शेती आणि मातीचा विषय वर्तमानपत्राच्या पहिल्या पानावर आणणारा पत्रकार म्हणजे मुकुंदराव

एका छोट्याशा गावातून एक पोरगा उठतो. जेमतेम २ वर्षे शाळा शिकलेला पोरगा – धर्माच्या व रुढीच्या बेड्या झुगारून उभा राहतो. स्वतःच्या बळावर शिकतो, वाचतो आणि आपल्या ग्रामीण भागातील लोकांसाठी ५७ वर्षे सलग पेपर चालवतो.

आधुनिक भारतातील पहिले ग्रामीण नियतकालिक चालवण्याचा मानही त्यांनाच जातो.

सावित्रीमाऊलीचं चरित्र लिहिणारे प्रा. जी. ए. उगले म्हणाले होते,

तरवडी (ता. नेवासे) सारख्या गावातून सत्यशोधकी पत्रकारिता करणारे आद्य ग्रामीण पत्रकार मुकुंदराव पाटील विसाव्या शतकातील प्रती महात्मा फुले आहेत

फक्त दुसरी इयत्ता शिकलेला हा माणूस भारतात ग्रामीण पत्रकारितेची पायाभरणी करणारा माणूस होता. आपली सगळी विद्या आणि कौशल्ये त्यांनी स्वतःच्या बळावर सेल्फ लर्निंगनं मिळवली होती. शेतकऱ्यांच्या हक्कांना वाचा फोडणारा आणि समाजाच्या रूढींना हादरे देणारा लेखक होता.

शेतीचा इतिहास लिहून त्यांनी शेती देशोधडीला लागायची कारणं शोधली.

शेतकऱ्यांची स्थिती काँग्रेसच्या राजकारणाने सुधारणार नाही हे ओळखून त्यांनी शेतीप्रश्नाचा सविस्तर अभ्यास केला. त्यामुळं त्यांना ग्रामीण बहुजनांचा सिग्नेचर पत्रकार म्हणूनच ओळखलं जातं.

सत्यशोधक समाजात सगळ्यात नाद काम करून देश हादरवून टाकणाऱ्या आणि इंग्लंडच्या राजपुत्राची चौकात चव काढणाऱ्या कृष्णराव भालेकरांचा हा दुसरा पोरगा. जन्म २० डिसेंम्बर १८८५.

त्यांच्या बहिणीला काशीबाई सखाराम क्षीरसागर पाटील यांचा एकुलता एक पोरगा गणपतराव पाटील. वयाच्या २७ व्या वर्षी त्यांचं निधन झालं. यांना मुलबाळ नव्हतं. आपल्या बहिणीला आधार म्हणून कृष्णराव भालेकरांनी ७ ऑगस्ट १८९३ रोजी आपल्या सात वर्षाच्या पोराला तिच्या पदरात दिलं.

मुकुंदराव भालेकर आता मुकुंदराव पाटील झाले.

१९०६ साली अहमदनगरला नवीन थेटर बांधायचं काम सुरू होतं. बागडे नावाच्या या थेटरचं बांधकाम मुकुंदराव बघत होते. त्यामुळं नगर भागात त्यांचं राहणं झालं. वाचायच्या आवडीमुळं त्यांची ओळख रेव्हरंड टिळक आणि बालकवी ठोंबरे यांच्याशी झाली.

तेव्हा त्यांनी घरच्या घरी इंग्लिश लिहायचा आणि वाचायचा सराव सुरू केला. या कामाची त्यांना इतकी सवय झाली होती की “रोज काहीतरी लिहिल्या आणि वाचल्याशिवाय मला चैनच पडत नाही” असं त्यांनी एकाला पत्रात लिहिलं आहे.

इथंच त्यांची भेट मँचेस्टर युनिव्हर्सिटी रिटर्न मराठा समाजातील दलितांसाठी काम करणाऱ्या महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्याशी झाली.

सत्यशोधक समाजाची अनेक मुखपत्रे फुलेंच्या काळात सुरू होती. पण नंतरच्या काळात ही पत्रे हळूहळू बंद पडत गेली. मुकुंदरावांना गावातील लोकांच्या जनजागृतीसाठी पत्राची गरज होती. दीनमित्र म्हणजे गरिबांचा दोस्त या नावाचा पेपर सुरू होता. हे पत्र नंतर काळाच्या ओघात बंद झाले.

