फलटणचे मालोजीराजे नाईक निंबाळकर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले नाहीत हे राज्याचं दुर्दैव..
स्वातंत्र्यापूर्वी देशात असंख्य संस्थाने होती. कित्येक राजेरजवाडे होऊन गेले. त्यांच्या ऐशो आरामाच्या चैनीच्या कथा आजही संपूर्ण जगभरात फेमस आहेत. पण हे एकाबाजूला आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा सांगणाऱ्या मराठी मातीचे संस्थानिक एका बाजूला.
कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज, बडोद्याचे सयाजीराव गायकवाड, औंधचे संस्थानिक भवानराव पंतप्रतिनिधी, इचलकरंजीकर नारायणराव घोरपडे अशी यादी बरीच मोठी आहे. अशाच नररत्नांच्या यादीत एक महत्वाचे नाव म्हणजे फलटणचे मालोजीराजे नाईक निंबाळकर
महाराष्ट्रातील फलटण संस्थानचे शेवटचे अधिपती. शिवपूर्वकालीन महाराष्ट्रात ऐतिहासिक जहागिरदार घराण्यांत फलटणच्या नाईक निंबाळकर घराण्याचे स्थान महत्त्वाचे होते. या घराण्याची राजकीय सत्ता जवळजवळ सातशे वर्षे अबाधित होती. शिवरायांच्या पत्नी व शंभू महाराजांच्या मातोश्री सईबाई या याच घराण्याच्या होत्या. नाईक निंबाळकर घराण्याची छत्रपती भोसले घराण्याशी सोयरीक त्याच्याही आधी अनेक पिढ्यांपासून चालत आलेली.
त्यामुळेच चौऱ्याऐंशी गावांचे हे संस्थान आकाराने लहान असले, तरी मानाने फार मोठे होते.
मालोजीराजे उर्फ नानासाहेब यांचा जन्म गणेश चतुर्थीला त्यांच्या आजोळी निभोरे (ता. फलटण) गावी झाला. त्यांचे मूळ नाव नारायण होते. त्यांच्या वडिलांचे नाव रघुनाथराव नाईक निंबाळकर होते, तर आईचे नाव सीतादेवी. फलटणचे संस्थानाधिपती मुधोजीराजे उर्फ बापूसाहेब महाराज यांनी नारायण या अवघ्या चार वर्षांच्या मुलास दत्तक घेतले आणि त्याचे नामकरण मालोजीराजे असे करण्यात आले.
मालोजीराजे यांचे प्राथमिक शिक्षण फलटण येथे मुधोजी हायस्कूलचे तत्कालीन मुख्याध्यापक आणि संस्कृततज्ज्ञ गोपाळ रघुनाथ भिडे यांच्याकडे सरकारी वाड्यातच झाले. त्यांचे माध्यमिक शिक्षण कोल्हापूरला कँडीसाहेबांच्या सरदार हायस्कूलमध्ये झाले. याकाळात कोल्हापूरच्या छत्रपती शाहू महाराजांचा राज्यकारभार त्यांनी अनुभवला. त्यामुळेच लोकहिताचे निर्णय घेण्याचे संस्कार शालेय जीवनातच मिळाले..
पुढे राजकोट येथील राजकुमार कॉलेजमध्ये ब्रिटिश अधिकाऱ्यांकडून प्रशासनाचे शिक्षण घेतलं. नोव्हेंबर १९१७ मध्ये मालोजीराजांचा वयाच्या एकविसाव्या वर्षी राज्याभिषेक होऊन फलटण संस्थानच्या राज्यकारभाराची सूत्रे दिवाळी पाडव्याच्या दिवशी त्यांच्या हाती सोपविण्यात आली.
बाणगंगा आणि माणगंगा नद्यांच्या खोऱ्यात वसलेलं फलटण संस्थान हे कायम दुष्काळाच्या छायेत पिचलेला प्रदेश. त्यामुळे संस्थानची प्रजा आणि राज्यकर्ते यांना नेहमी बिकट परिस्थितीला तोंड द्यावे लागत होते.
मात्र मालोजीराजे यांनी आपल्या कारकिर्दीत संस्थानात विविधांगी सुधारणा घडवून आणायच्या म्हणून ठरवलं.
