मनोहर जोशींनी स्वतःच्या लग्नाचा हुंडा स्वतःचं दिला होता
लग्न म्हंटल कि, दोन व्यक्तींबरोबर दोन कुटुंबाचं सुद्धा मिलन असत. त्यामुळे रीतीभाती, हौस- मौस, प्रथा- परंपरा, मान – सन्मान या सगळ्याचं गोष्टी करायला लागतात. त्यामुळे खर्चाचं बजेट कुठून कुठं जात कळत सुद्धा नाही. आता त्यात एक गोष्ट बरी झाली कि, १९६१ साली हुंड्यासारखी तथाकथित प्रथा बंद झाली. नाहीतर मुलीच्या घरच्यांचं खर्चानं कंबरडच मोडायचं. त्यामुळं मुली जन्मालाच घालायच्या नाही असला प्रकार सुद्धा सुरु झालेला.
आता त्या प्रकारामुळं पोरींची संख्या कमी पडली आणि नंतर पोरांनाच पोरीसाठी हुंडा द्यायची वेळ आली हे खरं. असो.. ह्या झाल्या भूतकाळातल्या गोष्टी. पण या हुंड्याच्या विषयावरून एक किस्सा मात्र जरूर शेअर करावासा वाटला. हा इंटरेस्टिंग किस्सा म्हणजे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे दिग्गज नेते मनोहर जोशी यांच्या लग्नाचा.
मनोहर जोशी रायगड जिल्ह्यातल्या कुलाबा मधल्या नांदवी गावचे. घरची परिस्थिती तशी गरिबीचीच, वार लावून माधुकरी मागून शिक्षण झालेलं. १९५६ मध्ये ते मुंबईला आले. मुंबई महापालिकेत आठ वर्षे कारकुनी केली. त्या वेळीच एम.ए. केलं, बी.टी. केलं. दादरच्या रानडे रोडवरच्या श्री बिल्डिंगमध्ये ‘कोहिनूर क्लास’ काढला. तेव्हापासून त्यांची परिस्थिती सुधारत गेली.
त्यामुळे काही वर्षानंतर त्यांच्या लग्नाचा विषय निघाला. घरच्यांनी पोरी बघायला सुरुवात केली. मनोहर जोशींच्या ओळखीचे एक गृहस्थ स्वतःच्या मुलीसाठी स्थळ शोधत होते. त्यांना मनोहर जोशींचा स्वभाव पटला होता, त्यामुळे त्यांनी आपल्या मुलीसाठी मनोहर जोशींना मागणी घातली. पण मनोहररावांना ती मुलगी काही आवडली नाही. मोकळ्या स्वभावाच्या मनोहरपंतांनी आपल्याला कशी मुलगी पाहिजे हे त्यांना सांगितलं. त्यावेळी त्या गृहस्थांच्या डोक्यात अनघाताईचं नाव डोक्यात आलं.
अनघाताई मूळच्या पुण्याच्या. घरची परिस्थिती अतिशयच गरिबीची. वडिलांचं अकालीच निधन झालेलं. एक भाऊ, तीन बहिणी आणि आई असं कुटुंब. त्यामुळे सगळा भार एकट्या भावावर होता. अशी सगळी हलाखीची परिस्थिती.
पण मनोहरपंतांना अनघाताई पसंत पडल्या. सुपारी फुटली. घरच्यांची बघाबघी झाली आणि लग्नाचा दिवस ठरला १४ मे १९६४. पण प्रश्न आला हुंड्याचा, निदान हजार रुपये तरी हुंडा हवाच, असा आग्रह पंतांच्या घरच्यांनी धरला. पण गरिबी असलेल्या अनघाताईंच्या भावाकडे तेवढी रक्कम नव्हती. त्या मुद्द्यावरून लग्न मोडणार असं ऐकून चित्र होत.
पण मनोहर पंतांना अनघाताई फारच आवडलेल्या त्यांनी त्यांनी एक युक्ती केली. त्यांनी आपल्याकडचे हजार रुपये गुपचूप अंघाताईंच्या भावाला दिले आणि ते हुंडा म्हणून आपल्या घरच्यांना द्यायला सांगितले. आधी तर अंघाताईंच्या भावाला थोडं लाजवलेलं झालं पण मुलगा चांगलाये, समजूतदार आहे आणि हुद्यांचा प्रश्न होता म्ह्णून त्यांच्या भावाने ते पैसे घेतले आणि मनोहरपंतांच्या घरच्यांना दिले. आणि अशाप्रकारे मनोहर जोशी आणि अंघाताईंचं लग्न झालं.
अनघाताईनं एकेठिकाणी म्हंटल देखील होतं की, गरिबीतच वाढलेल्या मनोहरपंतांची परिस्थिती आमच्यापेक्षा त्या वेळी बरी होती. कारण त्यांनी एम. ए. वगैरे होऊन क्लासेस सुरू केले होते. मनोहरपंतांनी त्या वेळी असं केलं नसतं, तर आपलं लग्न त्यांच्याशी झालंच नसतं.
पुढे १९६८ मध्ये शिवसेनेनं मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका लढवण्याचा निर्णय घेतला. तेव्हा मनोहर जोशी यशवंत पाध्ये यांच्या मध्यस्थीने बाळासाहेबांना भेटले. शिवसेनेत आले. निवडणुकीला उभे राहिले आणि निवडून सुद्धा आले. तिथूनच त्यांची राजकीय कारकीर्द सुरू झाली. ते शिवसेनेच्या कट्टर नेत्यांपैकी एक आहेत.
या दरम्यान, ‘कोहिनूर क्लासेस च्या शाखा सर्वत्र वाढल्या. ‘कोहिनूर हॉटेल्स’ निघाली. आज मनोहर जोशी हे शिवसेनेचे सर्वात श्रीमंत आमदार आहेत. शरद पवार हे काँग्रेसचे सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री, तर मनोहर जोशी हे शिवसेनेचे सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री आहेत.
हे ही वाच भिडू :
- गोदरेज कारखान्याच्या संपात मनोहर जोशींचा जीव जाता जाता वाचला होता
- मनोहर जोशींमुळे सहारा विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव मिळाले
- मोदींची जंगी सभा झाली तरी गायकवाडांनी मनोहर जोशींना हरवलं होतं..