जयललितांच्या त्या रहस्यमयी बंगल्यात काय होतं…
तामिळनाडूचे मुख्यमंत्री पलनिस्वामी यांनी मध्यंतरी एका प्रकरणातून स्वत:ला क्लिनचिट दिली होती. प्रकरण होत चोरीचं. तामिळनाडूच्या नेत्या जयललितांच्या बंगल्यात जी चोरी झाली त्यामागे पलनिस्वामीचा हात असल्याचा आरोप करण्यात आला होता. हि चोरी साधीच होती. म्हणजे पोलिसांनी चोरांना पकडलं आणि त्यांच्याकडून फक्त पाच घड्याळे आणि क्रिस्टलची गेंड्याची मुर्ती जप्त केली होती.
पण या चोरीचा आरोप असणाऱ्यांचा एकामागून एक मृत्यू होत गेला, आणि सुरू झाली रहस्यमयी बंगल्याबद्दल चर्चा.
कोडनाड इस्टेट.
निलगिरी पर्वतावर असणार कोडनाड हे चहा आणि कॉफींच्या बागांसाठी प्रसिद्ध आहे. या शांत आणि पर्यटनस्थळावर आहे कोडनाड इस्टेट. सुमारे ९०० एकरचा चहाचा मळा आणि त्या मळ्यात असणारा बंगला. ९० च्या दशकात जयललितां एका शांत जागेच्या शोधात होत्या. तेव्हा जयललितांच्या निकटवर्तीयांनी त्यांना या प्रापर्टीबद्दल सांगितलं. १८६४ साली इंग्रजांनी हि प्रापर्टी बनवली होती. चहाचे मळे लावले होते, सुरेख बंगला बांधण्यात आला होता. सध्याच्या काळात या बंगल्याचे मालक होते ते पीटर जोन्स कुटूंब. पिटर जोन्स हि जागा विकण्याच्या मनस्थितीत नव्हते. तेव्हा जयललितांच्या समर्थकांनी त्यांच्याकडून जबरदस्तीने खूपच कमी किंमतीत हि प्रापर्टी विकत घेतली होती.
१९९० पासून जयललिता या बंगल्यामध्ये सुट्या घालवण्यासाठी येत असत.
उन्हाळ्यामध्ये किंवा आजारी पडल्यानंतर त्यांचा मुक्काम इथेच असे. या बंगल्यात बाहेरच्या व्यक्तींना प्रवेश नव्हता. खूपच ठरावीक व्यक्ती या बंगल्यामध्ये येवू शकत होत्या. त्यामुळे या बंगल्याबद्गल वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या. लोकांच अस म्हणणं होतं की या बंगल्यातच जयललितांनी आपली सर्व संपत्ती ठेवली आहे. हा बंगला साधासुधा नसुन कित्येक कोटींची संपत्ती यामध्ये लपवून ठेवण्यात आली आहे. बंगल्यास मोठ्या प्रमाणात सिक्युरिटी असल्याकारणाने या चर्चांवर शिक्कामोर्तब होण्यास वाव मिळतच होता.
बंगल्यात नेमकं काय आहे याचे फक्त अंदाज बांधले जात होते अशात जयललितांच निधन झालं आणि बंगल्यात काय आहे हे रहस्यच राहिलं.
दिनांक २३ एप्रिल २०१७ ची रात्र.
या रात्री बंगल्याच्या आवारातील वॉचमन ओम बहादुरचा खून झाला. दूसरा वॉचमन कृष्ण बहादुर गंभीर जखमी होता. पोलीस आले. चौकशी सुरु झाली तेव्हा समजल. बंगल्यामध्ये चोरी झाली आहे. बंगल्याच्या दिशेने जाताना काही गाड्या पाहिल्याचं सांगण्यात आलं. नक्की कोणत्या गोष्टी चोरण्यात आल्या हे कोणालाच सांगता आलं नाही. पोलीसांच म्हणणं होतं की, बंगल्यामधून काही घड्याळे आणि क्रिस्टलची गेंड्याची मुर्ती चोरून नेण्यात आली आहे. तर लोकांच म्हणणं होतं की या बंगल्यात खूप मोठ्ठी प्रॉपर्टी होती. एक दोन करत आठ दहा बॅग भरून प्रॉपर्टीची कागदपत्रे चोरून नेल्याचं सांगण्यात येत होतं. पण पोलीसांनी या गोष्टीला नकार दिला.
या घटनेनंतर सुरू झाला कोडनाड केसचा प्रवास….
