पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेपाळी मुलाची गोष्ट…

आपल्या पंतप्रधानांना एक मुलगा आहे….

असं म्हटल्यावर भली भली माणसं म्हणतील, येड लागलं का तुम्हाला? तर अहो खरंच, आपल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना एक नेपाळी मुलगा आहे. आणि आज या नेपाळी मुलाचीच गोष्ट आम्ही सांगणार आहोत. कारण सत्य कधी लपत नसतं. आणि आम्ही अशा लपलेल्या गोष्टी बाहेर काढतोच.

तर या गोष्टीला सुरुवात होते १९९८ सालात. एक नेपाळी कुटुंब भारतात कामाच्या शोधात येत. प्रचंड गरिबी असलेल्या या कुटुंबाचं मूळ नेपाळ देशातल्या नवलपरासी जिल्ह्यातलं कवासती लोकहा हे गाव. या कुटुंबातला मोठा मुलगा दशरथ कामाच्या शोधात दिल्लीला येतो. दिल्लीत त्याला काही काम मिळत नाही, म्हणून तो मजल दरमजल करत राजस्थानमध्ये येतो. तो एकटाच नसतो तर त्याच्यासोबत त्याचा लहान भाऊ जीत बहादूरही असतो.

नेपाळच्या पहाडी टेकड्या आणि गुलाबी थंडीत रमणाऱ्या जीत बहादूरचं मन त्या कोरड्या आणि शुष्क अशा राजस्थानच्या वाळवंटात रमेना. त्याच्या डोक्यात ते शहर सोडून पळून जाण्याचा विचार आला. त्याने लागलीच तसा प्रयत्न केला. लहान असलेल्या जीत बहादूरच्या एकच लक्षात होतं ते म्हणजे, आपण आपल्या नेपाळमधल्या घरून ट्रेनने आलोय, तर आपल्याला ट्रेननेच आपल्या घरी जाता येईल.

खरं त्याला हे माहित नव्हतं की बसायचं कोणत्या ट्रेनमध्ये. गोरखपूरच्या ट्रेनमध्ये बसायचं सोडून जीत बहादूर अहमदाबादच्या ट्रेन मध्ये बसला. ट्रेन जशी का अहमदाबादला पोहोचली, त्याला आपलं घर सापडलंच नाही. पुढं जीत रस्त्यावरच राहायला लागला. अशा परिस्थितीत राहणाऱ्या जीतची दया एका महिलेला आली. तिने जीतला आपल्या सोबत घेतलं. पुढं काही दिवसांनी या महिलेची गाठभेट नरेंद्र मोदींसोबत झाली. मोदींनी जेव्हा तिला जीतविषयी विचारलं तेव्हा तिने त्याची कर्मकहाणी सांगितली.

मोदींना पापभिरू जीतची दया आली. त्यांनी त्याला सांभाळण्याचा निर्धार केला. आणि त्याला आपला धर्मपुत्र मानलं. आता जीत मोदींचा मुलगा झाला.

मोदींनी या जीतला फक्त सांभाळलंच नाही तर त्याला चांगल्या शाळेतही घातलं. त्याला शिकवलं. पुढं कॉलेजात घातलं. आणि एमबीए करायला लावलं. १९९८ पासून सलग बारा वर्ष मोदींनी त्यांच्या या धर्मपुत्राचा सांभाळ केला. या जीतने सुद्धा मोदींचा आपले पिता म्हणून स्वीकार केला. पण त्याला अधून मधून आपल्या नेपाळी कुटुंबाची आठवण यायची. मोदींपासून जीतच्या मनची गोष्ट लपली नव्हती.

असंच २०११ मध्ये नेपाळचे एक बिजनेसमॅन विनोद चौधरी गुजरातच्या दौऱ्यावर आले होते. त्यावेळी फिक्की या कार्यक्रमाचं आयोजन अहमदाबाद मध्ये करण्यात आलं होत. आणि त्यावेळी नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री होते.

त्या कार्यक्रमात विनोद चौधरी यांनी मोदींना नेपाळला भेट देण्याचं आमंत्रण दिलं. मोदींना तात्काळ जीतचा चेहरा आठवला. त्यांनी लगेचच विनोद चौधरींना सांगितलं, की मी नेपाळचा दौरा करीन पण माझी एक अट आहे. मोदींची अट म्हटल्यावर विनोद चौधरी जरा चपापलेच. आणि मोदींना त्यांची अट सांगण्याची विनंती केली. त्यावेळी मोदी म्हटले,

माझा एक नेपाळी मुलगा आहे, म्हणजे धर्मपुत्र आहे. तो बऱ्याच वर्षांपूर्वी अहमदाबाद मध्ये हरवला होता. त्याच कुटुंब म्हणे नेपाळ मध्ये आहे. कृपया तुम्ही त्याच्या कुटुंबाला शोधू शकाल का ? जर शोधलं तर मी लगेचच नेपाळला येईन. 

विनोद चौधरी म्हटले एवढंच ना. काम झालंच म्हणून समजा. पुढे विनोद चौधरींनी नेपाळ मध्ये गेल्या गेल्या, जीत बहादूरच्या कुटुंबाचा शोध घ्यायला सुरुवात केली. अवघ्या ३० तासाच्या शोध मोहिमेत जीतच कुटुंबाचा शोध विनोद चौधरींना लागला. त्यांनी या कुटुंबाशी संपर्क साधला. चौधरींनी जीतच्या आईला विचारलं की, तुमचा कोणता मुलगा हरवला आहे का ?

त्या फोनवरच जीतच्या आईला रडू कोसळलं. तिने त्याची इत्यंभूत माहिती चौधरींना सांगितली. चौधरींनी खात्री करून घेतल्यावर, लागलीच मोदींना फोन करून सांगितलं, काम झालं आहे तुम्ही आता फक्त नेपाळला यायचा अवकाश आहे.

२०११ मध्ये जीत आणि मोदी त्याच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी नेपाळला गेले. जीतने जेव्हा त्याच्या आईला पाहिलं तेव्हा त्याच्या डोळ्यात पाणी तर आलंच पण त्याला त्याचा तो ट्रेनचा प्रवास आठवला. हा प्रसंग पाहून मोदींच्या डोळ्यात सुद्धा पाणी उभं राहीलं.

हा प्रसंग टिपण्यासाठी नेपाळी मीडिया जितच्या नेपाळमधल्या गावी गोळा झाला होता. मीडियाच्या एका प्रश्नाला उत्तर देताना जीतची आई म्हटली की, 

मी जीतची जन्मदाती आई असली तरी मोदींनी त्याचा सांभाळ केलाय. त्याला वाढवलंय, त्याला जगण्यालायक बनवलं आहे. त्यामुळे तो मोदींचाच धर्मपुत्र आहे. जीतने आपल्या मोदींविषयीच्या भावना व्यक्त करताना म्हटलं होत की, मोदी माझे सर्वस्व आहेत. त्यांनी या काळात माझी खूप काळजी घेतली आहे. त्यांच्या सारखा वडील या जगात होणे नाही.

मोदींचा फोटो सुद्धा जीत त्याच्या घरी घेऊन आला होता. आणि आज ही तो फोटो सोशल मीडियावर कधीकधी चर्चेचा विषय ठरतो. आज ही जीत मोदींना विसरलेला नाही. तो त्या फोटोची आजही अगदी तन-मन-धन अर्पून पूजा करतो.

बघा….तुम्हाला वाटत होतं, काहीतरी बंडल असणार आहे. पण असं नसतंय. माणसं वळकायला शिका ओ.  

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.