काँग्रेस अध्यक्षपदासाठी पटेलांच्या ऐवजी नेहरूंना पाठिंबा देणे ही माझी सर्वात मोठी चूक ठरली.
भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद. स्वातंत्र्य चळवळीतील एक मोठं नाव. हिंदू -मुस्लिम ऐक्य, त्यांचे शैक्षणिक कार्य यासाठी त्यांचं नाव अग्रक्रमाने घेतले जाते. सोबतच अगदी कमी वयात काँग्रेसचे पहिल्या फळीतील नेते म्हणून मिळवलेली ओळख.
वयाच्या अवघ्या ३५ व्या ते काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष झाले होते. त्यांच्या शब्दाला पक्षांसोबतच संपूर्ण देशात आदर होता. १९४० मध्ये झालेल्या रामगढच्या अधिवेशनात काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून निवडले होते. पुढे दुसरे महायुद्ध, भारत छोडो आंदोलन, आणि बऱ्यापैकी काँग्रेसचे मोठे नेते जेलमध्ये अश्या विविध कारणांनी आझाद एप्रिल १९४६ पर्यंत अध्यक्ष म्हणून पदावर होते.
अध्यक्ष पदावरून दूर झाल्यानंतर त्यांनी घेतलेल्या एक निर्णयाला ते आपल्या आयुष्यातील सर्वात मोठी आणि न सुधारता येणारी चूक मानतात. आपल्या ‘इंडिया विन्स फ्रिडम’ या आत्मकतेमध्ये (जी १९५९ मध्ये त्यांच्या मृत्यूनंतर प्रकाशित झाली होती) त्यांनी आपली चूक काय होती हे सांगितलं आहे.
तीच संपूर्ण घटना काय होती हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहे.
दुसरे महायुद्ध संपले तोपर्यंत भारताला स्वातंत्र्य मिळणार हे स्पष्ट झाले होते, आणि सोबतच हे देखील स्पष्ट झाले होते की, काँग्रेस अध्यक्षांना केंद्रात अंतरिम सरकार बनवण्यासाठी आमंत्रण मिळणार आहे. कारण १९४६ च्या केंद्रीय असेम्ब्लीमध्ये आवश्यकतेपेक्षा काँग्रेसने जास्त जागा जिंकल्या होत्या.
त्याच दरम्यान काँग्रेस अध्यक्षपदासाठी निवडणूक जाहीर झाली. तेव्हा मौलाना आझाद यांनी पुन्हा निवडणूक लढवण्यासाठीची इच्छा व्यक्त केली. त्यांनी आपल्या आत्मकथेमध्ये लिहिलेले आहे की,
काँग्रेसमध्ये नवीन निवडणूक घेऊन नवीन अध्यक्ष निवडला जावा असा मुद्दा उपस्थित होत होता. जशी या संबंधित माहिती वृत्तपत्रांमधून आली तेव्हा, सगळीकडून मला अध्यक्ष म्हणून दुसरा कार्यकाळ मिळावा अशी मागणी होत होती.
या गोष्टीने ‘आझाद यांचे जवळचे मित्र आणि सहकारी जवाहरलाल नेहरू यांना मात्र चांगलेच काळजीत टाकले होते. त्यांची देखील अध्यक्षपदासाठी एक सुप्त इच्छा होती.
पुढे २० एप्रिल १९४६ मध्ये गांधीजींनी नेहरूंच्या पारड्यात आपलं मत टाकलं. पण त्याचवेळी काँग्रेसमधील एक मोठा गट सरदार वल्लभभाई पटेल यांना काँग्रेस अध्यक्ष बनवू इच्छित होता. त्यावेळी केवळ प्रदेश काँग्रेसची समितीच पक्षाच्या अध्यक्षांना नामनिर्देश आणि निवड करू शकत होती.
अध्यक्षपदासाठी अर्ज भरण्याची शेवटची तारीख होती २९ एप्रिल १९४६ होती.
काँग्रेस पक्षाच्या जुन्या कागदपत्रांनुसार गांधीजींनी आपलं मत जाहीर केलं होत, पण त्यानंतर देखील १५ पैकी १२ प्रदेश काँग्रेस समितीने पटेल यांना पक्षाध्यक्ष म्हणून निर्देशित केलं होतं. बाकी तीन समित्यांनी या निवड प्रक्रियेत भाग घेतला नव्हता. याचा अर्थ सरळ होता की, प्रदेश काँग्रेस समिती नेहरूंना निवडू इच्छित नव्हती. आणि ज्या सदस्यांची नेहरू अध्यक्ष व्हावे अशी इच्छा होती त्यांना निवडीचा अधिकार नव्हता.
