‘मॅड मॅक्स फ्यूरी रोड’ मध्ये दाखवलेला पाण्याचा संघर्ष मराठवाड्यामध्येही सुरु झालाय.
मॅड मॅक्स फ्यूरी रोड हा हॉलिवूड मधील फँटसी प्रकारात येणारा एक चित्रपट आहे. ज्यामध्ये पृथ्वीचा सर्वनाश झाल्यानंतर पाण्यासाठी होणारे लोकांचे हाल, पाण्यावर ज्यांची मक्तेदारी आहे त्यांची राजवट आणि पाण्यासाठी तडफडणारे, गुलामीत जगणारे जीव अशा प्रकारचं एक भेदक कल्पनाविश्व उभं केलेलं आहे.
मराठवाड्यात दीड-एक महिना घालवल्यानंतर, संपूर्ण मराठवाडा फिरल्यानंतर मला मॅड मॅक्स मधल विश्व् आणि मराठवाड्यातील अस्तित्व ह्यात फार काही फरक वाटला नाही. ज्यांनी हा सिनेमा पहिला नाहीये त्यांच्यासाठी आणि ज्यांनी पहिला आहे त्यांना ठळकपणे अधोरेखित करण्यासाठी मी काही निरीक्षणं सांगतो.
मॅड मॅक्समध्ये जसं यत्र तत्र सर्वत्र वाळवंटच वाळवंट आहे, पाण्याचे जवळ-जवळ सगळेच स्रोत नष्ट झालेत, नजर जाईल तिथवर कुठेच हिरवंगार झाड दिसत नाही. माणूस आणि सरडा सोडून इतर कोणत्याही प्रजातीचा वावर नाही. खायला अन्न नाही की प्यायला पाणी नाही आणि बरगड्या कोणत्याही क्षणाला शरीर फाडून बाहेर येतील अशी बिकट अवस्था चित्रित करण्यात आलीये.
मराठवाड्यात काही वेगळं चित्र नाही, इथेही प्रमुख शहर आणि तालुक्याचं ठिकाणापासून आपण १५-२० कि.मी. पुढे गेलो की वाळवंटसदृश परिस्थिती समोर येते. कित्येक वर्षांपासून पाण्याला आसुसलेली जमीन दिसते, चारही बाजुंनी दूरपर्यंत पसरलेला भोंगळा माळरान दिसतो आणि ह्या माळरानावर सुकलेली नुसतीच उभी असेलेली बाभळीची खोडं दिसतात. जमिनीवर दुष्काळाने केलेले वार – पडलेल्या भेगा आ वासून समोर येतात.
पाण्याचे सर्वच नैसर्गिक स्रोत अक्षरशः कोरडे पडले आहेत. नदी-तलाव-ओढे-कालवे-विहिरी आभाळाला आपला तळ दाखवत निपचित व्हेंटिलेटरवर पडून आहेत. कारखाने, उद्योग धंदे देशोधडीला लागलेत. बैल-रेडे, गुरु-ढोर अशी धष्ट-पुष्ट असणारी जनावरं अशक्त झालीयेत, त्यांच्या चेहऱ्यावरचं तेज निघून गेलंय आणि दुरूनच पाहिल्यावर सांगाडे चालत जाताना दिसतात. घरातील सर्वच कुटुंब हंडाभर पाण्यासाठी मर मर कष्ट करतायत. शेतकऱ्याला उत्पन्न नाही, काही आलंच तर त्याला भाव नाही, तरुणांना हाताशी काम नाही, घरात पैसे नाहीत, बघायला कोणी वाली नाही मग अशा परिस्थिती करायचं काय? जनावरांना चारा छावणी आणि घर-गाव मागे ओसाड सोडून स्थलांतर.
मॅड मॅक्स मध्ये जस उर्वरित पाण्याचा ताबा मिळवलेला लॉर्ड ठराविक दिवसांनी व्याकुळ जनतेला घोटभर पाणी पिता येईल एवढं पाणी उपलब्ध करून देत असतो तसंच काहीस इकडे आहे.
