बॉलीवूडला कात टाकायला भाग पाडणारं ‘मंडी हाऊस’ आहे तरी काय ?
दिल्ली पुरातन काळापासून भारतातील सांस्कृतिक केंद्र. मीर तकी मीर पासून ते गालिब पर्यंत अनेक शायर इथे बनले. शायर जाऊ द्या खुद्द उर्दू भाषा इथल्या गल्ल्यांमध्ये तयार झाली. पांडव काळात इंद्रप्रस्थ नगरी असल्या पासून दिल्ली आपल्या पदरात नृत्य नाट्य संगीत अशा कलांना सांभाळून जपत आहे. याचं परंपरेला पुढ नेण्याचं काम केलंय मंडी हाउसने. असं म्हणतात की मंडी हाऊसने भारताचा सांस्कृतिक नकाशा बदलून टाकला.
आता मंडी हाउस म्हणजे काय हा प्रश्न तुम्हाला पडला असेल.
१९४० सालच्या दशकात हिमाचल मधील मंडी संस्थांनच्या राजाने दिल्लीत एक निवास बांधलं ते नंतर “मंडी हाऊस ” नावाने ओळखू जाऊ लागलं. स्वातंत्र्य मिळाल्यावर याच दिल्लीतील मंडी हाऊस भवती अनेक साहित्यिक आणि सांस्कृतिक संस्थांची मुख्य कार्यालयं बहरत गेली. ज्यामुळे काळाच्या ओघात हे ठिकाण दिल्लीचं सांस्कृतिक केंद्र बनलं.
ब्रिटीशांनी उभारलेल्या नवी दिल्लीत चौक नसतात तिथे गोल चक्कर आहेत. आपल्याकडे जशी चौकांची नावे असतात तशीच काहीशी या गोल चक्करांनाही नावे आहेत. त्यातलाच एक मंडी हाऊसचं गोल चक्कर. जिथे दिल्लीतील सात रस्ते येऊन मिळतात. यातील प्रत्येक मार्गावर कला व साहित्याशी निगडित अनेक महत्त्वाची कार्यालय आहेत. पैकी फिरोज शाह रोडवर नेपाळचे दूतावास अणि रशियन सेंटर आहे. तर कोपर्निकसन मार्गावर साहित्य अकादमी अणि दूरदर्शनचे मुख्य कार्यालय आहे. तानसेन मार्गावर त्रिवेणी कला संगम अणि फक्की सभागृह आहे. सफदर हाश्मी मार्गावर फेमस श्रीराम सेंटर (दिल्लीचं बालगंधर्व ) आहे.
जवळच रविन्द्र नाट्य भवन आहे. सर्वात महत्त्वाच म्हणजे भगवान दास रोडवर असलेल NSD नॅशनल स्कूल ओफ ड्रामा आहे. हिंदी सिनेमा सृष्टी जरी मुंबईत असली तरी तिला दर्जेदार कलाकार दिल्ली पुरवते असच म्हणाव लागेल. दिल्लीचं स्वतःचा अस एक नाट्य विश्व आहे. ते जरी हिंदीत असलं तरी त्यावर भारतातल्या प्रत्येक भागाची पुसटशी छाप असतेच. देशभरातून लोक इथे कलाकार बनायला अभिनय शिकायला येतात .
मंडी होऊस महणजे एक चालत फिरत रंगमंचच आहे.
इथे अनेक तरुण तरुणी खांद्यावर शबनमची बॅग अडकवून, डोक्यात अनेक विचार, नवनवीन कल्पना, कविता घेऊन आपल्या अभिनयाच्या स्वप्नांना पंख देण्यासाठी येतात. श्री राम सेंटरवर गाड्यांच्या आवाजामुळे जराही विचलित न होता एका हातात सिगारेट तर एका हातात डायलॉग असलेला कागदाचा तुकडा घेऊन अनेक कलाकार आपल्या सीनची तयारी करत असतात. त्यांचे भाव बदलत असतात, आवाज चढत उतरत असतो आणि कमी अधिक प्रमाणात दिवसभर हेच चालू असतं. अनेक रीटेक होत राहतात. नृत्य संगीत आणि अभिनयाची ही रंगीत तालीम अनेकांना भुरळ घालते, एखादा वाटसरू चहा घेतो चहा पीत पीत या सर्वचा आस्वाद घेतो व पुढे निघून जातो.
