गावातील तलाठ्यामुळे महर्षि कर्वे भारतरत्न पुरस्कार घेण्यासाठी वेळेवर पोहचू शकले नाहीत.
महर्षि धोंडो केशव कर्व म्हणजेच अण्णा कर्वे. आजच्या SNDT विद्यापीठाचे संस्थापक म्हणून लोकांच्या ते परिचयाचे. पुण्यामध्ये कर्वे पुतळा आहे, कर्वे रोड आहे, SNDT विद्यापीठांच्या शाळा आहे व जास्तीत जास्त या व्यक्तीला भारतरत्न पुरस्कार मिळाला आहे इतकीच सर्वसामान्य माहिती बऱ्याच जणांना असते.
यापुढे महर्षि कर्वे कोण होते यासंबधिती माहिती जाणून घेण्याचे देखील तसे काही ठोस कारण लोकांकडे नसते.
पण महर्षि कर्वे यांची आठवण आपणाला असायला हवी. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांनी स्त्रीशिक्षणासाठी आपले संपुर्ण आयुष्य पणाला लावले. त्याचप्रमाणे महर्षि कर्वेंनी देखील महिला शिक्षण संस्था उभारून स्त्री शिक्षणाला पाठबळ दिले असे म्हणता येईल.
महर्षि कर्वेंचा जन्म झाला तो १८५८ साली. त्यांनी हिंगण्याच्या माळरानावर एका झोपडीत पहिली शाळा सुरू केली ते साल होतं १९०७. म्हणजेच महर्षि कर्वेंच त्यावेळीच वय ४९ वर्ष होतं.
तिथून पुढे खऱ्या अर्थाने लोकसेवेच्या दिशेने मार्गक्रमण झाले. ३ जून १९१६ रोजी त्यांनी या शाळेपासून झालेल्या सुरवातीस मुर्त स्वरूप दिले व महिला विद्यापीठाची स्थापना करण्यात आली.
ते १०४ वर्ष जगले. वयाच्या शंभरीमध्ये त्यांचा भारतरत्न पुरस्कार देवून सत्कार करण्यात आला.
याबाबतचा सरकारी प्रसंग म्हणजे महर्षि कर्वे पुरस्कार घेण्यासाठी दिल्लीला वेळेवर पोहचू शकले नव्हते.
त्यांच कारण होता हिंगण्याचा तलाठी.
झालं अस की इतक्या मोठ्या माणसाला संपुर्ण भारत ओळखत होता. मात्र हिंगण्याच्या तलाठी. हिंगण्याच्या तलाठ्यानं गृहचौकशी अहवालात राष्ट्रपती भवनला कळवलं होतं की महर्षि कर्वे नावाचा इसम इथे रहात नाही.
यामुळे कर्वेना वेळेत निरोप मिळाला नाही, ते दिल्लीत वेळेत पोहचू शकले नाहीत. जेव्हा ही बातमी प्रसिद्ध झाली तेव्हा तलाठ्याची विभागिय चौकशी करण्यात आली. या चौकशीत पद्धतशीर सरकारी उत्तर तलाठ्याने दिलं होतं,
तलाठ्याने लेखी उत्तर दिलं होतं,
मला धोंडो केशव कर्वे माहित होते, महर्षि कर्वे नाहीत.
रत्नागिरीमधील मुरूड हे त्यांच गाव.
१८८१ साली महर्षि कर्वे हे मॅट्रिक झाले. त्यानंतर त्यांनी मुंबईच्या एल्फिस्टन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. गणिताची पदवी घेतली. त्यांच लग्न झालं तेव्हा त्यांच वय १४ आणि त्यांच्या पत्नी राधाबाईंच वय ८ वर्ष होतं. १८९१ साली वयाच्या २७ व्या वर्षी राधाबाईंच निधन झालं.
महर्षि कर्वे पुण्यात स्थायिक झाले. ते फर्ग्युसन कॉलेजमध्ये गणित विषय शिकवत असत. या काळातच राधाबाईंचे निधन झाले. त्या काळात पत्नी वारली तर दूसरे लग्न हे लहान वयाच्या कुमारीके बरोबरच करण्याची पद्धत होती. मात्र महर्षि कर्वेंनी या प्रथेला फाटा मारून शारदा सदन संस्थेत शिकणाऱ्या विधवा गोदूबाईंसोबत विवाह केला.
आपल्या क्रांन्तिकारी निर्णयानंतर ते जेव्हा मुरुडला गेले तेव्हा त्यांच्यावर सामाजिक बहिष्कार टाकण्यात आला. त्यांना तत्कालीन सनातनी लोकांनी जिल्हादूषण का किताब देवून वाळीत टाकलं.
नाशिकच्या गंगालहरी या वर्तमानपत्राने लिहलं की,
कर्वे हा खऱ्या ब्राह्मण बीजाचा बच्चा नसणार.
महर्षि कर्वे विधवा पुर्नविवाहाच्या दृष्टिने जागृती करण्यासाठी २१ मे १८९४ साली एक कुटूंबमेळा आयोजित केला. यामध्ये विधवा विवाह प्रतिबंध निवारक मंडळाची स्थापना झाली. विधवा विवाहाला विरोध करणाऱ्या प्रवृतींना प्रतिबंध घालणे हे या मंडळाचे उद्दिष्ट होते.
पुढे १८९६ मध्ये त्यांनी सहा विधवा महिलांसह अनाथ बालिकाश्रमाची स्थापना केली. विधवा विवाहोत्तजक मंडळाची देखील स्थापना करण्यात आली. त्यांचे कार्य पाहून रावबहादूर गणेश गोविंद गोखलेंनी त्यांना हिंगणे येथील आपली सहा एकर जागा देवू केली. त्याचसोबत महर्षि कर्वेंना ७५० रुपये संस्थेच्या उभारणीसाठी देण्यात आले.
त्यानंतर हिंगणेच्या माळावर स्त्रीशिक्षणासाठी पहिली झोपडी बांधण्यात आली.
पंडिता रमाबाई, ईश्वरचंद विद्यासागर, हर्बट स्पेन्सर यांच्या विचारावंर काम सुरु केले. १८९६ मध्ये त्यांनी कर्वेनगर येथे विधवा महिलांसाठी आश्रम सुरु केला तर १९०७ साली महिला विद्यालयाची स्थापना करण्यात आली.
मराठी (आत्मवृत्त, इ.स. १९२८) आणि इंग्रजी (लुकिंग बॅक, इ.स. १९३६) अशा दोन्ही भाषांमध्ये त्यांनी आत्मचरित्र लिहिले.
हे ही वाच भिडू
- जगात सर्वाधिक पुस्तके लिहण्याचा रेकॉर्ड या मराठी लेखकाच्या नावावर आहे.
- बॉम्बस्फोटावेळी मुंबईला वाचवणारा जंजीर
- कोलकत्याला ६ नोबेलचा सन्मान आहे तसाच महाराष्ट्रातल्या या गावाला ३ भारतरत्नांचा सन्मान आहे.