१९९९ साली सैन्याच्या राजकिय वापरासाठी नरेंद्र मोदींना माफी मागावी लागली होती..
भारतीय जनता पक्ष आपल्या सैन्याचा राजकीय वापर करतो अशी टिका विरोधी पक्षांकडून वारंवार केली जाते. मागच्या टर्मच्या शेवटी शेवटी बालाकोट येथे एअर स्ट्राईक करण्यात आला होता. पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून या गोष्टींचा भाजपने हे करून दाखवलं म्हणून प्रचार देखील करण्यात आला.
आत्ता भारतीय सैन्याचा असा उपयोग केला जावू नये हे तर जगजाहीर आहे..
अशीच एक घटना १९९९ च्या लोकसभा निवडणूकांमध्ये झाली होती. या संदर्भात निवडणूक आयोगाने पक्षाला नोटीस देखील बजावली होती व नरेंद्र मोदींनी यावर माफी मागितली होती.
१९९८ नंतर आलेल्या १९९९ च्या इलेक्शनमध्ये भारतीय जनता पक्ष १८२ जागांवरतीच थांबला. पण या इलेक्शनची महत्वपूर्ण गोष्ट म्हणजे या इलेक्शनच्या प्रचारासाठी मोदींकडे खास जबाबदारी देण्यात आली होती.
तेव्हा नरेंद्र मोदी पार्टी महासचिव म्हणून पक्षाच्या प्रचाराची जबाबदारी संभाळत होते.
१९९९ सालच्या निवडणूकांच्या तीन महिन्यापूर्वी आपलं पाकिस्तानसोबत युद्ध झालं होतं. या युद्घाचा उल्लेख कारगील युद्ध म्हणून केला जातो. १९९९ साली अटल बिहारी वाजपेयी यांच सरकार बहुमत सिद्ध न करता आल्यामुळे कोसळलं. निवडणूक आयोगाने सप्टेंबर आक्टोंबर १९९९ साली निवडणूकांचे वेळापत्रक घोषीत केले.
या निवडणूकांमध्ये अटल बिहारी वाजपेयी सरकारचा प्रचार जोरात सुरू होता. त्याच महत्वाचं कारण कारगील पराक्रम होता हे वेगळं सांगायला नको.
जनसत्ता जे माजी संपादक प्रभाष जोशी यांनी २९ ऑगस्ट १९९९ साली एक लिख लिहला होता. त्यात ते लिहतात.
त्या काळात हरियाणाच्या कर्नाल येथे एक प्रचारसभा पार पडली. या सभेसाठी खुद्द अटल बिहारी वाजपेयी उपस्थित होते. प्रचारसभेत असणाऱ्या स्टेजच्या पाठीमागे मोठा बॅनर उभारण्यात आला होता. हा बॅनर तोतलिंग पर्वतावर भारतीय सैनिक तिरंगा फडकवत आहेत हा कारगील युद्धातला गाजलेला फोटो होता. सोबतच तिन्ही सेनादलाच्या प्रमुखांना व्हिक्टरी साईन केल्याचे फोटो देखील होते.
या गोष्टीवरून निवडणूक आयोगाने भाजपला नोटीस पाठवली होती. त्यावर नेमकं काय झालं होतं यावर लिहताना प्रभाष जोशी लिहतात की, त्यानंतर नरेंद्र मोदी यांनी भाजपच्या वतीने निवडणूक आयोगाकडे माफी मागितली होती.
असही सांगितलं गेलं की मंचावर उपस्थित असताना सोबत बॉडिगार्ड्स असल्याने वाजपेयींनी हे बॅनर पाहिलं नव्हतं. त्यांना या बॅनरची कल्पना देखील नव्हती. पण याच लेखात सांगण्यात आल की, मंचावरून जात असताना वाजपेयींची नजर त्या बॅनरकडे गेली आणि वाजपेयींनी स्वत:हून अशा प्रकारच्या प्रचाराबाबत नाराजी व्यक्त केली होती.
मात्र दोनच दिवसात गुजरातच्या कापडवंच येथे पुन्हा अटल बिहारी वाजपेयी यांच्या उपस्थितीत एक प्रचारसभा पार पडली यामध्ये देखील कारगील युद्धाचा बॅनर लावण्यात आला.
ही गोष्ट इथेच थांबली नाही तर मंचावर थेट कारगील युद्धात शहीद झालेल्या दिनेश वाघेलांच्या आईवडिलांना बोलवण्यात आलं व अटल बिहारी वाजपेयींसोबत त्यांची भेट घालून देण्यात आली.
अशा गोष्टींच्या विरोधात तेव्हा थेट सैन्यप्रमुख वेद प्रकाश मलिक यांनी नाराजी व्यक्त करत, आम्हाला आमच्या ठिकाणी सोडून द्यायला हवं अस विधान केलं होतं..
हे ही वाच भिडू
- नरेंद्र मोदींनी दिलेले १ कोटी रुपये हेमंत करकरे यांच्या पत्नीने का नाकारले होते?
- इंदिरा गांधी व नरेंद्र मोदींनी जमिनीत पुरलेल्या कालपात्राचं रहस्य काय आहे
- मोदी कोणाच्या बोटाला धरून राजकारणात आले याच उत्तर अरुण जेटलींपाशी येऊन थांबतं