मराठ्यांनी पाडलेल्या मंदिराचा जीर्णोद्धार टिपू सुलतानने केला होता.
ही कहाणी माहित करून घेण्यासाठी आपण थेट जाऊ १७०० शतकात …
१७०० च्या दशकात मुघल केवळ नावाला राज्यकर्ते म्हणून उरले होते. भारतातील बहुतेक भागातल्या सत्तेचे खरे नियंत्रण त्यांच्या हातून केंव्हाच निघून गेले होते. त्यात झालेल्या पानिपतच्या तिसऱ्या लढाईनंतर मराठा तरी त्यांची जागा घेईल अशी अशा होती पण त्यावरही पाणी फिरले. यात अफगाणांनी मराठ्यांचा चांगलाच पराभव केला होता.
उपखंडातील राज्यकर्त्यांची सत्ता एकीकडे कमकुवत होत होती आणि दुसरीकडे इंग्रज ताकदवान होत चालले होते.
म्हैसूरचा शासक टिपू सुलतान याने आधीच इंग्रजांकडून भविष्यात होऊ शकणारे धोके आणि आव्हाने फार पूर्वीच ओळखली होती जी कुणी इतर राज्यकर्ते ओळखू शकत नव्हते.
इंग्रज जाणून होते कि हा टिपू सुलतान मोठा डोकेबाज माणूस आहे त्यामुळे त्यांनी याच काळात म्हणजेच १७८९ मध्ये मराठ्यांना आणि हैदराबादच्या निजामाला आपल्याकडे वळवून घेतले. जेणेकरून यांचा वापर करीत ते आपल्या मार्गातील शेवटचा काटाही दूर करू शकतील तो म्हणजे टिपू सुलतान !
असंही टिपू सुलतान आणि मराठ्यांमध्ये फार चांगले संबंध नव्हते. जवळपास वैर, दुश्मनी म्हणली तरी चालतंय.
खरं तर टीपू सुलतान चे वडील हैदर अली यांनी जोरदार लढाईनंतर मराठ्यांकडून देवनाहल्लीचा गड जिंकून घेतला जो कि बंगळूरूजवळ आहे . त्याला प्रत्युत्तर म्हणून १७९१ मध्ये रघुनाथ राव पटवर्धन यांच्या नेतृत्वाखालील मराठ्यांनी म्हैसूर जिल्ह्यातील बेडनूरवर हल्ला केला.
या हल्ल्याच्या वेळी मराठ्यांनी तेथील श्रृंगेरी मठाचे मोठे नुकसान केले. मराठे तर हिंदू होते तरीदेखील त्यांनी या मठावर हल्ला चढवला होता.
तसं तर, पेशवाईच्या काळात लढाईच्या वेळी मंदिरांवर – मठांवर हल्ला करणे मराठ्यांसाठी नवे नव्हते.
कारण १७५९ मध्ये एका लढाईमध्ये मराठ्यांनी तिरुपती मंदिरावरही हल्ला केला होता आणि त्याचे खूप नुकसानही केले होते. परंतु श्रृंगेरी मठ हे सामान्य नव्हते तर त्याला मोठा इतिहास होता.
हिंदूंचे आदरणीय शंकराचार्य यांनी हजारो वर्षांपूर्वी या मठाची स्थापना केली होती. भारत देशाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात त्यांनी असे मठ, मंदिरं स्थापन केले होते. दक्षिणेत श्रृंगेरी तर उत्तरेला जोशीमठ, पश्चिमेला द्वारका आणि पूर्वेला पुरी स्थापन केली होती.
यामुळेच या शृंगेरी मठाचे महत्व हिंदू धर्मात खूप मोठे होते.
त्यामुळे तिथे आलेल्या प्रत्येक राज्यकर्त्यांनी मग तो हिंदू असो किंवा मुस्लीम, त्यांनी या मठाची प्रतिष्ठा कायम जपली.
टिपू सुलताननेही ही परंपरा कायम केली. तो वेळोवेळी मठाला भेटवस्तू पाठवायचा. तसेच त्याने मठाला बरीच जमीन दान केली. त्याचे आणि मठाचे सबंध खूप चांगले होते. जेंव्हा जेंव्हा त्याचे मठाच्या स्वामींशी चर्चा व्हायची तेंव्हा जगद्गुरू (जगाचे गुरू) या नावाने संबोधित करत असायचा.
या मठावर मराठ्यांनी हल्ला करण्याचे कारण असंही असू शकतं कि, या मठाजवळ भरपूर संपत्ती होती.
कदाचित म्हणूनच मराठ्यांनी त्याला लक्ष्य केले असावे.
मठाच्या स्थापनेचा एक हजार वर्षांचा इतिहास पाहिला तर प्रथमच या मठावर असं संकट आलं, मराठ्यांनी मठाची संपूर्ण मालमत्ता तर लुटलीच, परंतु तिथे राहणारया अनेक पुजाऱ्यांना मारले गेले, तसेच हल्यात तिथे असलेला शारदा देवीचा पुतळाही पाडण्यात आला.
