एका पत्रकारामुळे ८ वर्षांपूर्वी मनसे आणि भाजपची संभाव्य युती फसली होती…
मुंबईच्या शिवाजी पार्क मैदानावर गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर राज ठाकरेंच भाषण झालं. या भाषणात राज ठाकरेंनी महाविकास आघाडीला लक्ष्य केलं. हिंदूत्वाचा नारा दिला. हे करत असताना त्यांनी भाजपला सॉफ्ट कॉर्नर दिला.
ही पार्श्वभूमी ताजी असतानाच नितीन गडकरी थेट राज ठाकरे यांना भेटायला गेल्याची बातमी काल रात्री आली आणि पुन्हा एकदा मनसे भाजपच्या युतीची चर्चा सुरू झाली. मुंबई महानगरपालिकेच्या दृष्टीने मनसे आणि भाजपची युती शक्य आहे अशा चर्चा पुन्हा एकदा सुरू झाल्याने यापूर्वी मनसे भाजपची फसलेली युती सांगणारा हा किस्सा..
तर ते साल होतं २०१४.
२०१४ च्या लोकसभा इलेक्शनचा पुर्वार्ध. मोदी प्रचारप्रमुख झाले होते. पंतप्रधान पदाचे तेच उमेदवार होते. देशात मोदींची लाट होती. मोदींच्या नेतृत्वात आत्ता केंद्रात भाजप सत्तेत येईल याची शक्यता निर्माण झाली होती. राज्यात सेना भाजप युतीत होते. हि युती कायम राहिलं, जागावाटप होईल याची पुर्णपणे खात्री होती…
पण इकडे वेगळीच डाळ शिजत होती. राज ठाकरे गुजरात दौरा करून आले होते. राज ठाकरे मोठ्या मनाने मोदींच कौतुक करत होते. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीवर तौंडसुख घेणारे राज सत्ताधाऱ्यांच्या विरोधात होते पण विरोधकांच्या सोबत नव्हते.
यापुर्वी काय झालं होतं तर २००९ च्या निवडणुकांमध्ये मनसेच इंजिन जोरात धडकलेलं. विधानसभेला त्यांनी १३ जागांवर विजय मिळवलेला. बऱ्याच जागेवर त्यांचे उमेदवार दूसऱ्या क्रमांकावर राहिले होते. मनसे फॅक्टरमुळे नाही म्हणायला तोटा झालेला तो सेना आणि भाजपला. वातावरण मोदींच्या बाजूने तापलं होतं.
अशा वेळी मनसे फॅक्टरमुळे तोटा होवू नये म्हणून भाजप प्रयत्न करत होतं. पण यात मुख्य अडथळा होता तो सेनेचा. जोपर्यन्त सेना आणि भाजप युतीत आहे तोपर्यन्त मनसेला भाजप सोबत घेवू शकत नव्हता. अशा अडचणीच्या मुद्यातून बाहेर काढण्याची जबाबादारी भाजपमार्फत नितीन गडकरी यांच्याकडे देण्यात आली होती.
नितीन गडकरी आणि राज ठाकरे यांच्या चर्चेसाठी एक गुप्त बैठक आयोजित करण्यात आली. या किस्स्याबद्दल राजदिप सरदेसाई यांनी आपल्या 2014 election that changed India या पुस्तकात लिहलं आहे,
ते लिहतात,
“मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याबरोबरही एक गुप्त डील करण्यासाठी भाजपने प्रयत्न केला. २००९ च्या निवडणुकीत राज ठाकरेंनी मतविभागणी केल्यामुळे युतीला आठ जागा गमवायला लागल्या. राजना आपल्याकडे खेचण्याची कामगिरी नितीन गडकरींकडे सोपवण्यात आली. मध्य मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये ही बैठक आयोजित करण्यात आली होती.”
राज ठाकरेंनी नंतर राजदीप सरदेसाई यांना सांगितले की,
“हॉटेलच्या एका लिफ्टमध्ये आम्ही शिरलो आणि एका पत्रकाराने आम्हाला पाहिले. ही बैठक मग गुप्त राहिली नाही.”
बैठकीच्या बातम्या माध्यमांमध्ये आल्या. परस्पर बैठक झाल्याने सेनेने विरोधाची भूमिका घेतली व राज ठाकरेंनी उमेदवार उभा न करता मोदींच्या पंतप्रधान पदाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला.
आत्ता यावेळी सेना भाजपपासून बरीच दूर गेली आहे. मनसे भाजपच्या युतीत नेहमीच अडथळा ठरणारी शिवसेना यावेळी नसल्याने मनसे भाजप युती होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
हे हि वाच भिडू.
- जेव्हा विलासरावांच्या एका चुकीनं पवारांचं पंतप्रधानपद हुकलं !!!
- धीरुभाई अंबानी विरुद्ध कर्मचारी जिंकल कोण..?
Rajdeep is anti national person and deserves good beating