महाराष्ट्राचा असा मुख्यमंत्री ज्यांचा साखरपुडा येरवडा जेलमध्ये झाला होता.
महाराष्ट्रासारख्या राज्याला लाभलेले मुख्यमंत्री हा एक स्वतंत्र अभ्यासाचा विषय राहिलेला आहे. राज्यातील जातीची समिकरणं बाजूला सारत अल्पसंख्याक समाजाचे असणारे वसंतराव नाईक असो की विदर्भाचे पहिले मुख्यमंत्री म्हणून मान मिळालेले मारुतराव कन्नमवार असो या सर्वांनीच आपली झालेली निवड ही जाती किंवा एका विशिष्ट भागासाठी नसून महाराष्ट्राच्या भल्यासाठी आहे हे आपल्या कृतीतून नेहमीच सिद्ध केलं आहे.
महाराष्ट्राच्या याच मुख्यमंत्र्यांच्या यादीत समावेश होतो तो म्हणजे सातारच्या बाबासाहेब भोसले यांचा. बाबासाहेब भोसले म्हणल्यानंतर अनेक जाणकारांच्या भुवया उंचावल्या असतील, अनेक पत्रकार पोट धरू हसू लागतील याच कारण देखील तितकच मजेशीर आहे. बाबासाहेब भोसले हे तितकेच अतरंगी व्यक्ती म्हणून ओळखले जातं.
ते विधानसभेवर निवडून आले ते १९८० साली. आणि अवघ्या दोनच वर्षात अंतुले यांना सिमेंट घोटाळ्यात राजीनामा द्यावा लागला. राज्यातले गटतट बाजूला करत कोणाला मुख्यमंत्री करायचा असा पेचप्रसंग इंदिरा गांधीच्या समोर उभा राहिला आणि इंदिरा गांधीनी सर्वांना आश्चर्याचा धक्का देत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी बाबासाहेब भोसले यांची निवड केली. बाबासाहेबांची निवड ही इतकी आश्चर्यजनक होती की बाबासाहेब सातारचे भोसले असल्यानं इंदिरा गांधींचा गैरसमज झाला अशी प्रतिक्रिया लोक देवू लागले. मुळातच मुख्यमंत्रीपद सुद्धा ध्यानीमनी नसताना मिळालेल्या बाबासाहेबांचे अनेक किस्से लोक आजही तितक्याच उत्साहाने सांगतात त्यापैकीच एक किस्सा तो म्हणजे त्यांच्या लग्नाचा..
बाबासाहेब यांच लग्न कॉंग्रेसचे पुढारी तुळशीदास जाधव यांची कन्या कलावती यांच्यासोबत ठरवण्यात आला. तुळशीदास जाधव हे कॉंग्रेसचे पुढारी व स्वातंत्रचळवळीत अग्रेसर असणार नाव होतं. स्वातंत्र आंदोलन काळात त्यांना अटक करुन पुण्याच्या येरवडा कारागृहात ठेवण्यात आलं होतं. साहजिक मुलीचा साखरपुडा आपल्या उपस्थित व्हावा या इच्छेखातर साखरपुड्याचं आयोजन ब्रिटीश शासनाच्या देखरेखीखाली येरवडा कारागृहात करण्यात आलं.
साखरपुडा पार पडलां पण लग्न कुठं करायचं आणि लग्नात कन्यादान कोण करणार हा प्रश्न होताच. त्यासाठी काकासाहेब गाडगीळांनी पुढाकार घेतलां. मात्र लग्नाच्या अगोदरच वधुपिता अर्थात तुळशीदास जाधव जेलमधून सुटले. त्यानंतर बाबासाहेब भोसलेंच लग्न मटकीची उसळ व गुळाचा सांजा खावून गांधीवादी पद्धतीने अत्यंत साधेपणाने पार पडलं.