घरच्या गॅलरीत लावता येतील अशा औषधी वनस्पती
आयुर्वेद, पंचकर्म, आणि वनस्पती शास्त्राला भारतात खूप प्राचीन इतिहास आणि महत्व आहे. आधुनिक जगाच्या रेट्यात आज आपल्याला लगेच उपचार घेण्याची सवय लागली आहे. याच सवयीतून आपण आपल्या देशी वनस्पतींचा उपयोग विसरत चलो आहोत. पण त्यांचा वापर रोजच्या आयुष्यात झाला तर एक आजार बरा करून दुसरा आणणाऱ्या गोळ्या आपल्यला खाव्या लागणार नाहीत. याच आधुनिक आयुष्यात आपल्या घराची बाग गेली आणि वाढलेल्या गर्दी मुळे आपण वरच्या मजल्यांवर राहिला लागलो जिथे बागेचा आणि आपला काही संबंध येतच नाही. सुदैवाने आपण काही औषधी वनस्पती खिडकीतल्या बागेतही लावू शकतो. त्यांची माहिती घेऊ.
उष्णतेवर दुर्वा तर कृमी-विषमज्वरावर बेलाची पानं उपयुक्त आहेत म्हणूनच मंगळागौरीत वापरलेल्या पत्रीचा वापर दुसर्या दिवशी काढा करुन पिण्याची पद्धत होती. गुढीपाडव्याला कडुलिंबाची पाने खाण्याची परंपरा आपण पाळतो. वर्षभर आरोग्य चांगले राहावे म्हणून ही पाने खाल्ली जाण्याची प्रथा आहे. ही जरी सर्वत्र आढळणार्या झाडांची पानं असली तरी यांचे औषधी महत्व मोठे आहे.
ब्राम्ही
अत्यंत देखणी, नाजूक गोल पानांची वनस्पती. या वनस्पतीला ‘मंडूकपर्णी’ ही म्हणतात. हँगिंग बास्केट्समध्ये ब्राम्ही अनेकजण सध्या लावतात. पूरळ, फोड येत असल्यास ब्राम्हीचा रस गायीच्या तूपात मध घालून घेतात. केसांच्या वाढीसाठी, स्मरणशक्ती वाढवायला देखील ब्राम्हीचे सेवन उपयुक्त ठरते.
तुळस
घरोघरी तुळस असली तरी ती नीट वाढत नसल्याची बर्याच लोकांची तक्रार असते. याचे कारण म्हणजे तुळशीच्या वाढीसाठी उन्हाच्या उष्णतेची गरज असते. एक तुळस घरी असली की अनेक आजारापासून आपण लांब राहू शकतो.
सर्दी, खोकला, ताप यावर पानांचा रस गुणकारी ठरतो. सारखी उचकी लागत असेल तर तुळशीच्या पानांचा रस मधात कालवून देतात. त्वचारोगांवर तुळशीची पाने चोळली तरी त्याचा खूप फायदा होतो.
कोरफड
एकदा कुंडीत लावलं, अधून-मधून पाणी घातलं की वर्षानुवर्ष काहीही काळजी न घेता कोरफड वाढते. कीड नाही की रोग नाही. कोरफडीचेही वेगवेगळे प्रकार असतात. वापरायला सर्वात खालचं पान घ्याव आणि त्याच गर काढावा.
फेसपॅक म्हणूनही तो चेहर्यावर लावता येतो. केसांच्या अनेक समस्यांवरही कोरफडीचा लेप उपयोगी औषध आहे. कोंडा, केसांचे गळणे, केसांची वाढ यासाठी कोरफडीचा गर मिक्सरमध्ये वाटून पातळ करुन लावला तर तुम्हला लगेच फरक दिसेल. हा गर, सूंठ पूड आणि हळद मधात घालून चाटण दिवसातून दोन-तीन वेळा घेतल्यास खोकल्यापासून आराम मिळतो. पोट साफ न होण्याची तक्रार असेल तरी कोरफडीचा गर कामी येतो.
कोरफडीचा गर अनेक गोष्टींसाठी वापरला जातो. जखम झाल्यास, हळदीत कोरफडीचा गर घालून त्याचा लेप लावला तर जखम लवकर भरण्यास मदत होते. तसेच त्वचेसाठीही कोरफडीचा लेप फायदेकारक आहे.
गवती चहा
गवती चहाच्या पातीमुळे चहाची जव भारी होतेच, शिवाय तरतरीही येते. घरच्या घरी केलेल्या सुपमध्ये गवती चहामुळे हॉटेलसारखी चव येते. गवती चहाच्या काढ्याने भरपूर घाम येऊन तापावर उपाय होतो. गवती चहाचे रोप लावल्यानंतर ते पहिली दोन वर्ष चांगले वाढते. त्यानंतर मात्र त्याची मूळं घट्ट होतात आणि नवीन पान येत नाहीत. अशावेळी संपूर्ण झाड उपटून त्याचे लहान-लहान भाग करुन दुसर्या कुंडीत नव्याने लावले जाऊ शकते.
