अनेक प्रयत्न झाले मात्र, नंदा आणि मनमोहन देसाईंची प्रेमकहाणी कधीच सफल होऊ शकली नाही

हिंदी सिनेमाचे सुप्रसिद्ध चित्रपट निर्माता दिग्दर्शक मनमोहन देसाई यांनी ७० आणि ८० च्या दशकात जबरदस्त हिट सिनेमे दिले होते. बिग बी अमिताभ बच्चन यांच्या सोबत त्यांचा विशेष रॅपो होता. मनमोहन देसाई यांचे आयुष्य भन्नाट होते. त्यांची प्रेमकहाणी सूद्धा विलक्षण होती.

हिंदी सिनेमाच्या दुनियात ते साठच्या दशकांमध्ये आले होते. राजकपूर यांचा ‘छलिया’(१९६१) हा त्यांनी दिग्दर्शित केलेला पहिला चित्रपट. याच दशकात अभिनेत्री नंदा हिंदी सिनेमा मध्ये टॉपच्या अभिनेत्रींपैकी एक होती.

मनमोहन देसाई यांना नंदा प्रचंड आवडत असे. मनमोहन देसाई यांची पत्नी जीवनप्रभा आणि मुलगा केतन देसाई यांनाही आपल्या वडिलांची आवड माहिती होती. त्यामुळे ज्या ज्या वेळी नंदाचा नविन चित्रपट प्रदर्शित होत असे त्यावेळी ते मनमोहन देसाई यांना गमतीने चिडवायचे,

“तुमच्या हिरॉईनचा नवीन सिनेमा येतो आहे!”

चित्रपट मासिकातून, वर्तमानपत्रातून नंदाचा फोटो आला, तरी ते देसाई यांना तो फोटो दाखवून चिडवायचे. 

एकाच शहरात आणि एकाच इंडस्ट्रीत असून देखील म्हणून देसाई आणि नंदा यांची भेट होत नव्हती. देसाई यांना आपल्या चित्रपटात नंदाने भूमिका करावी असे खूप वाटायचे. त्यासाठी त्यांनी प्रयत्न देखील केले.

१९६८ साली  मनमोहन देसाई ‘किस्मत’ नावाचा चित्रपट बनवत होते. या चित्रपटात नंदाला अभिनेत्री म्हणून घ्यावे यासाठी त्यांनी प्रयत्न केले. त्यावेळी नंदा ची बहिण मीना तिचे सर्व व्यवहार पाहत असे. ज्यावेळी मीनाला देसाई यांनी चित्रपटाचे कथानक ऐकवले त्यावेळी तिला ते काही तेवढे आवडले नाही आणि तिने या चित्रपटात नंदा काम करणार नाही असे सांगितले. (नंतर हि भूमिका बबिताने केली.)

देसाई खूप नाराज झाले पण त्यांच्या दोघांच्या भेटीचा योग लवकरच आला.

१९७० साली मनमोहन देसाई आर के स्टुडिओ मध्ये त्यांच्या ‘सच्चा झूठा’ या चित्रपटाचे चित्रीकरण करत होते. याच सेटच्या  दुसऱ्या फ्लोअरवर नंदाचे ‘रुठा ना करो’ या चित्रपटाचे शूटिंग चालू होते. ‘सच्चा झूठा’ या चित्रपटात राजेश खन्ना च्या बहिणीची भूमिका करणाऱ्या अभिनेत्री नाज हिला मनमोहन देसाई यांना नंदा किती प्रिय आहे हे माहीत होते. त्यामुळे तिने या दोघांची भेट घडवून आणण्याचे ठरवले. नंदा आणि नाज ह्या दोघी चांगल्या मैत्रिणी होत्या.

नाज मनमोहन देसाई यांना नंदाकडे घेऊन गेली. या दोघांची ही पहिलीच भेट होती. देसाई या भेटीने खूपच प्रफुल्लित झाले आणि ज्याला त्याला सांगत सुटले की “आज मी नंदाला भेटलो!” 

सत्तरच्या दशकामध्ये नंदाला घेऊन चित्रपट बनवण्याचे त्यांच्या खूप मनात होते पण योग काही जुळून येत नव्हता. कदाचित मनमोहन देसाई यांच्या चित्रपटाचा जॉनर आणि नंदाच्या आजवरच्या भूमिका यांचा मेळ बसत नव्हता.

