तर युतीकडून शिवसेनेचे भाऊसाहेब वाकचौरे यांना तिकीट देण्यात आले. ही लढत अत्यंत चुरशीची होईल असे सांगण्यात येत होते.
तर दुसरीकडे शिर्डी लोकसभा मतदारसंघावर काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व असल्याने रामदास आठवेल पुन्हा एकदा आराम जिंकून येतील अशी राजकीय वर्तुळात चर्चा होती.
मात्र या निवडणुकीच्या प्रचार दरम्यान विरोधकांकडून रामदास आठवले हे बाहेरचे उमेदवार असल्याचा प्रचार करण्यात मोठ्या प्रमाणात करण्यात आला होता. तसेच स्थानिकांच्या मते काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा हीच भावना होती. याच बरोबर रामदास आठवले निवडून आले तर अस्ट्रॉसिटीच्या गुन्ह्यात वाढ होईल असा प्रचार दबक्या आवाजात करण्यात आला होता.
अशा प्रकारचा प्रचार शिर्डी मतदार संघात मोठ्या प्रमाणात झाला होता. त्यामुळे शिर्डी लोकसभा मतदार संघातील ६ विधानसभा मतदार संघा पैकी ५ मतदारसंघात काँग्रेस राष्ट्रवादीचे आमदार असतांना सुद्धा रामदास आठवले यांचा पराभव झाला होता.
भाऊसाहेब वाघचौरे यांना ३ लाख ५९ हजार ९२१ तर रामदास आठवले यांना १ लाख २७ हजार १७० मते मिळाली होती. वाघचौरे यांनी रामदास आठवले यांचा तब्बल १ लाख ३२ हजार ७५१ मतांनी पराभव केला होता.
शिर्डी लोकसभा मतदारसंघात ६ पैकी ५ आमदार काँग्रेस राष्ट्रवादी- काँग्रेसचे होते. तसेच स्थानिक स्वराज्य संस्था, सहकारी कारखाने, दूध संघ, सहकारी सोसायट्यात काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व होते. तरीही रामदास आठवले यांना पराभव स्वीकारावा लागला होता.
२००४ च्या लोकसभा निवडणुकीत शिर्डी लोकसभेच्या सहा विधानसभा मतदारसंघातून राधाकृष्ण विखे पाटील यांना मोठ्या प्रमाणात आघाडी मिळाली होती आणि ते निवडून आले होते.
तत्कालीन काँग्रेस नेते राधाकृष्ण विखे पाटील, बाळासाहेब थोरात, मधुकर पिचड सारख्या नेत्यांनी मदत न केल्याने २००९ च्या लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्याचे सांगण्यात येते.
उदाहरण म्हणून बघायला गेलं तर काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या संगमनेर मतदार संघात वाघचौरे यांनी २३ हजार पेक्षा जास्त मतांची आघाडी मिळाली होती. वाघचौरे यांना ५७ हजार ७८१ तर आठवले यांना ३४ हजार १५२ मते पडली होती.
काँग्रेसकडे असणाऱ्या आकोले मतदारसंघात सुद्धा वाघचौरे यांना आघाडी मिळाली होती. हीच परिस्थिती शिर्डी, कोपरगाव, नेवासा, श्रीरामपूर मतदार संघात होती.
काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी रामदास आठवले यांना मदत न केल्याने त्यांचा पराभव झाला होता. बाहेरचा उमेदवार म्हणून त्यांच्या विरोधात प्रचार केल्याने त्यांचा पराभव झाला होता. पुढे २०१४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी भाऊसाहेब वाघचौरे काँग्रेस मध्ये गेले आणि निवडणूक लढवली त्यात त्यांचा प्रभाव झाला.
२०१४ आणि २०१९ मध्ये सलग दोन वेळा शिवसेनेचे सदाशिव लोखंडे शिर्डी मतदारसंघातून निवडून आले आहेत. मात्र यावेळी भारतीय जनता पक्ष आणि राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मदतीने आपण निवडून येऊ असे आठवले यांना वाटते.
हे ही वाच भिडू
- मंत्रिपद द्या महामंडळे द्या ; रामदास आठवलेंकडे एवढी बार्गेनिंग पॉवर येती तरी कुठून..?
- नारायण राणेंपाठोपाठ रामदास कदम ही काँग्रेस मध्ये जाणार होते.
- भाजपला साथ देणारे पक्ष ; एकतर स्वतंत्र अस्तित्व सोडून भाजपचे झाले नाहीतर संपले…