उदाहरण द्यायचं झालं तर उस्मानाबाद मधील कोळेवाडी ह्या गावाचं बघता येईल, जिथे गावात दर १२-१५ दिवसांनी टँकर येतो, हे गाव गेल्या दशका पासून टँकर ग्रस्त गाव आहे. गावातील जनता टँकरची चातकासारखी वाट बघत असते. टँकर आला की त्याच्या मागे सगळे आपल्या आजूबाजूच्या वयोवृद्ध-चिमुकले पोरं सगळी नाती-गोती ह्यांना बाजूला सारून धावत पळत टँकर गाठतात. एका टँकरला ५ नळ असतात आणि एका एका नळाला ५-६ घर नेमून दिलेली आहेत. त्या-त्या घरांनी त्याच नळाला पाणी भरायचं आणि ते देखील घरात माणसं किती आहेत त्यानुसार ठरवून दिलेल्या संख्येएवढेच हांडे भरून घ्यायचे आणि पुढचे १२-१५ दिवस त्यावर भगवायचं. ह्या मिळालेल्या पाण्यावर घरातल्या माणसांचंच भागत नाही तिथे जनावरांनी काय करायचं? शहरात पाणी कपात सुरु झाली आणि दिवसाला दोन वेळेस येणार पाणी एका वेळेस येऊ लागलं की पंचाईत होते.
कोळेवाडी सारखी शेकडो गावांची अशीच अवस्था आहे. मैलोन मैल लहान थोर सर्वच हांडे, डब्बे, ड्रम, बादल्या पाणी भरून ठेवता येईल असं सर्वच घेऊन भटकताना दिसतात, आणि हे झालं वापरण्याच्या पाण्याबद्दल, प्यायच्या पाण्याची एक वेगळीच भानगड आहे. इकडे एक नवीन गोष्ट निदर्शनास आली ती म्हणजे “जार”.
जे काही पाणी वाट्याला येत किंवा उपलब्ध होत ते पिण्याच्या लायकीचंच नाही त्यामुळे प्यायचं पाणी हवं असेल तर एकमेव पर्याय म्हणजे विकतच पाणी. “जार”च पाणी. एक जार ३० रुपयांना मिळतो ज्यात १५ लिटर पाणी येत. समजा घरात ५ माणसं असतील तर दिवसाला २ जारची गरज पडते. म्हणजे महिन्याला ६० ते ७० जार म्हणजेच एका सामान्य कुटुंबाला, दुष्काळग्रस्त कुटुंबाला महिन्याला सादहरणपणे १८०० ते २१०० रुपये प्यायच्या पाण्यासाठी खर्च करावे लागतात. जारच पाणी विकणारे प्रत्येक तालुक्यात, तालुक्यापासून लांब गावं असतील तर ७-८ गावांमध्ये एक असं बऱ्याच ठिकाणी प्यायचं पाणी विकणारे सापडतील. ज्या गावांपर्यंत पाणी विकणारे हे लॉर्ड्स आजून पोहचले नाहीयेत किंवा ज्यांची पाणी विकत घ्यायची परिस्थिती नाहीये त्यांचं जिणं तर अजूनच हलाकीच आहे. जारवाले आणि टँकरवाले ह्यांची मक्तेदारी आणि वाळू ठेक्यांसारखी तयार झालेली ही एक लॉबी हा स्वतंत्र चर्चेचा विषय आहे.
दुष्काळ आणि चारा छावण्यांचं राजकारण हा काही नवीन विषय नाही पण जेंव्हा तुम्ही स्वतःच्या डोळ्यांनी परिस्थिती बघता तेंव्हा राग, चीड, असह्य ह्या भावना आणि मन हळवं झाल्याशिवाय राहत नाही.
शेतकऱ्याचा- संपूर्ण कुटुंबाचा जीव हा त्यांच्या जनावरात गुंतलेला असतो. जेंव्हा ते मुकं जनावर पाण्यावाचून हंबरडा फोडत-रडतं तेंव्हा लहानच मोठं केलेल्या जीव लावलेल्या त्या माऊलीच्या त्या शेतकऱ्याच्या काळजाला किती वेदना होतात. नाईलाजानं सुकलेला चारा तोही पोटभर नाही, जनावर जिवंत राहील, अशक्त का होईना पण जिवंत राहील एवढाच चारा शोधून शोधून उपलब्ध करून द्यायचा. मेंढरांना भक्कड माळरानांवर जिथे दगडांशिवाय काहीच नाही तिथे उगाच चरायला घेऊन जायचं, उरलं-सुरलेलं काही तोंडी लागेल ह्या आशेनं.
