उत्पल्ल पर्रिकर वडिलांचा वारसा पुढे नेण्यासाठी तयार आहेत पण फडणवीस सिरीयस नाहीत.
“देशाचे माजी संरक्षणमंत्री तथा गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर यांनी पक्षाचे भरीव काम करून दाखवावे. त्यांना स्वतःलाही केवळ पर्रीकरांचे पुत्र म्हणून भाजपची उमेदवारी आपल्यालाच मिळावी असे कधीही वाटणार नाही”, असं सद्या गोव्याच्या निवडणुकीचे धुरा सांभाळणारे देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांना बोलतांना व्यक्त केले.
ते असंही म्हणाले कि, मनोहर पर्रीकर यांनी केवळ गोव्यासाठीच नाही तर भाजप पक्षाचा विस्तार केला. त्यामुळे त्यांचे योगदान भाजप कधीही विसरू शकत नाही.त्यांचा वारसा गोव्यात अव्याहत चालू राहील आणि त्या समृद्ध वारशावर केवळ भाजपाचाच अधिकार आहे.
त्यांच्या अशा प्रतिक्रियांना गोव्यातली सद्य राजकीय स्थिती कारणीभूत आहे.
त्याचं झालं असं कि, सद्या भाजपातील एका गटाने उत्पल पर्रीकर यांनाच भाजपाने उमेदवारी द्यावी, असा आग्रह धरला आहे. तर दुसऱ्या गटाचं म्हणण आहे कि, त्यांनी या पेक्षा काही वेगळा मार्ग निवडावा. कारण मेख अशी आहे कि, भाजप अतानासियो मोन्सेरात यांच्यासह त्यांच्या पत्नीलाही उमेदवारी देण्याचा सद्या मानस असल्याने उत्पल पर्रीकर यांनी यातून बाहेर पडत आपला वेगळा मार्ग निवडावा म्हणजेच पणजीमध्ये अपक्ष म्हणून निवडणूक लढवावी आणि कार्यकर्त्यांनी त्यांच्या पाठिमागे उभे राहावे अशा एकंदरीत हालचाली चालू आहेत.
त्यात विशेष म्हणजे फक्त कार्यकर्त्यांचीच मागणी आहे म्हणून नाही तर स्वतः उत्पल पर्रीकर यांनी देखील निवडणूक लढवण्यास स्वारस्य दाखवलं आहे, कारण गेल्या काही काळापासून त्यांनी आगामी निवडणुकांना नजरेसमोर ठेवून पणजीमध्ये राजकीय कामांना आणि हालचालींना सुरुवात केली आहे.
उत्पल यांनी गेल्या काही काळापासून भाजप नेत्यांच्या आणि पर्रीकरांच्या निष्ठावान कार्यकर्त्यांना भेटायला सुरुवात केली आहे.
मनोहर पर्रीकरांच्या जाण्यानंतर पणजीतील लोकांना योग्य पर्याय हवाय.
आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचं म्हणन आहे कि, तो योग्य पर्याय म्हणजे उत्पल पर्रीकर आहेत. याबाबतीत कार्यकर्ते जास्तच आग्रही असल्याचे एकंदरीत तेथील स्थानिक राजकारणातून दिसून येत आहे.
उठसुठ कुणीही मग ते भाजपचे कट्टर विरोधक का असेना मात्र मनोहर पर्रीकरांच्या नावामुळे उत्पल यांना समर्थन देत आहे कि आम्ही तुमच्यात मनोहर पर्रीकरांना पाहतो. तुम्ही बिनधास्त विधानसभा निवडणूक लढवा आम्ही तुमच्या पाठीशी आहोत असे म्हणत आहेत.
आणि याच बळावर उत्पल यांनी विधानसभेच्या जगावर दावा ठोकला आहे. आणि आपण पणजीतून विधानसभा निवडणूक लढवण्यावर ठाम आहोत असे कळवले आहे.
उत्पल यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना अप्रत्यक्ष दखल घ्या च असा इशारा दिला असं दिसून येतंय.
उत्पल पर्रीकर यांनी गोव्याचे सद्याचे प्रभारी देवेंद्र फडणवीस यांना भेटून आपल्या कामाचा अहवालच सुपूर्द केला अशी माहिती मिळतेय. आपले वडील मनोहर पर्रीकर यांच्या निधनानंतर पणजीतील पक्षाचे काम आपण पुढे कसे नेले आहे, याचा सविस्तर लेखाजोखा त्यांनी फडणवीस यांना सोपवला.