भारतावर ब्रिटिश सत्तेचा कारभार चालत होता. संस्थानिकांवर अनेक बंधने होती मात्र तरीही मालोजीराजेंनी फलटण मध्ये विकासाचा धडाका उडवून दिला.
त्यांचा कारभार जातिनिरपेक्षपणे चालत असे. राज्यकारभारात भ्रष्टाचाराला थारा नव्हता. दुसऱ्या महायुद्धकाळात देशात भयंकर धान्यटंचाई निर्माण झाली असताना त्यांनी आपल्या संस्थानात एकही भूकबळी होऊ दिला नाही. त्यांनी आपल्या संस्थानात कायद्याने अस्पृश्यता नष्ट केली. आपल्या राजवाड्याशेजारी सर्व जातीजमातींच्या मुलांसाठी एक वसतिगृह सुरू केले. अस्पृश्यांना मंदिर प्रवेश, पडदा पद्धत बंद, सक्तीचे शिक्षण, आंतरजातीय विवाहाला मान्यता हे त्यांचे निर्णय तत्कालीन परिस्थितीत क्रांतिकारक होते.
मालोजीराजे यांनी आपल्या रयतेचे आर्थिक प्रश्न सोडविण्याचा सातत्याने प्रयत्न केला.
त्यासाठी आपल्या संस्थानात सहकार चळवळीला प्रोत्साहन दिले. त्यासाठी संस्थानात सहकारी पतपेढी व सोसायट्या स्थापन करण्यात आल्या. १९१८ साली दि फलटण बँक लिमिटेडची स्थापना करण्यात आली, तसेच १९२६ साली श्री लक्ष्मी सेंट्रल को ऑपरेटिव्ह बँक स्थापन केली. सहकारी संस्थांमुळे संस्थानातील शेतकरी, व्यावसायिक, उद्योजक यांना पतपुरवठा होऊ लागला.
दुष्काळी प्रदेशात शेतीला पाणी मिळवून देणे ही अतिशय जटील समस्या असते. फलटण संस्थानातील या समस्येचे काही प्रमाणात निराकरण करण्यात मालोजीराजे यशस्वी ठरले.
त्यांनी १९२५ पासून भाटगर धरणातील नीरा उजव्या कालव्याचे पाणी फलटण संस्थानातील अनेक गावांना मिळवून दिले. त्यामुळे संस्थानातील एक चतुर्थांश शेतजमीन बागायती बनली. फलटण संस्थानात ऊस या नगदी पिकाचे उत्पादन होऊ लागले आणि ऊस शेतीचे क्षेत्र वाढले. १९३१ साली मालोजीराजेंनी पाडेगाव येथे ऊस संशोधन केंद्र सुरू केले. त्यानंतर त्यांनी श्रीमान शेठ मफतलाल व आपटे यांच्याशी वाटाघाटी करून व त्यांना सवलत देऊन, मदत करून १९३३ साली आपल्या संस्थानात साखरवाडी येथे फलटण शुगर वर्क्स लि. या नावाचा साखर कारखाना काढला.
मालोजीराजे कोल्हापुरात शिकत असताना त्यांनी कोल्हापूर संस्थानातील राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा पुरोगामी सुधारणांचा कारभार पहिला होता. समाज परिवर्तनाच्या प्रक्रियेतील शिक्षणाचे महत्त्व त्यांनी जाणले होते. त्यामुळे त्यांनी आपल्या संस्थानात १९१८ साली प्राथमिक शिक्षण सक्तीचा कायदा पास केला आणि त्याची प्रथम फलटण नगरपालिका क्षेत्रात प्रायोगिक तत्त्वावर अमंलबजावणी करण्याचा निर्णय घेतला.
मालोजीराजेंनी स्त्रीशिक्षण प्रसारास चालना दिली व मुलींना विशेष सवलती दिल्या. त्यांनी महाराष्ट्रातील अनेक शाळा, महाविद्यालये, शिक्षणसंस्था, संशोधनसंस्था यांना उदार अंतःकरणाने देणग्या दिल्या. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या रयत शिक्षण संस्थेला सातारा येथील आपला बंगला, साडेदहा एकर जमीन आणि पाच हजार रुपयांची देणगी देऊन त्यांच्या शिक्षण प्रसाराच्या कार्याला मदत केली.