पुदिना
अपचन, अजीर्णावर पुदिन्याची ताजी पान गुणकारी असतात. बाजारातून आणलेल्या पुदिन्याच्या पाच-सहा काड्या कुंडीत खोचल्या तरी त्यांना मूळं फुटतात. मात्र, भरपूर सूर्यप्रकाश असेल अशा जागेवर पुदिन्याची कुंडी ठेवावी लागते.
पानफुटी
मूतखडा झाल्यावर बरीच लोकं पानफुटीच्या पानाचा वापर करतात. याच्या पानांचा रस जंतांवरही गुणकारी असतो. लहान सहान जखमांवर पानफुटीचा रस लावल्यास जखमेतून रक्त वाहात असल्यास थांबते.
रुई
काटा रुतून मध्येच तुटला की तो काढणे अवघड जाते. अशा वेळी रुईच्या चिकाचा एक थेंब लावला की तिथं फोड येऊन काटा काढायला सोपं जात. लहान मुलांचं पोट दुखलं की रुईच पान गरम करुन शेक देतात.
दुर्वा
उष्णतेमुळे येणार्या तापावर दुर्वा अत्यंत गुणकारी मानल्या जातात. उन्हाळ्यात घोणा फुटतो आणि नाकातून रक्त येते, अशा वेळी दुर्वांच्या रसाचे दोन थेंब नाकात घालावेत त्यामुळे या समस्येचा कायमस्वरूपी निकाल लागतो.
अडुळसा
खोकल्यावर अत्यंत गुणकारी औषध म्हणून अडुळसा सगळ्यांना माहिती आहेचं. याची नुसती फांदी रोवली तरी त्याला मूळं फुटून चांगली रोपं तयार करता येतात. याची पानं तव्यावर गरम करून वाटून पिळली की रस काढता येतो. हा रस मध घालून घेतात. अंगावर सूज आली असल्यास पानं तव्यावर गरम करुन सुजेवर बांधल्यास आराम मिळतो. पूर्वी याच्या वाळलेल्या पानांच्या पुड्या कपड्यांमध्ये ठेवण्याची पद्धत होती. त्यामुळे वस्त्रांना कसर लागत नाही.
झेंडू
दिवाळी, दसरा, पाडवा अशा अनेक सणानमध्ये सगळ्यात जास्त झेंडूचा वापर होतो. झेंडू अनेक गोष्टींवर FIRST AID म्हणून करतो. काही वेळा सुखंटला स्पर्श झाल्यावर प्रचंड खाज सुटते. अशावेळी झेंडूच्या पाल्याचा रस लावाला कि हि खाज कमी होते. जखम झाल्यावरही पानांचा रस लावला जातो.
गुलाब
सर्वांच्या परिचयाचे आवडते फूल, गावठी गुलाब. हे औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण असते. खडीसाखर आणि गुलाबाच्या पाकळ्यांचे थर करुन बर्णी उन्हात ठेवली की छान गुलकंद तयार होतो. पित्त, उष्णता, शौचास साफ होणे, डोळ्यांची जळजळ अशा अनेक व्याधींवर ते उपयुक्त ठरते.
जास्वंद
जास्वंदाची फुलं खाल्ली की जंत नष्ट होतात. मेंदूची तरतरी वाढवण्यासाठी देखील जास्वंदाची फुले खडीसाखरे बरोबर खाल्ली की फायदा होतो. पानांचा-फुलांचा वापर करुन तेल बनवता येते. त्याने केस काळेभोर, लांब सडक राहतात.
आघाडा
कावीळ झाली की भूक लागत नाही, अशाने अशक्तपणा वाढतो. आघाड्याचे मूळ उगाळून ते कालवून घेतल्यास काही तासातच भूक लागते. काटा घुसला असेल तर या पानांना ठेचून बांधले की काटा बाहेर निघतो. दाढ दुखत असली की आघाड्याची पानं चावून खावीत त्यामुळे हा त्रास कमी होतो आणि ते पेनकिलर सारख काम करतात.
औषधी वनस्पती लावताना हे लक्षात घ्यावे या वनस्पतींचा वापर तज्ञांना विचारूनच करावा.
कुंडी व्यवस्थित भरावी, पाण्याचा निचरा होण्यासाठी खाली मोठं छिद्र असावं, माती आणि कुजलेलं शेणखत किंवा गांडूळखत २:१ प्रमाणात मिसळून भरावे औषधी वनस्पतींवर रोग किंवा कीड लागल्यास रासायनिक औषधांचा वापर करु नये. उन्हात वाढलेल्या वनस्पतीमध्ये सावलीत वाढलेल्या वनस्पतींपेक्षा जास्त गुणधर्म असतात हे लक्षात ठेवा.
हे ही वाचा भिडू.
- या महिलेमुळे तुमच्या ऊसाचा उतारा वाढला.
- पुरूषांना देखील होवू शकतो ब्रेस्ट कॅन्सर, वाचा काय असतात लक्षणे..
- पानाचा असला ‘लाल इतिहास’, ना बच्चन सांगेल ना मस्तानी.