गेल्या विधानसभा निवडणुकीच्या वेळेला उत्पल यांना पक्षाकडून उमेदवारी दिली नव्हती तरी त्यांनी नाराजी न बाळगता पणजीत आपले काम सुरूच ठेवले होते. सूत्रांच्या संदर्भाने असंही कळतंय कि, उत्पल यांनी आपणास यावेळी उमेदवारी दिली नाही तर त्याचे परिणाम राज्यभरात उमटू शकतील, याचा अंदाजही त्यांनी आपल्या शैलीत फडणवीस यांना दिला असल्याचा कळतंय.
थोडक्यात त्यांच्या सूचक संदेशाचा अर्थ असाय कि, आपल्याला उमेदवारी दिल्यास पर्रीकर यांच्या वारशाची भाजपला किंमत आहे, असा सकारात्मक संदेश राज्यभरात जाईल. त्याचा थेट परिणाम निवडणूक निकालावर होईल.
पण फडणवीस यांनी केलेल्या उत्पल पर्रीकर यांनी पक्षाचे भरीव काम करून दाखवावे अशा वक्तव्यावर उत्पल यांनी उत्तर दिले आहे.
उत्पल यांनी स्पष्ट असं उत्तर दिलंय कि, पक्ष संघटनेतील १९९४ पासूनचे कट्टर विचारक आणि निष्ठावान कार्यकर्ते आजही दुर्लक्षित आहेत. त्यांच्या सुख-दुःखावेळी आपण धावून जात आहे. प्रत्येक घराघरांत संपर्क ठेवला आहे. केवळ पक्षाचेच नव्हे तर इतर पक्षाचे कार्यकर्तेही आपुलकीने वागू लागले आहेत. पक्षाच्या कार्यकर्त्यांसोबत नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर राहिलो आहे. त्याची कित्येक उदाहरणे देऊ शकेन. हे सर्व पक्षाचे काम नव्हे काय, अशी सडेतोड विचारणा उत्पल यांनी फडणवीस यांना केली आहे.
मात्र देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांना बोलतांना स्पष्ट केले, की भाजप सरकारला स्थैर्य देणाऱ्या आमदारांना आम्हाला येत्या निवडणुकीत डावलता येणार नाही, त्यामुळे पणजीचा अधिकृत उमेदवार मोन्सेरात हेच राहणार आहेत हे आता कळून चुकले आहे.
तर बाबूश मोन्सेरात जे पणजीचे आमदार आहेत त्यांनी माध्यमांना बोलतांना प्रतिक्रिया दिली होती कि, त्यांनी भाजप ज्यांना तिकीट देईल तो पक्षाचा अधिकृत उमेदवार बनेल. आम्हांला पक्षाचा निर्णय मान्य करावा लागेल. पणजीत मी, सिद्धार्थ, उत्पल पर्रीकर आहेत. त्यापैकी एकालाच उमेदवारी मिळेल.
त्यामुळे आता उत्पल यांना उमेदवारी न देणे हे भाजपला नुकसानदायक ठरणार आहे. कारण गेल्यावेळी उत्पल यांना उमेदवारी न देऊन उत्पल यांनी कसलीही बंडखोरी केली नव्हती. मात्र यावेळेस त्यांनी उघड इशारा दिला आहे कि त्यांना उमेदवारी मिळालीच पाहिजे. पण त्यांना मुद्दाम डावलण्यात येतंय का असा प्रश्न देखील समोर येत आहे. कारण,
भाजपने गेल्या विधानसभा निवडणुकीवेळी उत्पल यांना उमेदवारी दिली नव्हती.
स्थानिक पातळीवरून त्यांचे नाव दिल्लीत विचार करण्यासाठी पाठवण्यात आले नव्हते, तर म्हापशात ॲड. फ्रांसिस डिसोझा यांचे पुत्र ज्योशुआ यांच्या नावाचा दिल्लीत विचार झाला, मात्र उत्पल यांचा झाला नव्हता. अशी बातमी नंतर उघडकीस आली होती. त्यामागे काय कारण होतं किंव्हा या मागे सूत्रधार कोण आहे हे आजतागायत समोर आले नाही.
कोणत्या बड्या नेत्याने उत्पल यांच्या नावाचा विचार केला जाऊ नये किंव्हा त्यांना उमेदवारी दिलीच जाऊ नये यासाठी प्रयत्न चालवले आहेत का अशी शंका निर्माण होत आहे.
हे हि वाच भिडू :
- शिवरायांच्या अस्सल चित्रांचा ससंदर्भ घेतलेला मागोवा म्हणजे मऱ्हाटा पातशाह.
- अजिंठ्याचा इतिहास जगासमोर आणणारा पारोचा देवदास अर्थात रॉबर्ट गिल
- म्हणून ब्रिटिशांना मराठ्यांवर मिळवलेला हा विजय नेपोलियनपेक्षा भारी वाटतो.