महर्षी धोंडो केशव कर्वे यांना फलटण संस्थानामार्फत तहयात सहाशे रुपयांचे वर्षासन सुरू केले होते.
१९४१ मध्ये बनारस विश्वविद्यालयाचे तत्कालीन कुलगुरू डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांना त्यांच्या फलटण भेटीच्या वेळी त्यांच्या बनारस विश्वविद्यालयाच्या विकासकार्यासाठी दहा हजार रुपयांची देणगी दिली. मालोजीराजे विद्वानांचे व गुणीजनांचे चाहते होते. त्यांनी प्रसिद्ध बंगाली इतिहासकार व शिवचरित्रकार सर जदुनाथ सरकार, डॉ. राधाकृष्णन, श्री विश्वेश्वरय्या, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महर्षी आण्णासाहेब कर्वे, साहित्यसम्राट न. चि. केळकर इत्यादी ख्यातनाम व्यक्तींना फलटणला आणले. त्यामुळे त्यांना पाहण्याची व त्यांचे विचार ऐकण्याची संधी फलटणच्या जनतेला लाभली. रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी पाचाड गावी राजमाता जिजाबाई यांच्या भग्नावस्थेत असलेल्या समाधीचा मालोजीराजे यांनी जीर्णोद्धार केला.
१९३१ ते १९३९ या कालावधीत मालोजीराजेंनी संस्थानिकांचा प्रतिनिधी या नात्याने कायदेमंडळावर काम केले.
तिसऱ्या गोलमेज परिषदेत उपस्थित राहण्याची संधी त्यांना मिळाली. देशातील राजकीय बदलांची दिशा ओळखून पावले टाकण्याची राजकीय दूरदृष्टी त्यांच्याकडे होती. संस्थांनी राज्यकारभाराचे लोकशाहीकरण आणि संस्थानाचे अस्तित्व राखण्यासाठी लहान लहान संस्थानांचा गट करून त्यांच्या संघराज्याची निर्मिती या दोन उद्दिष्टांची परिपूर्ती करण्याचे प्रयत्न त्यांनी केले.
१९२८ साली मालोजीराजेंनी आपल्या ३२ व्या जन्मदिनी जबाबदार राज्यपद्धती हे आपल्या कारभाराचे अंतिम ध्येय असल्याचे जाहीर केले आणि राज्यात प्रजेच्या हाती क्सत्तेची सूत्रे देण्याचे सूतोवाच केले.
पुढच्याच वर्षीच्या गणेश चतुर्थीला फलटण संस्थान कायदेमंडळाचे उद्घाटन करण्यात आले. त्याच वेळी माधव संभाजी अहिवळे या मागासवर्गीय गृहस्थाची कायदेमंडळात सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली. १९४२ पर्यंत अनेक सवलती देऊन फलटण लोकसभा, लोकल बोर्ड, नगरपालिका या संस्थांमध्ये लोकनियुक्त सभासदांना प्रतिनिधित्व व अधिकार देण्यात आले.
१९४२ चा फलटण संस्थान कायदेमंडळाचा कायदा अत्यंत महत्त्वाचा होता. त्या कायद्याच्या तरतुदीनुसार संस्थानच्या कायदेमंडळातील सदस्यांपैकी १२ लोकनियुक्त व ६ दरबार नियुक्त राहणार होते. लोकनियुक्त १२ सदस्यांमधून दोन मंत्री नेमण्याची तरतूद होती.
भारत स्वतंत्र झाल्यानंतर फलटण संस्थान आपल्या खजिन्यातील पासष्ट लाख रुपये शिल्लक रकमेसह स्वखुशीने मुंबई राज्यात विलीन झाले.
