त्यांच्यामुळे गरिबांना साडेसात हजार एकर जमीन मिळू शकली
जेष्ठ गांधीवादी नेते, सर्वोदयी नेते, माजी खासदार सदाशिवराव ठाकरे यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. ते ९५ वर्षांचे होते. भारतीय स्वातंत्र्य लढा ते आजच्या २०२० भारताला जोडणारे ते एकमेव नेते असावेत.
सदाशिवराव ठाकरे नेमके कसे होते हे सांगायचे झाल्यास त्यांच्याच आत्मचरित्राप्रमाणे वेगवेगळ्या टप्यांवरचे सदाशिवराव पहावे लागतात.
त्यांचे बालपणांचे शिक्षण वर्धा येथे महात्मा गांधी आणि विनोबा भावे यांच्या सहवासात गेले. पुढे समाजकारणातून भूदान चळवळीसाठी त्यांचा सिंहाचा वाटा राहिला. पुढे राजकारणाच्या माध्यामातून त्यांनी भरीव योगदान दिले.
विशेष म्हणजे आयुष्याच्या एका टप्यावर राजकारण सोडून पंढरीची वाट धरण्याचं धैर्य त्यांनी दाखवले.
यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी तालुक्यातील झंझाळा गावातला त्यांचा जन्म. शेतकरी कुटूंबात १४ जून १९२५ साली त्यांचा जन्म झाला. झंझाळा, मानोली, घाटंजी, यवतमाळ, नागपूर आणि वर्धा असा त्यांचा शिक्षणासाठी प्रवास झाला.
१९४२ साली वयाच्या १८ वर्षांची असताना ते महात्मा गांधींजींच्या स्वातंत्र्य लढ्याकडे आकर्षित झाले. विद्यार्थी जीवनातच विद्यार्थी काँग्रेसचेच सक्रिय सदस्य झाले आणि काही दिवसातच त्यांची यवतमाळ विद्यार्थी काँग्रेसच्या अध्यक्षपदावर निवड करण्यात आली.
१९४६ च्या दरम्यान त्यांची महात्मा गांधींसोबत पहिली भेट झाली. महात्मा गांधींच्या अहिंसेच्या तत्वाचा त्यांच्यावर या पहिल्या भेटीत जो प्रभाव पडला तो आयुष्याच्या अखेरपर्यन्त कायम राहिला. वर्धाच्या सहवासात दादा धर्माधिकारी, जी. रामचंद्रन, मश्रूवालाजी अशा व्यक्तिंमत्वासोबत संपर्क येत गेला आणि सदाशिवराव घडत गेले.
१९५२ मध्ये विनोबा भावेंनी भूदान चळवळ सुरू केली.
अशा वेळी या व्यक्तिंने स्वत:ची ८० एकर जमीन देवून आपल्या समाजकार्याचा श्रीगणेशा केला. भूदान यात्रेच्या निमित्ताने ते विनोबा भावे यांच्यासोबत गावागावात फिरू लागले.
त्यांच्या कार्याबद्दल सांगायचं तर त्यांच्यामुळे भूदान चळवळीत साडेसात हजार एकर जमीन मिळवण्यात आली.
त्यानंतरच्या काळात ते राजकारणाकडे वळले. यवतमाळ जिल्हा परिषदेचे दोन वेळा अध्यक्ष, यवतमाळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार व १९७१ ते १९७७ या काळात जांबुवंतराव धोटे यांचा पराभव करून ते खासदार म्हणून दिल्लीत गेले.
१९९२ साली त्यांनी सक्रिय राजकारणातून निवृत्त होण्याच्या निर्णय घेतला.
त्यांच्याबद्दल लिहताना न्या. धर्माधिकारींनी त्यांच्या आत्मचरित्रात की,
महात्मा गांधींचे विधायक कार्यक्रम ज्यांनी जिवनमुल्य म्हणून स्वीकारले असा हा शंभर नंबरी माणूस.
स्वातंत्र्यपूर्व काळ आणि स्वातंत्र्यानंतरचा भारत अशा दोन्ही दुव्यांना जोडणारे ते व्यक्ती होते. माजी खा. सदाशिवराव ठाकरे यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
हे ही वाच भिडू.
- विनोबांनी खरंच आणीबाणीला ‘अनुशासन पर्व’ म्हंटलं होतं का..?
- फुटकळ नेत्यांच्या त्याच त्या गोष्टी सांगणारे आपण सीडी देशमुखांना विसरत चाललोय.
- पंतप्रधानांनी आवाहन केलं म्हणून अख्ख्या देशाने एकवेळचा उपवास केला होता.