आंबेडकरांनी रमाईला लिहिलेली पत्रं वाचून वाटतं…असं असलं पाहिजे प्रेम

इतिहासात काही मोजकी जोडपे होऊन गेलीत ज्यांचे सहजीवन, त्यांनी समाजासाठी केलेला त्याग, त्यांनी जोडीने घेतलेला समाजसुधारणेचा ध्यास पाहता असं वाटतं…अस्सं असलं पाहिजे प्रेम, आयुष्यभराची साथ…थोडक्यात आदर्श कपल !

इतिहासातील आदर्श कपल बघायला गेलं तर कुणाला छत्रपती शिवाजी महाराज- महाराणी सईबाई आठवतील, कुणाला छत्रपती संभाजी महाराज-महाराणी येसूबाई आठवतील…आणि अलीकडच्या इतिहासातील सावित्री बाई फुले-ज्योतिबा फुले तर कुणाला बाबासाहेब आणि रमाई आठवतील….हि सगळी जोडपी म्हणजे वैवाहिक जोडपे म्हणून आपल्या सर्वांनाच आदर्श आहेत…आणि असायलाच हवीत. 

त्यातल्या त्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि  रमाई आंबेडकर  ती कितीतरी लोकांसाठी एक वैवाहिक जोडपे म्हणून आपल्या सर्वांनाच आदर्श आहेत. 

युगपुरुष महामानव डॉ. बाबासाहेबांच्या खडतर आयुष्यात जेंव्हा बाबासाहेब शिक्षणास बाहेर होते तेंव्हा याच स्त्रीने शेणाच्या गोवऱ्या थापून दारिद्र्यांच्या खोल दरीत असलेला संसाराचा गाडा ओढला होता…त्याची जाणीव देखील तिकडे मेहनत घेणाऱ्या बाबासाहेबांना होऊ दिली नाही. पण तरीही त्याची पूर्णपणे जाणीव बाबासाहेबांना होती. 

त्यांच्या खाजगी आयुष्याबद्दल आणि तसेच त्यांच्या आणि रमाईंच्या नात्याबद्दल खूप कमी लोकांना माहिती आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे फोटो आपण पहिले तर ते अत्यंत गंभीर आणि कडक शिस्तीचे वाटतात आणि ते होते देखील. पण ते मनातून तितकेच प्रेमळ आणि मायाळू होते.

बाबासाहेबांना रमाईंची साथ नसती तर ते कदाचित भिवाचा भीमराव झालेच नसते. 

बाबासाहेब जेव्हा इंग्लंडला होते तेव्हा त्यांनी माता रमाईंना अनेक पत्र लिहिली होती. त्यांची ही पत्रे वाचली तर आपल्याला कळेल की त्यांच्यातलं ‘खरं प्रेम’ कसं होतं. दोघांमधले प्रेम अपार होते या एका पत्रावरूनच समजते.

प्रेमपत्र हे तर कुणाच्याही खाजगी आयुष्याची बाब असते.  परंतु हि पत्रे सांगण्याचा उद्देश हा आहे की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दृष्टीकोनातून रमाईचे महत्व आणि प्रेम आणि त्यांच्याबद्दलची ओढ त्यांनी त्यांच्याच शब्दात व्यक्त केली आहे. तुम्हालाही ते सांगण्याचा मोह आवरत नाही…..

प्रिय रमा,

रमा तू माझ्या आयुष्यात आली नसती तर..?

कशी आहेस रमा तू? तुझी आणि यशवंताची आज मला खूप आठवण येत आहे. तुमच्या आठवणीने माझे मन खूपच हळवे झाले आहे. मागील काही दिवसांमध्ये माझी भाषणे फारच गाजली. परिषदेतील सर्वोत्कृष्ट भाषणे, प्रभावी वक्तृत्वाचा सर्वोत्कृष्ट नमुना असे माझ्याबद्दल इकडच्या वर्तमानपत्रात लिहून आले आहे. या पहिल्या गोलमेज परिषदेतील माझ्या भूमिकेचा मी विचार करत होतो, आणि माझ्या डोळ्यासमोर आपल्या देशातील सर्व पीडितांचे संसार माझ्या डोळ्यासमोर उभे राहिले.

दुःखाच्या डोंगराखाली ही माणसे हजारो वर्षांपासून गाडली गेली आहेत. या गाडले-पणाला पर्याय नाही हीच त्यांची समजूत आहे. मी हैराण होत आहे रमा, पण मी झुंज देत आहे. माझी बौद्धिक शक्ती परमवीर झाली होती जणू.  खूप भावना मनात दाटून आले आहेत. खूपच हळवी झाली आहे मन. खूप व्याकुळही झाले आहे. आणि घरातल्या तुम्हा सर्वांची आठवण आली. तुझी आठवण आली आणि यशवंताची सुद्धा. मला आठवतं तू मला बोटीवर पोहचवायला आली होती.

