ऐन थंडीत मराठवाडा, विदर्भामध्ये अचानक गारपीट होण्याचं कारण म्हणजे..
भर मान्सून काळात महाराष्ट्रातल्या मराठवाडा आणि वैदर्भातील काही जिल्ह्यांना अतिवृष्टीचा फटका बसला होता, त्यात झालेले शेतकऱ्यांचे नुकसान अजूनही भरून निघाले नाही तोच दुसरं संकट आलं ते म्हणजे काल मोठ्या प्रमाणात झालेली गारपीट. ऐन थंडीत अवघा महाराष्ट्र कुडकुडत होता अन त्यात गारपिटीने वातावरणाचं चक्रच फिरवलं. राज्यात विदर्भ, मराठवाड्यासह काही ठिकाणी ढगाळ वातावरण आणि पावसाचा फटका बसला. विदर्भ, मराठावाड्यात अनेक भागात अवकाळी पाऊस आणि गारपिटी झाली. औरंगाबाद, नागपूर, वाशिम, अकोल्यास जवळपास अकरा जिल्ह्यांना अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा तडाखा बसलाय
औरंगाबाद – जिल्ह्यामध्ये अवकाळी जालना अंबड, घनसावंगीमध्ये तसेच तीर्थापूरी, वालसावंगी येथे मुसळधार पाऊस पडला तर जिल्ह्यातील काही ठिकाणी पैठण, पाचोड, गंगापूर, वैजापूर, पैठण तालुक्यातील इसारवाडी, धनगाव, वाहेगव, लोहगावमध्ये परिसरात वादळी वारा अन पावसासह गारपीट देखील झाली. सलग अर्धा तासाच्या जवळपास गारपीट झाल्यामुळे या भागातल्या रबी पिकांचे मोठे नुकसान झाले. तर तीर्थापुरी येथे वीजा पडल्यानेही मोठे नुकसान झाले आहे.
जालना – जालना जिल्ह्यातील अंबड व भोकरदन तालुक्यात वालसावंगी परिसरात विजेच्या कडकडाटासह पाऊस झाला. पारध, पिंपळगाव रेणुकाई, हिसोडा, वडोदतांगडा, पद्मावती, धावडा येथे देखील मोठं नुकसान झाल्याचं पाहायला मिळालं. तर दोन ठिकाणी वीज पडली. तर एका झाडाखाली बांधलेला बैल ठार झाला. पारध, पिंपळगाव रेणुकाई, हिसोडा, वडोदतांगडा, पद्मावती, धावडा येथे अवकाळी पाऊस व गारपीट झाल्याचे वृत्त आहे.
वैजापूर – तालुक्यातील चेंडुफळ, अव्वलगाव, हमरापूर, नागमठाण, या गावांना गारपिटीचा मोठा फटका बसला आहे. पैठण तालुक्यात आडुळ भागातील अंतरवली, आडगाव, बिडकीन या भागात गारपीट झाली.
या भागातल्या रबी पिकांचे मोठे नुकसान झाले. नव्याने लागवड झालेल्या पिकांचे नुकसान झाले.
सध्या तूर काढणीचा हंगाम आहे अन या हंगामात या आस्मानी संकटामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आलेय. गंगापूर परिसरात या गारपिटीमुळे कांदा पिकाचे नुकसान झाले. तसेच हरभरा, ज्वारीसह रबीच्या पिकांनाही फटका बसला.. काही ठिकाणी तर संत्र्याच्या बागांनाही पावसाचा अन गारपिटीचा फटका बसलाय. या पावसामुळे भाज्यांचंही मोठं नुकसान झालंय.
तर नांदेड, हिंगोली व परभणी जिल्ह्यात गेले २ दिवस झालं ढगाळ वातावरण होते.
विदर्भ – नागपूरसह, अकोला, अमरावती, यवतमाळ जिल्ह्यात पावसासह गारपिट झाली. त्यामुळे गहू, हरभरा, ज्वारी, कापूस, तूर, कांदा, तसेच मोसंबी व डाळिंब आदी फळबागांचेही नुकसान झाले.
नागपूर – नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर, नरखेड, बाभूळगाव तालुक्यात गारांसह पाऊस झाला. मोहपा, वाढोना व मेंढला परिसरात गारपीट झाली. गणोरी, बाभूळगाव शहर, आसेगाव राणी अमरावती आणि जवळपासच्या तालुक्यात गारा पडल्या.
अचानक थंडीत एवढी मोठ्या प्रमाणात गारपीट का झाली ?
३ दिवसांपूर्वीच हवामान विभागाकडून विदर्भ, मराठवाड्यात गारपिटीचा इशारा देण्यात आला होता.
उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे गेले काही दिवस किमान तापमानात वेगाने घट झाली होती. पश्चिमी चक्रावातामुळे पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या राज्यांमध्ये पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता आहे. यातच राज्यात पावसाला पोषक हवामान असून, मंगळवारपासून विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात विजांसह पावसाचा अंदाज वर्तवला होता. मंगळवारी विदर्भ आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी गारपीठ होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्याचप्रमाणे या भागात गारपीट झाली आहे. सेही सांगण्यात आलेय कि, मराठवाड्यात पुढील दोन ते तीन दिवस वातावरण असेच राहणार आहे.
औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यात काही ठिकाणी मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल अशीही शक्यता वर्तवण्यात अली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना या पावसामुळे चिंता लागून राहिली आहे कि, अशा वातावरणामुळे फळबागांना जास्त फटका बसू शकतो.
काही हवामान तज्ज्ञांचं असं मत आहे कि, डिसेंबरच्या काळात अशी अवकाळी परिस्थिती निर्माण होत असते. त्यात वातावरणीय बदलांमुळे ऐन डिसेंबरमध्ये गारपीट झाल्याचं बघायला मिळालं आहे.
हे हि वाच भिडू :
- प्रणब मुखर्जींचं कुत्रं वाजपेयींना चावलं आणि पेपरात बातमी आली…
- पुण्यात सुरू झालेल्या रोल्समॅनियाने सगळ्या भारतात मार्केट खाल्लंय
- अक्षय कुमार सोडा, नकली अंडरटेकरनी खऱ्या अंडरटेकरचा सुद्धा पद्धतशीर गेम केला होता