५० वर्षे झाली बालभारतीच्या किशोर मासिकाची जादू अजूनही कमी झालेली नाही..

सध्या कोरोनामुळे शाळा बंद आहेत. परीक्षा होतील नाही होतील याचा अंदाज नाही. आपली शाळकरी दोस्त मंडळी जवळपास वर्षभराची सुट्टी अनुभवत आहेत. यात साथ आहे मोबाईलची.

सकाळचे ऑनलाईन क्लासेस आणि दिवसभराचे ल्युडो गेम हे घराघरातलं चित्र आहे. जास्तीतजास्त सिनेमा, युट्युब व्हिडीओ, इन्स्टा रील आणि वेब सिरीज एवढ्या पुरत आपल लाईफ सर्कल बनलेलं आहे.

पण पूर्वी असं नव्हतं. सुट्ट्या पडल्या की मामाबरोबर सकाळी शेतातल्या विहिरीत पोहायला जाणे, आज्जीने बनवलेली खमंग न्याहरी, दिवसभर क्रिकेट, लपंडाव,  झालंच तर टीव्हीवरील चंद्रकांता, शक्तिमान, मोगली हे सगळं चालायचं. रात्री पत्त्यांचे डाव रंगायचे.

पण सगळ्याबरोबर आपले काही खास साथीदार असायचे. त्यांचं नाव होतं, चंपक,  ठकठक आणि किशोर.

म्हणायला तर हि लहान मुलांची मासिकं होती पण त्यांच्यात माहितीचा अद्भुत पेटारा होता. जुन्या पौराणिक कहाण्यांपासून ते चिकूसारख्या कॉमिक स्टोऱ्यापर्यंत सगळ्या गोष्टी त्यातून वाचायला मिळायच्या. युट्युब पेक्षा ते अजब विश्व होतं, ज्याची किंमत आज लक्षात येते.

या सगळ्या मासिकांमध्ये किशोर मात्र वैशिष्ट्य पूर्ण मासिक होतं. कारण त्याची निर्मिती केली होती, बालभारतीने.

नेहमीचा रटाळ अभ्यासक्रम, गणितं, विज्ञान अणुरेणू, सण सणावळ्यामध्ये गुरफ़टलेला इतिहास, भूगोल शिकवणारी बालभारती हे मासिक मात्र भन्नाट बनवायची. शाळेचं पुस्तक कधी न वाचणारी मंडळी दर महिन्याला आवर्जून किशोरची वाट बघायची. किशोर हा आपल्यासाठी विकिपीडिया होता.

तुम्हाला सांगून पटणार नाही पण या किशोर मासिकाची सुरवात एका मंत्र्याच्या कल्पनेतून झाली होती.

तत्कालीन शिक्षण मंत्री मधुकरराव चौधरी

महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक शिक्षण मंत्री होऊन गेले मात्र गेल्या पन्नास वर्षात आपली छाप सोडलेले एकमेव शिक्षण मंत्री म्हणजे मधुकरराव चौधरी. असं सांगितलं जातं कि त्यांनी महाराष्ट्राच्या शिक्षणव्यवस्थेत अनेक आमूलाग्र बदल घडवून आणले. १०+२+३ चा राष्ट्रीय पॅटर्न त्यांनी महाराष्ट्रात देखील लागू केला. शिक्षण खात्यासाठी श्वेत पत्रिका काढणारा शिक्षण मंत्री म्हणून त्यांना ओळखलं जातं.

त्या काळात दहा ते पंधरा वयोगटातल्या मुलांचं मनोरंजन करेल असं मासिक उपलब्ध नव्हतं. मुलांसाठीची महत्त्वाची नियतकालिकं काळाच्या पडद्याआड लुप्त झाली होती. पाठ्यपुस्तकांइतकंच विद्यार्थ्यांना पूरक वाचन साहित्य देणं गरजेचं होतं. पूरक वाचनासाठी पुस्तकं प्रसिद्ध करण्यात अनेक मर्यादा होत्या. मासिकाद्वारे हा उद्देश साध्य करणं शक्य होतं.

