महात्मा फुलेंनी स्थापन केलेला सत्यशोधक समाज नेमका काय होता ?

व्यक्तीने किंवा समाजाने सत्याचीच कास धरून वाटचाल केल्याशिवाय व्यक्ती किंवा समाज कदापिही सुखी होऊ शकणार नाही हे अचूक ओळखून महात्मा फुलेंनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. महाराष्ट्रीय समाज हा जुन्या अनिष्ठ प्रथेत, परंपंरेत, जातीव्यवस्थेत गुरफटलेला होता. या समाजात नव्या विचारांची रुजवणूक करणे, शूद्रातिशूद्रांची सामाजिक आणि धार्मिक गुलामगिरीतून मुक्तता करणे, हि सोडवणूक करत असताना त्याच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहणे हा ध्येयवाद सत्यशोधक समाजाने स्वीकारलेला होता.

महात्मा फुलेंनी १८४८ पासून आपल्या समाजकार्याला सुरवात केली. त्यांनी आपले विचार जाहीर सभांमधून आणि पत्रके काढून प्रसिद्ध करण्यास सुरवात केली. महात्मा फुलेंनी प्रामुख्याने शिक्षण, जातीव्यवस्था आणि शेतकऱ्यांची पिळवणूक याकडे जास्त लक्ष दिलं. महात्मा फुले ब्राह्मणांच्या वर्चस्वातून कनिष्ठ वर्गाची मुक्तता करण्यासाठी खऱ्या अर्थाने झपाटलेले होते. 

महात्मा फुले लिहितात कि मानव आणि ईश्वर यांच्यामध्ये भट दलाल आडवा पडलेला होता, या दलालांनी धर्माच्या नावावर समाजात अत्याचार सुरू केला. आपमतलबी ग्रंथांची निर्मिती त्यांनी आपल्या पोटापाण्यासाठी केली होती.  या दलालांनी हिंदू लोकांभोवती चातुर्वर्णाचा व जातीवादाचा कोट रचला होता. भिक्षुकशाही आणि जातिव्यवस्थेवर महात्मा फुलेंनी कडाडून प्रहार केला होता.

सत्यशोधक समाज स्थापन होण्यापूर्वी अनेक लोक अशा विषयांवर चर्चा करण्यासाठी महात्मा फुलेंकडे येत असत.  तुकाराम हनुमंत पिंजण, ज्ञानगिरी बाबा, रामशेठ उरवणे, विठोबा गुठाळ, कुशाबा माळी, ग्यानोबा झगडे मिस्त्री, धोंडीराम गवंडी वैग्रे हि मंडळी संध्याकाळी ७  ते ९ पर्यंत महात्मा फुलेंशी अशा विचारांवर चर्चा करायची. तिथं कबीराच्या ग्रंथांचं वाचन केलं जायचं.

कबीराच्या बिप्रमती ग्रंथातील ब्राह्मणांच्या वर्चस्वाचा, स्वार्थाचा व आपमतलबाचा दुजोरा त्यांना मिळाल्यावर जमत असलेल्या मंडळींमध्ये महात्मा फुलेंच्या नेतृत्वाखाली एक मंडळ स्थापण्याची चर्चा सुरु झाली.  सत्य म्हणजे खरे, शोधून काढणारे म्हणजे शोधक आणि समाज म्हणजे मंडळ अशा अर्थाचे समाजमंडळ सुरु करण्याची कल्पना पुढे आली. 

समाजरचनेतील माणसांना उच्चनीच मानणारा जातिभेद, कर्मकांड, मूर्तिपूजा, स्त्रीदास्य, अंधश्रद्धा यांचे निर्मूलन करून वैचारिक क्रांती घडविण्याकरिता महात्मा जोतीराव फुले यांनी समाजातील काही समविचारी मंडळींच्या सहकार्याने जुना गंज घर नंबर ५२७ ला २४ सप्टेंबर १८७३ रोजी पुण्यात सत्यशोधक समाजाची स्थापना केली.

सत्यशोधक समाजातील व्यक्तींनी पाळावयाची सूत्रे ;

(१) ईश्वर (निर्मिक) एक असून तो सर्वव्यापी, निर्गुण, निर्विकार व सत्यरूप आहे आणि सर्व माणसे त्याची लेकरे आहेत. या निर्मिकाशिवाय मी इतर कशाचीही पूजा करणार नाही.

(२) निर्मिकाची भक्ती करण्याचा पूर्ण अधिकार प्रत्येकाला आहे. त्यासाठी पुरोहित किंवा मध्यस्थाची आवश्यकता नाही.

(३) माणूस जातीने श्रेष्ठ ठरत नसून गुणांनी श्रेष्ठ ठरतो.

(४) निर्मिक सावयव रूपाने अवतरत नाही.

(५) पुनर्जन्म, परलोक, मोक्ष, कर्मकांड, जपतप या गोष्टी अज्ञानमूलक आहेत; त्यांचा अवलंब माझ्याकडून होणार नाही.

(६) जनावरांना मारण्यात मी सहभागी होणार नाही.

(७) दारूच्या व्यसनापासून अलिप्त राहण्याचा मी प्रयत्न करीन आणि

(८) तसेच समाजाचा खर्च चालावा म्हणून मी माझ्या उत्पन्नातून काही वर्गणी देईन.

सत्यशोधक समाज हे महात्मा फुलेंच्या प्रेरणेतून सुरु झालं आणि यामुळे धार्मिक किंवा जातीय मुजोरी करणाऱ्या लोकांना मोठ्या प्रमाणात आळा घालण्याचं काम सत्यशोधक समाजाने केलं.

हे हि वाच भिडू :

 

1 Comment
  1. Rohidas Kondake says

    खूप छान माहिती

Leave A Reply

Your email address will not be published.