ब्रिटिशांनी युरोपात मिळवलेल्या विजयाचे खरे शिल्पकार ‘मराठा लाइट इन्फंट्री !
छत्रपती शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्याचा वारसा जपणाऱ्या ब्रिटीश काळात जन्म झालेल्या आणि आजवर कार्यरत असलेल्या ‘मराठा लाइट इन्फंट्री’ ही गाथा शौर्याची आणि बलिदानाची आहे.
छत्रपती शिवरायांच्या आदेशाने तानाजी मालुसरेंच्या नेतृत्वात मराठ्यांनी कोंढाणा जिंकला, ती लढाई ‘मराठा लाईट इंफंट्री’ मूळ प्रेरणा आहे. तोच दिवस मराठा दिन म्हणून साजरा केला जातो. करवीर छत्रपतींना आजही ह्या रेजिमेंट चे मानद, ‘कर्नल ऑफ दी रेजिमेंट’ म्हणून सर्वोच्च मानाचं पद दिल जातं.
पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धात मोठा पराक्रम गाजवणाऱ्या फर्स्ट मराठा म्हणजेच जंगी पलटण आणि सेकंड मराठा म्हणजे काळी पाचवी अशा दोन बटालियन होत्या. ब्रिटिशांनी युरोपात मिळवलेल्या विजयाचे खरे शिल्पकार या या दोन्ही रेजिमेंटमधील मराठेच होते. पहिल्या महायुद्धाचा शेवट तर मराठ्यांनीच केला होता.
मराठ्यांचा इतिहास आणि पराक्रम पाहून ब्रिटिशही थक्क झाले होते. आज मराठा दिनी उलगडूया ‘मराठा लाइट इन्फंट्री’च्या इतिहासातील पाने..
भारतात अडीचशे वर्ष पूर्ण झालेल्या अगदी मोजक्या रेजिमेंट आहेत. त्यातली मराठा लाइट इन्फंट्री ही प्रमुख रेजिमेंट आहे. ब्रिटिश काळात बॉम्बे नेटिव्ह सिपॉयच्या रूपात ‘मराठा’ची स्थापना झाली. ब्रिटिशांनी स्वत:च्या वखारीच्या सुरक्षेसाठी १७६८ मध्ये याची स्थापना केली.
सुरुवातीला याची ओळख ब्रिटिश लष्करातील जंगी पलटण म्हणून होती. १८०२ मध्ये या पलटणला रेजिमेंटचा दर्जा देण्यात आला. लाईट इंन्फंट्री म्हणजे मोजक्या सैनिकांची चपळपणे हालचाली करू शकणारी पलटण होय. त्यावेळी अशा प्रकारच्या सहा बटालियन्स सैन्यात होत्या. या बटालियन्स एकत्रित करून त्याचे लाईट इन्फंट्री रेजिमेंटमधे रुपांतर करण्यात आले.
व्हिक्टोरिया क्रॉस हा सर्वोच्च शौर्य पुरस्कार मराठा रेजिमेंटचे नामदेव जाधव आणि यशवंत घाडगे यांना (मरणोत्तर) देण्यात आला.
दुसऱ्या महायुद्धाच्या काळात यशवंत घाडगे यांनी सिटा डे कॅस्टेलो येथे जर्मन मशिनगनधारी सैनिकांना कंठस्नान घातले. मात्र, छातीवर लागलेल्या गोळीमुळे त्यांना हौतात्म्य पत्करावे लागले. तर शिपाई नामदेव जाधव यांनी एकट्यानेच सेनिओ नदीच्या तीरावर पराक्रम गाजवत जर्मनीची दोन ठाणी ताब्यात घेतली.
१९४५ साली मुंबईत नौदलाच्या एका तुकडीने ब्रिटीश सरकारच्या विरुद्ध बंड केले. हे बंड कसबसे शमवले पण तेव्हा इंग्रजांना जाणवले कि जर मराठा बटालियन सारखी पराक्रमी तुकडी बंड केली तर आपली या देशात धडकत नाही.
हे लक्षात आल्यानेच इंग्रजांनी भारत सोडला.
मराठा बटालियनने स्वातंत्र्यानंतरही अनेक युद्धात चमकदार कामगिरी केली.
गोवा मुक्ती संग्राम, दमण दीव येथेही गाजवला. १९६२ च्या युद्धात सिक्कीममध्ये तर १९६५ च्या युद्धात अमृतसर वाघा येथून आत प्रवेश करत पाकिस्तानी हद्दीतील बुर्ज नावाच्या ठाण्यावर कब्जा केला.