त्यातून किशोरची कल्पना मधुकरराव चौधरी यांना सुचली.

त्यांनी आपल्या मंत्रालयातील अधिकाऱ्यांना तसे आदेश दिले. बालभारती म्हणजेच महाराष्ट्र राज्य पाठयपुस्तक मंडळाच्या वतीने  हे मासिक बनवायचं ठरलं. १९७१ बालदिनादिवशी म्हणजेच पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीदिनी ८ ते १४ वर्षे वयोगटातील मुलांसाठी हे मासिक प्रकाशित झालं.

‘किशोर’चा पहिला अंक पंडित नेहरूंच्या आठवणींना समर्पित केला होता. मुखपृष्ठावरचं त्यांचं चित्र काढलं होतं प्रसिद्ध चित्रकार मुरलीधर आचरेकर यांनी.

“तुमच्या बुद्धीला, तरल अशा कल्पनाशक्तीला आणि जिज्ञासेला सतत काहीतरी हवे असते. काही अद्भूतरम्य विलक्षण असे पहावे, ऐकावे याकडे तुमचे मन सारखे झेपावते. या तुमच्या सर्वांगाने, सर्वांशाने फुलण्याच्या काळात तुम्हांला काही मदत करता आल्यास ती करण्याचा ‘किशोर’चा विचार आहे,”

असं तत्कालीन शिक्षण मंत्री मधुकरराव चौधरी यांनी आपल्या मनोगतात म्हटलं होतं.

पहिल्या अंकाच्या प्रती शाळांमध्ये मोफत वाटण्यात आल्या आणि विद्यार्थी-शिक्षकांची प्रतिक्रिया अजमावण्यात आली. ‘किशोर’ची नियमित छपाई जानेवारी १९७२ पासून सुरू झाली. पहिल्यांदा दहा हजार प्रती छापण्यात आल्या. सहा महिन्यांनंतर ‘किशोर’ची विक्री दरमहा २५ ते ३० हजार प्रती आणि दिवाळी अंकाची विक्री ३५ ते ४० हजार प्रतींपर्यंत गेली. आता दरमहा सरासरी ६५ हजार प्रती वितरित होतात.

किशोर’ला कलात्मक मांडणी आणि आशय संपन्नतेचं अधिष्ठान दिलं ते पहिले कार्यकारी संपादक वसंत शिरवाडकरांनी.

‘किशोर’नं कटाक्षानं काही पथ्यं पाळली. विद्यार्थी वाचकांमध्ये सम्यक, विवेकी, तर्कशुद्ध, विज्ञाननिष्ठ विचार-दृष्टिकोन रुजावा; त्यांच्या मनात धार्मिक, जातीय, आर्थिक, लैंगिक भेदाभेदाच्या विचारांचा प्रभाव पडू नये, यासाठी काळजी घेण्याचं धोरण ‘किशोर’नं स्वीकारलं. अंधश्रद्धांना खतपाणी घालणारं, जुन्या रूढी परंपरा, कर्मकांडांना प्रोत्साहन देणारं लिखाण मासिकात नसेल असं पथ्यही मंडळानं घालून घेतलं.

विज्ञान, तंत्रज्ञान, भूगोल, सामाजिक इतिहास यासारख्या विषयांना विशिष्ट पानं राखीव ठेवण्यात आली. या विषयावरचं लेखन सोपं-सुटसुटीत असेल याची काळजी घेण्यात आली. त्यासाठी होमी भाभा सायन्स एज्युकेशन सेंटरची मदत घेण्यात आली. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तर देणारं ‘शंका-समाधान’ हे सदर, शिरवाडकर यांची ‘असे हे विलक्षण जग!’ ही लेखमाला खूप गाजली. गोष्टी, कवितांसोबत रंगीत चित्रं, रेखाटनं वापरण्याची प्रथा ‘किशोर’नं पहिल्या अंकापासून पाडली.