मी नको म्हणत होतो तरीही तुझे मन राहवले नाही. तेव्हा मी गोलमेज परिषदेला जात होतो. माझा सर्वत्र जयजयकार सुरु होता. तेव्हा ते चित्र तू पाहत होतीस तुझं मन गदगदून आलं होतं. कृतार्थतेने तू ओथंबून आली होतीस. तू शब्दांनी बोलत नव्हतीस पण तुझे डोळे जे शब्दांनी सांगता येत नव्हतं ते सांगत होते.  तुझं मौन शब्दाहून अधिक बोलकं झालं होतं.

तुझ्या गळ्यातील का आवंढा ओठांपर्यंत येऊन थडकत होता. ओठातल्या शब्दांच्या भाषेपेक्षा डोळ्यातील आसवांचीच भाषा त्यावेळी माझ्या मदतीला धावली होती. आणि आता इथे इंग्लंडमध्ये या साऱ्या गोष्टी मनात उभ्या राहिल्या आहेत. मन नाजूक झाले आहे. जीवात कालवाकालव होत आहे.

कशी आहेस रमा तू? माझा यशवंत कसा आहे? माझी आठवण काढतो का तो? त्याचे संधिवाताचे दुखणे कसे आहे? त्याला जप रमा, आपली चारही मुले आपल्याला सोडून गेली. आता आहे आपला फक्त यशवंत. तोच तुझ्या मातृत्वाचा आधार आहे आता. त्याला आपण जपलं पाहिजे. त्याला खूप अभ्यासही करायला लाव. त्याला रात्री अभ्यासाला उठवत जा. 

माझे बाबाही मला रात्री अभ्यासासाठी उठवीत असायचे. तोवर ते जागे राहत असत. ती शिस्त त्यांनीच लावली. मी उठलो मी अभ्यास सुरू केला की मग ते झोपत असत. अगदी प्रारंभी मला अभ्यासाला उठण्याचा कंटाळा येई, त्यावेळी अभ्यासापेक्षा झोप महत्त्वाची वाटे. पुढे तर आयुष्यभरासाठी झोपेपेक्षा अभ्यासच मोलाचा वाटत राहिला याचे सर्वात जास्त श्रेय माझ्या बाबांना जाते. माझ्या अभ्यासाची वात तेवत राहावी म्हणून माझे बाबा तेलासारखे जळत राहिले. 

मी रात्रीचा दिवस केला. अंधाराचा उजेड केला. माझ्या बाबांच्या कष्टांना आता फळ आली. फार फार आनंद वाटतोय रमा आज. रमा यशवंतच्या मनाला असाच अभ्यासाचा छंद लागला पाहिजे. ग्रंथाचा त्याने ध्यास घेतला पाहिजे. रमा, वैभव – सुबत्ता ही सर्व निरर्थक आहे. 

तू अवतीभोवती पाहते आहेसच ना माणसे अशाच गोष्टींच्या मागे लागलेली असतात. त्यांची जीवन जिथून सुरू होतात तिथेच थांबलेली असतात. या लोकांची आयुष्य जागा बदलत नाहीत, आपल्याला असे जगून चालणार नाही. आपल्याजवळ दुःखात शिवाय दुसरं काहीच नाही. दारिद्रय गरिबी दुःख याच्याशिवाय आपल्याला कसलीही सोबत नाही. 

अडचणी संकटे आपल्याला सोडत नाहीत. अपमान छळ अहवेलना ह्या गोष्टी आपल्याला सावली सारख्या जखडलेल्या आहेत. मागे अंधारच आहे. दुःखाची समुद्रच आहेत. आपला सूर्योदय आपणच झाले पाहिजे. आपणच आपला मार्ग झाला पाहिजे. त्या मार्गावर दिव्यांची ओळ आपणच झाले पाहिजे. त्या मार्गावरचा जिद्दीचा प्रवास देखील आपलाच झाला पाहिजे.

आपली दुनिया आपणच निर्माण केली पाहिजे. आपण असे आहोत म्हणून म्हणतोय रमा यशवंताला खूप अभ्यास करायला लाव. त्याच्या कपड्यांची आणि त्याची काळजी घे. त्याच्यात जिद्द जागव.