हल्ल्याच्या वेळी मठाचे स्वामी कसेबसे जीव मुठीत घेऊन पळाले, नंतर त्यांनी टिपू सुलतानला पत्र पाठवून, मठासाठी मदत मागितली जेणेकरून देवीचा पुतळा मठात पुन्हा बसवता येईल. टिपू ने त्यांना उत्तर पाठवले, त्यात त्याने मोठी नाराजी व्यक्त केली.
“लोकं चुकीच्या गोष्टी करून आनंद व्यक्त करत आहेत. पण ज्यांनी आपल्याला हे दुःख दिलेय त्याची त्यांना शिक्षा जरूर मिळेल”.
त्याचबरोबर टिपु ने मठाला मदत पाठवली, एक माळी पाठवला जेणेकरून तेथे देवीचा पुतळा पुन्हा बसवता येईल. नवीन पुतळ्यासाठी त्यांनी आपल्या वतीने देवीला आभूषणे आणि वस्त्र हि पाठवली.
ह्या घटनेतील टिपू सुलतानची भूमिका आणि बाकी टिपू सुलतानची प्रतिमा यात विरोधाभास होता.
१९९० च्या दशकात कर्नाटकात हिंदुत्वाचा उदय झाला आणि टिपू सुलतानची धर्मनिरपेक्ष शासक असलेली प्रतिमा मुस्लिम हुकूमशहाची बनवली गेली. मात्र या प्रतिमेला छेद देणारी हि वरील घटना म्हणता येईल.
आता काही मराठी लोकांना यावर विश्वास बसणार नाही कि, हिंदू असलेले मराठ्यांनी जरी श्रृंगेरी मठाचे खूप नुकसान केले असले तरीही टिपूने मुस्लिम असूनही त्या पडझड झालेल्या मठाचे नूतनीकरण केले.
अर्थात, टिपूने आधुनिक नियमांच्या बाबतीत काही गुन्हे केले हे नाकारता येत नाही. त्याने अत्याचारही केले. पण मग मराठ्यांनीही तेच केलं. अगदी आपल्याच धार्मिक ठिकाणी श्रृंगेरी मठाचे नुकसान केले, तेथील लोकांना मारले. त्यामुळे सर्वांना एका रांगेत किंवा एकाच मापदंडात मोजायला गेलं तर सगळाच गोंधळ होऊन बसेल, असो
टिपू आपल्या काळात जे करत होता ते म्हणजे सत्तासंघर्षाची प्राचीन परंपरा एक प्रकारे पुढे नेणे. उदाहरणार्थ, म्हैसूरच्या सत्तेवर आल्यावर त्याने आधीच्या हिंदू राज्यकर्त्यांचा देव भगवान वराह यांचा पुतळा असल्यामुळे त्यांनी वराह मंदिर पाडले. पण टिपूने राज्यातील बाकीच्या मंदिरांशी छेडछाड केली नाही. त्याऐवजी त्यानी आपल्या राजधानीतील श्रीरंगनाथ मंदिराला चांदीची पोत दान करणाऱ्या शृंगेरी आणि इतरही अनेक मंदिरांना मदत केली. ननजनगुडा येथे उभारलेल्या ननजुनडेश्वरा मंदिरात मौल्यवान हिरव्या दगडाचे शिवलिंग बसवण्याचे कामही त्यानेच केले.
टिपूने हिंदू आणि ख्रिश्चनांवर हल्ला केला हे जितके खरे आहे तितकेच हेही खरे आहे कि, त्याने महदेवी नावाच्या काही मुस्लिम समाजांनाही सोडले नाही.
कारण हे सर्व समुदाय मैसूर राज्याशी एकनिष्ठ नव्हते. त्यातले मुसलमान ब्रिटिशांना पाठिंबा देऊ लागले. हद्द म्हणजे ते मुसलमान ईस्ट इंडिया कंपनीच्या सैन्यात घोडेस्वार म्हणून त्यांनी काम करण्यास सुरुवात केली होती.
टिपू या मताचा होता कि, त्याच्या राज्यात हिंदू आणि मुस्लिमांचे घनिष्ठ पारंपारिक संबंध असू द्यावे, या मताबाबत तो खूप जागरूक होता. तथापि, या समुदायांनी त्याच्या सत्तेला कोणतेही आव्हान देऊ नये, धोका निर्माण करू नये, ही त्याची एकमेव अट होती. त्याचा जवळचा माणूस जो त्याचा ‘राईट हॅन्ड’ मानला जायचा तो एक हिंदू होता, म्हणजेच त्याच्या राज्याचा मुख्यमंत्री पूर्णिया.
असो राजकीय वर्तुळात बऱ्याचदा टिपू सुलतानाचा मुद्दा निवडणुकीपुरता वापरला जातो आणि विसरला जातो, हेच वारंवार चालत राहणार आहे ..
हे ही वाच भिडू.
- टिपू सुलतान मरेपर्यन्त राम लिहलेली अंगठी घालत होता
- कितीही टिका केली तरी टिपू सुलतानने रॉकेटस् बनवल्याची कर्तबगारी दूर्लक्षित करता येत नाही
- टिपूच्या मदतीला नेपोलियन येईल या भीतीने इंग्रजांनी मुंबईत किल्ला बांधला.