श्री. वसंत शिरवाडकरांनंतर हरहुन्नरी लेखक वसंत सबनीस आणि त्यानंतर ज्ञानदा नाईक या कार्यकारी संपादकांनी ‘किशोर’ची ध्वजा आणखी उंचावली.

या तिघांचाही मराठी साहित्य आणि कलेच्या क्षेत्रातल्या व्यक्तींशी गाढा संपर्क. त्यामुळे उत्तमोत्तम कविता, कथा, ललित लेखन, प्रवासवर्णनं, स्थलचित्रं, व्यक्तिचित्रं यांनी ‘किशोर’चे अंक समृद्ध झाले. सोबत विज्ञान, तंत्रज्ञान, नवनवे शोध, पर्यावरण, प्रदूषण आदी विषय ‘किशोर’नं मुलांच्या भाषेत मांडले. मराठीतल्या बहुतांश लेखक-कवींनी किशोरसाठी लेखन केलं आहे. अनेक प्रतिभावान चित्रकारांनी मासिकाला सजवलं. त्याचं श्रेय या तीनही कार्यकारी संपादकांचं. ‘किशोर’चे आताचे कार्यकारी संपादक किरण केंद्रे यांनीही नवीन सदरं आणि रंजक उपक्रमांची ही परंपरा कायम राखली आहे.

किशोरनं दिग्गज चित्रकारांकडून चित्रं काढून घेतली तसंच सामाजिक भान ठेवून कला महाविद्यालयांतून बाहेर पडणाऱ्या उदयोन्मुख कलाकारांनाही संधी दिली. त्यामुळे ‘किशोर’मधील चित्रं ताजीतवानी राहिली. तरुण कलाकारांच्या कुंचल्यातून साकारलेल्या वेगवेगळ्या शैलीतल्या चित्रांनी मुखपृष्ठं सजली.

‘किशोर’ला देखणं करण्यात संपादक-चित्रकारांइतकाच निर्मिती विभागाचाही वाटा आहे.

१९८४ च्या दिवाळी अंकाला शांताराम पवार यांनी फुलपाखरं, मुलं आणि फुलांचं प्रतिकात्मक चित्र केलं होतं. या मुखपृष्ठाला मोठा अवकाश हवा होता. तेव्हाचे नियंत्रक शं. वा. वेलणकर यांनी मुखपृष्ठ आणि मलपृष्ठाला दुमडता येईल असं एकेक पान जोडून भव्य कव्हर केलं.

या अंकासाठी गंगाधर गाडगीळ, शंकरराव खरात, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, पं. महादेवशास्त्री जोशी, अरुण साधू, राजा मंगळवेढेकर, कुसुमाग्रज, इंदिरा संत, वा. रा. कांत, संजीवनी मराठे, मंगेश पाडगावकर, शान्ता शेळके, शंकर वैद्य अशा मातब्बर लेखक-कवींनी लिहिलं होतं. याच वर्षी उन्हाळी सुट्टीचा विशेषांक काढण्यास सुरूवात झाली.

नंतर नाट्य, लोककथा, स्वातंत्र्य, कारगिल युद्ध, स्वच्छता अशा वेगवेगळ्या विषयांवर विशेषांक काढण्याची प्रथा ‘किशोर’नं सुरू केली.

‘किशोर’साठी दुर्गा भागवत, पंढरीनाथ रेगे, ग. दि. माडगूळकर, वसंत सबनीस, ज्योत्सना देवधर, पु. ल. देशपांडे, नरहर कुरुंदकर, श्रीपाद जोशी, व्यंकटेश माडगूळकर, विंदा करंदीकर, सरिता पदकी, महावीर जोंधळे यांनीही लेखन केलं. राजन खान, प्रवीण दवणे, राजीव तांबे, संजय भास्कर जोशी, अरुण म्हात्रे, दासू वैद्य या आताच्या लेखकांपर्यंत हा प्रवास सुरू आहे.