मला काहीच कळत नाही असेही नाही रमा , मला कळतंय कि, रमा या दुःखाच्या वनव्यात तू स्वतः करपून जात आहेस. पाने गळून जावीत आणि जीव सुकत जावा त्याप्रमाणे तू होत आहेस. मी तरी काय करू? एका बाजूने हात धुवून पाठीशी लागलेले दारिद्रय दुसऱ्या बाजूने माझ्या जिद्दीने घेतलेला वसा, वसा ज्ञानाचा! विज्ञानाचा सागर उपसतो आहे. मला इतर कशाचेही भान नाही. पण ही शक्ती  मिळवण्यात तुझा ही महत्वाचा वाटा आहे. 

तू इथे माझा संसार शिवत बसली आहेस. आसवांचे पाणी घालून माझे मनोबल वाढवीत आहेस. म्हणून मी बेभान मनाने ज्ञानाच्या तळगर्भाचा वेध घेत आहे. खरं सांगू रमा मी निर्दयी नाही, जिद्दीचे पंख पसरून आकाशात उडणाऱ्या मला कुणी सादही घातली तरी यातना होतात. माझ्या मनाला खरचटतं आणि माझ्या रागाचा भडका उडतो. 

मलाही हृदय आहे रमा. मी कळवळतो परंतु मी बांधलो गेलो आहे क्रांतीशी! म्हणून मला स्वतःच्या भावना चितेवर चढवाव्या लागतात. त्याच्या तुलाही आणि यशवंतलाही कितीतरी झळा बसतात हेही तितकेच खरे आहे. हे लिहिताना रमा मी उजव्या हाताने लिहीत आहे आणि डाव्या हाताने माझी अनावर झालेली आसवे पुसत आहे. त्याला सांभाळ रमा त्याला मारू नको, मी कधी त्याला मारले होते याची आठवणीही त्याला करुन देऊ नको. तोच आता तुझ्या काळजाचा एकुलता एक घटक आहे.

माणसाच्या धार्मिक गुलामगिरीचा आर्थिक आणि सामाजिक उचनीचतेच्या गुलामगिरीचा पत्ता मला शोधायचा आहे. माणसाच्या जीवनात या गोष्टी ठाण मांडून बसले आहेत त्यामुळे त्याला पार जाळून पुसून टाकता आला पाहिजे. समाजाच्या स्मरणातून आणि संस्कारातूनही या गोष्टी नाहीशा झाल्या पाहिजे. 

रमा ! तू हे वाचते आहेस आणि तुझ्या डोळयात आसवं आली आहेत. कंठ दाटला आहे. तुझं काळीज थरथरायला लागलं आहे. ओठ कापू लागले आहेत. मनात उभे राहिलेले शब्द ओठापर्यंत चालतही येऊ शकत नाहीत. इतकी तू व्याकूळ झाली आहेस.

रमा तू माझ्या आयुष्यात आली नसती तर ? तु मला साथी म्हणून मिळाली नसती तर? तर काय झालं असतं? 

केवळ संसार सुखाला ध्येय समजणारी स्त्री मला सोडून गेली असती. अर्धपोटी राहणे, गौऱ्या वेचायला जाणे वा शेण वेचून त्याच्या गौऱ्या थापणे किंवा गोवऱ्या थापायच्या कामाला जाणे हे कोणाला आवडेल? स्वयंपाकासाठी इंधन गोळा करायला जाणे, मुंबईत हे कोण पसंत करेल? घराला ठिगळे लावणे, वस्त्रांना शिवत राहणे, एवढ्याच काड्याची पेटीमध्ये महिना निघाला पाहिजे, एवढेच धान्य एवढेच ते लिमिट महिनाभर पुरले पाहिजे. 

हे माझ्या मुखातून बाहेर पडलेले आदेश हे तुला गोड वाटले नसते तर माझे मन फाटून गेले असते. माझ्या जिद्दीला तडे गेले असते. मला भरती येत गेली असती. आणि तिला त्या त्या वेळी लगेच आहोटी ही लागली असती. माझ्या स्वप्नांचा खेळच पार विस्कटून गेला असता रमा. जीवनाचा सर्व सूर बेसूर झाला असता. सगळीच मोडतोड झाली असती. मी कदाचित खुरटी वनस्पतीच झालो असतो. जप स्वतःला जशी जपतेस मला. लवकरच यायला निघेन काळजी करू नको सर्वात भूषण सांग.

कळावे,

तुझाच भीमराव!

सादर केलेले हे पत्र डॉ. भीमराव आंबेडकर यांनी ३० डिसेंबर १९३० रोजी लंडनहून रमाबाईंना लिहिले होते. मराठीतील हे पत्र प्रा. यशवंत मनोहर यांनी आपल्या ‘रमाई’ या पुस्तकात समाविष्ट केले आहे. 

हे हि वाच भिडू :

  

Leave A Reply

Your email address will not be published.