ह्या परिस्तिथीत चारा छावण्या हे शेतकऱ्यांसाठी जणू स्वर्गच. पण इथलं राजकारण आणि खरी परिस्थिती पाहिली की काय बोलावं हेच सुचत नाही. बीड जिल्ह्यातील एक उदाहरण मांडतो, ९ मे रोजी प्रशासनाकडून अचानक चारा छावण्याची तपासणी करण्यात आली होती. यामध्ये बीड तालुक्यातील कोल्हारवाडी येथील चारा छावणीवर ७४४ जनावरे जास्त दाखवण्यात आल्याचे उघड झाल्यामुळे छावणी रद्द करण्याची कारवाई झाली होती. दोन तलाठी निलंबित करण्यात आले होते. कारवाईच्या भीतीने १० मे रोजी दिलेल्या अहवालामध्ये जिल्ह्यातील चारा छावण्यावरील जनावरांची संख्या १७ हजार ९१ एवढी घटली होती. म्हणजे कारवाई करण्यापूर्वी ही जनावरे अधिक दाखवून मलिदा खाण्याचा प्रयत्न काही छावणी चालकांकडून करण्यात येत होता. हे झालं एक उदाहरण असे अनेक प्रसंग आहेत जिथे शासन आणि प्रशासन ह्यांची उदासीनता आणि त्यांचा ढिसाळ कारभार निदर्शनास येतो.
शासन किती बेपर्वा आहे ह्याच आजून एक उदाहरण म्हणजे निम्मा महाराष्ट्र दुष्काळात होरपळून निघत असताना आणि पावसाळा अवघ्या १५ दिवसांवर येऊन ठेपलेला असताना राज्याला स्वतंत्र कृषिमंत्री आणि कृषिसचिव नसावा, ही अवस्था लांच्छनास्पद आहे. अशावेळी, दुग्धविकास, जलसंधारण, कृषी, रोजगार हमी, सहकार, ग्रामविकास आणि महसूल अशा सर्व खात्यांनी हातात हात घालून ग्रामीण महाराष्ट्राला आधार देण्याची गरज आहे.
राज्याचे कृषिमंत्री व ज्येष्ठ भाजपनेते पांडुरंग फुंडकर यांचे निधन होऊन आता एक वर्षे झाले. त्यांच्या निधनानंतर मुख्यमंत्र्यांनी काही काळ कृषी खाते स्वत:कडे ठेवले. नंतर त्यांनी या खात्याची धुरा त्यांच्या विश्वासातले आणि गिरीश महाजन यांच्याप्रमाणेच अग्निशमन दलाची भूमिका बजावणारे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हाती सोपवली. मुख्यमंत्र्यांना पाटील यांच्याकडे कृषी खाते तात्पुरते सोपविल्यानंतर इतक्या महिन्यांत स्वतंत्र मंत्री नेमण्यास सवड सापडू नये, हे आश्चर्यकारक आणि खेदजनक आहे.
यातच भर म्हणून कृषिसचिवांना निवृत्त होऊनही नऊ महिने उलटले. तेथेही आजतागायत नवी नेमणूक नाही. तो कारभारही जलसंधारण सचिव हाकत आहेत. महाराष्ट्राची निवडणूक होण्यास अजून काही महिने अवकाश आहे. तोवर बियाणे वाटप, कर्जवाटप तसेच पेरण्या व पावसाकडे लक्ष ठेवून वेगाने निर्णय घेण्याची गरज पडणार आहे. असे असताना मुख्यमंत्र्यांनी स्वतंत्र कृषिमंत्री व कृषिसचिव नेमण्यात चालढकल का करावी? ह्या अशा परिस्थितीत शेतकरी कशीबशी जनावरे जगवत आहेत किंवा भ्रष्टाचाराने लदबदलेल्या छावण्यांमध्ये जड मनाने नेऊन बांधत आहेत.
बीड जिल्ह्यातीलच आजून एक हृदय पिळवटून टाकणारी अवस्था ही ऊस तोड कामगारांची.