बर इथं कथक केंद्र ही आहे. तेथील घुंगरू आणि तबल्याची थाप एवढ्या कल्लोळातूनही कानावर पडतेच .काहीजण तर साहित्य अकादमी आणि ललित कला अकादमीच्या ग्रंथालयात आणि ग्रंथात अखंड बुडालेले असतात. नाटकाशी निगडीत साहित्य ,नेपथ्य ,कथा,कपडे, रंगरंगोटी ह्या सर्व जुळवाजुळवीत प्रत्येकजण रममाण असतो. फाईन आर्ट्सची मुलं ही याच ठिकाणी गर्दी करतात. कुठल्यातरी झाडाखाली मांडी घालून ही मुलं येत जात असलेल्या लोकांचे चित्रंं रेखाटण्यात मश्गुल असतात .
ही मुलं म्हणतात असा माहोल आम्हाला दुसरीकडे कुठेच मिळत नाही. याची प्रचिती देणारा एक प्रचलित किस्सा पण आहे. पीयूष मिश्रा हा दिल्लीच्या ह्याच नाटक वर्तुळातून आलेला आहे. त्याला अनुराग कश्यपने गुलाल सिनेमाची गाणी लिहायला सांगितली . पियुष म्हणाला,
” मी इथं मुंबईत गाणी लिहणार नाही. मंडी हाऊसच्या वातावरणात मला चांगलं सुचतं. “
तर पियुष मिश्रा अनुराग ला दिल्लीचं तिकीट काढायला सांगितलं,अणि ह्याच मंडी हाऊस मध्ये गुलालची अप्रतिम गाणी लिहीली.
भारत सरकारने नॅशनल स्कूल अॉफ ड्रामाने या देशाला नसिरुदिन शाह, ओम पुरी, अनुपम खेर, नवाजुदिन, इरफान खान, राज बब्बर, पंकज कपूर, सतीश कौशिक, रोहिणी हट्टंगडी, अन्नू कपूर, पंकज त्रिपाठी, सीमा विश्वास, पियुष मिश्रा आणि स्वानंद किरकिरे सारखे हाडाचे कलाकार दिले.
फक्त हे कलाकारच नव्हे तर एनएसडीच्या सावलीत तिथली नाटके बघून मंडी हाउस भागात आणखीन नाट्यचळवळी उभ्या राहिल्या. त्यामधून ही शाहरुख खान, मनोज वाजपेयी, अनुराग कश्यप अनेक कलाकार, तंत्रज्ञ तयार झाले.
आज हे सर्व लोक हिंदी सिनेमा गाजवत आहेत. बॉलीवूड मधील प्रस्थापित घराणेशाहीला मागे टाकत हे कलाकार प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत बनले आहेत. हेच मंडी हाऊस आणि नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा मधून तावून सुलाखून निघालेली हे कलाकार आज “ट्रेंड सेटरस ” बनले आहेत
सध्याचे प्रेक्षकही करण जोहरच्या रोमांटीक आभासी कलाकृतींपेक्षा अनुरागच्या वास्तववादी गँगस ऑफ वास्सेपूरला लोकं डोक्यावर घेत आहेत. रणबीर सारखाच नवाजूद्दीन सिद्दिकी लोकांना भावतो आहे. न्यूटन ,विकी डोनर, अंधाधुंद, लिपस्टिक डर माय बुरखा सारखे कमी बजेटचे सिनेमे ही अनेक कोटींचा गल्ला जमवू लागले आहेत. बॉलीवूडला कात टाकायला या लोकांनी भागच पडले अहे असं म्हणावं लागेल.
या सर्व स्थित्यंतराच्या मागे कुठे ना कुठेतरी मंडी हाऊस आहे. आजही पियुष मिश्रासारखे एकापेक्षा एक कलाकार मंडी हाउस भागात आहेत. मुंबईसारख्या गावात त्यांना बऱ्याच संधी देखील आहेत पण दिल्ली त्यांना सोडवत नाही. याच मातीत बनलेला एक शायर म्हणून गेलाय,
“इन दिनों गरचे दक्खन मैं हैं बड़ी क़द्र ऐ सुखन
कौन जाये ज़ौक़ पर दिल्ली की गलियां छोड़ कर“
हे ही वाच भिडू.
- दिल्लीचा रंगीला बादशहा, ज्याने फक्त स्वत:चे नग्न पेंटिंग काढून घेण्यातच धन्यता मानली.
- खुदा ए सुखन अर्थात गालिबचा उस्ताद मीर तकी मीर;
- दिल्ली दरबारात सयाजीराव महाराजांनी पंचम जॉर्जचा अपमान केला होता.
- लोक म्हणतात हा रफी आणि किशोर पेक्षा मोठा गायक आहे.