१९४९ साली अनपेक्षितपणे मालोजीराजे यांचा बाळासाहेब खेर यांच्या मंत्रीमंडळात मंत्री म्हणून समावेश झाला. बाळासाहेब खेर एका पत्रात म्हणतात,
“मालोजीराव एक सरळ विचाराचे, जातीभेदाचे उन्मूलन करू इच्छिणारे, सरळ अंतःकरणाचे गृहस्थ आहेत. त्यांचे चिंतात जातीचा किंवा कुळाचा अभिमान हे मुळीच नाही. सर्व चांगल्या कार्यात मदत करण्याची त्यांची प्रवृत्ती आहे. “
खेरांनी केलेल्या आग्रहामुळे त्यांनी मंत्रीपदाचा स्वीकार केला. पुढे सहा महिन्यांनी ते काँग्रेस पक्षाचे सभासद झाले. १९४९-५२ या काळात ते सहकार खात्याचे मंत्री होते. त्यांनी शेतकऱ्यांना महाराष्ट्रात सहकारी साखर कारखाने काढण्यास प्रोस्ताहन दिले. १९५२ च्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत मालोजीराजे फलटण मतदारसंघातून मुंबई प्रांतिक विधानसभेवर काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून निवडून आले.
१९५२ ते १९५७ या काळात ते मोरारजी देसाई यांच्या मंत्रीमंडळात सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री होते. त्या काळात त्यांनी केलेल्या नानाविध कामांपैकी महाराष्ट्राला वरदान ठरलेल्या कोयना धरण प्रकल्पाचा आराखडा व कार्यारंभ आणि मुंबईतील मंत्रालयाच्या सहा मजली भव्य, प्रशस्त इमारत ही दोन कामे संस्मरणीय आहेत.
१९५७ च्या विधानसभा निवडणुकीत संयुक्त महाराष्ट्र लढ्याच्या पार्श्वभूमीवर फलटण मतदारसंघातून मालोजीराजे पराभूत झाले. पण त्यावेळी त्यांना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्षपद देण्यात आलं. संयुक्त महाराष्ट्र आंदोलनामुळे त्यांना आव्हानात्मक परिस्थितीत प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून काम करावे लागले. त्यांनी काँग्रेस पक्षाचे मुखपत्र म्हणून विशाल सह्याद्री हे दैनिक सुरू केले तसेच प्रतापगडावर छ. शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारला.
हट्टाने या पुतळ्याचे अनावरण ३० नोव्हेंबर १९५७ रोजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंच्या शुभ हस्ते करविले.
मालोजीराजे यांनी फलटण येथे श्रीराम सहकारी साखर कारखान्याची उभारणी केली.
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाचा दावेदार
त्यावेळी महाराष्ट्रात सर्वात मोठे नेतृत्व यशवंतराव चव्हाणांचे होते. मात्र ते सातारा जिल्ह्यातील कराडचे आणि मालोजीराजे सुद्धा सातारा जिल्ह्यातील फलटणचे असल्यामुळे एकाच जिल्ह्यात दोन जणांना मोठे पद देता येणार नाही म्हणून मालोजीराजे यांचे नाव मागे पडत गेले. नेमके याच काळात सातारा जिल्ह्यातील पाटणचे बाळासाहेब देसाई यांचे देखील नेतृत्व राज्य पातळीवर गाजू लागलं होतं.
दरम्यानच्या काळात मालोजीराजेंचा काँग्रेस पक्षाच्या नेत्यांशी मतभेद होऊ लागले. त्यांना मंत्रिमंडळातून देखील वगळण्यात आलं. पुढे त्यांनी पक्षाच्या सभासदत्वाचा राजीनामा दिला. अखिल भारतीय काँग्रेस पक्षात फूट पडल्यावर ते महाराष्ट्र प्रदेश संघटना काँग्रेसचे अध्यक्ष झाले . तसेच ते जनता पक्षाचे अल्पकाळ महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष देखील राहिले.
मात्र त्यानंतर ते राज्याच्या राजकारणातून बाजूला पडले. त्यांचा प्रभाव ओसरला.
संदर्भ-मराठी विश्वकोश
हे ही वाच भिडू
- पश्चिम महाराष्ट्रातल्या अपक्ष आमदारांनी पाठींब्याच्या बदल्यात अजब मागणी केली होती.
- इतिहासात भोसले आणि नाईक-निंबाळकर घराण्याचे एकमेकांसोबतचे संबंध कसे राहिले आहेत..
- रंकाळ्याची लढाई ही शिवरायांच्या पूर्वजांच्या पराक्रमाची पहिली खूण होती