बीड हा जिल्हा ऊस तोड कामगारांसाठी प्रसिद्ध आहे. इथले अनेक कामगार शेतकरीच आहेत परंतु पाण्याअभावी त्यांची शेती होत नाही म्हणून पश्चिम महाराष्ट्रात आणि उत्तर कर्नाटकात हे ऑक्टोबर ते मार्च ह्या कालावधीसाठी स्थलांतर करतात. जिल्ह्यातल्या अनेक गावांपैकी वंजारवाडी आणि हाजीपूर हे ऊसतोड कामगारांची गावं, जिथे संपूर्ण गाव हेच काम करत. ठेकेदार पती-पत्नी असं एक जोडी ह्या हिशोबाने हजेरी ऊसतोड कामगारांना देतात. जोडीतील एकानेही एका दिवसासाठी सुट्टी घेतली तर त्यांची हजेरी कापली जाते किंवा ५०० रुपये दंड ह्या जोडीकडून आकारला जातो.
ह्या अशा जाचक नियमांसमोर अडचण येते ती मासिक पाळीची. महिन्याला १-२ दिवस सुट्टी घेतली जाते आणि जोडीची हजेरी चुकते, दंड आकारला जातो. म्हणून ह्या गावातल्या महिलांनी जिल्ह्यातल्या ऊसतोडीला जाणाऱ्या महिलांनी २-३ आपत्य झाल्यावर लगेचच आपली गर्भाशय काढून टाकलीयेत जेणेकरून मासिक पाळीचा धर्म बंद होईल आणि हजेरी चुकणार नाही. ठेकेदार पण अशाच जोडयांना कामावर ठेवतात ज्यात बाईच गर्भाशय नसेल आणि महिन्याला १-२ दिवस काम बंद होऊन नुकसान नाही होणार.
आपल्या भागात दुष्काळ आहे, शेतीला पाणी नाही, आजूबाजूला काम धंद्यांचा काही पर्याय नाही, कोणता कारखाना नाही की रोजंदारी नाही मग अशा परिस्थितीत चार-दोन पैशांसाठी आपलं घर सोडून, मुलं बाळांची शाळा चुकवून ८-८ महिने काबाड कष्ट करून अशा निर्दयी जाचक नियमांसमोर लोक हतबल होतात आणि शासन इथेही कानाडोळा करत आहे.
विश्वास ठेवा पश्चिम महाराष्ट्रातील आणि कोकणातील सर्व सामान्य लोकांना ह्या दुष्काळी भागाचा इथल्या जीवनमानाचा जरा सुद्धा अंदाजा नाहीये. इथल्या जनतेने आपल्या कोषातून बाहेर येण्याची गरज आहे, राज्यातील ह्या दुष्काळग्रस्त बांधवाना सोबत करण्याची गरज आहे, ह्यासाठी त्या भागात जाऊन काही करायला हवं असं नाही. अनेक सामाजिक संस्था चांगल्या पद्धतीचं नियोजन बद्ध काम करत आहेत त्यांना होईल तशी मदत केली किंवा शासन राबवत असलेल्या योजनांचा पाठपुरावा केला तरी बराच हातभार लागेल.
आपण आपल्या वाटेला आलेलं पाणी गरजेपुरतं आणि व्यवस्थित नियोजन करून वापरलं आणि शासनाला योग्य प्रश्न विचारले तर बरंच काही साध्य करता येईल नाही तर मॅड मॅक्स फ्यूरी रोड मधलं फँटसी जग संपूर्ण पणे सत्य परिस्थिती व्हायला वेळ लागणार नाही.
- भिडू श्रेयस चौगुले
हे ही वाच भिडू.
- आज गोपीनाथ मुंडे पाहीजे होते.
- अवघ्या 20 वर्षाच्या शेतकऱ्याच्या पोरानं सुरू केलीय राज्यातली पहिली विना-अनुदानित चारा छावणी.
- एसटी तिकीटामधल्या १५ पैशाच्या अधिभारातून रोजगार हमी योजना उभी राहिली.
- उजनीचं पाणी यशवंतराव ते विलासराव व्हाया शरद पवार.
अतिशय हृदयद्रावक वर्णन केलं आहेस श्रेयस. या परिस्थितीची ज्या प्रकारे तू मांडणी केली आहेस ते खरंच अंगावर काटा आणणारे आहे.
प्रत्येक माणसाने पाणी वाचवण्याचे काम करावे.
भयाण वास्तव आहे …..hats of to pani foundation , because they really did great work in such areas ,& it works lot ,,