मीनाक्षी शेषाद्रीच्या डायहार्ड फॅनच्या विचित्र लीला…
कलाकारांना फॅन फॉलोवर हवे असतात. त्यांच्या लोकप्रियतेचे ते बॅरोमीटर असतात. पण कधी कधी आपल्या चाहत्या कडून कलावंतांना भयंकर असा त्रास होतो. असाच काहीसा त्रास अभिनेत्री मीनाक्षी शेषाद्री हिला झाला होता.
त्यावेळी मीनाक्षी जुहूला एका बंगल्यामध्ये ‘नाचे नागिन गली गली’ या चित्रपटाचे चित्रीकरण करत होती. एका गाण्याचे चित्रीकरण चालू होते. या शूटिंगमध्ये तिच्यासोबत मास्टर भगवान देखील होते. चित्रपटाचा नायक नितीश भारद्वाज या बंगल्यातील आतल्या रूममध्ये आपल्या शॉटची वाट पाहात बसला होता. गाण्याचे चित्रीकरण झाले.
दिग्दर्शक मोहन प्रसाद यांनी कट म्हटले आणि चित्रीकरण स्थळावर पांगापांग सुरू झाली.
मीनाक्षी शेषाद्री तिच्या रूमकडे जायला निघाली. तितक्यात एक जण पळत पळत तिच्याजवळ आला आणि त्या अनोळखी व्यक्तीने मीनाक्षीला आपल्या बाहुपाशात घट्ट आवळले. मीनाक्षीला क्षणभर काय घडत आहे ते कळलेच नाही. त्या व्यक्तीने मीनाक्षीला पूर्णपणे आपल्या मिठीत सामावून घेतले.
आता त्याची धिटाई वाढत होती आणि तो तिचे चुंबन घेण्याचा प्रयत्न करत होता.आता मात्र मीनाक्षी जोरजोरात ओरडू लागली. युनिटमध्ये मात्र काही लोकांना हा चित्रपटात शूटिंगचा एखादा भाग असावा असे सुरुवातीला वाटले.
पण ज्यावेळी मीनाक्षीने त्या व्यक्तीच्या तोंडात फाडफाड मारायला सुरुवात केली, त्यावेळी युनिटच्या लक्षात आले की काहीतरी गडबड आहे.
युनिटचे लोक धावत धावत तिथे आले. आणि त्या व्यक्तीपासून मीनाक्षीची सुटका केली. मीनाक्षी शेषाद्री प्रचंड घाबरली होती. ती आपले कपडे सावरत आपल्या रूम मध्ये गेली आणि रडू लागली.
तिकडे युनिटच्या लोकांनी त्या व्यक्तीला मारायला सुरुवात केली. पोलिसांनाही बोलावण्यात आलं. पोलिसांनी जेव्हा त्या व्यक्तीला विचारले त्या वेळेला त्याने सांगितले की
“मी मीनाक्षीचा मोठा चाहता आहे आणि मला ती प्रचंड आवडते. दिवसा, रात्री खाता-पिता तिचाच चेहरा माझ्या डोळ्यापुढे येतो. तिच्याशिवाय मी क्षणभर देखील जगू शकत नाही. तिला भेटण्यासाठी मी खास बनारसहून इथे आलो आहे!”
पोलिसांनी त्या व्यक्तीला अटक केली आणि त्याला घेऊन गेले. परंतु संध्याकाळी मीनाक्षी शेषाद्रीची आई पोलीस स्टेशनमध्ये गेली आणि त्यांनी आपली कंप्लेंट मागे घेतली.
त्या व्यक्तीचे चुकलंच होते. पण तो मीनाक्षीचा चाहता होता. त्याच्या कृतीचे कुठेही समर्थन नाही. पण अशा प्रसंगात कसे वागायचे याचा साधक बाधक विचार त्याला करता आला नाही. त्याच्याकडे तेव्हडी बुद्धी नव्हती.
अशा या कृतीने विनाकारण त्याचे आयुष्यात का बरबाद करायचे असा विचार माय लेकीनी केला. त्याला समज देऊन पोलिसांनी देखील सोडून दिले.
त्या चाहत्याचे नाव होते राजेशकुमार मिश्रा. त्या काळात म्हणजे १९८९ साली ही बातमी मिडीयात खूप गाजली होती. यानंतर मात्र मीनाक्षीने धडा घेतला ती कायम आपली स्वतःची सिक्युरिटी घेऊन चित्रपटाच्या शूटिंगला जाऊ लागली.
हे ही वाच भिडू:
- या वर्षात येणारे हे ६ पिक्चर साऊथ इंडियन सिनेमांचे रिमेक असणार आहेत..
- सध्या जगात गाजणाऱ्या दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीचा पाया आपल्या कोल्हापुरातून रचला गेलाय…
- रेल्वेमध्ये एका प्रवाशाने केलेला अपमान अशोक सराफ यांच्या जिव्हारी लागला..