त्या प्रसंगानंतर किशोर कुमार यांच्या गाण्यावर सरकारने बंदी आणली होती..
किशोर कुमार. बॉलिवूड इंडस्ट्रीमधलं सुप्रसिद्ध नावं. ज्यांनी आभिनयाबरोबरचं आपल्या आवाजाने एक वेगळीचं छाप सोडली. एक अभिनेता म्ह्णून त्यांनी अनेक सुपरहिट चित्रपट दिले, ज्यातून त्यांना नेम आणि फेम दोन्ही गोष्टी मिळाल्या. पण यासोबतच एक प्ले बॅक सिंगर, संगीतकार, निर्माता, दिग्दर्शक आणि स्क्रीन रायटर म्ह्णूनही त्यांनी नाव कमवलं. आपल्या गाण्यांनी त्यांनी लोकांच्या मनावर केलेली जादू अजूनही कायम आहे.
‘रूप तेरा मस्ताना’, ‘खईके पण बनारस वाला’, ‘एक लडकी भिगी भागी सी’, ‘जय जय शिव शंकर’ अशी त्यांची एकपेक्षा एक गाणी इतक्या वर्षांनंतरही गुणगुणली जातात. पण फार कमी लोकांना माहित असेल कि, या दिग्गजाच्या गाण्यावर एकदा थेट बॅन आणलं होत.
तो काळ होता १९७५ चा. जेव्हा देशात इंदिरा गांधी यांचं सरकार होत. २५ जून १९७५ ला देशभरात आणीबाणी लागू करण्यात आली होती, लोकांना नजरकैदेत ठेवण्यात आलं होत. या दरम्यान ऑल इंडिया रेडिओ आणि दूरदर्शननं किशोर कुमारांना ब्लॅक लिस्टमध्ये टाकलं होत.
यामागचं कारण काय तर या गायकानं मुंबईतल्या एका पॉलिटिकल रॅलीत गाणं गायला नकार दिला होता.
तत्कालीन माहिती आणि प्रसारण मंत्री विद्या चरण शुक्ला यांची इच्छा होती कि, बॉलिवूडनं इंदिरा गांधी यांनी आणीबाणी लागू केल्यानंतर घोषित केलेला २०-कलमी कार्यक्रमाचा ऑल इंडिया रेडिओ आणि दूरदर्शनच्या माध्यमातून प्रसार करण्यास मदत करावी. व्हीसी शुक्ला हे संजय गांधींच्या जवळचे होते.
यासाठीच सरकारनं किशोर कुमारांना फेवर मागितलं कि, त्यांनी आपल्या आवाजात सरकारच्या योजनांना गाण्यांच्या माध्यमातून पोहोचवावं. कारण, प्रत्येकालाच ठाऊक होत कि, किशोर कुमारांचा आवाज हा लोकांच्या थेट हृदयाला भिडणारा होता.
त्यावेळचे माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे जॉईन सेक्रेटरी सीबी जैन यांनी किशोर कुमारांना फोन करून सरकारला काय हवं आहे, याची माहिती दिली. त्यांनी किशोर कुमारांना निवासस्थानी भेटण्याचा आग्रहही धरला. मात्र, किशोरदा यांनी त्यांना नकार दिला.
एवढचं काय स्वतः संजय गांधींनी कार्यक्रमात गाण्यासाठी किशोर दाची मनधरणी केली, पण किशोर कुमारांनी त्यांचंही म्हणणं ऐकलं नाही.
कुमारांच्या अश्या वागण्याने सीबी जैन नाराज झाले. ज्यानंतर त्यांनीमाहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव एसएमएच बर्नी यांना कळवले की, ‘त्या गायकाने भेटण्यास नकार दिलाय. यानंतर, बर्नी आणि व्हीसी शुक्ला यांच्या मंजुरीसह आकाशवाणी आणि दूरदर्शनवरच्या किशोर कुमार यांच्या सगळ्या गाण्यांवर बंदी घालण्यात आली.
पण असं म्हणतात की, किशोर कुमार जरी कॉमेडी स्वभावचे होते, तरी ते आपल्या विचार आणि नियमांचे पक्के होते. म्हणून ते आपल्या तत्वांच्या विरुद्ध गेले नाहीत, आणि त्यांनी या कार्यक्रमात गाण्यास नकार दिला. आणि याच कारणामुळे आणीबाणीच्या काळात किशोर कुमारांच्या गाण्यांवर बंदी लावण्यात आली.
एकदा किशोर कुमारांनी म्हंटल होतं कि, ‘जे मला पटत नाही, ते माझ्याकडून कोणीच करून घेऊ शकत नाही. मी कोणाच्या हुकुमावरून किंवा इच्छेनुसार गात नाही.
दरम्यान, आणीबाणीच्या काळात किशोर कुमार यांच्या गाण्यावर लागलेली बंदी आणीबाणी संपुष्टात येईपर्यंत म्हणजे ४ मे १९७६५ पर्यंत कायम होती. आणीबाणी संपल्यानंतर पुन्हा एकदा किशोर कुमारांचा आवाज लोकांच्या कानावर पडायला सुरुवात झाली.
हे ही वाच भिडू :
- माणूस दगा देतो, झाड नाही. म्हणूनच किशोर कुमार झाडांना मित्र करायचे
- सारखं खर्चाचं रडगाणं ऐकवणाऱ्या निर्मात्याची किशोर कुमारने अशी जिरवली
- किशोर कुमारनी खालेल्या बारा पानांमुळे खाई के पान बनारसवाला ला रंग चढला.