मुकुंदरावांनी वयाच्या २५ व्या वर्षी २३ नोव्हेंबर १९१० रोजी हा पेपर पुन्हा पुनरुज्जीवित केला. त्यांनी वडिलांना हे पत्र किमान १२ वर्षे चालवण्याचे आश्वासन दिले होते.

पण पुढची साठ वर्षे पेन हातात धरायला जमत होता तोपर्यंत त्यांनी दीनमित्र कोणताही गॅप न पडू देता प्रकाशित केला.

आपल्या लेखनातून त्यांनी ग्रामीण भागातील माणसाच्या प्रश्नांना वाचा फोडली. त्या काळची सगळी पत्रे-नेते-परिषदा-ठराव तद्दन शहरी असत. एकाच शहरात ४० किलोमीटर अंतरात लोकांचे क्रांती आणि राजकारण असे उद्योग चालत. आपल्याला वाटतं तेच समाजाचं मागणं आहे आणि आपणच समाजाचे नेते आहोत असा थाट या लोकांचा असायचा. अशा शहरी लोकांना आपली पातळी दाखवण्यात दीनमित्र अग्रेसर होता.

केसरीसारख्या देशभरात गाजावाजा असणाऱ्या पेपरमधल्या चुका, फाजील विधाने यांचा समाचार ते “सारासार विचार” या आपल्या सदरात घेत असत.

एकदा केसरीने लोकमान्य टिळक संपादक असताना ४ जुलै १९१७ च्या अंकात दादाभाई नौरोजी यांचे निधन झाल्याची बातमी छापली.

त्याबरोबर एक मोठा श्रद्धांजलीचा लेखही छापला.

नौरोजी इंग्लंडमध्ये निवडणूक लढवून खासदार झाले होते, त्यामुळं त्यांच्यावर लोकांचा जीव होता. पुण्यात अचानक शोककळा पसरली. पण दादाभाई नौरोजी जिवंत आहेत हे समजून घेण्याची तसदीही पुण्यातल्या जागरूक नागरिकांनी घेतली नाही.

शेवटी दीनमित्रने तेव्हा या फेक न्यूजचा समाचार घेतला. “केसरी पत्र आणि त्यातील मजकूर ब्रह्मदेवांची लेखणी समजणाऱ्यानी ही घोडचूक पाहून सावध व्हावे” असा टोला लावला. टिळकांच्या राजकारणावर त्यांनी मुद्देसूद आणि ग्रामीण शेतकऱ्याच्या दृष्टीने विचार करत वेळोवेळी टीका केली.

“चातुर्वण्याची पुन्हा स्थापना झाली पाहिजे असे म्हणणारे राष्ट्रउन्नतीच्या कार्यास कवडीच्याही उपयोगाचे नाहीत” असं म्हणण्याचं धाडस करणारे समग्र भारतातील ते एकमेव संपादक असावेत.

कराडला १९२० च्या न्यू इयरला सत्यशोधक समाजाची नववी परिषद भरली.

त्याचे अध्यक्षस्थान मुकुंदराव पाटलांना देण्यात आले होते. शाहू महाराजांनी त्यांना या कामी मोलाची मदत केली. आपल्या कामात मोठ्या माणसांना नेहमी सहभागी करून त्यांच्या मदतीनं आणि सहकार्याने लोकांचं कल्याण साधण्याची ही हातोटी सत्यशोधक समाजाची खासियत होती.

१९२४ साली ब्रिटिश सरकारने त्यांच्या कामाचं महत्व ओळखून त्यांना रावसाहेब ‘किताब दिला. गांधीजींच्या राजकारणाशी ते सहमत नव्हते. तरीही गांधीजींची हत्या झाल्यानंतर त्यांनी या किताबाचा त्याग केला आणि आपली रावसाहेब उपाधी ब्रिटनला पाठवून दिली.

ते शहरातील तज्ञ, ज्येष्ठ जाणकार आणि विश्लेषक बनून राहिले नाहीत. त्यांनी शेतकऱ्यांची जागृती करण्यासाठी गावागावात जाऊन प्रयत्न केले.

१५ मार्च १९२५ साली महार परिषद पाथर्डी येथे भरली. त्याचे अध्यक्षपद मुकुंदरावांना देण्यात आले. त्यात त्यांनी फक्त शिक्षण या गोष्टीवर जोर दिला. मंदिर प्रवेश आणि सत्याग्रह असल्या मार्गांनी अस्पृश्यांचे कल्याण होणार नाही अशी त्यांची स्पष्ट भूमिका होती.