यानंतर नेहरूंसाठी आपलं नाव मागं घ्यावं यासाठी पटेल यांची मनधरणी करण्यास सुरुवात झाली. हे जेव्हा गांधींजींच्या कानावर ही गोष्ट गेली तेव्हा त्यांनी देखील पटेल यांना आपलं नाव मागे घेण्यास सांगितले. त्यावेळी डॉ. राजेंद्रप्रसाद यांनी खेद व्यक्त करत म्हणाले,
“गांधीजीने एक बार फिर ‘चमकदमक वाले नेहरू’ की खातिर अपने भरोसेमंद सिपाही को त्याग दिया है’’.
सोबतच त्यांनी नेहरू इंग्रजांच्या परंपरांवर चालणार अशी देखील शंका व्यक्त केली. त्यावेळी खरंतर राजेंद्र प्रसाद यांचा इशारा १९२९, १९३७, १९४६ यावेळी देखील नेहरूंच्यासाठी पटेल यांना अध्यक्षपदापासून वंचित ठेवण्यात आलं. ते देखील प्रत्येक वेळी अखेरच्या क्षणी.
पटेल यांनी दुसऱ्या नंबरवर राहणं पसंत केलं. कारण दोन होती. एक तर पटेलांसाठी पद महत्वाचं नव्हतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांना भीती होती की, नेहरूंना जर हे पद मिळाले नाही तर ते विरोधत देखील जातील. या परिस्थितीला टाळण्यासाठी त्यांनी आपला पाय मागे घेतला.
त्याच दरम्यान मौलाना आझाद यांनी अर्ज भरण्याच्या अंतिम तारखेच्या तीन दिवस आधी म्हणजे, २६ एप्रिल १९४६ रोजी, आपला पाठिंबा नेहरूंना घोषित केला.
ते यासंबंधात आपल्या आत्मकथेत लिहितात,
सगळ्या बाजूंचा सारासार विचार करून मी या निर्णयांपर्यंत पोहचलो होतो की, सद्य परिस्थितीमध्ये सरदार पटेल यांची निवड योग्य राहणार नाही. अनेक तथ्यांचा अभ्यास करून मला वाटत होत की, नेहरूंनी अध्यक्ष बनायला पाहिजे. त्यामुळे मी माझ्या सगळ्यात चांगल्या निर्णयानुसार काम केलं.
पण त्यानंतर जी परिस्थिती निर्माण झाली, त्यामुळे मला जाणवलं की, मी अध्यक्षपदासाठी नेहरूंना पाठिंबा देऊन चूक केली. सरदार पटेल यांना पाठिंबा न देणं ही माझ्या राजकीय आयुष्यातील सगळ्यात मोठी चूक होती. त्यांनी ती चूक कधीच केली नसती जी जवाहरलाल नेहरूंनी केली.
त्यामुळे मी हा विचार करतो की, मी जर ही चूक केली नसती तर मागच्या १० वर्षांचा इतिहास काही तरी वेगळा असता. तेव्हा मला वाट की मी स्वतःला त्यासाठी कधीच माफ करू शकणार नाही.
नेहरूंच्या प्रति सहानुभूती असणारे माइकल ब्रेखर लिहितात,
अध्यक्ष पद प्रत्येक वेळी बदलण्याच्या परंपरेनुसार तेव्हा संधी पटेलांची होती. त्यांना काँग्रेसच्या कराची अधिवेशनात अध्यक्ष होऊन त्यावेळी पर्यंत १५ वर्षांचा कालखंड लोटला होता. त्या दरम्यान नेहरू १९३६ मध्ये लखनऊ, आणि १९३७ मध्ये फिरोजपूर मध्ये अध्यक्ष झाले होते.
एवढेच नाही तर, पटेल यांना जास्तीत जास्त काँग्रेस समित्यांनी आपली पसंती दर्शवली होती. नेहरू गांधीजींच्या हस्तक्षेपामुळे अध्यक्ष म्हणून निवडले गेले. जर गांधीजींनी हस्तक्षेप केला नसता तर १९४६-४७ मध्ये पक्षाचे अध्यक्ष आणि खरेतर पहिले पंतप्रधान हे पटेलच असते.
हे हि वाच भिडू.
- संसदेच्या आवारात एका महिलेने थेट नेहरूंची कॉलर पकडून जाब विचारला होता, अन् आत्ता
- गांधी, पटेल, नेहरू, आंबेडकर हे सर्वजण वकील होते, इतिहासातील महिला वकील आठवतेय का?
- पुण्यात औषध निर्मितीचा कारखाना काढून नेहरूंनीच खऱ्या अर्थाने आत्मनिर्भर भारत उभा केला