सत्तरच्या दशकाच्या अखेरीस मनमोहन देसाई यांची पत्नी जीवनप्रभा यांचे आकस्मिक निधन झाले. मनमोहन देसाई यांच्या जीवनात मोठी पोकळी निर्माण झाली. या काळात मनमोहन देसाई ‘नसीब’ हा मल्टिस्टारर सिनेमा दिग्दर्शित करीत होते. या चित्रपटातील एका गाण्यात त्यांना हिंदी सिनेमातील अनेक अभिनेते आणि अभिनेत्री हवे होते.

यासाठी त्यांनी वहिदा रहमान आणि तिचे पती कमलजीत यांना देखील बोलावले. वहिदा रहमान आणि नंदा या दोघी चांगल्या मैत्रिणी होत्या.

वहीदा नंदालाही या गाण्याच्या चित्रीकरणासाठी घेवून आली. मनमोहन देसाई यांना प्रचंड आनंद झाला आला. ही त्यांची दहा वर्षानंतरची दुसरी भेट होती. यानंतर मात्र ते सातत्याने भेटत राहीले. हळूहळू त्यांच्या दोघांचे असे लक्षात आले की आपण दोघेही एकमेकांच्या प्रेमात आहोत.

नंदा अविवाहित होती तर मनमोहन देसाई यांच्या पत्नीचे निधन झाले होते. देसाई यांनी नंदाला एक हिऱ्याची अंगठी भेट म्हणून दिली होती.

ज्या वेळी नंदाने लग्नाचा प्रस्ताव त्यांच्याकडे ठेवला त्यावेळी देसाई तिला म्हणाले की, “माझ्या पत्नीचे नुकतेच निधन झाले आहे आणि मी इतक्यात असा कुठलाही निर्णय घेऊ शकत नाही.”

नंदाने त्यांचे हे विधान खूप पर्सनली घेतले आणि ती त्यांच्या आयुष्यातून दूर झाली. पुढे पाच वर्षे दोघे एकमेकांना भेटलेच नाही.

पुढे योगायोगाने १९८५ साली त्या दोघांची बेंगलोरच्या विमानतळावर अनपेक्षितपणे भेट झाली. त्यावेळी म्हणून मनमोहन देसाई ‘मर्द’ या चित्रपटाच्या प्रिंट घेऊन दिल्लीला चालले होते आणि तिथून ते वैष्णो देवीच्या दर्शनाला जाणार होते. विमानतळावर त्यांनी नंदाला जेव्हा पाहिले त्यावेळी तिच्या बोटात त्यांना त्यांनी तिला दिलेली हिऱ्याची अंगठी दिसली.

आपले प्रेम अजून तिनं जपून ठेवले आहे याचा त्यांना आनंद झाला. कदाचित वैष्णोदेवीच्या मनातच आपण दोघांनी एकत्र यावे असे असावे असे समजून त्यांनी मनोमन तिच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

मुंबईला आल्यानंतर ते दोघे पुन्हा भेटले त्यावेळी नंदाच्या आईची प्रकृती बरी नव्हती. पुढे काही दिवसातच नंदाचे आईचे निधन झाले.

त्या धक्क्यातून सावरल्यानंतर नंदा आणि मनमोहन देसाई यांचा साखरपुडा झाला. दोघांच्याही आयुष्यात आनंदाचे क्षण येऊ घातले होते. मनमोहन देसाई त्या काळात ‘अनमोल’ या नावाच्या  चित्रपटाची निर्मिती करत होते. या चित्रपटाचे दिग्दर्शन त्यांचा मुलगा केतन असे करणार होता. चित्रपट पूर्ण झाला पण यशस्वी झाला नाही. मनमोहन देसाई यांना फार मोठा धक्का बसला.

१ मार्च १९९४ रोजी आपल्या घराच्या बाल्कनी तून पडून मनमोहन देसाई यांचा जागीच मृत्यू झाला. ही आत्महत्या होती की अपघात होता हे सिद्ध होऊ शकले नाही पण नंदा ची प्रेम कहाणी मात्र अधुरीच राहिली.

पुढची २१ वर्षे तिने स्वत:ला घरात कोंडून ठेवले. श्वेत वस्त्र परिधान करू लागली. तिच्या आयुष्यातील जणू चैतन्यच हरपले!

  • भिडू धनंजय कुलकर्णी

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.