काही दिवसांनंतर बंगल्याच्या आवारातील CCTV ऑपरेट करणाऱ्या दिनेशने घरात आत्महत्या केल्याची माहिती मिळाली. दिनेश या बंगल्याच्या आवारातील CCTV ऑपरेट करत होता. मात्र त्या रात्री CCTV चालू नव्हते. पोलीस त्याची चौकशी करत होते दरम्यानच्या काळातच त्याने आत्महचत्या केली.
त्यानंतर पोलीसांचा संशय गेला तो कनागराज या जयललितांच्या ड्रायव्हरवर. जयललितांच्या या ड्रायव्हरने पैशाच्या आमिषातून हि चोरी केल्याचा संशय होता. चौकशी दरम्यानच त्याचा कार एक्सिडेंटमध्ये मृत्यू झाला. त्यानंतर जयललितांचा दूसरा कर्मचारी केवी सायन याच्या एक्सिडेंटची बातमी आली. त्या अपघातात तो वाचला होता पण त्याची पत्नी आणि मुलांचा मृत्यू झाला. केवी सायन याच्यावर ड्रायव्हर कनागराज याची मदत केल्याचा आरोप होता.
एकामागून एक व्यक्ती मरू लागले आणि रहस्यास सुरवात झाली.
जयललितांच्या मृत्यूनंतर या बंगल्याची मालकी शशिकला यांच्यावर आली. तितक्यातच शशिकला यांना अटक झाली. त्यानंतर शशिकलाचे पुतणे टिटिवी दिनाकरण यांच्याकडे मालकी आली आणि ते देखील जेलमध्ये गेले. हा बंगला कुणालाच सोडत नाही अशा प्रकारची ती चर्चा. बंगल्यात काय होत यापासून बंगल्यामुळे हे सर्व होत आहे अशा अफवा पसरवण्यात आल्या.
पण प्रश्न राहतो तो चोरीनंतर काय झालं ?
पोलीसांना चोरीचे धागे सापडले ते हायवेवरच्या एका CCTV कॅमेऱ्यामुळे. या कॅमेऱ्यात संशयास्पद इडेव्हेअर गाडी दिसली होती. यात दहा व्यक्ती होत्या. त्यातील एक कनागराज हा जयललितांचा पुर्वीचा ड्रायव्हर होता. पोलिसांनी त्या गाडीला रात्री अडवलं देखील होतं. केरलच्या दिशेने जाणाऱ्या या गाडीत जयललितांचे फोटो असणारे मनगटी घड्याळे होते. जयललितांचे कार्यकर्ते म्हणून त्यांना सोडून देण्यात आलं. ड्रायव्हरने आपल्या साथीदारांना सांगितल होतं की या बंगल्यात खूप मोठ्ठी प्रॉपर्टी आहे पण त्याच्या हातात काहीच सापडलं नाही. फक्त चोरी करण्याच्या उद्देशानेच हे लोक बंगल्याच शिरल्याच पोलीसांकडून सांगण्यात आलं. पोलीसांची हि थेअरी असली तरी बंगल्याच्या आवारातले CCTV त्या पुर्वी बंद कसे पडले होते. बंगल्याच्या आवारातील सुरक्षारक्षक कमी कसे करण्यात आले होते या गोष्टींचे उत्तर पोलीस देवू शकले नाहीत त्यामुळे बंगल्याबद्दलचा संशय वाढत गेला.
११ जानेवारी २०१८.
दिल्लीमध्ये पत्रकार मॅथ्यू सॅम्युअल यांनी एक पत्रकार परिषद बोलवली. या पत्रकार परिषदेत एक व्हिडीओ जाहिर करण्यात आला. त्यामध्ये चोरीच्या संशय असणाऱ्या दहा जणांपैकी काही व्यक्तींचे ऑडिओ रेकॉर्डिंग करण्यात आले होते. केवी सायन आणि वालायार मनोज अशा दोघांमध्ये झालेल्या या संभाषणात तामिळनाडूचे मुख्यमंत्री पलनिस्वामीच नाव आलं होतं. सायनच्या मते तो मुख्यमंत्र्याच्या जवळचा होता.
त्यानंतर तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांनी स्वत:लाच या प्रकरणातून क्लिनचिट दिली. आरोप प्रत्यारोपातून त्या बंगल्यात नेमकं काय होत हे मात्र रहस्यच राहिलं.
हे ही वाच भिडू.
- मंगळसुत्र नको म्हणून आपल्या प्रेमाचा त्याग करणारे करुणानिधी.
- भारताच्या इतिहासातील रहस्यमय ‘चपाती आंदोलन’, ज्याने ब्रिटीश सरकार भयभीत झालं होतं !
- खरंच राजस्थानच्या विधानसभेत भूत असेल का..?
- YSR यांच्या अपघातानंतर अनेकांनी आत्महत्या केल्या, अशी कोणती जादू होती त्या माणसात ?