अन्यत्र प्रसिद्ध झालेलं साहित्य न स्वीकारण्याच्या भूमिकेमुळं मुलांना नेहमी कोरं-करकरीत वाचायला मिळालं.

चित्रकार मुरलीधर आचरेकर, श्रीधर फडणीस, मारिओ मिरांडा, अनंत सालकर, रवी परांजपे, शांताराम पवार, अनंत कुलकर्णी, घनश्याम देशमुख, प्रभाकर काटे, रमेश मुधोळकर आदींनी रंगवलेल्या जादुई दुनियेत मुलं हरवून गेली. ‘माझे बालपण’, ‘सुटीचे दिवस’, ‘माझा गाव’, ‘चित्रकथा’, ‘फास्टर फेणे’, देशोदेशींच्या कथा मुलांपर्यंत पोचवणारं ‘देशांतर’ ही या मासिकातली काही गाजलेली सदरं.

‘माझे बालपण’ या सदरात यशवंतराव चव्हाण, लता मंगेशकर, विजय तेंडुलकर, सुनील गावसकर, जयंत नारळीकर ते नव्या पिढीचे सचिन तेंडुलकर, अमृता सुभाष यांनी लेखन केलं.

गेली जवळपास ५० वर्ष किशोर मासिक न थकता न थांबता सुरु आहे.

आजही हे मासिक वाचकाभिमुख व्हावा म्हणून विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया घेतल्या जातात. मुलांना गोष्टी, चित्रं, कोडी, विनोद असं हलकंफुलकं, चटपटीत वाचन हवं असतं. त्यानुसार बदल करण्यात येतात. विद्यार्थ्यांनी लिहितं व्हावं म्हणून त्यांच्यासाठी साहित्याचा आणि चित्रांचा विभाग सुरू केला.

विद्यार्थ्यांमधून लेखक घडावेत म्हणून ‘किशोर’नं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात, वाड्यावस्त्यांवर, साखर शाळांमध्ये, दगडखाण कामगारांच्या मुलांच्या शाळांमध्ये, आदिवासी पाड्यांत लेखन कार्यशाळा घेतल्या.

कविता, कथा, लेख कसे लिहावेत याचं मार्गदर्शन वसंत बापट, यदुनाथ थत्ते, महावीर जोंधळे, माधव वझे, अनिल तांबे, बाळ सोनटक्के, विजया वाड, प्रवीण दवणे आदींनी केलं.

सर्वोत्तम ते देण्याची धडपड मासिकात प्रतिबिंबित होत असल्यानं ‘किशोर’ विविध व्यासपीठांवर नावाजला गेला.

तीन अंकांना राज्य तसंच राष्ट्रीय स्तरावरील साहित्य संघाची बक्षीसं मिळाली. माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं मार्च १९७३ आणि नोव्हेंबर १९७६ च्या अंकांना छपाई आणि सजावटीसाठी अनुक्रमे श्रेष्ठता प्रमाणपत्र आणि प्रथम पुरस्कार देऊन गौरवलं. ही परंपरा आजतागायत कायम आहे.

किशोर’चं वितरण ‘बालभारती’चं करते. शाळा आणि देणगीदारांना पोस्टामार्फत सवलतीच्या दरात अंक वितरित केला जातो. सेमी इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू झाल्यापासून ‘किशोर’मध्ये चार इंग्रजी पानं देण्यात येतात.

बाकी काही केलं असेल किंवा नसेल पण किशोरने एकहाती महाराष्ट्राची वाचन सांस्कृती घडवली हे मात्र नक्की.

गेल्या काही वर्षांपासून बालभारतीने किशोर मासिक आता ऑन लाईन स्वरूपात देखील उपलब्ध केले आहे. आजवरच्या १९७१ सालांपासूनच्या सर्व किशोर मासिकांचा खजिना आपल्याला इथे वाचता येऊ शकतो. लहानपणीच्या आठवणींमध्ये रमायचं असेल तर नक्की या बालभारतीच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

हे ही वाच भिडू.

 

Leave A Reply

Your email address will not be published.