उत्तरेतल्या या मंदिराच्या उभारणीमध्ये मराठ्यांना दिलेल्या शापाची दंतकथा सांगितली जाते
प्रयागराज शहर नेहमीच चर्चित असणार भाग, मग तो राजकीय दृष्ट्या असो किंवा आपल्या भौगोलिक स्थानामुळं असो. अगदी मुघल आणि अवधच्या नवाबांपासून इंग्रजांपर्यंत सर्वांनी प्रयागराजला विशेष महत्त्व दिलंय. यामागचं कारण म्हणजे उत्तर भारताच्या बरोबर मध्यभागी असल्यानं इथून बाकीच्या ठिकाणांवर नियंत्रित करणं सोपे व्हायचं.
त्यामुळे सत्तेसाठी प्रत्येकाचाच इच्छा होती कि,प्रयागराज आपल्या ताब्यात असावं. ज्यात मुघल, नवाबांसोबत मराठ्यांचाही समावेश होता. मराठ्यांच्या प्रयागराजशी असलेल्या नातेसंबंधाच्या कथाही इतिहासात नोंदवलेल्या आहे.
तर तो काळ होता १७३९चा, जेव्हा सआदत अली खानने १७३२ मध्ये मुघलांच्या अधिकाराला झुगारून अवधमध्ये आपली स्वतंत्र सत्ता स्थापन केली होती. औरंगजेबाला जाऊन ३० वर्षांपेक्षा जास्त काळ लोटला होता, त्यामुळे मुघल साम्राज्य पार डबघाईला आलं होत. या दरम्यान मराठा साम्राज्याची भरभराट होत होती. उत्तरेचा ताबा घेऊन संपूर्ण हिंदुस्तानांत मराठा साम्राज्य उभारण्याच्या रणनीतीवर काम सुरु होत.
यामागे धार्मिक दृष्टिकोन सुद्धा होता. काशी, प्रयाग, मथुरा या प्रमुख धार्मिक स्थळांसह परिसर ताब्यात घेऊन हिंदुत्वाचे सर्वोच्च प्रतिनिधी म्हणून प्रस्थापित करण्याचे स्वप्न मराठ्यांचे होते. हा उद्देश पूर्ण करण्यासाठी नागपूरचे शासक राघोजी भोसले यांनी १७३९ मध्ये अलाहाबादवर हल्ला केला.
असं म्हंटल जात कि, त्या काळात अवधचा शासक नवाब वझीर यांचे प्रतिनिधी म्हणून शुजा खानकडे अलाहाबाद प्रांताची जबाबदारी होती. बुंदेलखंडमार्गे अलाहाबादला पोहोचलेल्या मराठ्यांना रोखण्याचा शुजाखानने पुरेपूर प्रयत्न केला पण त्याला यश आले नाही. शुजाखान मारला गेला आणि राघोजींच्या डोक्यावर विजयाचा मुकुट चढला.
आता राघोजींच्या या सत्तेबाबत अनेक दंतकथा प्रसिद्ध आहेत, त्यातलीच एक अशी कि,
अलाहाबादचा विजय मिळविल्यानंतर मराठा सैनिकांचं जरा नियंत्रण डगमगलं, काही सरदारांनी आपला मनमानी कारभार करायला सुरुवात केली. असं म्हंटल जात कि, या पौराणिक शहराची प्रचंड लूट झाली. जीवितहानीही झाल्याचे बोलले जाते.
या छळाला अलाहाबाद नागरिक कंटाळले होते, दु:खी झालेल्या या लोकांनी राघोजी भोसले यांना भयंकर शाप दिल्याचे सांगितले जाते. राघोजींना याबद्दल वाईट वाटले पण त्यांनी या शापांची पर्वा केली नाही. मात्र जेव्हा राघोजी भोसले नागपूरला पोहोचले तेव्हा त्यांना गंभीर आजारानं घेरलं.
या आजारावर सगळी औषधोपचार केले, प्रार्थना केल्या, पण राघोजींच्या तब्येतीत कुठलीही सुधारणा झाली नाही. त्यानंतर शेवटचा पर्याय म्हणून राजपुरोहितांना बोलावण्यात आलं. त्यांनी एकप्रकारे नवस केला कि, राजा रोगमुक्त झाले तर दारागंज येथील नागवासुकी मंदिराचा जीर्णोद्धार केला जाईल. आणि कथेप्रमाणे राजा ठणठणीत बरे झाले.
आता नवस केल्याप्रमाणे तो फेडणंही भाग होत. त्याप्रमाणं राजपुरोहित श्रीधर यांनी नागवासुकी मंदिराचा जीर्णोद्धार तर केलाच, पण गंगेच्या काठावर पक्के घाटही बांधले. असेही म्हंटले जाते कि, या घटनेनंतर राघोजी भोसले मंदिराचे अनन्य भक्त बनले. ते जोपर्यंत जिवंत होते, तोपर्यंत त्यांनी मंदिराच्या देखभालीसाठी देणग्या देण्यासोबत अनेक प्रकारची मदत सुद्धा करत राहिले.
आता इतक्या वर्षांनंतरही हे पौराणिक महत्त्व असलेले नागवासुकी मंदिर आपले अस्तित्व टिकवून आहे, याच्या श्रेयात सगळ्यात मोठा वाटा राघोजींचा आहे.
हे ही वाच भिडू :
- झोप नाहीतर मराठा येतील. बंगालमधली हि मराठ्यांची दहशत रघुजीराजे भोसले यांच्यामुळे झाली होती.
- तीन लाख लोकांची कत्तल करणारा इराणचा सम्राट जेव्हा थोरल्या छत्रपतींचे नाव ऐकताच पळून गेला..
- मराठ्यांच्या भितीने महाराष्ट्रापासून २,००० किलोमीटर दूरवर बांधण्यात आलेला मराठा डीच