काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या जागेवर अदानींनी मुंद्रा बंदर उभं केलं…
परवा परवा बातमी आली कि गुजरातच्या कच्छमधल्या मुंद्रा बंदरामध्ये हेरॉईनची आतापर्यंतची सर्वात मोठी तस्करी जप्त करण्यात आली. अफगाणिस्तानमधून आयात करण्यात आलेलं तब्बल ३ टन हेरॉईन हे जवळपास २१ हजार कोटी रुपयांचं असल्याचं बोललं जातंय. आणि विशेष म्हणजे या बंदराचे संपूर्ण व्यवस्थापन अदानी समूहाकडे आहे. तेव्हापासूनच हे औद्योगिक बंदर चांगलचं चर्चेत आलं आहे.
मात्र अगदी सुरुवातीला जेव्हा हे बंदर अदानी उद्योग समूहाला मिळाले तेव्हा ते मिठाच्या उत्पादनासाठी मिळाले होते. त्याला अदानी यांनी औद्योगिक बंदर म्हणून विकसित केले.
या गोष्टीची सुरूवात होते ८० च्या दशकामधील. वडिलांना बिझनेसमध्ये मदत न करता शिक्षण अर्ध्यात सोडून गौतम अदानी यांनी मुंबई गाठली. यावेळी त्यांचे वय १८ वर्षे होते. याकाळात ते लोकलमध्ये काही छोट्या वस्तूंची विक्री करायचे. पुढे हिर्याच्या व्यवसायात उतरले. वयाच्या अवघ्या २० वर्षी अदानींनी मुंबईत स्वत:चा डायमंड ब्रोकरेजचा बिझनेस सुरु केला होता.
पण पुढे आपल्या मोठ्या भावाच्या आग्रहावरून गौतम अदानी पुन्हा गांधीधामला परत आले. तिथे त्यांनी प्लास्टिक फॅक्टरीत काम करायला सुरुवात केली. पण त्या व्यवसायावर खूप मर्यादा होत्या. त्यावेळी अदानींना महिन्याला २० टन पीव्हीसीची गरज होती. पण त्यावेळी भारताचं पेट्रोकेमिकल महामंडळ हे पीव्हीसीचं एकमेव निर्यातदार होते आणि ते एकावेळी केवळ २ टनापर्यंतच निर्यात करत होते.
अदानी यांनी इथली संधी ओळखली आणि १९८८ मध्ये कंदालामार्गे स्वतः प्लॅस्टिकच्या आयातीला सुरूवात केली. ‘कुछ नया करते हैं’ असं सातत्यानं म्हणत गौतम अदानी आव्हान स्विकारायचे आणि यशस्वी पण करायचे. अदानी यांच्या या उद्योगामुळे ते अल्पावधीतच प्रसिद्ध झाले. नेते मंडळी, राजकारणी लोकांच्यासोबत उठ-बसं सुरु झाली.
विशेषतः त्यावेळी ते काँग्रेसचे तेव्हाचे दिग्गज नेते चिमणभाई पटेल आणि केशूभाई पटेल यांच्याशी जवळीक वाढली.
याकाळात गौतम अदानी यांना पायाभूत सुविधा उभारणी उद्योगात पडण्याची महत्त्वाकांक्षा तयार झाली. त्यांनी बंदर उभारणीचा बराचं अभ्यास केला. योगायोगाने त्यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री चिमणभाई पटेल होते आणि त्यांच्याकडे बंदर हे खात होते. अदानी यांनी त्यावेळी चिमणभाईंकडे गुजरातमधलं मुंद्रा बंदर विकसित करण्याचा प्रस्ताव ठेवला.
मुंद्रा वाळवंटी भागातलं बंदर आहे. तिथून पाकिस्तानची बॉर्डर जवळ आहे. या वस्तुस्थितीची जाणीव चिमणभाईंनी गौतम अदानी यांना करून दिली. मात्र त्यानंतर देखील अदानी या बंदराच्या विकासावर ठाम होते. चिमणभाई यांनी देखील गुजरातचा विकासा डोळ्यासमोर ठेऊन अदानी यांच्या प्रस्तावाचा विचार केला.
अखेरीस १९९१-९२ साली चिमणभाई पटेल सरकारने कच्छ किनारपट्टी जवळील ३ हजार एकर जमीन अदानी आणि शेती उद्योग करत असलेल्या कारगिल समूह यांना संयुक्तरित्या मिठाच्या उत्पादनासाठी देऊ केली.
मात्र त्याच वेळी तिथं कामगारे नेते जॉर्ज फर्नाडिस यांचा एक संप झाला आणि या प्रकल्पामधून कारगिलने माघार घेतली. अदानी मात्र प्रकल्पावर कायम राहिले. ते आधीच मुंबई आणि कंदाला या बंदरामध्ये होत असलेल्या विलंबामुळे काहीसे वैतागले होते. परिणामी त्यांना ८ ते १० कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागत होता. पण तरीही ते या प्रकल्पासाठी ठाम होते.
मात्र ७ ते ८ वर्ष झाली तरी काहीच मार्ग निघत नव्हता. अखेरीस अदानी यांनी मुंद्रा बंदराला खाजगी बंदर म्हणून विकसित करण्याचा विचार केला.
बंदराच्या खाजगीकरणाला सुरुवात झाली आणि १९९८ ला मुंद्रा बंदरावरून पाहिलं जहाज रवाना झाला. पहिले ३ वर्ष तर या बंदराला विशेष प्रतिसाद मिळाला नाही. याच दरम्यानच्या काळात अंबानी देखील या उद्योगात उतरले. पुढे २००० नंतर मात्र या बंदराने विकासाची गती पकडली. पुढच्या १० वर्षांमध्ये म्हणजे २००९-१० मध्ये बंदरावरून मालाची आवक-जावक तब्बल १७३ कोटी रुपयांवर पोहोचली होती. २०११-१२ मध्ये हा आकडा २२४ कोटी रुपयांचा होता.
थोडक्यात अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत गौतम अदानी यांनी शिवधनुष्य पेललं. आज २३ वर्षानंतर हजारो एकरावरचं जमिनीवरचं हे बंदर देशातलं सर्वांत मोठं आणि अद्ययावत बंदर आहे. बिझनेसचा दांडगा अनुभव घेतल्यानंतर अदानींनी १९९६ मध्ये अडानी ग्रुपची स्थापना केली. सुरुवातीला त्यांची कंपनी पॉवर व एग्रीकल्चर कमोडिटीजच्या क्षेत्रात काम करत होती. आज जवळपास प्रत्येक पायाभूत विकासाच्या क्षेत्रात अदानी ग्रुप कार्यरत आहे.
हे हि वाच भिडू
- गौतम अदानींच्या या एका अफवेमुळे, NDTV चे शेअर्सचे भाव अचानक १० टक्क्यांनी वाढले.
- पवारांच्या सभेतल्या एका भाषणामुळे गौतम अदानींनी तिरोड्यात पॉवर प्रोजेक्ट बनवला..
- आज त्याचा बॉडीगार्ड पण करोडपती असला तरी बच्चनने एकेकाळी कोळसा खाणीत काम केलंय