मराठा बटालियनने पाकिस्तानही केला होता काबीज
१९७१ च्या युद्धात तत्कालिन पूर्व पाकिस्तानात पुण्यातील कर्नल संभाजी पाटील यांच्या २२ मराठाच्या तुकडीने असामान्य धैर्य दाखवत हिली प्रांत ताब्यात घेतला ढाक्यावर कब्जा केला. त्याचवेळी लाहोरकडे जाणाऱ्या रेल्वेमार्गावरील नैनाकोट हे पाकिस्तानातील महत्त्वाचे ठाणे पराक्रमाच्या जोरावर ताब्यात घेतले.
काश्मीर असो वा अरूणाचल, राजस्थान असो वा सियाचिन अशी एकही सीमा नाही, जिथे मराठाची तुकडी तैनात नाही. अगदी संयुक्त राष्ट्रांच्या शांतीसेनेतही मराठाची कामगिरी अत्यंत उजवी राहिली आहे.
भारतीय लष्कराच्या पॅराशूट रेजिमेंटमध्येही मराठा रेजिमेंटच्या सैनिकांचा समावेश आहे. सेकंड पॅराच्या तुकडीनेही उत्तम काम केले आहे. सर्जिकल स्ट्राइकसारख्या अत्यंत अभिमानास्पद कारवाईतही मराठा सैनिकांचा समावेश होताच.
कर्नल वाय. बी. शिंदे यांनीच पहिली स्पेशल फोर्सेस बटालियन सुरू केली. अलिकडे २००८ साली मुंबईवर झालेल्या हल्ल्यानंतर हेलिकॉप्टरमधून दोरीने खाली उतरून दहशतवाद्यांवर हल्ला चढविणारी पहिली व्यक्ती ही मराठा बटालियनचे कर्नल होते.
‘बोल श्री शिवाजी महाराज की जय’, मराठा बटालियनची युद्धघोषणा आहे.
आपण शिवाजींचे बच्चे आहोत, आपल्यामुळे त्यांच्या नावाला बट्टा लागता कामा नये, हेच मराठा रेजिमेंटमध्ये नव्याने दाखल होणाऱ्या प्रत्येकाला शिकवले जाते. ही शिकवण आणि युद्ध कौशल्याच्या बळावरच मराठा लाइट इन्फंट्री उभी आहे.
‘लाइट’ शब्दाचा इतिहास
दुसऱ्या महायुद्धात इटली व जर्मनीच्या सैन्याशी लढताना ब्रिटिश सैन्याला सोडविण्यासाठी फर्स्ट मराठाचे सैनिक विद्युतवेगाने तब्बल ४०० किलोमीटरचे अंतर पायी कापत पोहोचले. आणि आपल्या पराक्रमाच्या जोरावर त्यांनी ब्रिटिशांची सुटका केली. त्याच कामगिरीमुळे त्यांना लाइट म्हणजेच विद्युतवेगाने काम करणारी बटालियन म्हणून ओळख मिळवली.
शिवछत्रपतींचे सरसेनापती हंसाजी हंबीरराव मोहित्यांचे वंशज मराठा लाइट इन्फंट्रीमध्ये आहेत. ईशान्य भारतातील लष्कराच्या एका अत्यंत महत्त्वाच्या संस्थेत कार्यरत असलेले ब्रिगेडिअर संग्राम मोहिते हे हंबीरराव मोहिते यांचे वंशज आहेत.
हा बटालियनमध्ये अनेक जाती धर्माचे लोक आहेत. या बटालियनच्या एकूण २६ रेजिमेंट तर २० रेग्युलर बटालियन आहेत. तसेच ४ राष्ट्रीय रायफल आणि २ प्रादेशिक सेना कार्यरत आहेत. २५० वर्षांचा इतिहास असणाऱ्या या मराठा लाइट इन्फंट्रीचा येणाऱ्या अनेक पिढ्यांना अभिमान वाटेल असाच आहे.
हे ही वाच भिडू.
- गेल्या वीस पिढ्या सरसेनापती हंबीरराव मोहितेंचे घराणे आपल्या पराक्रमाने देशाची सेवा करत आहेत.
- अंदमान निकोबार बेटे आज भारतात आहेत याचं श्रेय जातं मराठा आरमाराच्या पराक्रमाला !
- ब्रिटीश भारतात आले नसते तर भारतावर मराठा साम्राज्य असतं, काय आहे थरुर थेअरी.
- मराठा आरमाराच्या दहशतीच्या कथा आजही ब्रिटीश रॉयल नेव्ही मध्ये चर्चिल्या जातात.