मुंबई बंदच्या वेळी बाळासाहेबांनी लोकल चालकाला कानफटात दिली.
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची धडाडती तोफ म्हणजे मराठी माणसाचा आवाज. बाळासाहेब ठाकरेंच्यावर जनता इतकी प्रेम करायची की त्यांच्या एका इशाऱ्यावर वेगाने धावणाऱ्या मुंबईची चक्रे एका क्षणात स्तब्ध व्हायची. बाळासाहेब ठाकरे यांचा दरारा इतका प्रचंड होता.
बाळासाहेबांचा शब्द म्हणजे शिवसैनिकांसाठी ब्रम्ह वाक्य असायचं. त्यांच्यासाठी प्राण देखील पणाला लावायला शिवसैनिक मागे पुढे पाहायचे नाहीत. जनतेच्या प्रशांसाठी प्रसंगी रस्त्यावर उतरून राडा करण्यात ते आघाडीवर असायचे. यामुळेच गैरसोय होत असूनही मुंबई बंद असताना जनता शिवसेनेच्या पाठीशी उभी राहायची.
ऐंशीच्या दशकातील गोष्ट….
देशभरात खलिस्तानवाद्यांचा मोठा गोंधळ सुरु होता. पंजाब मधल्या या कट्टरवाद्यांनी वेगळा देश हवा म्हणून हालचाली चालू केल्या होत्या. पंजाब राज्यात मात्र हा संघर्ष इतका टोकाला गेला होता कि, पंजाबमध्ये शाळेतील लहान मुलांच्या बसमधून मुलांना खाली उतरून खालिस्तान वाद्यांनी गोळ्या झाडल्या होत्या.
या घटनेने मात्र संपूर्ण भारत पेटला होता.
सगळीकडे नुसता हाहाकार माजला होता. सगळे राजकीय पक्ष याबाबत सक्रीय झाले. त्या दरम्यान हिंदुह्रदयस सम्राटमाननीय बाळासाहेब ठाकरे यांनी आणि भारतीय जनता पक्षाने वतीने संपूर्ण भारत बंदचे आव्हान करण्यात आले. बाळासाहेबांनी बंद चे आवाहन केले म्हणजे सर्वांनीच त्याला हाक द्यायची असंच ठरलेलं असायचं.
सेनेच्या सोबत भाजपने देखील आपल्या कार्यकर्त्यांसहित लोकांना देखील या बंद मध्ये सहभागी करून घेतलं होतं. तर त्यावेळचे सेनेचे नेते म्हणजे, मोहनशेठ व मुलुंडचे शिशिर शिंदे, भाजपच्या जयवंतीबेन मेहता या स्थानिक नेत्यांनी मुलुंडमध्ये रेल रोको आंदोलन केले होते.
पण त्याआधी असं घडलं कि,
आंदोलकांपैकी एका नेत्याने लोकल ट्रेनच्या खाली घुसून एम आर कॉक व इतर प्रेशर कॉक बंद केले आणि म्हणून गाडी तेथे ठप्प झाली व मुंबई लोकल बंद झाली.
काही वेळासाठी रेल्वे थांबली. हि बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि ट्रेन ला रोखण्यासाठी हजारोचा जमाव जमला होता. आणि तेवढ्यात अचानकच मुलुंड रेल्वे स्थानकात चार नंबर प्लॅटफॉर्म वर तिथे बाळासाहेब ठाकरे देखील पोहचले.
ताबडतोब शिवसैनिकांनी माईकची व्यवस्था केली. आणि बाळासाहेबांनी माईक हातात घेतला व भाषणाला सुरुवात केली. शिवसैनिक अंगात प्राण आणून बाळासाहेबांचे भाषण ऐकत असायचे. प्लॅटफॉर्मवर आणि रुळावर आणखीनच गर्दी वाढायला लागली.
तेवढ्यात अचानक ठाण्याकडून एक भरधाव वेगाने मेल मुलुंडच्या दिशेने येऊ लागला.
सगळीकडेच गोंधळ उडाला. धावपळ चालू झाली, हाहाकार उडाला. रेल्वे रुळावर उभे असलेले हजारो नागरिक मागे सरकले आणि मेल गाडीचे आठ ते दहा डबे प्लॅटफॉर्मच्या पुढे जाऊनच गाडी थांबली.
सुदैवाने आंदोलनकर्त्यांचा जीव वाचला पण सगळे रागाच्या भरात त्यांनी सापडतील ते दगड गाडीवर फेकण्यास सुरुवात केली.
त्याच ठिकाणी बाळासाहेब देखील बाजूलाच उभे होते. सगळीकडे पळापळ आणि दगडफेक चालू होती. सेना नेते मोहनशेठ यांनी स्वतः बाळासाहेबांचा हात पकडून बाळासाहेबांना स्टेशनमध्येच सुरक्षित स्थळी नेले.
काय चालू आहे हे कुणालाच कळेनासं झालं, आक्रमक लोकांपुढे इतर नागरिक घाबरून गेले. चालू असलेले दृश्य सर्वांच्याच हृदयाचा थरकाप उडाला होते.
बाळासाहेबांचं टेन्शन होतं कि, नागरिकांना काहीही होऊ नये. गाडी थांबली आणि आक्रमक नेते ही थांबले. पण कार्यकर्त्यांनी ड्रायव्हरला पकडून बाळासाहेबांकडे आणले. बाळासाहेबांनी रागाच्या भरात त्या ड्रायव्हरच्या कानाखाली वाजविली.
त्या मुळे नावाच्या ड्रायव्हरने बाळासाहेबांना विनंती करू लागला. त्याने मी देखील एक मराठी माणूस आहे. ठाणे-मुलुंड रुळावरून येतांना मला सिग्नल दिसलाच नाही. पण नंतर शांत झालेल्या बाळासाहेबांनी त्या ड्रायव्हरला मुलुंड पूर्वे कडील शाखेच्या पोलिसांच्या हवाली केले. आणि नंतर मेल ट्रेन मधील प्रवाशांना आणि खाली गर्दी केलेल्या नागरिकांना बाळासाहेबांनी पाणी द्या व त्यांची सुरक्षा करा असे आव्हान केले.
सन्दर्भ: मी जवळून पाहिलेले बाळासाहेब – मोहन हिरालाल बडगुजर.
हे हि वाच भिडू :
- बाळासाहेब म्हणाले, अमिताभला माझा रोल जमलाय का?
- बाळासाहेबांनी एकेकाळी रामदास कदमांच्या मतदारसंघासाठी गडकरींकडे शब्द टाकला होता.
- सगळ्यात गाजलेल्या हार्ट स्पेशालिस्टला पण बाळासाहेबांच्या ऑपरेशनवेळी भीती वाटलेली.
- एकदा चक्क संजय राऊत आणि बाळासाहेब ठाकरे यांच्यात जोरदार वाद झाला होता.