१९२६ सालची भिल्ल परिषद तसेच १९२५ साली तरवडी येथे मातंग परिषद त्यांनी भरवली. यातून शिक्षणाचा प्रसार आणि आर्थिक स्वावलंबन एवढे एकमात्र उद्दिष्ट त्यांनी ठेवलं होतं.

त्यांनी रूढी पाळत देवळा-बामनांना दान देणारा शेतकरी पाहिला आणि पहिला शोषण करणारा म्हणून त्याविरुद्ध आवाज उठवला. त्यांच्या लिखाणात उगाच उरबडवेगिरी नव्हती. विनोदबुद्धी वापरून सुम्बडीत काटा काढायचं कसब त्यांच्या लेखणीला साधलं होतं.

आपल्या धारदार पण फिरकी घेणाऱ्या लिखाणातून त्यांनी असे उद्योग करणाऱ्या लोकांची बिनपाण्याने केली. त्याचबरोबर मराठा जातीच्या पुढाऱ्यांनी फक्त ब्राह्मणविरोधासाठी सत्यशोधक समाजाचा वापर करू पाहिला.

त्यावेळी त्यांचाही समाचार मुकुंदरावांनी घेतला.“आपल्या जातीतील दोष जो परखडपणे सांगतो तोच खरा सत्यशोधक” अशी भूमिका त्यांनी घेतली.  

शेतकऱ्यांच्या विकासासाठी त्यांनी सात उपाय सुचवले. यालाच मुकुंदरावांची सप्तसूत्री म्हंटलं जातं. याच्यात शेतकऱ्यांची स्थिती सुधरायची असल तर त्यांनी काय केलं पाहिजे याचा वस्तुपाठ आहे.
शेतकरी संघटनेपासून ते आद्य शेतकरी नेत्यांनी केलेल्या मागण्या आणि काढलेल्या योजना या सगळ्यांची बीजे त्यांच्या लेखनात सापडतात.

शेतकऱ्यांच्या पोरांचं शिक्षण आणि शेतकऱ्यांची एकजूट हे त्यातले सगळ्यात मेन मुद्दे होते.

आज बलुतेदारी आणि त्या व्यवस्थेचे गुण गाणारे मोठे लोकं, साहित्यिक भेटतात. या माणसानं त्या काळात “बलुतेदारी पद्धत मुळातच चुकीची आहे. प्रत्येक जातीच्या माणसाला वडिलोपार्जित कामं सोडून आपल्या आवडीचा व्यवसाय करण्याचे स्वातंत्र्य मिळाले पाहिजे. सगळ्या जातीतील मुलांना शिक्षण देऊन कमी कष्टात जास्त उत्पादन कसे मिळते हे प्रशिक्षण दिलं पाहिजे” असं मत मांडलं.
माणूस हा प्राणी काबाडकष्ट करण्यासाठी नसतो तर आपल्या बुद्धिमत्ता आणि कल्पकतेनं निसर्गाला आपल्यासाठी काम करायला लावतो हीच मांडणी ते करतात. लोखंडाचा फाळ नांगराला लावल्यावर जमीन कोपते अशी अंधश्रद्धा शेतकऱ्यांच्यात पसरली होती. आपल्या आज्यापंज्याने केलं तर बरोब्बरच असणार असं शेतकरी म्हणायचे.
अशा लोकांना,
“ज्या आज्याला सत्यनारायण माहीत नव्हता त्याचा पोरगा वडिलांची चाल सोडून सत्यनारायण का घालतो?”
असा खडा सवाल त्यांनी आपल्या लेखनातून केला.
शेतकऱ्यांसाठी लिहिणारे आणि इंग्रजीत थयथयाट करणारे एनजीओवाले लय पत्रकार आपल्या ओळखीत आहेत. पण इतका क्रांतिकारी विचार मांडून तेवढ्याच ताकदीचं काम ग्राउंडवर करणारा दुसरा पत्रकार निपजल्याचे आमच्या बघण्यात नाही. जातीपाती तोडण्यापासून ते आर्थिक सक्षमीकरण करण्यापर्यंत सगळ्या विचारांची पाळंमुळं मुकुंदरावांच्या भूमिकेत आढळतात.
काळाच्या कितीतरी पुढं असणाऱ्या सत्यशोधक माणसांना आपण सिरियसली घेतलं नाही म्हणून आपण अजून याच मुद्द्यांवर चाचपडत बसलो आहोत.

हे ही वाच भिडू

1 Comment
  1. vughnesh says

    urbadvegiri mhanje ka???

Leave A Reply

Your email address will not be published.